Sunday, February 7, 2021

चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती) One day trek near Mumbai, Nashik

उंबरदरा

अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर हे घाटमाथ्यावरचे प्राचीन गाव. सध्याच्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे गाव प्राचीन व्यापारी मार्गावर आहे. या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या अलंग - मदन - कुलंग या दुर्ग त्रिकुटापैकी अलंगच्या कुशीत वसलेले मुळ गाव धरणामुळे आता विस्थापित झालेले आहे. पूर्वीच्या काळी व्यापा‍र्‍यांचे तांडे सह्याद्रीची डोंगररांग पार करुन घाटघर गावात विश्रांतीसाठी थांबत असत. त्यासाठी प्राचीन काळापासून आजपर्यंत चोंढ्या घाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), घाटनदेवी घाट (पायथ्याचे गाव :- मेट), निसणीची वाट, नळीची वाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), ऊंबरदरा (पायथ्याचे गाव :- चोंढ्या) या चार घाटवाटा अस्तित्वात आहेत. 

चोंढ्या घाट

आसनगाव मार्गे शहापूरहून देहेणे गाठले . देहेणे गावाच्या पुढे रस्त्याला दोन फाटे फुटतात. एक आजोबा डोंगराकडे जातो, तर दुसरा चोंढ्या धरणाकडे जातो. चोंढ्या गाव पार केले की घाट सुरु होतो. या रस्त्यालाही दोन फाटे फुटतात. एक धरणाच्या भिंतीकडे जातो, तर दुसरा रस्ता वर चढत स्वीच यार्डकडे जातो. नळीची वाट आणि उंबरदऱ्याची वाट या घाटघरला जाणार्‍या वाटा या स्वीच यार्डच्या आसपास उतरतात. देहेणे गावापासून धरणा पर्यंतचे अंतर ७ किलोमीटर आहे तर चोंढ्या गावापासून ५ किलोमीटर आहे. आम्ही आमची चढाई चोंढ्या घाटातून करणार होतो. त्याची नक्की सुरुवात कुठे होते हे आम्हाला माहिती नव्हते . धरणाच्या वरच्या बाजूला आल्यावर रस्त्याच्या बाजूला पार्कींगसाठी भरपूर मोकळी जागा ठेवलेली दिसली. येथून खाली धरणाची भिंत, त्या मागचा जलाशय आणि मागे आकाशात अंगठा उंचावलेले शिपनूर शिखर दिसत होते. शिपनूरपासून सुरु झालेल्या डोंगरांगेने जलाशयाला वेढा घातला होता. जलाशयाच्या स्तब्ध पाण्यावर या सगळ्याचे पडलेले प्रतिबिंब सकाळच्या कोवळ्या उन्हात एखाद्या सुंदर चित्रासारखेच दिसत होते .  आम्ही उभे असलेल्या या "डॅम व्ह्यू पॉईंट " (स्थानिक लोक याला एम (M) पॉईंट म्हणतात) पासून एक पायवाट धरणाच्या भिंतीपर्यंत गेली होती. या भिंतीपर्यंत जाऊन तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांना वाट विचारावी म्हणून खाली उतरुन गेलो. पण तेथे कोणी नव्हते. पुन्हा गाडी पाशी येउन डोंगराच्या दिशेला थोडी शोधाशोध केल्यावर एक पायऱ्याची वाट दिसली. हीच चोंढ्या घाटाची वाट होती. रितसर वाटेला लागलो. घाटवाटेच्या पहील्या १०० एक पायऱ्या व्यवस्थित सिमेंट मध्ये बांधून काढलेल्या आहेत. या भागात दोन धरण आहेत. घाट माथ्यावर घाटघर धरण आणि कोकणात चोंढ्या धरण. घाटघर धरणात साठलेले पाणी दिवसा पाईपां मार्फत चोंढ्या धरणात आणले जाते . त्यावर टर्बाईन्स फिरवून वीज निर्मिती केली जाते. रात्रीच्या वेळी वीजेची मागणी घटल्यावर, हिच तयार होणारी वीज वापरुन चोंढ्या धरणातील पाणी पंपाव्दारे पुन्हा घाटघर धरणात भरले जाते. अशाप्रकारे पाण्याचे एका धरणातून दुसऱ्या धरणात दिवस रात्र चक्र चालू असल्याने दोन्ही धरणांच्या पाणी साठ्याच्या पातळीत दिवसा व रात्री फरक पडतो .


भातखळा

पायऱ्या संपल्यानंतर आम्ही एका मोठ्या वीजेच्या टॉवर खाली आलो. धरणाच्या पाण्यावर तयार झालेली वीज ग्रीडशी जोडण्यासाठी हे टॉवर्स उभारलेले आहेत. टॉवरच्या पुढे पायवाट एका मोकळ्या पठारावर आली. समोरुन घाटवाट उतरुन एक गावकरी येत होता. त्याच्याकडून ही वाट बरोबर असल्याची खात्री केली. गावकरी या वाटेने तासभरात घाटघरला पोहोचतात असे त्याने सांगितले. आम्ही उभे होतो. त्या पठाराला  "भातखळा" म्हणतात असेही त्याने सांगितले . अशा घाटवाटांवर गावकऱ्यांचे नेहमीचे विश्रांतीचे टप्पे असतात आणि त्यांना स्थानिक नावही असतात. जिथे दम खाण्यासाठी, थोडा विसावा घेण्यासाठी थांबतात. अशा ठिकाणी बऱ्याचदा एखादा डेरेदार वृक्ष आणि बसण्याजोगा एखादा खडक तरी नक्कीच असतो.  चोंढ्या धरणाच्या जागी गाव असताना या भागात भात शेती केली जात होती म्हणून हा "भाताचा खळा" . याचा पुढचा स्टॉप "आंब्याचा मोढा" आणि त्यानंतरचा "म्हसोबा" हेही त्याच्याकडून कळले. तिथे फोनची रेंज होती. त्यामुळे घाटघर मधल्या एकनाथला फोन केला . दुपारचे जेवण त्याच्याकडे सांगितले होते आणि उंबरदर्‍याच्या वाटेने तोच आम्हाला खाली घेउन येणार होता. एकनाथ म्हसोबा जवळ भेटतो बोलला . 

Shipnur , Ajoba from Chondya ghaat
शिपनुर-आजोबा-चोंढ्या धरण

पठार पार करुन दाट झाडीत शिरलो. वाट मळलेली होती. गप्पा मारत, रमतगमत चढत होतो. आता शिपनूरच्या मागे आजोबाचे शिखर दिसत होते. तासाभरात म्हसोबापाशी पोहोचलो . येथे एका अनघड दगडाला शेंदूर लावलेला. त्या ठिकाणी उदबत्यांची पाकीटे. दिवे, माचीसचे बॉक्स पडलेले होते. म्हसोबाच्या मागच्या बाजूला असलेल्या खड्कावर एका झाडाच्या मनगट एवढ्या मुळाने वेटोळा घातलेला होता . त्यावर या उघड्या आभाळा खालच्या देवळाची घंटा बांधलेली होती. घाटवाटांवर प्रवास सुखकर आणि निर्धोक व्हावा यासाठी अशाप्रकारचे अनघड दगडांचे देवी देवता स्थापन केलेले पाहायला मिळतात. आधुनिक घाट रस्त्यांवरही छोटी देवळं पाहायला मिळतात.    

म्हसोबा 

एकनाथने म्हसोबासमोर अगरबत्ती लावली. म्हसोबा पासून तीन वाटा फ़ुटतात.  सरळ जाणारी वाट घाटघर गावात जात होती. उजवीकडे जाणारी वाट कोकणकड्याकडे जात होती आणि डावीकडे जाणारी वाट म्हसोबाच्या बाजूने पाण्याकडे जात होती. डावीकडच्या वाटेने थोडे उतरुन गेल्यावर समोर डोंगराचा कातळकडा उभा ठाकला होता. याठिकाणी कातळात चर खोदून एक छोटासा खड्डा बनवलेला होता. कातळातून झिरपणारे पाणी चरातून या खड्ड्यात जमा होईल अशी योजना होती. पण जानेवारीतही  याठिकाणी पाणी नव्हते, पण ठिकाण सुंदर होते.  


पुन्हा म्हसोबापाशी येऊन उजवीकडील प्रशस्त वाट पकडली या वाटेवर कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. आता धरणात बुडालेल्या मुळ घाटघर गावाकडे जाणारी ही प्राचीन वाट होती. यावाटेने पाच मिनिटे चढून गेल्यावर पठारावर पोहोचलो. याठिकाणी पाण्याची दोन टाकी आहेत. एक कड्या लगत आहे. दुसरे त्याच्या थोडे वऱच्या बाजूला आहे. याठिकाणाहून मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत होता. पाठीवरच्या सॅक उतरवून सर्वजण समोरचा नजारा पाहात बसलो. कड्यावर काही गावकरी बायका आणि पुरुषही विखरुन बसले होते. त्यांनाही भर उन्हात हा नजारा बघत बसलेले बघून आश्चर्य वाटले. कारण डोंगर, दर्‍या, निसर्ग या त्यांच्या नेहमीच्या जगण्यातल्या गोष्टी असल्यामुळे त्यांना आपल्या शहरी लोकांसारखे अप्रुप नसते. या लोकांचे एकनाथकडे कौतुक केल्यावर तो बोलला काही नेटवर्कची रेंज इथेच मिळते त्यामुळे मोबाईलवर बोलायला गावातले लोक इथपर्यंत येतात.    

पाण्याची दोन टाकी 



पठारावरुन गावची वाट धरली. वाटेत सुंदर जांभळ्या, गुलाबी रंगांच्या छोट्या फ़ुलांच्या गुच्छांनी लगडलेली झाडं दिसत होती. त्या फ़ुलांचा सडा खालच्या कातळावर पडून तोही जांभळा झाला होता. गावकरी या झाडाला करप या नावाने ओळखतात. हे अंजनाचे (Memecylon umbellatum) झाडं होते. त्याची सुंदर फ़ुलं बघुन गोविंदाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवल्या.


अंजन 

ऱाकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा , फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा !!


अंजनाच्या कळ्या 

Memecylon umbellatum


एक उंचवटा चढून झाडीतून बाहेर आलो. गावातल्या घरांच्या पार्श्वभूमीवर समोर अलंग - मदन - कुलंगचे दुर्ग त्रिकुट उठून दिसत होते. 

अलंग - मदन - कुलंग

एकनाथच्या सारवलेल्या अंगणात "सॅका" टाकून थेट जेवायला बसलो . भाकरी पिठले , चटणी , कांदा अशा गावरान मेन्यूवर यथेच्छ आडवा हात मारुन अंगणात आडवे झालो . अशा वेळी निघणाऱ्या जुन्या ट्रेकच्या आठवणी , पुढच्या अनेक ट्रेकचे हवेतल प्लानिंग त्यावर चर्चा झाली . भर दुपारी डांबरी सडकेवर येउन कोकणकड्याच्या दिशेने वाटचाल चालू केली . 


घाटघर धरणाच्या जलायशयाच्या बाजूने जाताना एकनाथने मुळ गावाची जागा दाखवली . रात्री पंपिंग करुन खालच्या धरणातले पाणी वरच्या धरणात कुठपर्यंत चढते तेही दाखवले. मुख्य रस्ता सोडून दाट झाडीतल्या पायवाटेने इरीगेशन डिपार्टमेंटच्या इमारतीना वळसा घालून कोकणकड्यावर पोहोचलो . तेथे कड्यावर सुरक्षेसाठी लांबच्या लांब उंच लोखंडी ग्रील बसवलेले आहे . त्यामुळे तेथून लगेच काढता पाय घेतला आणि पुढे उंबरदरा पॉइंटच्या दिशेने निघालो . वाट दाट झाडीतून होती . उंबरदरा पॉईंटच्या अगोदर वाट खाली एका छोट्याश्या घळीत उतरली.  तेथे एका खाचेत पाण्याचा झरा अचानक प्रकट झाला होता. त्या वाहात्या थंडगार पाण्याने  बाटल्या भरुन घेतल्या . 

झरा

एक चढ चढून गेल्यावर उंबरदरा पॉईंट पाशी पोहोचले येथे  लोखंडी पाईपांचे रेलिंग बसवलेले होते . तेथून डोंगराच्या बेलाग कड्यामधील घळीतून खालचे धरण दिसत होते. ऱेलींग ओलांडून पायवाटेला लागलो . उंबराच्या दाट झाडीतून बाहेर आलो आणि दोन्ही बाजूला सरसरुन आकाशाला भिडलेले सरळसोट कातळकडे . त्यावरुन वर्षानुवर्षे निखळलेल्या खडकांची खालपर्यंत परसलेली रास त्यातून खळखळाट करत वहाणारे पाणी आणि कड्यांच्या या रचनेमुळे वहाणारा भणाणणारा वारा . सगळच अचंबित करणार होते . कितीतरी वेळ आम्ही सह्याद्रीचे हे रुप अनुभवत तिथेच थांबलो होतो. सांदण, हरिशचंद्र गडाच्या नळीच्या वाटे  सोबत अशा अनेक वाटा फिरुन झाल्या होत्या, पण सह्याद्री प्रत्येक वेळी वेगळच पण विलोभनीय रुप दाखवत असतो . माझ्या मते तरी एका वाटेची तिथल्या रचनेची , तिथून दिसणाऱ्या दृश्याशी, तिथल्या हवेतल्या गंधाशी दुसऱ्या ठिकाणाशी तुलना करु नये . प्रत्येकाचा बाज वेगळाच असतो.

उंबरदरा 



आमची पावलं खिळली असली तरी एकनाथ पार खाली जाऊन आमची वाट बघत उभा होता . आम्हीही निघालो .दृश्य कितीही मोहक असले तरी या दगडातून उतरताना शेवटी शेवटी जीव मेटाकुटीला येतो हे अनुभवाने माहिती होते . उंबर दऱ्याच्या घळीतून उतरायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात मोकळ्यावर आलो . कातळभिंती थोड्या दूर गेल्या . हलणारे दगड , त्या दगडातून वहाणारे पाणी , दगडांवर साठलेले शेवाळे या सगळ्यांना सांभाळत खाली उतरत होतो . आधाराला मधे मधे उगवलेली आणि तग धरून असलेली उंबराची झाड होती . या उंबरांच्या झाडांमुळे या ठिकाणाला उंबरदरा नाव मिळाले आहे .  खरतर ही  घाटवाट नसून ओढ्याची वाट होती.  त्यात २६ जुलै २००६ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे या वाटेवर अनेक दरडी कोसळल्या आणि गावातल्या लोकांनी ही वाट वापरणे बंद केले.
 
