Wednesday, November 29, 2017

टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला आणि विठठल मंदिर, जामगावचा किल्ला आणि पारनेरचे सोमेश्वर मंदिर (Takali Dhokeshwar, Palashi Fort , Jamgaon Fort & Someshwar Temple , Parner, Dist. Ahmednagar)


सप्तमातृका, टाकळी ढोकेश्वरची लेणी

ऑक्टोबर महिना सुरु झाला की, ऑक्टोबर हिटमुळे एक महिना ट्रेकना विश्रांती असते. पण भटकंतीच वेड काही घरी स्वस्थ बसू देत नाही. या ऑक्टोबर मध्ये एका शनिवारी सकाळी असाच एक झंजावती दौरा काढला. नर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला आणि विठठल मंदिर, जामगावचा किल्ला आणि पारनेरचे सोमेश्वर मंदिर अशी चार ठिकाण बघण्याची योजना होती. डोंबिवलीहून एकूण अंतर ५०० किमी पेक्षा जास्त असल्याने सकाळी सहा वाजतच गाडी काढली आणि थेट माळशेज घाटातील बोगद्याच्या पुढे असलेल्या टपरीवर थांबलो. एका मस्त धबधब्याच्या पार्श्वभुमीवर सकाळच्या कोवळ्या उन्हात गरमागरम चहा आणि नाश्ता करुन पुढचा प्रवास चालू केला.

टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी
कल्याण - नगर रस्त्यावर नगरच्या अलिकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याण पासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. महामार्ग सोडून गावात जाणार्‍या रस्त्याने गाव पार करुन पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. लेण्यांपासून पाऊण उंचीवर मध्ययुगात बांधलेले प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरुनच लक्ष वेधून घेतात. पायर्‍यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला आहे. पायर्‍या चढतांना प्रवेशव्दाराच्या अलिकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरे आहेत. त्यावर दगडी फ़ुल आहेत. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेल आहे. हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेंव्हा बांधली असेल तेंव्हा त्याच्या बाजूला हे शरभ शिल्प असणार पण कालांतराने डागडूजी करतांना ते मुळ जागेवरून काढून टाकले असावे. अश्या प्रकारचे नक्षीकाम केलेले दगड पायर्‍या चढतांना पायर्‍यांमध्येही आढळतात.  


टाकळी ढोकेश्वर प्रवेशव्दार 

 टाकळी ढोकेश्वरचे मुख्य लेण प्रशस्त आहे. लेण्यात शिरतांना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वहानांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसर्‍या बाजूला वीरभद्राची मुर्ती कोरलेली आहे. गाभार्‍याच्या दारावर व्दारपाल कोरलेले आहेत. गाभार्‍यात पिंड आणि सभामंडपात नंदी आहे. गाभार्‍या भोवती प्रदक्षिणापथ कोरुन काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर अनेक वीरगळ ठेवलेल्या आहेत. एक मोठा नंदी आणि सर्पशिळा येथे ठेवलेल्या आहेत.

लेण्याचा सभामंडप आणि गर्भगृह,टाकळी ढोकेश्वर 


मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरुन काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या कोरलेल्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे.
पाण्याचे टाके
सीता न्हाणीला जाण्यासाठी दगडातल्या खोबण्या



फ़ुलझाडांची लागवड करुन परीसर सुशोभित केलेला आहे. या ठिकाणाहून दुरवरचा परिसर दिसतो. आम्ही लेण्यांच्या परिसरात आलो तेंव्हा तेथे पांढरा लेंगा सदरा घातलेले आजोबा होते. लेण्यांची साफ़सफ़ाई करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अशा स्थानिकांशी गप्पा मारल्यावर अनेक नवीन गोष्टी कळतात असा माझा अनुभव आहे. आजोबांशी संवाद साधायचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तंबाखू आहे का? तो आमच्याकडे नसल्याने त्यांची निराशा झाली आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तर देण्यचे टाळले आणि एका जागी जाऊन चक्क झोपले.  


टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून झाल्यावर आता पळशीचा किल्ला पाहायचा होता. त्यासाठी पुन्हा टाकळी ढोकेशवर गावातून महामार्गावर येऊन उजव्या बाजूला परळीचा रस्ता पकडावा . टाकळी ढोकेश्वर - पळशी अंतर २५ किलोमीटर आहे. पळशी नदीच्या काठी पळशीचा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यात असलेल्या पळशीकरांच्या वाड्यात लाकडावर केलेले अप्रतिम कोरीवकाम पहाण्यासारखे आहे. पळशी किल्ल्याबाहेर असलेले विठ्ठल मंदिरही अप्रतिम कोरीवकामाचा नमुना आहे. पळशी गाव जवळ यायला लागल्यावर किल्ला दिसायला लागला.

पळशीच्या भुईकोट

पळशीच्या भुईकोटाला १६ बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील २ दरवाजे मोठे असून दोन दरवाजे लहान आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला असलेल्या मोठ्या दरवाजातून थेट गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात गाव वसलेले असल्याने किल्ल्याच्या उत्तर भागात पक्के रस्ते बनवलेले आहेत. किल्ल्याचा उत्तर दरवाजा आणि त्याच्या बाजूचे भक्कम बुरुज आजही दिमाखाने उभे आहेत, गावकर्‍यांनी याला रंग लावून शोभा घालवलेली आहे. दरवाच्या दोन्ही बाजूला दोन शिलालेख कोरलेले आहेत. दरवाजातून गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते. 

पळशीकरांचा वाडा

किल्ल्यात शिरल्यावर चौफ़ेर वस्ती दिसते. या वस्तीतून महादेव मंदिराकडे चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. या मंदिराचे दगडी बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या मागच्या भिंतीवर हनुमान कोरलेला आहे. गाभार्‍या समोर मोठे कासव आहे. मंदिरासमोर एक वीरगळ आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक गल्ली जाते या गल्लीत एक मोठा तोफ़गोळा पडलेला आहे. तेथेच दोन पुरातन दिपमाळा आहेत. तेथून पुढे गेल्यावर पळशीकरांचा वाडा आहे. 


पळशीकरांचा वाडा

पळशीकरांचा वाडा


पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे. या वाड्याचा दरवाजा आणि त्याची चौकट यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर एक बोळ लागतो. तो पार केल्यावर डाव्या बाजूला वाड्याचे दुसरे दार आहे. त्यातून आत गेल्यावर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो. वाड्यात सध्या दोन भाडेकरु राहातात. वाडा बांधला तेंव्हा दुमजली होता पण आज केवळ एकच मजला शिल्लक आहे. चौकात शिरल्यावर वाड्याच्या खांबांवर, हस्तांवर केलेले अप्रतिम नक्षीकाम पाहायला मिळते. वाड्याला तळघर आहे पण ते सध्या बंद केलेले आहे. चौकात मोरी असून त्यात एक दगडी पाट आहे. वाड्यात शिरल्यावर उजव्या बाजूला देवघर आहे. त्यात जुने टाक आणि मुर्ती आहेत. देवघरच्या बाजूला असलेल्या खोलीच्या चौकटीवर कोरीवकाम केलेले आहे. याच खोलीत वाड्यातील आड आहे.


पळशीकरांचा वाडा


लाकडावरील नक्षीकाम , पळशीकरांचा वाडा

देवघर, पळशीकरांचा वाडा

वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील खांब पाम वृक्षा सारखे कोरलेले आहेत. वाड्याचा दुसरा मजला कोसळलेला असल्याने त्यावर पत्रे घातलेले आहेत. वाड्याची कुठल्याही प्रकारची निगा न राखल्याने त्याची दुरावस्था झालेली आहे.




 वाडा पाहून बाहेर आल्यावर समोर एका दुमजली इमारतीचे अवषेश दिसतात. याठिकाणी दुसरा वाडा होता. या वाड्याच्या दोन भिंती कशाबशा उभ्या आहेत. त्या भिंतीतले कोनाडे पाहाण्यासारखे आहेत. या वाड्याची गावातल्या लोकांनी हागणदरी केलेली आहे. त्यामुळे येथे थोडा वेळ उभ राहाणे कठीण आहे. या दोन वाड्यांच्या मधून एक वाट देवीच्या मंदिराकडे जाते. मंदिरात डोक्यावर नागाचा फ़णा असलेली, हातात चक्र, गदा घेतलेली आणि पायाशी हत्ती असलेली देवीची मुर्ती आहे.   



         देवीचे मंदिर पाहून पुन्हा महादेव मंदिराच्या चौकात येऊन मंदिराकडे पाठ करुन सरळ चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्व दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या बाहेर थोड्या अंतरावर पळशी नदीचे अरुंद पात्र आहे. दरवाजावर चढून जाण्यासाठी पायर्‍या आहेत. दरवाजा वरून संपूर्ण किल्ला आणि आजूबाजूचा परीसर दिसतो.

विठ्ठल मंदिर, पळशी

व्याल आणि हत्ती, विठ्ठल मंदिर, पळशी

पूर्व दरवाजातून बाहेर पडून नदीचे पात्र ओलांडून गेल्यावर आपण विठ्ठल मंदिरापाशी येते. येथे नदीला बांध घातल्यामुळे जलाशय तयार झाला आहे. या जलाशयाच्या एका बाजूला विठ्ठल मंदिर आणि दुसर्‍या बाजूला शंकर मंदिर आहे. जलाशयाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंदिरे सुंदर दिसतात. विठ्ठल मंदिराच्या बाहेर नदीपात्राला लागून पुष्कर्णी आहे. मंदिराला भव्य प्रवेशव्दार आहे. त्यावरील कोरीवकामावर इस्लामी प्रभाव जानवतो. मंदिर तटबंदीच्या आत वसलेले आहे. प्रवेशव्दारावर नगारखाना आहे. मंदिर नागर शैलीतले आहे. मंदिराचा सभामंडपात कासव आहे. हे कासव थेट किल्ल्यातील महादेव मंदिरातील कासवाची प्रतिकृती आहे. सभामंडपाच्या छता़ची आतील बाजूची रचना महादेव मंदिराच्या छतासारखीच आहे. गर्भगृहाच्या व्दारपट्टीवर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजच्या वरच्या बाजूस श्रीकृष्ण आणि गोपिका कोरलेल्या आहेत. उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला श्रीकृष्णाची मुर्ती आहे.गर्भगृहात विठ्ठलाची नविन मुर्ती आहे. बाजूला काही नव्या जुन्या मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या खांबांवर फ़ारसे नक्षीकाम नाही पण त्यावर मोर आणि हत्ती कोरलेले आहेत. 



मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा मारताना तीन दिशांना तीन देव कोष्टक दिसतात त्यात विष्णू आणि महिषासूर मर्दिनीची मुर्ती आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर नक्षीकाम आणि नेहमी आढळणार्‍या सुरसुंदरी दिसत नाहीत. पण दोन फ़ुलांच्या पट्ट्या आणि कळसाच्या खालील बाजूस किर्तीमुखाची पट्टी पाहायला मिळते. गर्भगृहातील पाणी बाहेर जाण्यासाठी जो सांडवा आहे तेथे मकरमुख बसवलेले आहे. मंदिराच्या तटबंदीला असलेल्या जीन्याने फ़ांजीवर चढून कळस जवळून निरखता येतो. कळसात चार देवकोष्टक असून त्यात विष्णूच्या मुर्ती आहेत. छोटे छोटे कळस एकमेकात गुंफ़ून मुख्य कळसाची रचना करण्यात आली आहे. प्रवेशव्दाराच्यावर असलेल्या नगारखान्यात जाऊन बसलो . बाहेर ऑक्टोबरच्या दुपारचे उन रणरणत होते. नदीवरुन येणारी गार वार्‍याची झुळूक, नगारखान्यातली सावली आणि मंदिरात उभा असलेल्या वारकर्‍याच्या एकतारीतून एकाच सुरात, संथ लयीत ऐकू येणार संगीत यामुळे मस्त समाधी लागत होती . पण पोटात ओरडणारे कावळे आणि आजच्या दिवसात बघायची राहीलेली दोन ठिकाणे यामुळे समाधी सोडून निघण भाग होते. नदीच्या काठा पल्याडचे शिवमंदीर पाहून जामगावच्या किल्ल्याकडे निघालो. जामगावला जाण्यासाठी पुन्हा टाकळी ढोकेश्वरला जाणे आवश्यक होते. तिथे हायवे वर असलेल्या धाब्यावर पोट्पूजा उरकून जामगावचा किल्ला गाठला. 

मुख्य प्रवेशव्दार, जामगावचा भुईकोट 

जामगावच्या भुईकोटाला एका टेकडीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे जामगावच्या किल्ल्याची तटबंदी टेकडीच्या दोन बाजूंना भिडवलेली आहे. पण टेकडीच्या संरक्षणाची काही व्यवस्था केलेली आढळत नाही. ८६ एकरावर पसरलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीत २० बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील ३ दरवाजे बंद केलेले असून एकाच दरवाजातून किल्ल्यात जाता येते. जामगाव पारनेर रस्त्यावर मळगंगा मंदिराच्या समोर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. सध्या हा दरवाजा बंद केलेला आहे पण त्याच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज आणि तटबंदी आजही सुस्थितीत आहे. हा दरवाजा पाहून रस्त्याने पुढे गेल्यावर किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या समोरच्या बाजूला रस्त्याच्या पलिकडे हनुमानाचे मंदिर आहे. हनुमानाचे दर्शन घेऊन किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर दुहेरी तटबंदी दिसते या तटबंदीत महादजी शिंदे यांचा वाडा आहे. या वाड्याकडे न जाता प्रथम डाव्या बाजूला दिसत असलेल्या मंदिराकडे गेलो. येथे पेशवेकालिन मंदिर शैलीतले रामाचे मंदिर आहे. समोरच्या देवळीत हनुमानाची मुर्ती आहे. राम मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मुर्ती आहेत. मंदिरात गावकर्‍यांचा वावर नसल्याने मंदिर अस्वच्छ झालेले आहे. रामाचे मंदिर पाहून समोर दिसणार्‍या विठ्ठल रखुमाईच्या मंदिर गेलो. त्याचीही निगा राखली जात नाही. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे (जो बंद केलेला आहे. . दोन्ही मंदिरे पाहून आल्या वाटेने परत वाड्या कडे जाणार्‍या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. कारण पूर्वीच्या काळी या किल्ल्यातच जामगाव वसलेले होते. नंतरच्या काळात ते किल्ल्या बाहेर वसवण्यात आले.

शिंदेंचा वाडा, जामगाव किल्ला 

वाड्याकडे जातांना उजव्या बाजूला ३ कमानी असलेली मशिदीची इमारत दिसते. तर डाव्या बाजूला एक वीटांनी बांधलेली पडकी इमारत पाहायला मिळते. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला मजबूत तटबंदी पाहायला मिळते. वाड्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला पुढील बाजूने दुहेरी तटबंदी बांधलेली पाहायला मिळते. हि तटबंदी ओलांडल्यावर वाड्याच्या भोवतीची तटबंदी आणि त्यात असलेला छोटा दरवाजा दिसतो. या तटबंदीला एकूण सहा बुरुज आहेत. दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा दिसतात. समोरच्या बाजूला आठ पायर्‍या आहेत त्या चढून गेल्यावर आपण वाड्या समोर येतो. वाड्या समोरच उजव्या बाजूला प्रशस्त विहिर आहे. वाडा दुमजली आहे. वाड्यात अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असल्याने त्यात काही बदल केलेले आहेत. वाडा पूर्ण फ़िरुन पाहाता येतो. वाड्यात फ़ारसे कोरीवकाम किंवा नक्षीकाम केलेले नाही. वाड्याच्या गच्ची वरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर दिसतो. वाड्याच्या भिंतीतही जंग्या आहेत. वाडा पाहून विहिरी जवळ वाड्याच्या तटबंदीत असलेल्या दुसर्‍या दरवाजाने बाहेर पडावे. तेथून वळसा घालून मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी शनिवार किंवा रविवार निवडावा कारण इतर दिवशी कॉलेज चालू असल्यामुळे वाडा पाहाता येत नाही. वाड्याची आता खुप पडझड झाली आहे आणि तो सांभाळणे रयत शिक्षण संस्थेला जड जात असल्याने वाड्याच्या बाजूलाच कॉलेजची नवी इमारत बांधण्यात येणार आहे असे तेथिल एका माणसाने सांगितले.

