Monday, August 21, 2017

डभोईची लढाई आणि किल्ला (Battle of Dabhoi & Dabhoi Fort , Offbeat Gujrat)

Hira Gate , Dabhoi



         गुजरात मधील सरदार सरोवर धरण पाहाण्यासाठी हल्ली बरेच पर्यटक जातात . बडोद्याहून सरदार सरोवराकडे जाताना ३० किलोमीटरवर डभोई नावाचे तालुक्याचे गाव लागते . गुजरात मधल्या डभोईचा महाराष्ट्राशी संबंध म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी लढाई डभोई किल्ल्याच्या साक्षीने झाली होती. १ एप्रिल १७३१ रोजी छत्रपती शाहूंचे पेशवे बाजीराव यांची सेनापती त्रिंबकराव दाभाडे, पिलाजी गायकवाड, पवार,  निजाम यांच्या सयुक्त सैन्याशी लढाई झाली होती.



या लढाईची पार्श्वभूमी थोडक्यात अशी होती. गुजरात आणि माळव्याच्या चौथाई वरुन बाजीराव आणि दाभाडे यांच्यात बेबनाव झाला होता. त्याचवेळी माळव्याची चौथाई वसूलीचे हक्क बाजीरावाने शिंदे, होळकर यांना दिले. त्यामुळे धारचे पवार नाराज झाले. चिमाजी आप्पांनी मुघला विरूध्द गुजरातेत आघाडी उघडलेली होती त्यामुळे पिलाजी गायकवाड नाराज झाले होते. बाजीरावाच्या वाढत्या प्रस्थामुळे अनेक जण नाराज झाले होते. या नाराजाना एकत्र करुन त्रिंबकरावांनी बाजीरावा विरूध्द आघाडी उघडली. त्यासाठी त्यांनी मराठ्यांचा शत्रू असलेल्या निजाम उल हकशी पण संधान साधले. निजामालाही बाजीरावाचा सत्ता विस्तार खुपत होता त्यामुळे तोही असंतुष्टाना सामिल झाला. महम्मदखान बंगश या मुघल सरदाराकडे माळवा प्रांताची सुभेदारी होती. बाजीराव, शिंदे, होळकर यांनी माळवा काबिज केल्याने बंगशही असंतुष्टाना मिळाला. 

खरे पाहायला गेले तर हा शाहू महाराजांच्या पेशव्या आणि सेनापती मधला तंटा होता. तो त्यांनी शाहू महाराजांच्या दरबारात सोडवणे आवश्यक होते. पण बाजीराव उत्तरेच्या मोहीमेत गर्क असल्याचे पाहून दाभाडेनी निजाम आणि इतर असंतुष्टांशी संधान बांधले. हा सरळसरळ राजद्रोह होता. छत्रपती शाहूंनी दाभाड्यांना पत्र लिहून समज दिली. पण दाभाडॆंनी त्याकडे दुर्लक्ष करुन ऑक्टोबर १७३० मध्ये गुजरातकडे कुच केली आणि बडोद्याच्या अलिकडे नर्मदा आणि ओरसंग नद्यांच्या संगमावर असलेल्या कर्नाली गावात त्यांने सैन्याचा तळ ठोकला.

हैद्राबादहून निघालेला निजाम गुजरातमध्ये थेट न येता माळव्याचा मुघल सुभेदार बंगश याला भेटायला माळव्यात गेला. तेथे नर्मदा नदीकाठी अकबरपूर येथे त्याची आणि बंगशची २६ मार्च १७३१ ला भेट झाली. 

बाजीराव दसर्‍या नंतर पुण्याहून निघाले. ते खानदेश मार्गे थेट अहमदाबादला पोहोचले. मुगल बादशहाने अभयसिंहला गुजरात प्रांताची सुभेदारी दिलेली होती. बाजीरावांनी अभयसिंहाची भेट घेऊन त्याच्याशी तह करुन आपली उत्तरेची बाजू निर्धोक केली. त्याआधी चिमाजी आप्पानेही सुरतच्या मोगल सुभेदार सरबुलंद खान याच्याशी करार करुन गुजरात मधून महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग निर्धोक केला होता.  


बाजीरावाच्या सैन्य मोक्याच्या जागी कसे विखुरलेले होते ते पाहू. चिमाजी आप्पा बडोद्याला आपले सैन्य घेउन होते. शिंदे आणि होळकर धार, मंडू उर्फ मांडवगड परिसरात होते. बंगश आणि निजामाच्या सैन्याला ते काही काळ रोखून धरु शकले असते. पिलाजी जाधवांचे सैन्य खानदेशात होते. गुजरात मधून महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग त्यामुळे निर्धोक होता. अशा प्रकारे आघाडी आणि पिछाडी दोन्ही सुरक्षित करुन निजाम - बंगशचे सैन्य आणि दाभाड्यांचे सैन्य एकत्र येण्यापूर्वी दाभाड्यांच्या सैन्यावर हल्ला करणे आवश्यक होते.  

Battle of  Dabhoi 

       त्यासाठी बाजीरावांनी जलद हालचाली केल्या. अहमदाबादहून बाजीराव निघाले ते बडोद्याला पोहोचले. तेथे त्यांना चिमाजी आप्पांचे सैन्य येऊन मिळाले. दाभाड्यांचे सैन्य ४०००० जणांचे होते तर बाजीरावांचे सैन्य त्याच्या निम्मे होते. बाजीरावांनी दाभाडे यांना सला करण्यासाठी निरोप पाठवला. पण दाभाडे युध्द सज्ज झाल्याचे पाहून बाजीराव डभोई जवळ पोहोचले. डभोईला किल्ला होता पण ती जागा युध्दासाठी योग्य नसल्याने बाजीरावांनी डभोई बडोदा रस्त्यावर डभोई पासून ९ किमीवरील थुवाई गावाकडे मोर्चा वळवला. १ एप्रिलला दोन्ही सैन्यात लढाई झाली. ९ तास चाललेल्या या युध्दात दाभाडे गोळी लागून मारले गेले. उदाजी पवार, गायकवाड पकडले गेले. बाजीरावांनी त्यांना मानाची वस्त्रे देऊन बडोदा आणि धारच्या चौथाईचे हक्क दिले. निजाम आणि बंगश नर्मदेकाठी अकबरपूरा गावात असतानांच त्यांना बाजीरावने युध्द जिंकल्याचे कळले. त्यामुळे निजाम आल्यापावली परत हैद्राबादला गेला. युध्दा नंतर बाजीरावनेही जलद हालचाली करत पुणे गाठले. तेथे थोडा काळ थांबुन छत्रपती शाहूंची भेट घेतली. निजाम आणि मोगल या मराठ्यांच्या शत्रूशी युती केल्याने सहानुभूती गमावलेल्या दाभाडे यांच्या मुलांना छ. शाहू महाराजांनी सेनापती पद दिले. पण त्यानंतरच्या काळात मराठ्यांच्या सेनापतींचे महत्व उत्तरोत्तर कमी होत गेले आणि त्याचवेळी पेशव्यांचे प्रस्थ वाढत गेले. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला डभोई किल्ला १ तासात पाहाता आरामात येतो.

नांदोडी भागोल (Nandodi Bhagol, Dabhoi)


सहाव्या शतकात बांधलेल्या डभोई उर्फ दर्भावती हा किल्ला वेगवेगळ्या काळात  सोलंकी वाघेला , मुगल , मराठे यांच्या अधिपत्याखाली होता हा नगर कोट असल्याने  भारतातल्या सगळ्या नगरकोटांची जी अवस्था झाली आहे तशीच डभोईची अवस्था झाली आहे . किल्ल्यात असलेल्या नगराने वाढता वाढता किल्ल्यालाच गिळून टाकलेले आहे . किल्ल्याचेच सामान वापरुन  यातील अनेक घर बांधलेली आहेत . इतर नगर कोटात उरतात त्याप्रमाणे येथेही किल्ल्याचे चार दिशांना असणारे चार दरवाजे उरलेले आहेत . पण हे दरवाजेच या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहेत. १२ व्या शतकात बांधलेले, अप्रतिम कोरीवकाम असलेले हे दरवाजे पाहाण्यासाठी डभोईला वाट वाकडी करुन जायला हरकत नाही.गुजरात पुरातत्व खात्याने हे दरवाजे अतिशय सुंदरपणे जतन केले आहेत . त्यांच्या संरक्षणासाठी केवळ संरक्षित स्मारकाचा निळा फलक  न लावता त्याठिकाणी रक्षक नेमलेले आहेत .





















बडोद्याकडून गावात शिरतानाच डाव्या बाजूला किल्ल्याचा एक बुरुज त्याच्या बाजूची तटबंदी आणि पाण्याने भरलेला खंदक आणि तलाव पाहायला मिळतो. गावात शिरल्यावर आपल्या समोर येते किल्ल्याचे भव्य असे पश्चिम व्दार याला वडोदरा भागोल (प्रवेशद्वार) या नावाने ओळखले जाते. २० फुट उंच असलेला दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी पिवळ्या दगडात  (सॅंडस्टोन) मध्ये बांधलेली आहे . या दरवाजाला ६ कमानी असून त्या लाल दगडात बनवलेल्या आहेत. या कमानींवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. त्यात पक्षी, फुल , वेलबुट्टी , व्याल , किर्तीमुख यासारखे काल्पनिक प्राणी कोरलेले आहेत . दोन कमानींच्या मधल्या भागात विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजूला २० खांब असलेले एक सुंदर दालन आहे . हा दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो. त्याला उत्तर दरवाजा , माहुडी भागोल या नावाने ओळखले जाते . या दरवाजातून जाणाऱ्या रस्त्याने रहदारी चालू असते . दरवाजा ५ कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीवकाम केलेले आहे . दोन कमानींच्या मध्ये मुर्ती आहेत . यापुढील दरवाजा पूर्व दिशेला आहे . या दरवाजाला हिरा भागोल या नावाने ओळखले जाते. किल्ल्याचा हा सर्वात सुंदर दरवाजा असून या दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या तटबंदीत १०० मीटर अंतरापर्यंत अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे . यात अनेक गवाक्षे , देवकोष्टके आहेत. त्यात शंकर , विष्णू, लक्ष्मी , चामुंडा अशा अनेक देवदेवतान्च्या मुर्ती आहेत . समुद्रमंथना पासून अनेक पौराणिक प्रसंग कोरलेले या ठिकाणी पाहाता येतात. घोड्यावर बसलेले योध्दे , हत्ती , हंस , व्याल फुले , वेलबुट्टी याने हा दरवाजा सजवलेला आहे . दरवाजा ६ कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीवकाम केलेले आहे . या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस एक दरवाजा असून त्याची कमान ढासळलेली आहे पण उरलेल्या भागावरील कोरीवकाम सुंदर आहे .

Carving on Hira Bhagol, Dabhoi

Carving on Hira Bhagol, Dabhoi

Carving on Hira Bhagol, Dabhoi

Carving on Hira Bhagol, Dabhoi

१२ व्या शतकात बांधलेल्या या दरवाजा बद्दल एक दंतकथा या भागात प्रचलित आहे . या दरवाजाचे बांधकाम करणारा स्थापिती हरीधर याने या दरवाजासाठी आणलेले दगड चोरुन आणि इथलेच मजूर वापरुन आपल्या बायकोसाठी तेन तलाव नावाचा तलाव डभोई पासून ३ किमीवर बांधला . हा अपहार राजाला कळल्यावर हरीधरला या दरवाजातच चिणून मारण्यात आले . त्यामुळे या दरवाजाचे नाव हिरा भागोल पडले आहे .किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे दक्षिण दरवाजा हा दरवाजा नांदोडी भागोल या नावने ओळखला जातो. सहा कमानी असलेल्या या दरवाजाच्या कमानींवर आणि दरवाजाच्या वरही कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजाच्या संरक्षणासाठी बाहेरच्या बाजूस अजून एक दरवाजा बांधलेला आहे . 

Vadodara Bhagol, Dabhoi

Vadodara Bhagol, Dabhoi

माहुडी भागोल (Mahudi Bhagol, Dabhoi)

Hira Bhagol second gate


जाण्यासाठी :- बडोदा - डभोई राज्य मार्ग १६१ ने बडोद्यापासुन ३० किमीवर डभोई गाव आहे .

मुंबईहून बडोद्याकडे येताना बडोद्याच्या अलिकडे करजन गाव आहे . करजन गावातून राज्यमार्ग १११ ने डभोईला जाता येते . अंतर ३० किमी आहे .





दक्षिण गुजरात मधील किल्ले हा लेख वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा 
https://samantfort.blogspot.com/2018/12/blog-post.html?m=1


Second gate of Nandodi Bhagol, Dabhoi

#Bajiraopeshawa#battleofdabhoi#offbeatgujrat#offbeatplacesnearbaroda#

Friday, August 11, 2017

Parasa Lepida



आपलं शहरी जीवन एवढं व्यस्त झालयं की, आपल्या आजूबाजूला निसर्गात घडणार्‍या छोट्या गोष्टींकडे आपले पटकन लक्ष जात नाही. माझ्या घराला लागून आंब्याचा डेरेदार वृक्ष आहे. त्यावर ऋतुमानाप्रमाणे येणारे विविध पक्षी आणि फ़ुलपाखरे यांची आता माहिती झालेली आहे. त्यात नविन कोणी दिसला तर आमची घरतल्यांची चर्चा होते. दरवर्षी घरटी करणारे रातबगळे, गाय बगळे, कावळे, नाचण, शिंपी, पोपट, वटवाघूळ, विविध प्रकारचे पतंग आमच्या परिचयाचे झालेले आहेत. ( त्यावर "माझा पावसाळी मित्र" हा ब्लॉग लिहिलेला आहे. ब्लॉग वाचण्याकरीता लिंकवर टिचकी मारा https://samantfort.blogspot.com/2014/10/indian-bird-night-heron.html)