बिकट वाट

उतरायला सुरुवात केल्यावर साधारणपणे अर्ध्या तासात आम्ही अशाच एका मोठ्या खडकापाशी आलो . वरुन पडलेल्या या शिलाखंडाने पुढे जाणारी वाट अडवलेली होती . त्यावर चढून जाऊन विरुध्द बाजूने उतरणे जवळ जवळ अशक्य होते . पण या ठिकाणी खडकाच्या खाली जेमतेम एक माणूस उतरु शकेल एवढीच जागा होती . त्यातून पाणी वाहात होते . एकनाथने त्यावर पडलेले दगड बाजूला केले आणि त्याने त्या चिंचोळ्या तोंडाच्या छिद्रात उतरुन आम्हाला कुठे पाय ठेवायचा कसे उतरायचे याचे प्रात्येक्षिक दाखवले. वाहाते पाणी , शेवाळलेले दगड आणि जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढी जागा यामुळे प्रत्येकाला कोणाचा आधार न घेता उतरायचे होते . साधारणपणे दिड पुरुष उंचीच्या या छिद्रात उतरुन आम्ही एक एक करुन दुसऱ्या बाजूने बाहेर आलो . 

छिद्राचे तोंड


दुसरी बाजू


व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणवर टिचकी मारा.

या थरारक अनुभवा नंतर  पुन्हा दगडांची वाट उतरायला सुरुवात केली . एके ठिकाणी  ओढ्याने उंचावरून उडी मारली होती . त्यामुळे पुन्हा पुढची वाट बंद झाली होती . मग ओढ्याच्या बाजूने जंगलातून जाणाऱ्या घसार्‍याच्या वाटेने उतरायला सुरुवात केली . काही वेळाने पुन्हा ओढ्यात उतरुन दगडगोट्यातून चालायला सुरुवात केली . उतरायला सुरुवात केल्यापासून साधारणपणे दिड तासाने ओढ्याची वाट सोडून उजव्या बाजूच्या डोंगरावर चढायला सुरुवात केली . उंबरदरा पासून येणारा हा ओढा पुढे चोंढ्या धरणाच्या जलाशयाला जाऊन मिळतो.

चोंढे धरण

डोंगरावर जाणारी पायवाट पकडून १०  मिनिटात स्वीच यार्ड पाशी पोहोचलो . येथे डोंगरात इरीगेशन डिपार्टमेंटने एक मोठा बोगदा खोदलेला आहे . हा बोगदा ग्रील लावून बंद केलेला असतो . तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परवानगी दिली तरच बोगद्यातून जाता येते . अन्यथा बोगदा असलेला डोंगर चढून रस्त्यावर उतरावे लागते . बोगद्याच्या पुढे  डांबरी रस्त्याने १५ मिनिटे चालल्यावर आम्ही ट्रेक चालू केला त्या ठिकाणी  M पॉईंटवर पोहोचलो .  उंबरदरा उतरायला आम्हाला दोन तास लागले होते . एकनाथचा निरोप घेतला तो चोंढ्या घाटाने घाटघरला निघाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो .


चोंढ्या घाट - उंबरदरा हा ट्रेक एक दिवसाचा ट्रेक आहे . चोंढ्या घाट ट्रेक वर्षभरात केंव्हाही करता येइल . उंबरदरा मात्र पाणी ओसरल्यावर डिसेंबर नंतर मे महिन्यापर्यंत करता येइल . उंबरदरा उतरण्यासाठी गाईडची आवश्यकता आहे .


चोंढ्या धरण - चोंढ्या घाट - घाटघर :- १ ते १.५ तास


घाटघर - उंबरदरा पॉइंट :- अर्धा तास


उंबरदरा पॉइंट - उबंरदरा घाट - चोंढ्या धरण :- २ ते २.५ तास

 

GPS ने रेकॉर्ड केलेली चोंढ्या घाट - घाटघर- उंबरदरा भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर



शिपनुर

Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right

Video by :- Pallavi 

Map :- Mahendra Govekar © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 


रडतोंडी घाट - पार घाट - प्रतापगड - मधुमकरंदगड - हातलोट घाट, जावळीच्या खोर्‍यातील भटकंती हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

https://samantfort.blogspot.com/2020/01/blog-post.html