Sunday, October 14, 2018

माणदेशातले किल्ले (भाग - १) Vardhangad, Mahimangad, Bhushangad, Varugad, Shikhar Shingnapur, Gondavale, Offbeat Satara

Varugad Fort, Dist Satara

सातारा जिल्ह्याचे भौगोलीक दृष्ट्या दोन भाग पडतात. पश्चिमेकडचा भाग सुपिक, सधन, जंगल आणि डोंगररांगांनी नटलेला तर पूर्वेकडचा भाग म्हणजे दुष्काळी, वैराण, छोट्या छोट्या टेकड्या वजा डोंगररांगांचा. दोन्ही भागाचे स्वत:चे असे वेगळे सौंदर्य आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, सांगोला, जत हे तालुके पूर्वीच्या माण देशात मोडतात. माण आणि गिरणा या इथल्या मुख्य नद्या पण हा पर्जन्य छायेचा प्रदेश असल्याने मुळातच पाऊस कमी, दुष्काळ तर पाचवीलाच पुजलेला आहे. माणदेशात फ़िरतांना नेहमी दिसणार दृष्य म्हणजे दूरवर पसरलेला सपाट प्रदेश, त्याला छेद देणार एखाद बाभळीच झाड. त्या मैदानात चरणारा शेळ्या- मेंढ्यांचा कळप त्याची राखण करणारा गडद रंगाचे मुंडासे बांधलेला धनगर आणि पार्श्वभूमीला एखादी टेकडी.....  ग. दि. माडगुळाकर आणि व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्यातून माणदेश आणि इथली माणस आपल्याला भेटलेली असतात. पण प्रत्यक्षात तिथे जाऊन त्याचा अनुभव घेण्यात खरी मजा आहे. विविध कारणाने विविध ऋतूंमध्ये मी या भागात फ़िरलो. इथल्या किल्ल्यांवर राहीलो. एका वर्षी तर आम्ही तिथे असतांना ऑक्टोबर महिन्यात एवढा पाऊस झाला की माणदेशातले नदी नाले दुथडी भरुन वाहायला लागले आणि ते आश्चर्य पाहाण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली पाहिली.    

 माणदेशातून जाणारी मुख्य डोंगररांग म्हणजे महादेव डोंगर रांग, शिखर शिंगणापूरचे मंदिर या डोंगर रांगेवर असल्याने ही डोंगररांग महादेव डोंगररांग या नावाने ओळखली जाते. या डोंगररांगेत उंचच उंच डोंगर आणि डोळे फ़िरवणार्‍या दर्‍या नाहीत. इथले उघडे बागडे डोंगरही आपले वेगळे सौंदर्य राखून आहेत. माणदेशातल्या या मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर अनेक किल्ले विराजमान झालेले आहेत. आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. तसेच फ़लटनकडे उतरणारा मोगराळे घाट या मार्गांचे रक्षण करण्यासाठी वर्धनगड, महिमानगड, वारुगड, भुषणगड इत्यादी किल्ल्याची योजना केली होती. शाहू महाराजांच्या काळात राजधानी सातार्‍याला हलवल्यामुळे या किल्ल्यांना महत्व आले होते.

मुंबई-पुण्याहून माण देशातील, माण, खटाव तालुक्यातील वर्धनगड, भूषणगड, महिमानगडगोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर, शनी शिंगणापूर, वारुगड ही ठिकाणे दोम दिवसात व्यवस्थित पाहाता येतात. सातारा मार्गे माणदेशात शिरल्यास नांदगिरी उर्फ़ कल्याणगड हा किल्लाही या बरोबर पाहाता येतो. दुसर्‍या दिवशी मुंबई पुण्याकडे फ़लटण मार्गे गेल्यास संतोषगड, फ़लटनचे राम मंदिर, जरबेश्वर मंदिर, राजवाडा आणि समाध्या पाहाता येतात. 
 
माणदेशातला पहिला किल्ला वर्धनगड. सातरा जिल्ह्यातून जाणार्‍या महादेव डोंगर रांगेवर, भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर वर्धनगड किल्ला बांधलेला आहे. सातारा - पंढरपूर मार्गावर कोरेगाव नंतर येणारा घाट याच किल्ल्याच्या पदरातून जातो. सातार्‍या पासून ३० किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे.

Vardhangad, Dist Satara

वर्धनगड
वर्धनगड छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला आहे. अफजलखानाच्या वधानंतर छ्त्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधला. १२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर १६६१ शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते.  वर्धनगड गावाच्या बाहेर मुख्य रस्त्या लगत गडावरच्या दोन तोफ़ा आणून ठेवलेल्या आहेत. येथून पक्का रस्ता थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. किल्ल्यावरील वर्धनीमातेच्या मंदिरात पंचक्रोशीतील लोकांचा राबता असतो. त्यामुळे किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे. साधारणपणे अर्ध्या तासात आपण गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. आजही ते सुस्थितीत उभे आहे. दरवाज्या पासून किल्ल्याची तटबंदी चालू होते, ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसर्‍या टोकाशी येऊन पोहोचते. ही तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच एक ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे.


      दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे. पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणार्‍या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटे लागतात. टेकाडावर गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभार्‍यात सुंदर कासवाची मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून खाली उतरावे. या वाटेने खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात. संपूर्ण गड फिरण्यास एक तास लागतो.

Mahadev Mandir, Vardhangad, Satara

Fortification of Vardhangad Fort , Satara

माण तालुक्यातला दुसरा किल्ला महिमानगड हा सातारा पंढरपूर रस्त्यावर असलेल्या महिमानगड गावात आहे. वर्धनगडापासून २२ किलोमीटरवर हा किल्ला आहे.

Mahimangad Fort , Dist Satar


महिमानगड

महिमानगड गावातून ठळक पायवाट गडावर गेलेली आहे. साधारणपणे अर्ध्या तासात आपण गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस असलेल्या बुरुजांची रचना अशी केलेली आहे की, प्रवेशद्वाराजवळ येई पर्यंत आपल्याला ते दिसत नाही. प्रवेशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर ऊजव्या बाजूस समोरच हनुमानाचे देऊळ दिसते. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायर्‍या दिसतात.येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूस पाण्याचे सुंदर तलाव आहे, तलाव बर्‍यापैकी खोल आहे. या तलावाला बारामही पाणी असते. त्याच्याच बाजूला वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. या बांधीव तलावाच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे, तो साच पाण्याचा तलाव असावा. या दोन तलावांच्या मधून वाट गडाच्या ईशान्येस असलेल्या सोंडेकडे जाते. या सोंडेवर असलेल्या तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून पलिकडे गेल्यावर लांबवर पसरलेली सोंड दिसते. सोंडेच्या टोकाला एक बुरुज आहे. हे पाहून परत येतांना २ तलावांमधून न येता किल्ल्याच्या रस्त्याकडील तटबंदीच्या बाजूने यावे, येथे तलावाच्या वरच्या बाजूस एक पीराचे थडगे आहे. येथून प्रवेशद्वारापाशी येऊन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गेल्यावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. येथील तटबंदीवरुन खालचे महिमानगड गाव दिसते. गड फिरण्यास साधारण अर्धातास लागतो. किल्ल्यावरून वर्धनगड, ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो.
 
Mahimangad Fort, Dist Satara
महिमानगडा पासून ४० किलोमीटरवर भूषणगड किल्ला आहे.

Bhushangad, Dist Satara


भूषणगड

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात असलेला भूषणगडचा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकर्‍यांनी गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. यात पिवळ्याजर्द कन्हेरीच्या फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी व फुलपाखर यांनी गड गजबजून गेला आहे.

Fortification of Bhushangad Fort,Dist. Satara
देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला. .. १६७६ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव ‘‘इस्लामतारा’’ ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. .स १८४८ मध्ये इंग्रजांनी सातार्‍याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.


भूषणगडवाडीतून पायर्‍यांची वाट गडावर जाते. गडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत नाही. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘‘गोमुखी’’पध्दतीची आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारा समोरील वाट तटबंदीच्या बाजूने जाते, या मार्गावर आपल्याला एक खोल विहीर पाहायला मिळते. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असल्यामुळे त्यात जागोजागी आपल्याला जंग्या पाहायला मिळतात.

Entrance Gate of Bhushangad Fort

Water tank on Bhushangad Fort, Dist Satara
प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडील पायर्‍यांची वाट मोठ्या बुरुजाकडे जाते. या बुरुजाला तोफेसाठी झरोके आहेत. या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो. बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना, उजव्या हाताला भव्य बांधीव कुंड दिसते. या कुंडाजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे. या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाई देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. या जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय भूषणगडची तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते.तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणाकरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो.
Fortification of Bhushangad

प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायर्‍या उतरल्यावर डाव्याबाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालुन जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते. वाटेत आपल्याला तटबंदीवरुन दिसणारी भूषणगड डोंगराची सोंड लागते. भूयारी देवीचे मंदिर भूयार बुजवून नविनच बनविण्यात आलेले आहे. भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते; ती करण्यास १ तास लागतो.

Gondavalekar Maharaj Samadhi Mandir, Gondavale


शुकाचार्य (शुकाचारी) ते कोळदुर्ग हा माणदेशातील अप्लपरिचित ठिकाणावरचा ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा. 

गोंदवलेकर महाराज मंदिर, गोंदवले.