सोमेश्वर मंदिर, पारनेर 

जामगावच्या किल्ल्याचा निरोप घेऊन पारनेरचा रस्ता पकडला. पारनेरच्या पुढे ४ किमीवर दोन ओढ्यांच्या संगमावर  सोमेश्वर मंदिर आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पराशर ऋषींची तपोभुमी होती असे स्थानिक लोक मानतात. या जागेत सध्या असलेल्या सोमेश्वर मंदिराचे बांधकाम मात्र मध्ययुगात झालेले असावे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी ओढ्यावर बांधलेला पुल ओलांडावा लागतो. येथे दोन्ही ओढ्यांवर बांधारे बांधून पाणी अडवलेले आहे. येथुन मंदिराचे होणारे प्रथम दर्शन आपल्याला या जागेच्या प्रेमात पाडते. मंदिरासाठी या जागेची योजना ज्याने केली तो खरच निसर्गप्रेमी रसिक माणूस असणार. मंदिराच्या प्रांगणात जमिनीवर बांधलेला एक घुमट आहे . घुमटाखाली  उतरण्यासाठी पाय‍र्‍या आहेत. पायर्‍या उतरुन गेल्यावर छोटासा काळोखी गाभारा आहे. त्यात पिंड आहे. गाभार्‍यात हवा खेळती राहावी यासाठी छ्ताला झरोके आहेत. हे मंदिर खास ध्यानधारणा करण्यासाठी बनवलेले असावे. मुख्य मंदिर दगडात बांधलेले आहे. मंदिराच्या भिंतींवर कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम किंवा मुर्ती नाहीत. मात्र मंदिराच्या परिसरात अनेक जीर्ण मुर्ती व्यवस्थीत ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्या जुन्या मंदिराच्या असाव्यात. मंदिर पाहून परत पुलापाशी येऊन मंदिराच्या विरुध्द दिशेला गेल्यास दगडात बांधलेली सुंदर पुष्कर्णी आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या कमानदार ओवर्‍या पाहायला मिळतात. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काही महिन्यात हा परिसर नितांत सुंदर दिसतो. एव्हाना सूर्य मावळला होता. त्यामुळे अधिक वेळ न घालवता परतीचा प्रवास चालू केला. 

पुष्कर्णी, सोमेश्वर मंदिर, पारनेर 

टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला, जामगावचा किल्ला आणि सोमेश्वर मंदिर पाहून घरी न परतता नगरला मुक्काम केल्यास दुसर्‍या दिवशी नगरचा किल्ला, रणगाडा म्युझियम (यावर आधीच ब्लॉग लिहिलेला आहे), फ़राह भाग इत्यादी ठिकाणे पाहात येतील. टाकळी ढोकेश्वरच्या १७५ पायर्‍या सोडल्यास बाकी सर्व ठिकाणे जनिमीवर असल्याने कोणालाही सहज भेट देता येईल .

सोमेश्वर मंदिर, पारनेर 

जाण्यासाठी :- कल्याण - नगर रस्त्यावर नगरच्या अलिकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याणपासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता (अंतर २५ किमी) अंतरावरील पळशी गावाकडे जातो. कल्याण ते पळशीचा किल्ला हे अंतर १९१ किमी आहे. (पुणे - शिरुर - पारनेर - टाकळी ढोकेश्वर - पळशीचा किल्ला हे अंतर १३३ किलोमीटर आहे.)


कल्याण - नगर रस्त्यावर टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता (अंतर ३३ किमी) पारनेरला जातो. पारनेरहून १२ किलोमीटरवर जामगावचा किल्ला आहे. कल्याण ते जामगावचा किल्ला हे अंतर २०३ किमी आहे. जामगावचा किल्ला पारनेर जामगाव रस्त्याला लागून आहे. पारनेर गावातून ४ किलोमीटरवर सोमेश्वर मंदिर आहे. (पुणे - शिरुर - जामगावचा किल्ला हे अंतर १०५ किलोमीटर आहे.)



Sunday, November 19, 2017

Offbeat Maharashtra कंधार - होट्टल आणि नांदेडची भटकंती Kandhar Fort, Siddheshwar Mandir, Hottal, Mukhed, Tadkhel & Nanded)

कंधार किल्ल्यातील शिल्प

भल्या पहाटे हुजूरसाहेब नांदेड स्टेशनला उतरलो. पावसाळी हवेमुळे गारवा जाणवत होता. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई पुण्याजवळचे गर्दीने बजबजलेल्या किल्ल्यांवर जाण्यापेक्षा दुरवरचे वेगळे किल्ले, मंदिर आणि प्रदेश पाहाण्याचा कार्यक्रम आखायला गेल्या काही वर्षापासून सुरुवात केली होती. स्टेशनवरची गर्दी कमी झाल्यावर उपहागृहाकडे मोर्चा वळवला. भल्या पहाटे त्याने लावलेल्या भयानक गाण्यांमुळे उपाहारगृह शोधायला वेळ लागला नाही. हिंदी सिनेमातली टाकाऊ गाणी निवडून त्याची सीडी बनवणारे आणि ती विकत घेणारे दोघेही प्रात:समयी वंदनीय असल्यामुळे तिथेच चहा घेतला. आता झुंजुमुंजू व्हायला लागल्याने फ़लाट सोडला आणि नांदेड शहरात प्रवेश केला. नांदेडचा गुरुव्दारा हे सुवर्णमंदिरा खालोखाल शिखांचे दुसरे महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्याने स्टेशनची इमारतही गुरुव्दारा सारखी बनवलेली होती. नुकत्याच उघडलेल्या हॉटेलात नाश्ता मिळेल का ? अस विचारल्यावर त्याने गरमागरम पोहे बनवून दिले तो पर्यंत आम्ही ठरवलेली गाडी आली. भरल्या पोटाने कंधारकडे कुच केले. नांदेडच्या तीन दिवसाच्या भटकंतीत पहिल्या दिवशी कंधार किल्ला, मुखेड, होट्ट्ल आणि तडखेल येथिल मंदिरे पाहायची होती. दुसर्‍या दिवशी गोळेगावची गढी, गुरुव्दारा आणी नांदेडचा किल्ला. तर तिसर्‍या दिवशी माहूरचा किल्ला पाहून परतीचा प्रवास करायचा होता.   



नांदेड शहरापासून ५८ किलोमीटरवर असलेले कंधार हे गाव बालाघाट रांगेच्या उतारावर मन्याड नदीच्या खोर्‍यात वसलेला आहे. इसवीसनाचा चौथ्या शतकात काकतीय घराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती केली आणि त्याला आपली राजधानी बनवले. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकुटांचीही ही राजधानी होती. त्यांनी कंधारपूर ही नगरी वसवली आणि जगत्तुंग समुद्र या विशाल तलावाची निर्मिती केली . राष्ट्रकुटांच्या काळात कंधार किल्ला कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जात असे. 
कंधार किल्ला


कंधार किल्ला गावाच्या एका बाजूला आहे. खंदक पार करुन किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत गेलो, पण दरवाजाला भला मोठा टाळा होता. किल्ला  पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असून ९ . ३० ते संध्याकाळी ५ .०० पर्यंत किल्ला पाहाता येतो. किल्ल्याचे दरवाजे उघडायला अजून अर्धा ते पाऊण तास होता. आम्हाला पाहून जमा झालेल्या गावकर्‍यां बरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. अशा गप्पांमधून नविन माहिती हाती लागते ती सहसा कुठल्याही पुस्तकात मिळत नाही. गप्पांच्या ओघात कळले की गावातल्या कॉलेज मधल्या प्रोफ़ेसरांनी कंधार किल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. ते कॉलेज जगत्तुंग सागर तलावाकाठी होते. नशिबाने सरांना लेक्चर नव्हते ते इतिहास विभागत होते. सरांशी भरपूर गप्पा झाल्या त्यांच्या इतर पुस्तका बद्दल माहिती मिळाली. पण त्यांच्या कंधारच्या पुस्तकाची प्रत त्यांच्याकडॆ नव्हती, कंधार मार्केट मधिल पुस्तकाच्या दुकानात मिळेल अस ते म्हणाले. गाडी कंधार मार्केटकडे घेतली. त्यादिवशी कंधारचा आठवडी बाजार होता. गावात भरणार्‍या आठवडी बाजारात फ़िरायला मला खूप आवडत. या बाजारातही सुबक विणलेल्या डिझायनर टोपल्या दिसल्या. अतिशय स्वस्त असल्याने लगेच विकत घेतल्या. कंधार वरच पुस्तक बरीच शोधाशोध केल्यावर दुकानदाराला मिळाल ते घेऊन कंधार किल्ला गाठला. किल्ल्याच कुलूप आता उघडलेल होत.    

कंधार आणि मानसपुरी परिसरात सापडलेली शिल्प,कंधार किल्ला  

इसवीसनाच्या चौथ्या शतकात वरंगळचा काकतीय राजा नंदगिरीने कंधार किल्ला बांधला. त्याचा पुत्र सोमदेव याने कंधार ही राजधानी बनवली असा उल्लेख प्रतापरुद्र यशोभूषण या ग्रंथात आहे. इसवीसनाच्या सातव्या  शतकात राष्ट्रकुट घराण्यातील राजा कृष्ण पहिला याने कंधार नगरास राजधानीचा दर्जा दिला . त्याच काळात कंधारला पाणी पुरवठा करण्यासाठी जगत्तुंग समुद्र या तलावाची निर्मिती करण्यात आली आणि कंधारचा किल्ला बांधण्यात आला. वेंगीचा चालुक्य राजा गुणग विजयादित्य तिसरा याने इसवीसनाच्या ९ व्या शतकात कंधार जाळून टाकले . राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने कंधार नगराची उभारणी केली. त्याच बरोबर किल्ला भक्कम केला. पुढील काळात राष्ट्रकुटानी त्यांची राजधानी गुलबर्गा जवळील म्यानखेटला याठिकाणी हलवली आणि कंधारला उपराजधानीचा दर्जा दिला .

इसवीसनाच्या १२ व्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता. १३ व्या शतकात मलिक काफूरने हा किल्ला जिंकून घेतला. महमद तुघलकाने १३४७ मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. त्याने नसरत सुलतान याला कंधारचा किल्लेदार नेमले . १२ वर्ष किल्लेदार म्हणून राहील्यावर त्याने बंड केले ते तुघलकाने मोडून काढले.इसवीसन १३४७ मध्ये हसनगंगूने बहामनी सत्तेची स्थापना केली तेंव्हा कंधार किल्ला त्याच्या ताब्यात गेला. बहामनी साम्राज्याचा अस्त झाल्यावर इसवीसन १५६५ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात किल्ला गेला. इसवीसन १५९६ मध्ये चांदबिबीने कंधार मोगलांच्या ताब्यात दिला. पुढे मलिक अंबरने हा किल्ला इसवीसन १६२० मध्ये मोगलांकडून जिंकून घेतला. त्याने किल्ला मजबूत केला . किल्ल्यात अंबरी बुरूज, दर्गा , मशीद बांधली आणि  किल्ल्यात पाणीपुरवठा योजना राबवली .  मोगल बादशाह शहाजहानने इसवीसन १६३१ मध्ये नसिरखान यास कंधार घेण्यास पाठवले. मोगलानी किल्ल्याला वेढा घातला. कंधारच्या किल्लेदाराने १९ दिवस किल्ला लढवला पण किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवीसनाच्या १८ व्या शतकात हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात कंधार किल्ला गेला . त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो निजामाच्या ताब्यात होता.