आज सकाळी नेहमीप्रमाणे ऑफ़ीसला जायच्या घाईत होतो. पु.ल.नी म्हटल्या प्रमाणे मुंबईकर असल्यामुळे माझ्या आयुष्याचे ७.४७ वाजलेले आहेत. नेहमीप्रमणे वेळेच गणित चुकले होते. सकाळीचे ७.४७ ची फ़ास्ट लोकल पकडायची म्हणून घाईघाईने जीना उतरुन फ़ुटपाथवर आलो. आमच्या सोसायटीचे कंपाऊंड आणि फ़ुटपाथ यांच्या मध्ये आंब्याच झाड आहे, या झाडाखाली पोपटी रंगांचे पुंजके पडलेले दिसले. पावसाळ्यात झाडाच्या फ़ांद्यावर , बुंध्यांवर शेवाळे येते, काही बांडगुळे वस्तीला असतात त्यापैकी एक असेल म्हणून दुर्लक्ष केले आणि रिक्षा पकडायला पुढे निघालो. मग एकदम लक्षात आले की, शहरातल्या झाडवर प्रदुषणामुळे सहसा शेवाळे (मॉस) येत नाही. जंगलात मात्र पावसाळ्यात आपल्याला झाडावर शेवाळे हमखास बघायला मिळते. पुन्हा मागे वळलो आणि नीट पाहिल्यावर कळले की पोपटी रंगांचे अनेक सुरवंट झाडाच्या बुंध्यापाशी पडलेले आहेत. पोपटी रंगाचे गवतासारखे पुंजके त्याच्या अंगावर होते. पाठीवर मध्यभागी डोक्यापासून शेपटी पर्यंत निळ्या रंगाचा पट्टा दिसत होता. सुरवंट कितीही गोंडस दिसत असला तरी त्याला हात लावणे मुर्खपणाचे होते. कारण त्यांच्या गवताच्या पुंजक्या सारख्या दिसणार्‍या भागात सौम्य विष असणार त्यामुळे सुरवंटाला हात लावाला तर खाज येणे,पूरळ उठणे असे प्रकार होतात. आपल्या शत्रूंपासून बचाव करण्यासाठी निसर्गानेच ही योजना केलेली असते. जवळ पडलेल्या काडीने सुरवंट उलटा करुन पाहिल्यावर लक्षात आले की, त्याच्या दोन्ही बाजूलाही निळ्या रंगाच्या रेषा आहेत. अशा प्रकारचे सुरवंट मी याठिकाणी पहिल्यांदाच पाहात होतो. त्यामुळे त्यांची ओळख पटणे (कुठल्या फ़ुलपाखराचे आहेत) शक्य नव्हते. त्यामुळे स्मार्ट फ़ोन काढून त्यावर फ़ोटो घेतेले आणि ट्रेन पकडायला पळालो.

आंब्याच्या झाडाखाली पडलेले सुरवंट


आजकाल अनेक साईट, कम्युनिटी उपलब्ध आहेत ज्यावर जाऊन आपल्याला सुरवंट, फ़ुलपाखरे, पतंग यांची ओळख पटवता येते. त्यापैकी एखाद्या साईटवर जाऊन शोधावे असा विचार केलेला. पण नेहमीप्रमाणे ट्रेनला तुडूंब गर्दी होती. आपलेच हातपाय गोळा करुन एकत्र आणून सरळ (ताठ नव्हे) उभे राहाण्याची मारामारी असतांना, डोंबिवलीत ट्रेन मध्ये चढून त्या गर्दीत व्हॉट्साप करणारे, इतरांना धक्के देत गेम खेळणारे यांच्या बद्दल मला प्रचंड आदर आहे. लोकांना आपला त्रास होतो याची अजिबात पर्वा न करण्याचा निर्लज्ज कोडगेपणा यांच्यात कुठून येतो हे मला अजून समजलेले नाही. दिवसभराच्या रगाड्यात सुरवंट विसरुन जाउ नयेत म्हणून मी आमचे एन्व्हॉर्मेंट सायन्सची प्रोफ़ेसर प्रणॊतीला फ़ोटो पाठवून दिले. १० मिनिटात तिचा रिप्लाय आला "Parasa Lepida" Catterpillar. प्रणोती आणि चिन्मय खानोलकर हे दोघे एन्व्हॉर्मेंट सायन्सचे प्राध्यापक माझ्या अशा अनेक शंकांची न कंटाळता उत्तर देत आले आहेत. त्यांच्या बरोबर ट्रेकला गेले की निसर्गातली अनेक गुपित ते आपल्या समोर साध्या सोप्या भाषेत उलगडतात. प्रणोतीने सुरवंटाचे नाव सांगितल्यावर त्याने पान कुरतडायचे सोडून माझा मेंदू कुरतडायला सुरुवात केली.
सुरवंटानी आंब्याच्या पानांची केलेली चाळणी  

 
गुगलवर त्याबद्द्ल भरपूर माहिती आणि काही व्हिडीओज उपलब्ध आहेत. त्याचे कारण म्हणजे या सुरवंटाचे उपद्रव मुल्य. आंबा, रबर, नारळ, पाम, चहा, कॉफ़ी, केळी इत्यादी नगदी पिक देणार्‍या झाडांवर हे खादाड सुरवंट वाढतात आणि त्यांची पाने खाऊन त्याचे अपरिमित नुकसान करतात. या सुरवंटानी हल्ला केलेल्या नारळाच्या किंवा पामच्या झाडाची पाने खाल्यामुळे हिराच्या झाडू सारखे दिसायला लागतात. त्यानंतर झाडाला पहिले ६ महिने कमी फ़ळे येतात. त्यापुढील २० महिने फ़ळेच येत नाहीत. झाडाला पहिल्या सारखी फ़ळे येण्यासाठी ४० महिन्यांचा कालावधी जावा लागतो. म्हणजे जवळजवळ चार वर्ष त्या बागायतदाराला किती नुकसान होत असेल याचा अंदाज करता येईल. कदाचित त्याच्या या उपद्रवमुल्यामुळे त्याला  Parasa - Pasasite म्हणत असावेत. 

 या सुरवंटा पासून Limacodidae कुळातला Parasa Lepida हा पतंग तयार होतो. पतंग (Moth) आणि फ़ुलपाखरु (Butteerfly) यात अनेक मुलभूत फ़रक आहेत. पण आपण सरसकट सर्वांनाच फ़ुलपाखरु म्हणतो. दिवसा आपल्याला रंगीबेरंगी फ़ुलपाखरे उडताना दिसतात. तर पतंग रात्रीच्या वेळी उडतात . त्यांचे रंगही मातकट असतात. फ़ुलपाखरांचे पंख नाजूक असतात. तर पतंगांचे पंख जाडेभरडे असतात. फ़ुलपाखरांच्या मिशा (Antennae) नाजूक असतात आणि त्याच्या टोकाला बटणांसारखा गोल भाग असतो. पतंगांच्या टोकाला बटणांसारखे गोल भाग नसतात. फ़ुलपाखरु बसतांना पंख मिटून बसते तर पतंग आपले पंख पसरुन बसतात.


Parasa Lepida Moth


Limacodidae या कुळातला पतंग (Moth) पानांच्या टोकावर खालच्या बाजूला अंडी घालतो. फ़ुलपाखरांच्या/ पतंगाच्या पायाला असलेल्या सेंसर्सनी पानातल्या रस तपासला जातो. पतंगाची मादी योग्य वनस्पतीचे पानं मिळेपर्यंत या झाडा वरुन त्या झाडावर उडत राहाते. योग्य झाडाचे कोवळे पानं मिळाल्यावर त्यावर अंडी घातली जातात.  सहा दिवसांनी अंड्यातून सुरवंट बाहेर येतो. बाहेर आल्यावर कोशात जाई पर्यंत ४० दिवस तो खादाडी सुरु ठेवतो. पानाच्या टोकापासून सुरुवात करुन देठा पर्यंत पान खात खात हा सुरवंट पुढे सरकतो. तो पानाच्या शिरा खात नसल्याने शेवटी देठ आणि पानांच्या शिरांचे फ़राटेच उरतात. पक्षी आणि cuckoo wasp जातीच्या निळ्या किंवा हिरव्या मेटॅलीक रंगाची माशी हे या सुरवंटाचे नैसर्गिक शत्रू आहेत. कुकू वास्प माशीची पण गंमत आहे. ती पाना आड दडलेल्या या सुरवंटाला शोधत असते. एकदा का सुरवंट सापडला की ती त्याच्या अंगावर आपली अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या त्या सुरवंटावर वाढतात. त्याचा फ़न्ना उडवून टाकतात. सुरवंटांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी निसर्गाने योजलेले हे उपाय आहेत. "जीवो जीवस्य जिवनम्". अशा प्रकारच्या संकटा मधून वाचलेले सुरवंट स्वत: भोवती तपकिरी रंगाचा कोश तयार करतात. २२ दिवस कोशात राहिल्यावर त्यातून पतंग बाहेर पडतो. मातकट रंगाच्या या पतंगावर डोक्यापासून पंखांपर्यंत पोपटी पट्टा असतो. अशाप्रकारे अंड्यापासून सुरवंट- कोश - पतंग असे जीवनचक्र चालू राहाते.



२०१७ साली सुरवंट मी आंब्याच्या झाडावर प्रथम पाहिले त्यानंतर त्यांनी या झाडावर बस्तान बनवले सुरवंटांची भूक राक्षसी असते. त्यामुळे झाडाची पान मोठ्या प्रमाणावर त्यांनी फ़स्त केली . त्यामुळे २०१८, २०१९ या दोन वर्षात झाडावर फ़ार कमी आंबे लागले. आंबा सदाहरीत वृक्ष आहे पण २०२० च्या जानेवारीत या आंब्याच्या झाडाची पान झडायला सुरुवात झाली आणि एकवेळ अशी आली की झाडाच्या एका भागावर एकही पान नव्हते.  झाड भुंडे झाले होते. आंब्याच्या झाडावर असे मी पहिल्यांदाच पाहात होतो. मला वाटले सुरवंटांमुळे झाडाचा एक भाग नष्ट झाला .प्ण आठवड्या भरात फ़ांद्यांवर लालसर पालवी दिसायला लागली.. आणि त्यानंतर झाड पुन्हा तजेलदार पानांनी बहरल. २०२० मध्येही मोहोर यायचा महत्वाचा काळ पाने झडवण्यात गेल्याने आंबे कमीच आले आहे. कदाचित सुरवंटाचा नायनाट करण्यासाठी या सदाहरीत झाडाने असे केले असेल का ? याबाबतीत या विषयातल्या तज्ञांना विचारले. त्यांनी सांगितले स्वसंरक्षणासाठी झाडे अशा प्रकारे वागतात. झाडाची ही आयडीया किती प्रमाणात सफ़ल झाली ते येणार्‍या काळात कळेलच. 

अदृश्य किटकांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा....

Friday, June 23, 2017

सेंट मेरीज आयलंड , ऊडुपी. (St.Mary's Island , Udupi) Offbeat Karnataka

सेंट मेरीज आयलंड , ऊडुपी.


मुंबईकरांना उडुपी माहिती आहे ते मुंबईतल्या उडुपी हॉटेल्समुळे आणि उडुपीतल्या प्रसिध्द श्रीकृष्ण मंदिरामुळे. या उडुपीला सुंदर समुद्र किनारा आहे त्याच नाव आहे मालपे बीच. या बीच पासून  ६ किलोमीटर अंतरावर निसर्गातील एका आश्चर्याने समुद्रातुन डोक वर काढलेल आहे, ते म्हणजे सेंट मेरीज आयलंड. पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्ट्कोनी अशा उभ्या बेसॉल्ट खडकाच्या स्तंभांनी ही चार बेट बनलेली आहेत. भारतातली अशा प्रकारची ही एकमेव बेट असुन, जिओग्राफ़िकल सर्व्हे ऑफ़ इंडीयाने २००१ साली या बेटांना "नॅशनल जिओग्राफ़िक मॉन्युमेंटचा" दर्जा दिलेला आहे.


उडुपी बस स्थानका पासून ५ किमीवर जेटी आहे. सेंट मेरीज आयलंडला जाण्यासाठी येथून बोटी सुटतात. बोटीचे तिकीट रुपये १००/- असून ३० लोक जमा झाल्याशिवाय बोट सोडत नाहीत. त्यामुळे शक्यतो सुट्टीचा दिवस आणि संध्याकाळी ४ च्या दरम्यान जावे म्हणजे सुर्यास्त पाहून परतता येते. बेटावर वस्ती नसल्याने खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळत नाहीत.. त्यामुळे त्या सोबत बाळगाव्यात. धक्क्यावरुन साधारण अर्ध्या तासात आपण सेंट मेरीज आयलंडपाशी  पोहोचतो. स्थानिक दंतकथे प्रमाणे केरळला जाण्यापूर्वी १४९८ मध्ये वास्को द गामा प्रथम या बेटांवर आला आणि मदर मेरीच्या नावावरून त्याने या बेटाला सेंट मेरी आयलंड (ओ पाड्रो दी सांता मारीया) असे नाव दिले. या ठिकाणी  कोकनट आयलंड ( या बेटावर नारळाची झाड आहेत.), नॉर्थ आयलंड, दर्या बहादुरगड आयलंड आणि साऊथ आयलंड या चार मोठ्या बेटांनी समुद्रातून डोके वर काढलेले आहे. यातील कोकनट आयलंड म्हणजेच (सेंट मेरीज आयलंड) वर बॅसॉल्ट खडकाचे बहुकोनी स्तंभ आहेत.



   बेटा जवळ बोट आल्यावर दुरुनच बेटावर आणि समुद्रात आजूबाजूला विखुरलेले बेसॉल्टचे स्तंभ दिसायला लागतात. बेट २४ एकरावर पसरलेले आहे. बेटावर काही माडाची झाड आणि खुरटी झुडप पाहायला मिळतात. बेटावरची जमिन वाळुने बनलेली नसून चक्क शंख शिंपल्यांनी बनलेली आहे. बेटावर अगणित शंख शिंपले पाहायला मिळतात. एवढ्या मोठ्या प्रमाणवर शंख शिंपले इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतात.या बेटाला वाळूचा किनारा नसून या शंख शिंपल्यांनी बनलेला किनारा आहे. बेटाच्या आजूबाजूला खडक असल्याने समुद्रही पोहोण्याच्या लायक नाही आहे. बेटावर फ़िरतांना वरुन पाहिले तर कासवाच्या पाठीसारखे आणि बाजूने पाहिले तर खांबांसारखे दिसणारे बेसॉल्टचे दगडी स्तंभ दिसायला लागतात. 

६० दशलक्ष वर्षापूर्वी लाव्हारसामुळे दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली त्याच वेळी या बेटाची आणि त्यावरील स्तंभांची निर्मिती झाली. या स्तंभांसारख्या रचनेला "कॉलम्नर जॉईंट" म्हणतात. चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्ट्कोनी अशा बहुकोनी आकारात तयार झालेले हे स्तंभ एकमेकाला चिकटलेले असतात. ज्वालमुखीच्य उद्रेका नंतर लाव्हारस जर खोलगट भागात जमा झाला तर अशा प्रकारची रचना तयार होण्याची शक्यता असते. लाव्हारस थंड होण्याची प्रक्रीया पृष्ठभागापासून चालू होते. वरचा भाग थंड झाल्यावर हळूहळू खालचा भाग थंड होत जातो. अशा प्रकारे द्रवरुपातून घनरुपात येतांना तो आकुंचन पावतो आणि त्यामुळे त्याला भेगा पडतात. सामान्यत: या भेगा एकमेकांशी ६० अंशाच्या कोनात पडतात. त्यामुळे दगडाला षटकोनी आकार येतो. या भेगा पृष्ठभागाशी ९० अंशाचा कोन करतात त्यामुळे षटकोनी आकाराचे उभे स्तंभ तयार होतात. जर भेगा पडण्याच्या प्रक्रीयेत काही बाधा आली तर चौकोनी, पंचकोनी आकारचे स्तंभ तयार होतात. 

वर्षानूवर्षे लाटांच्या आणि वार्‍याच्या मार्‍यमुळे या ठिकाणी अनेक स्तंभ तुटून पडलेले पाहायला मिळतात. बेटावर काही सेंटीमीटर उंच ते जास्तीत जास्त ३ ते ४ मीटर उंचीचे स्तंभ पाहायला मिळतात. 

दगडी स्तंभांचे विविध आकार, त्यावर फ़ुटणार्‍या लाटा आणि विविध आकाराचे, रंगांचे शंख शिंपले गोळा करतांना वेळ कसा जातो ते कळत नाही. बोटीचा परतीचा इशारा देणारा भोंगा वाजायला लागतो. समुद्रात बुडणार्‍या सूर्याला साक्षीला ठेऊन आपण या सुंदर बेटाचा निरोप घेतो.



जाण्यासाठी :- कर्नाटकातील उडुपी स्थानक कोकण रेल्वे वरील महत्वाचे स्थानक आहे. या ठिकाणी सर्व गाड्या थांबतात. उडुपीत राहाण्यासाठी अनेक हॉटेल्स आहेत. कोस्टल कर्नाटक सहलीत वाट थोडी वाकडी करुन आपण उडुपी आणि सेंट मेरी आयलंडचा समावेश करु शकतो.


अमित सामंत

#Offbeatkarnataka

Friday, June 16, 2017

ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) Offbeat Places near Jodhpur,Rajasthan

ओसिया


राजस्थानातील जोधपूरला पाहण्याच्या यादीत क्लॉक टॉवर, मेहरानगढ किल्ला, जसवंतथाडा, मंडोर इत्यादी ठिकाण होती. स्थानिक रिक्षावाले, हॉटेलवाल्यांशी गप्पा मारतंना ओसिया गावाच नाव समजले. त्या ठिकाणी सचिया मातेच मंदिर आहे आणि ओसिया पासून जवळच वाळूच्या टेकड्या आहेत आणि उंटावरुन किंवा जीप मधून तुम्ही त्यावर फ़िरु शकता असेही कळले. जोधपूर पासून ६० किमीवर अंतरावर ओसियॉ गाव आहे. बसने गावात पोहोचल्यावर गावाच्या बाहेरच रस्त्यालगत दगडात बांधलेली अप्रतिम मंदिर दिसली. बस मधून उतरुन थेट मंदिरे गाठली. नेहमी प्रमाणे पूरातत्व खात्याच्या निळ्या फ़लकाने स्वागत केले. स्मारक संरक्षित असले तरी त्याला काहीही संरक्षण नव्हते. शेळ्या मेंढ्यांचा मंदिरात मुक्त वावर होता आणि गावाची कचराकुंडीही तेथेच होती. रस्ताच्या एका बाजूला ३ आणि दुसर्‍या बाजूला एक मंदिर होते. रस्त्या लगत असलेल्या मंदिराचा कळस तुटलेला होता. पण त्याचा गजपृष्ठाकृती सभा मंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दगडात केलेले हे काम पाहाण्यासारखे आहे. छतावर आणि खांबांवर कोरीवकाम आहे. गर्भगृहात मुर्ती नाही. त्याच्या बाजूचे हरीहरचे मंदिर हे शिल्पकामाचा अप्रतिम नमुना आहे. शेव आणि वैष्णव पंथातील वाद पराकोटीला पोहोचला होता तेंव्हा तो मिटवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर केला गेला. त्यातूनच मुर्तीशास्त्रात हरीहर या कल्पनेचा उदय झाला. यात एकाच मुर्तीत उजव्या बाजूला शिव आणि डाव्या बाजूला विष्णू त्याच्या आयुध, अलंकार आणि वाहानांसह कोरलेला असतो.उजवीकडे शंकराच्या जटा, गळ्यातील रुंडमाळा, हातात डमरु, त्रिशुळ, पायाषी गण आणि नंदी दाखवलेले असतात, तर डाव्या बाजूला विष्णूचा मुकुट, गळ्यात वैजयंती माळा, हातात शंख, चक्र आणि पायाशी गरुड दाखवलेला असतो. या मंदिराच्याही गर्भगृहात मुर्ती नाही. पण मंदिराच्या सभा मंडपातील खांब, छत यावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हरीहर, त्रिविक्रम अवतार, नरसिंहावतार, शंकराची केवलमुर्ती, गणपती, महिषासुर मर्दीनीची मुर्ती आणि इतर मुर्ती कोरलेल्या आहेत. मुर्तींच्या वरच्या शिल्प पटावर रामायण , महाभारत, पुराणातील कथा आणि काही मैथुन शिल्प कोरलेली आहेत. तिसरे मंदिर शंकराचे आहे ते सध्या पुजेत आहे. या मंदिराच्या पुढे एक सुंदर पुष्कर्णी बांधलेली आहे. सध्या मात्र ती कचर्‍याच्या विळख्यात सापडलेली आहे. 




ओसिया हे थर वाळवंटाच्या काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्वाचे स्थान होते. ८ व्या शतकात याठिकाणी प्रतिहार घराण्याची सत्ता होती. त्यांनी ८ ते १२ शतकाच्या दरम्यान याठिकाणी अनेक हिंदु आणि जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे. हि तीन मंदिर पाहून छोट्या टेकडीवर असलेल्या सचिया माता मंदिराकडे जातांना आजुबाजूला हाराची, प्रसादाची दुकान हॉटेल्स दिसतात. सचिया माता म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. याठिकाणी मुख्य मंदिरात सचिया माता व त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबा मातेची मंदिरे आहेत. ही मुळ मंदिरे ८ व्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे अनेक रुपात कोरलेले व्याल ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  ८ व्या शतकात बांधलेले महावीर मंदिर हे सुध्दा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही दोन्ही मंदिरात सध्या पूजा होते.

 \


 


या भागात काही रिसॉर्ट आहेत. डेझर्ट सफ़ारी, तंबूतील निवास, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशी पॅकेजेस ते देतात, पण ती खूपच महागडी आहेत. अशा मुद्दाम (आर्टीफ़िशियली) तयार केलेल्या रिसॉर्ट मध्ये राहाण्यापेक्षा येथील गावात टिपिकल राजस्थानी घरात राहाण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. टेकड्यांपासून ५ किमीवर असलेल्या खेमसरगावातील सिवरों की ढाणी या वस्तीवर आमच्या जीपवाल्याचे घर होते. तेथे त्याने जेवणाची व्यवस्था केली होती. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. पुन्हा वाळूच्या टेकड्यांवरुन उड्या मारत जीप वस्तीत पोहोचली. रस्त्यात एक फ़ोर व्हील ड्राईव्ह जीप मुलांना घेऊन शाळेत जातांना दिसली, हिच येथल्या मुलांची स्कुल बस. पाच सहा घरांची वस्ती असलेल्या सीवरों की धानी वस्तीजवळ मोर, नीलगाय आणि हरणांनी दर्शन दिले. मातीच्या कंपाऊंडच्या आत तीन गोलकार, गवताने शाकारलेली घर होती. त्यातील एक स्वयंपाक घर, दुसरी राहाण्याची खोली आणि एक पाहूण्यांसाठी जेवणाची खोली होती. मध्यभागी अंगण होते. बाहेर काही उंट झाडाखाली बांधलेले होते. जीप नसल्यास प्रवासाचे हे दुसरे साधन होते. राजस्थानी पध्दतीचे गरमागरम जेवण जेऊन परत ओसिया गाठले. ओसियाहून जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला जाता येते.






मंदोर दुर्ग (Mandore Fort)



जेवण झाल्यावर परत ओसियाला येऊन जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या  ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला उतरावे. या ठिकाणी ६ व्या शतकातला मंदोर दुर्ग, जोधपूरच्या राजांची समाधी मंदिरे आणि म्युझियम आहे. मांडव्य ऋषींच्या वास्तव्यामुळे टेकड्यांच्या सानिध्यात असलेल्या नगराला  मांडिव्यपूर असे नाव पडले. या नगरात मंदोदरी राहात होती. तीचे रावणाशी लग्न झाल्यामुळे मंदोर शहरातील लोक रावणाला आपला जावई मानतात. त्यांनी मंदोर मध्ये रावणाचे मंदिर बांधलेले आहे, दसर्‍याला देशभर रावणाला जाळण्याची प्रथा आहे, पण मंडोर मध्ये तो दिवस रावणाच्या श्राध्दाचा दिवस म्हणून पाळला जातो. 



       मंदोर दुर्ग दोन टेकड्यांवर वसलेला आहे. त्यामधील दरीतून जाणारा पाण्याचा प्रवाह वापरुन सुंदर जोधपूरच्या राजांनी सुंदर उद्यान बनवलेले आहे. स्थानिकांच्या अनास्थेमुळे या ठिकाणी अस्वच्छता आहे. जोधपूरच्या राजघराण्यातील राजांची येथे लाल दगडात बांधलेली समाधी मंदिरे आहेत. मंदोर गार्डन मधील समाधी मंदिरे पाहून व्यवस्थित बनवलेल्या पायर्‍यांच्या मार्गाने मंदोर दुर्गावर जाता येते. इसवीसनाच्या सहाव्या शतकापूर्वी या ठिकाणी दुर्ग होतो. ही प्रतिहार राजवंशाची राजधानी होती. इसवीसनाच्या १४ व्या शतकात प्रतिहारांनी हा किल्ला राठोडांना दिला.  १३९५ मध्ये गुजरातच्या सुतलानाने या किल्ल्याला वेढा घातला पण त्याला किल्ला जिंकता आला नाही. इसवीसन १४५३ मध्ये राव जोधा याने किल्ला जिंकून घेतला. त्याने आपली राजधानी मंदोर दुर्गावरुन जोधपूरच्या किल्ल्यावर हालवली. तेंव्हा पासून याकिल्ल्याचे महत्व कमी झाले. आज किल्ल्यावर एक मंदिर सोडल्यास बाकी सर्व वास्तू उध्वस्त झालेल्या आहेत. किल्या वरील वास्तूंच्या  अवशेषांवरुन या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर वस्ती होती. मंदोर दुर्ग पाहून जोधपूर सिटी बसने संध्याकाळी जोधपूरला परतता येते. 





 




 अमित सामंत

#OffbeatRajasthan

राजस्थानातील इतर अपरिचित ठिकाणांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

1) राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....(Ranapratap ....Chittorgad Fort, Ahar Museum, Haldighati Memorial & Chetak Smarak, Kumbhalgad, Ranakpur Temple)

2) जोधपूरची खाद्य भ्रमंती (what to eat & where to eat in Jodhpur)