भूषणगडापासून ३५ किलोमीटरवर गोंदवले आहे. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या गावात गोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर, थोरले राम मंदिर आनि धाकले राम मंदिर ही मम्दिरे पाहाण्यासारखी आहेत. थोरले राम मंदिरा समोर हनुमान मंदिर आहे . त्याच्या जवळ गजलक्ष्मीचे एक शिल्प आणि वीरगळ पाहायला मिळतात. गोंदवल्यातल्या अध्यात्मिक, शांत आणि पवित्र वातावरणचा अनुभव घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला निघायचे. गोंदवल्यापासून १७ किलोमीटरवर शिखर शिंगणापूर येथे प्राचिन स्वयंभू शिवमंदिर आहे. यावरुनच या डोंगररांगेला महादेव डोंगररांग म्हणतात. या डोंगररांगेत वारूगड, वर्धनगड, महिमानगड, कल्याणगड हे किल्ले आहेत. याच रांगेच्या एका फाट्यावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर शिखरशिंगणापूरचे प्राचिन मंदिर आहे.

Shikhar Shingnapur Temple


शिखर शिंगणापूर

पुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.      आजही दरवर्षी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुध्द अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.

Entrance Gate of  Shikhar Shingnapur Temple.
इतिहासात डोकावल्यास देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजाने हे गाव वसविले होते. त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावेशिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्‍या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी गावात मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतिर्थ असे म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.

Smruti Mandir, Shikhar Shingnapur
Smruti Mandir, Shikhar Shingnapur

      ..१७३५ मध्ये शाहू महाराजांनी देऊळाचा जिर्णोध्दार केला. त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्‍या आहेत. .. १९७८ मध्ये शिखर शिंगणापूर मंदिराचा पुन्हा एकदा जिर्णोध्दार करण्यात आला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्य तज्ञाकडून ६० फूटी शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.

Carving on the pillar of Shikhar Shingnapur Temple

शिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्‍यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला नगारखाना आहे.

Carving on the pillar of Shikhar Shingnapur Temple

काळ्या पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे. खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्‍या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. मंदिराच्या गाभार्‍या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्‍याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे. 


      मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग आहेत. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे.




शिंगणापूरचे मंदिर पाहून झाल्यावर आपला आजच्या दिवसातला शेवटचा मुक्कामाचा किल्ला वारुगड किल्ला आहे. शिखर शिंगणापूर ते वारुगड अंतर २६ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या माचीवर वारुगड गाव वसलेले आहे. त्यामुळे गाडी थेट वारुगडाच्या माचीवर जातात. मुंबई-पुणे-फ़लटणहून वारुगडावर थेट एअसटीच्या बसेस आहेत.

Flower of Pomegranate

Pomegranate

वारुगडावरील मंदिरात राहाण्याचा योग दोनदा आला. एकदा राहिलो त्यादिवशी अमावास्या होती. आजूबाजूच्या गावातले लोक मंदिरात जमून अमावास्येच्या रात्री भजन गाऊन जागर करतात. त्यामुळे आमच्या झोपेचे मात्र बारा वाजले. वारुगड परिसरात उत्तम सिताफ़ळ आणि डाळींब होतात. एका हातात मावणार नाहीत एवढ्या आकाराची फ़ळ आम्ही गडावरुन विकत घेतली होती. 

Varugad, Dist Satara

वारुगड


वारुगड किल्ला माची व बालेकिल्ला या दोन भागात विभागलेला आहे. रस्त्याने किल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी दुरुनच किल्ल्याची तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदीवेष्टीत आहे. आजही ती बर्‍याच मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतूनच पुढे जातो. या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते. आता मात्र रस्त्याच्या उजव्या बाजूला एकच दरवाजा शिल्लक आहे. त्याच्या पुढे पाण्याचा छोटा तलाव आहे. रस्ता संपतो तिथे भैरोबाचे जीर्णोध्दारीत मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोरच हातपंप व वस्ती आहे. मंदिराच्या मागे धर्मशाळा आहे, येथे राहण्याची सोय होते.
मंदिर पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याचे फलटण कडील प्रवेशव्दार लागते. गिरवी जाधववाडी या मार्गे माचीत प्रवेश करणारी वाट याच दरवाजातून वर येते.

Balekilla, Varugad, Dist Satar
गिरवी जाधववाडीतून माचीवर येणारी पायवाट दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभागते. डावीकडे जाणारा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो, तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन धडकते.( रस्त्याने किल्ल्यावर प्रवेश केल्यास डाव्या बाजूची पायवाट पाण्याच्या टाक्याच्या बाजूने बालेकिल्ल्यावर जाते.) बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पाण्याचे सुंदर बांधीव टाक आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराची रचना गोमुखी पध्दतीची आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी आजही शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच एक सदरेची इमारत आहे. आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे. समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे. विहीर बर्‍याच प्रमाणात बुजलेली आहे.किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर विस्तीर्ण प्रदेश नजरेस पडतो.

Water Tank on Varugad Fort, Dist Satara

वारुगडावर मुक्कामाची उत्तम सोय आहे. वारुगडावर मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोगराळे घाट उतरुन संतोषगड, फ़लटनचे राम मंदिर, जरबेश्वर मंदिर, राजवाडा आणि समाध्या पाहून मुंबईला जाता येते.

Water Tank on Varugad Fort, Dist Satara

 शुकाचार्य (शुकाचारी) ते कोळदुर्ग हा माणदेशातील अप्लपरिचित ठिकाणावरचा ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा.