Showing posts with label offbeat Gujrat. Show all posts
Showing posts with label offbeat Gujrat. Show all posts

Monday, December 24, 2018

दक्षिण गुजरात मधील किल्ले (Forts in South Gujrat)


दक्षिण गुजरात मधल्या वापी - दमण भागात ६ किल्ले आहेत. मुंबईहून एका दिवसात हे सहा किल्ले पाहून परत येता येते. दक्षिण गुजरात प्रांत महाराष्ट्रातील ठाणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्याने वेढलेला आहे. डांग जिल्ह्यातील घनदाट अरण्यांचा पर्वतीय प्रदेश ते पश्चिम किनार्‍यावरील सुरत, दमण सारखी बंदरे या टापूत दक्षिण गुजरात वसलेला आहे. प्राचिन काळापासून अनेक व्यापारी मार्ग महाराष्ट्रातील बाजारपेठांपासून दक्षिण गुजरात मधील बंदरापर्यंत जात होते. प्राचीन काळी (इसवीसन ९६० ते १२४३) चालुक्यांच्या राजवटीत गुजरातचा परदेशांशी व्यापार भरभराटीला आला होता. इसवीसन १५०९ मध्ये दिव येथे झालेल्या लढाईतील विजया नंतर पोर्तूगिजांनी दमण, सिल्व्हासा या दक्षिण गुजरात मधील भागात आपले बस्तान बसवले. मध्ययुगात सुरत बंदर भरभराटीला आले होते. पोर्तुगिज, इंग्रज ,डच, फ़्रेंच इत्यादी व्यापार्‍यांनी याठिकाणी आपल्या वखारी टाकल्या होत्या. अशा प्राचीन काळापासून गजबजलेल्या या व्यापारी मार्गाच्या आणि बंदरांच्या टेहळणीसाठी तसेच संरक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत किल्ले बांधले गेले. 

यातलेच सहा किल्ले पाहण्यासाठी सकाळीच मुंबईहून ट्रेनने वापी गाठावे. वापीहून खाजगी गाडी केल्यास हे सहा किल्ले व्यवस्थित पाहाता येतात. मुंबईहून खाजगी गाडीनेही हे सर्व किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
     
Entrance Gate of  Parnera Fort

पारनेरा किल्ला (Parnera Fort) :- वापी - सुरत रेल्वेमार्गावर अतुल नावचे स्टेशन आहे. वापीहुन पॅसेंजर ट्रेनने अतुलला जाता येते. अतुल स्थानकातून किल्ल्याचा डोंगर दिसतो. अतुल स्थानक ते किल्ला अंतर २.५ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते. रस्त्याने गेल्यास मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वापीपासून २५ किलोमीटरवर पारनेरा किल्ल्याचा पायथा आहे. अतुल या कंपनीची खाजगी मालमत्ता असल्याचा बोर्ड किल्ल्याच्या पायथ्याशी लावलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. तसेच किल्ल्याच्या उतारावर झाडी जोपासलेली आहे. किल्ल्यावर तीन मंदिरे असल्याने येथे भाविकांची कायम वर्दळ असते. किल्ल्याची उंची ४०० फ़ूट आहे. पायथ्यापासून साधारणपणे अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावरील तटबंदी जवळ पोहोचतो. तटबंदी फ़ोडून किल्ल्यात जाण्याचा मार्ग केलेला आहे. त्या मार्गाने किल्ल्यात न जाता उजवीकडे जाणार्‍या पायवाटेने तटबंदीला वळसा घातल्यावर आपण ६ फ़ूट उंच प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार बुरुजांमध्ये लपवलेले आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर साधारणपणे १० पायर्‍या चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. समोरच गडची रुंदी व्यापणारे कालिकामातेचे मंदिर बांधलेले आहे. जवळच हार, फ़ुले, प्रसाद विकणारी काही दुकाने आहेत. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. माची आणि बालेकिल्ला असे किल्ल्याचे दोन भाग आहेत. दोन्ही भाग तटबंदी आणि बुरुजांनी संरक्षित केलेले आहेत.


Bastion & fortification of Parnera Fort

कालिकामाता मंदिराच्या गाभार्‍याच्या बाजूने गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. बालेकिल्ल्याचा दरवाजा अस्तित्वात नाही. बालेकिल्ल्यावर अनेक उध्वस्त वास्तू पाहायला मिळतात. बालेकिल्ल्यावरुन आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याच्या जवळून वाहाणार्‍या पार नदीचे पात्रही दूरपर्यंत दिसते. या भागात हा एकमेव डोंगर असल्यामुळे टेहळणीच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याचे स्थान किती महत्वाचे होते ते लक्षात येते.     

Water Tank on Parnera Fort

या डोंगरावर नक्की किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. पण किल्ल्यावरील टाक्यांची रचना पाहाता चालूक्यांच्या काळात या किल्लाची उभारणी झाली असावी. त्यानंतर पंधराव्या शतकात हा किल्ला रामनगरच्या राजाच्या ताब्यात होता. मोहमद बेगाडाने हा किल्ला जिंकून घेतला. बेगाडाच्या अंतिम काळात या किल्ल्याचा ताबा पेंढारींकडे गेला. त्यावेळी १५५१ मध्ये दोनदा दमणच्या पोर्तुगिजांनी या किल्ल्यावर हल्ला केला. त्यानंतर हा किल्ला ओस पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये हा किल्ला नव्याने बांधून काढला. त्यानंतर हा किला १७८० पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर वेल्सने हा किल्ला जिंकून घेतला.


Chandika Mata Mandir, Parnera Fort

बालेकिल्ल्या वरील वास्तू पाहात आपण चंडीका माता मंदिरापाशी खाली उतरतो. याठिकाणी चंडीका मातेचे आणि हनुमानाचे मंदिर आहे. सर्वत्र संगमरवर आणि पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूस चांदपीर बाबाचा दर्गा आहे. इथे किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार आणि तिथून खाली उतरणारी पायवाट आहे. दर्गा पाहून पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जेथे पायर्‍या आहेत त्या ठिकाणी तीन मोठ्या तोफ़ा बेवारस पडलेल्या आहेत. या किल्ल्याचे अतुल कंपनी आणि मंदिराच्या ट्रस्टने कॉंक्रीटीकरण करुन टाकले आहे. एवढा खर्च केला आहे त्यात ३ चौथरे बांधून हा तोफ़ांचा ऐतिहासिक ठेवा व्यवस्थित ठेवता आला असता. रामेश्वर मंदिर हे किल्ल्याचे उत्तर टोक आहे. ते पाहून पुन्हा माघारी फ़िरुन चंडीकामाता मंदिराच्या बाजूने चालत निघाल्यावर डाव्या बाजूला कातळात खोदलेली ५ पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या बाजूला कॉंक्रीटचे खांब उभारुन पूल बांधलेला आहे. या पुलावरुन आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. किल्ला पाहायला अर्धा तास पुरतो.


Cannons on Parnera Fort

पारनेरा किल्ला उतरुन १ किलोमीटर चालत मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गेल्यावर पारडी गावासाठी रिक्षा मिळतात. खाजगी वहानाने थेट पारडी गावातील किल्ल्यापर्यंत जाता येते. पारनेरा ते पारडी अंतर ७ किलोमीटर आहे.


Chhatrapati Shivaji Maharaj Statue at Pardi Fort, Gujrat

पारडी किल्ला (Pardi Fort) :- पारडी गावातील भरवस्तीत पोस्ट ऑफ़ीसच्या इमारती मागे एका छोट्या टेकडा वरती पारडी किल्ला आहे. या टेकडीच्या खालून वहाणार्‍या पार नदीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. किल्ल्यापाशी पोहोचलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. किल्ल्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला होता.


Bastion on Pardi Fort, Gujrat

इसवीसन १६६४ मध्ये छ.शिवाजी महाराजांनी प्रथम सुरत लुटली. मोगलांच्या संपन्न बंदराची पार रया गेली. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या हल्ल्याच्या अफ़वा उठतच होत्या. इसवीसन १६७० मध्ये छ.शिवाजी महाराजांनी सुरत दुसर्‍यांदा लुटली. त्यानंतर सुरतची होती नव्हती ती पत पण गेली. सुरतेचा व्यापार खालावला. छ.शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत सुरतेवर हल्ला होणार अशा अफ़वा अधूनमधून उठत होत्या. त्यामुळे अनेक व्यापार्‍यांनी स्थलांतर केले. सुरत बंदरातून होणारा व्यापार थंडावला होता. सुरतेवरच्या हल्ल्याने छ.शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली मोगल साम्राज्याची आर्थिक नाकेबंदी झाली होती.


Pardi Fort Gujrat
Pardi Fort Gujrat

पारडी किल्ल्यात काळानुरुप अनेक बदल झाले आहेत. किल्ल्यात शिरताना प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला भव्य अष्टकोनी बुरुज आहे. किल्ल्याचे प्रवेशव्दार नव्याने बांधलेले आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर बुरुज पाहून पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला पीर आहे. अजून थोड्या पायर्‍या चढल्यावर डाव्या बाजूला कैद्यांसाठी असलेल्या बॅरॅक्स दिसतात. इंग्रजांच्या काळात किल्ल्याचे रुपांतर जेल मध्ये झाले होते. तर उजव्या बाजूला उध्वस्त वास्तू आहेत. हे पाहून पुढे गेल्यावर किल्ल्यावर असलेल्या पाण्यांच्या टाक्यांपाशी पोहोचतो. पारडी गावाला पाणी पुरवण्यासाठी ह्या टाक्या बांधलेल्या आहेत. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग आहे. किल्ला पाहून परत हायवे पर्यंत चालत येऊन बागवाडा गावातला अर्जूनगड गाठावा. पारडी ते अर्जूनगड अंतर १२ किलोमीटर आहे. मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील टोल नाका ओलांडल्या रेल्वे लाईन क्रॉस करुन बागवाडा गावात पोहोचता येत. गावाच्या मागे एक झाडांनी झाकलेली टेकडी दिसते. तोच अर्जूनगड आहे.

Bastion on Arjungad, Gujrat

अर्जुनगड (Arjungad) :- एका दंतकथे नुसार अर्जुनाने या ठिकाणीहून सुभद्राहरण केले म्हणून या किल्ल्याचे नाव अर्जूनगड पडले. चिमाजी आप्पांनी हा किल्ला बांधला असे म्हणतात. काही काळ हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. अर्जूनगडावर महालक्ष्मीचे देऊळ आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍यांच्या मार्गाने एक मोठ्या बुरुजाला वळासा घालून १० मिनिटात आपण प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. किल्ल्याचे प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. प्रवेशव्दार, तटबंदी आणि किल्ल्याचे बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा छोटा घेर दिसतो. किल्ल्याच्या मधोमध महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्याच्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. किल्ल्याच्या तटबंदीत ६ बुरुज आहेत. तटबंदी वरुन फ़िरताना दक्षिणेकडे कोलाक नदी दिसते. किल्ला फ़िरायला १० मिनिटे पुरतात.

Temple On Arjungad, Gujrat

Water Tank on Arjungad, Gujrat

Kolak River From Arjungad, Gujrat

अर्जूनगड पाहून झाल्यावर इंद्रगडाकडे मोर्चा वळवावा. अर्जुनगड ते इंद्रगडच्या पायथ्याचे पाली करंबेली गावाचे अंतर २३ किलोमीटर आहे. या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे. मंदिरा पासून एक कच्चा रस्ता इंद्रगडावर जातो. या रस्त्याने इंद्रगडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

Fortification & Water tank on Indragad

Indragad, Gujrat

इंद्रगड (Indragad):-  गडाच्या डोंगरावर भरपूर झाडे असल्याने गड चढतांना उन्हाचा त्रास होत नाही. गडाच्या तटबंदीला लागून चेडू मातेचे मंदिर बांधलेले आहे. त्यात एक साधू राहातो. या गडाचे प्रवेशव्दार एका अर्धवर्तुळाकार भिंतीमागे लपवलेले आहे. प्रवेशव्दारावर थेट हल्ला करता येऊ नये यासाठी अशाप्रकारे भिंतीची रचना केलेली आहे. या भिंतीत जंग्या आहेत. किल्ल्याचे प्रवेशव्दार शाबूत आहे. पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्याच्या आत अनेक इमारतींचे अवशेष आहेत. तटबंदीत आणि बुरुजा खाली खोल्या आहेत. एक पाण्याची टाकी आहे. किल्ल्याच्या उत्तरेला एक दरवाजा आहे. या प्रवेशव्दारासमोर सुध्दा संरक्षणासाठी भिंत बांधलेली आहे. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. त्यावरुन किल्ल्याला प्रदिक्षिणा मारता येते. किल्ल्यावरुन दरोथा आणि दमणगंगा या नद्यांची खोरी दिसतात. या परिसरातला हा सर्वात उंच डोंगर असल्याने खूप मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.

Entrance Gate , Indragad
African Baobab (गोरखचिंच)

इंद्रगड पाहून झाल्यावर दमणगंगा नदीच्या मुखावर असलेले दोन किल्ले मोटी दमण किल्ला आणि नानी दमण (सेंट जेरोम फ़ोर्ट) हे दोन किल्ले पाहाण्यासाठी पाली करंबेली ते मोटी दमन किल्ला हे ६ किलोमीटरचे अंतर कापावे लागते.

Entrance gate of Moti Daman Fort

Trench around Moti Daman Fort

मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort):- दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावर मोटी दमण किल्ला आहे. नानी दमण आणि मोटी दमन या दोन किल्ल्यामध्ये मोटी दमण किल्ला आकाराने मोठा आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. भारत स्वतंत्र झाल्यावर इसवीसन १९६१ मध्ये हा किल्ला भारताच्या ताब्यात आला. सध्या या किल्ल्यात दमण मधली सर्व सरकारी ऑफ़ीसेस आहेत. किल्ल्यात एक लाईट हाऊस आहे. किल्ल्याची प्रवेशव्दारे, तटबंदी, बुरुज आणि किल्ल्याच्या बाहेरील खंदक सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे. किल्ल्याला पोर्तुगिज शैलीतील १० पंचकोनी बुरुज आहेत. बुरुजांवर आणि तटबंदीवर पोर्तुगिज बांधणीची खासियत असलेले कॅप्सुल बुरुज आहेत. किल्ल्याला उतरेला आणि दक्षिणेला अशी दोन प्रवेशव्दारे आहेत. प्रवेशव्दारांवर शिलालेख आणि कोट ऑफ़ आर्म कोरलेले आहेत. किल्ल्यात बॉम जिजस चर्च नावाचे चर्च आहे या चर्च मधील लाकडावर केलेले कोरीवकाम पाहाण्यासारखे आहे. मोटी दमण किल्ल्याच्या समोरील किनार्‍यावर नानी दमण किल्ला आहे. मोटी दमण किल्ल्यातून बाहेर पडून दमणगंगा नदीवरील पूल ओलांडून नानी दमण किल्ल्यात जाता येते.

Carving on wood, Church of Bom Jejus

Carving on wood, Church of Bom Jejus

नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) :- दमणगंगा नदीच्या उत्तर तीरावर नानी दमण किल्ला आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. सध्या या किल्ल्यात शाळा आणि चर्च  आहे. किल्ल्याच्या दमण गंगा नदीकडील दरवाजाने आपला किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशव्दारांवर शिलालेख आणि कोट ऑफ़ आर्म कोरलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला तटबंदीला लागून असलेल्या फ़ांजीवर चढून जावे. फ़ांजीवरुन संपूर्ण किल्ला फ़िरता येतो. किल्ल्याला ३ बाणांच्या आकाराचे बुरुज आहेत. किल्ल्याला पूर्वेला मुख्य प्रवेशव्दार आहे. फ़ांजीवरुन प्रवेशव्दारा पर्यंत उतरण्यासाठी जीना आहे. किल्ल्याच्या या प्रवेशव्दाराच्या बाजूला एक छोटे प्रवेशव्दार आहे. त्याच्या बाजूला किल्ल्या वरची शाळा आणि चर्च आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावर झेंडा लावण्यासाठी असलेला लाकडी खांब आहे. किल्ला पाहाण्यासाठी अर्धा तास पुरतो.

Entrance gate, Nani Daman Fort

St. Jerom Fort (Nani Daman Fort)

Fortification, Nani Daman Fort

दमण मधले हे दोन्ही किल्ले पाहून झाल्यावर १३ किलोमीटरवरील वापी रेल्वे स्टेशन गाठल्यावर आपली ६ किल्ल्यांची भटकंती पूर्ण होते. वापी - पारनेरा किल्ला - पारडी किल्ला - अर्जुनगड - इंद्रगड - मोटी दमण किल्ला - नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) हे अंतर ८५ किलोमीटर आहे. वापीमध्ये ८ तासासाठी , ८० किलोमीटर अंतरासाठी खाजगी गाडी मिळते. या गाडीने सर्व किल्ले एका दिवसात आरामात पाहून होतात. जर मुंबईहून खाजगी गाडी घेऊन येणार असल्यास महाराष्ट्रातला शेवटचा किल्ला बल्लाळगडही पाहून होतो.     

Nani Daman Fort


#fortsinsouthgujrath#onedaytreknearmumbai#indragad#arjungad#pardifort#motidamanfort#nanidamanfort#

Monday, August 21, 2017

डभोईची लढाई आणि किल्ला (Battle of Dabhoi & Dabhoi Fort , Offbeat Gujrat)

Hira Gate , Dabhoi



         गुजरात मधील सरदार सरोवर धरण पाहाण्यासाठी हल्ली बरेच पर्यटक जातात . बडोद्याहून सरदार सरोवराकडे जाताना ३० किलोमीटरवर डभोई नावाचे तालुक्याचे गाव लागते . गुजरात मधल्या डभोईचा महाराष्ट्राशी संबंध म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी लढाई डभोई किल्ल्याच्या साक्षीने झाली होती. १ एप्रिल १७३१ रोजी छत्रपती शाहूंचे पेशवे बाजीराव यांची सेनापती त्रिंबकराव दाभाडे, पिलाजी गायकवाड, पवार,  निजाम यांच्या सयुक्त सैन्याशी लढाई झाली होती.



या लढाईची पार्श्वभूमी थोडक्यात अशी होती. गुजरात आणि माळव्याच्या चौथाई वरुन बाजीराव आणि दाभाडे यांच्यात बेबनाव झाला होता. त्याचवेळी माळव्याची चौथाई वसूलीचे हक्क बाजीरावाने शिंदे, होळकर यांना दिले. त्यामुळे धारचे पवार नाराज झाले. चिमाजी आप्पांनी मुघला विरूध्द गुजरातेत आघाडी उघडलेली होती त्यामुळे पिलाजी गायकवाड नाराज झाले होते. बाजीरावाच्या वाढत्या प्रस्थामुळे अनेक जण नाराज झाले होते. या नाराजाना एकत्र करुन त्रिंबकरावांनी बाजीरावा विरूध्द आघाडी उघडली. त्यासाठी त्यांनी मराठ्यांचा शत्रू असलेल्या निजाम उल हकशी पण संधान साधले. निजामालाही बाजीरावाचा सत्ता विस्तार खुपत होता त्यामुळे तोही असंतुष्टाना सामिल झाला. महम्मदखान बंगश या मुघल सरदाराकडे माळवा प्रांताची सुभेदारी होती. बाजीराव, शिंदे, होळकर यांनी माळवा काबिज केल्याने बंगशही असंतुष्टाना मिळाला. 

खरे पाहायला गेले तर हा शाहू महाराजांच्या पेशव्या आणि सेनापती मधला तंटा होता. तो त्यांनी शाहू महाराजांच्या दरबारात सोडवणे आवश्यक होते. पण बाजीराव उत्तरेच्या मोहीमेत गर्क असल्याचे पाहून दाभाडेनी निजाम आणि इतर असंतुष्टांशी संधान बांधले. हा सरळसरळ राजद्रोह होता. छत्रपती शाहूंनी दाभाड्यांना पत्र लिहून समज दिली. पण दाभाडॆंनी त्याकडे दुर्लक्ष करुन ऑक्टोबर १७३० मध्ये गुजरातकडे कुच केली आणि बडोद्याच्या अलिकडे नर्मदा आणि ओरसंग नद्यांच्या संगमावर असलेल्या कर्नाली गावात त्यांने सैन्याचा तळ ठोकला.

हैद्राबादहून निघालेला निजाम गुजरातमध्ये थेट न येता माळव्याचा मुघल सुभेदार बंगश याला भेटायला माळव्यात गेला. तेथे नर्मदा नदीकाठी अकबरपूर येथे त्याची आणि बंगशची २६ मार्च १७३१ ला भेट झाली. 

बाजीराव दसर्‍या नंतर पुण्याहून निघाले. ते खानदेश मार्गे थेट अहमदाबादला पोहोचले. मुगल बादशहाने अभयसिंहला गुजरात प्रांताची सुभेदारी दिलेली होती. बाजीरावांनी अभयसिंहाची भेट घेऊन त्याच्याशी तह करुन आपली उत्तरेची बाजू निर्धोक केली. त्याआधी चिमाजी आप्पानेही सुरतच्या मोगल सुभेदार सरबुलंद खान याच्याशी करार करुन गुजरात मधून महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग निर्धोक केला होता.  


बाजीरावाच्या सैन्य मोक्याच्या जागी कसे विखुरलेले होते ते पाहू. चिमाजी आप्पा बडोद्याला आपले सैन्य घेउन होते. शिंदे आणि होळकर धार, मंडू उर्फ मांडवगड परिसरात होते. बंगश आणि निजामाच्या सैन्याला ते काही काळ रोखून धरु शकले असते. पिलाजी जाधवांचे सैन्य खानदेशात होते. गुजरात मधून महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग त्यामुळे निर्धोक होता. अशा प्रकारे आघाडी आणि पिछाडी दोन्ही सुरक्षित करुन निजाम - बंगशचे सैन्य आणि दाभाड्यांचे सैन्य एकत्र येण्यापूर्वी दाभाड्यांच्या सैन्यावर हल्ला करणे आवश्यक होते.  

Battle of  Dabhoi 

       त्यासाठी बाजीरावांनी जलद हालचाली केल्या. अहमदाबादहून बाजीराव निघाले ते बडोद्याला पोहोचले. तेथे त्यांना चिमाजी आप्पांचे सैन्य येऊन मिळाले. दाभाड्यांचे सैन्य ४०००० जणांचे होते तर बाजीरावांचे सैन्य त्याच्या निम्मे होते. बाजीरावांनी दाभाडे यांना सला करण्यासाठी निरोप पाठवला. पण दाभाडे युध्द सज्ज झाल्याचे पाहून बाजीराव डभोई जवळ पोहोचले. डभोईला किल्ला होता पण ती जागा युध्दासाठी योग्य नसल्याने बाजीरावांनी डभोई बडोदा रस्त्यावर डभोई पासून ९ किमीवरील थुवाई गावाकडे मोर्चा वळवला. १ एप्रिलला दोन्ही सैन्यात लढाई झाली. ९ तास चाललेल्या या युध्दात दाभाडे गोळी लागून मारले गेले. उदाजी पवार, गायकवाड पकडले गेले. बाजीरावांनी त्यांना मानाची वस्त्रे देऊन बडोदा आणि धारच्या चौथाईचे हक्क दिले. निजाम आणि बंगश नर्मदेकाठी अकबरपूरा गावात असतानांच त्यांना बाजीरावने युध्द जिंकल्याचे कळले. त्यामुळे निजाम आल्यापावली परत हैद्राबादला गेला. युध्दा नंतर बाजीरावनेही जलद हालचाली करत पुणे गाठले. तेथे थोडा काळ थांबुन छत्रपती शाहूंची भेट घेतली. निजाम आणि मोगल या मराठ्यांच्या शत्रूशी युती केल्याने सहानुभूती गमावलेल्या दाभाडे यांच्या मुलांना छ. शाहू महाराजांनी सेनापती पद दिले. पण त्यानंतरच्या काळात मराठ्यांच्या सेनापतींचे महत्व उत्तरोत्तर कमी होत गेले आणि त्याचवेळी पेशव्यांचे प्रस्थ वाढत गेले. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला डभोई किल्ला १ तासात पाहाता आरामात येतो.

नांदोडी भागोल (Nandodi Bhagol, Dabhoi)


सहाव्या शतकात बांधलेल्या डभोई उर्फ दर्भावती हा किल्ला वेगवेगळ्या काळात  सोलंकी वाघेला , मुगल , मराठे यांच्या अधिपत्याखाली होता हा नगर कोट असल्याने  भारतातल्या सगळ्या नगरकोटांची जी अवस्था झाली आहे तशीच डभोईची अवस्था झाली आहे . किल्ल्यात असलेल्या नगराने वाढता वाढता किल्ल्यालाच गिळून टाकलेले आहे . किल्ल्याचेच सामान वापरुन  यातील अनेक घर बांधलेली आहेत . इतर नगर कोटात उरतात त्याप्रमाणे येथेही किल्ल्याचे चार दिशांना असणारे चार दरवाजे उरलेले आहेत . पण हे दरवाजेच या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहेत. १२ व्या शतकात बांधलेले, अप्रतिम कोरीवकाम असलेले हे दरवाजे पाहाण्यासाठी डभोईला वाट वाकडी करुन जायला हरकत नाही.गुजरात पुरातत्व खात्याने हे दरवाजे अतिशय सुंदरपणे जतन केले आहेत . त्यांच्या संरक्षणासाठी केवळ संरक्षित स्मारकाचा निळा फलक  न लावता त्याठिकाणी रक्षक नेमलेले आहेत .





















बडोद्याकडून गावात शिरतानाच डाव्या बाजूला किल्ल्याचा एक बुरुज त्याच्या बाजूची तटबंदी आणि पाण्याने भरलेला खंदक आणि तलाव पाहायला मिळतो. गावात शिरल्यावर आपल्या समोर येते किल्ल्याचे भव्य असे पश्चिम व्दार याला वडोदरा भागोल (प्रवेशद्वार) या नावाने ओळखले जाते. २० फुट उंच असलेला दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी पिवळ्या दगडात  (सॅंडस्टोन) मध्ये बांधलेली आहे . या दरवाजाला ६ कमानी असून त्या लाल दगडात बनवलेल्या आहेत. या कमानींवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. त्यात पक्षी, फुल , वेलबुट्टी , व्याल , किर्तीमुख यासारखे काल्पनिक प्राणी कोरलेले आहेत . दोन कमानींच्या मधल्या भागात विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजूला २० खांब असलेले एक सुंदर दालन आहे . हा दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो. त्याला उत्तर दरवाजा , माहुडी भागोल या नावाने ओळखले जाते . या दरवाजातून जाणाऱ्या रस्त्याने रहदारी चालू असते . दरवाजा ५ कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीवकाम केलेले आहे . दोन कमानींच्या मध्ये मुर्ती आहेत . यापुढील दरवाजा पूर्व दिशेला आहे . या दरवाजाला हिरा भागोल या नावाने ओळखले जाते. किल्ल्याचा हा सर्वात सुंदर दरवाजा असून या दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या तटबंदीत १०० मीटर अंतरापर्यंत अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे . यात अनेक गवाक्षे , देवकोष्टके आहेत. त्यात शंकर , विष्णू, लक्ष्मी , चामुंडा अशा अनेक देवदेवतान्च्या मुर्ती आहेत . समुद्रमंथना पासून अनेक पौराणिक प्रसंग कोरलेले या ठिकाणी पाहाता येतात. घोड्यावर बसलेले योध्दे , हत्ती , हंस , व्याल फुले , वेलबुट्टी याने हा दरवाजा सजवलेला आहे . दरवाजा ६ कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीवकाम केलेले आहे . या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस एक दरवाजा असून त्याची कमान ढासळलेली आहे पण उरलेल्या भागावरील कोरीवकाम सुंदर आहे .

Carving on Hira Bhagol, Dabhoi

Carving on Hira Bhagol, Dabhoi

Carving on Hira Bhagol, Dabhoi

Carving on Hira Bhagol, Dabhoi

१२ व्या शतकात बांधलेल्या या दरवाजा बद्दल एक दंतकथा या भागात प्रचलित आहे . या दरवाजाचे बांधकाम करणारा स्थापिती हरीधर याने या दरवाजासाठी आणलेले दगड चोरुन आणि इथलेच मजूर वापरुन आपल्या बायकोसाठी तेन तलाव नावाचा तलाव डभोई पासून ३ किमीवर बांधला . हा अपहार राजाला कळल्यावर हरीधरला या दरवाजातच चिणून मारण्यात आले . त्यामुळे या दरवाजाचे नाव हिरा भागोल पडले आहे .किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे दक्षिण दरवाजा हा दरवाजा नांदोडी भागोल या नावने ओळखला जातो. सहा कमानी असलेल्या या दरवाजाच्या कमानींवर आणि दरवाजाच्या वरही कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजाच्या संरक्षणासाठी बाहेरच्या बाजूस अजून एक दरवाजा बांधलेला आहे . 

Vadodara Bhagol, Dabhoi

Vadodara Bhagol, Dabhoi

माहुडी भागोल (Mahudi Bhagol, Dabhoi)

Hira Bhagol second gate


जाण्यासाठी :- बडोदा - डभोई राज्य मार्ग १६१ ने बडोद्यापासुन ३० किमीवर डभोई गाव आहे .

मुंबईहून बडोद्याकडे येताना बडोद्याच्या अलिकडे करजन गाव आहे . करजन गावातून राज्यमार्ग १११ ने डभोईला जाता येते . अंतर ३० किमी आहे .





दक्षिण गुजरात मधील किल्ले हा लेख वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा 
https://samantfort.blogspot.com/2018/12/blog-post.html?m=1


Second gate of Nandodi Bhagol, Dabhoi

#Bajiraopeshawa#battleofdabhoi#offbeatgujrat#offbeatplacesnearbaroda#