इसवीसनाच्या चौथ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत विविध राजवटींच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांनी या किल्ल्यात अनेक बदल, बांधकाम केली. आजही हा बदल आपल्याला पाहाता येतो. पुरातत्त्व खात्याने किल्ला उत्तम रितीने ठेवलेला आहे. किल्ल्यात भरपूर वास्तूंचे अवशेष आहेत. त्यांच्या बांधकाम शैलीतही वैविध्य आहे. 

मकरमुख असलेली बांगडी तोफ़,कंधार किल्ला  

कंधार किल्ला भूईकोट असल्यामुळे संरक्षणासाठी त्याच्या चारी बाजूला खंदक खोदलेला आहे .हा खंदक घडीव दगडानी बांधून काढलेला आहे. खंदकाची रुंदी १०० फ़ूट आणि खोली ५० फ़ूट आहे. अनेक वर्ष खंदकात गाळ साठल्यामुळे त्याची खोली कमी झालेली आहे. खंदकात पावसाचे पाणी साठवले जात असे तसेच कंधार गावात राष्ट्रकुटांनी बांधलेल्या जगत्तुंग तलावातून खंदकात पाणी सोडले जात असे. त्यासाठी बनवलेल्या मोर्या आणि सांडवे खंदकाच्या तलावाकडील भागात पाहाता येतात. खंदक साफ करण्यासाठी तसेच दुरुस्त करण्यासाठी त्यात उतरावे लागते. त्यासाठी ठराविक अंतरावर जीने बांधलेले आहेत. सध्याच्या मार्गाने खंदकात उतरल्यावर डाव्या बाजूला एक विहिर आहे. तसेच किल्ल्याच्या दक्षिण दिशेला खंदकात एक दर्गा आहे.

 आज आपल्याला किल्ल्यात जाण्यासाठी खंदकात उतरुन जावे लागते. पुरातत्व विभागाने त्यासाठी व्यवस्थित मार्ग बांधलेला आहे. खंदकाच्या भिंतीत कंधार गावाच्या बाजूला एक उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार आहे.  पूर्वीच्या काळी या खंदकावर काढता घालता येणारा पूल होता. खंदक पार करुन किल्ल्यासमोर पोहोचल्यावर भक्कम उत्तराभिमुख लोहबंदी दरवाजा आपल्याला दिसतो. या दरवाजावर लोखंडी खिळे मारलेले असल्यामुळे त्याला लोहबंदी दरवाजा हे नाव पडले आहे. या दरवाजावर थेट मारा करता येउ नये यासाठी त्यासमोर जीभीची भिंत बांधलेली आहे. 
छतावरील वीटांचे बांधकाम, कंधार किल्ला  

किल्ल्याला दोन तटबंद्या आहेत. लोहबंदी दरवाजा बाहेरच्या तटबंदीत आहे. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर वाट काटकोनात वळते. समोरच एक पूर्वाभिमुख मछली दरवाजा/मत्स्य दरवाजा आहे. मछली दरवाजावर दोन शिलालेख आहेत. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला एक फ़ारसी लिपीतील शिलालेख आहे. या दरवाजाच्या छतावर दोन मासे कोरलेले आहेत त्यावरुन या दरवाजाचे नाव मत्स्य दरवाजा उर्फ़  मछली दरवाजा असे पडले आहे. मछ्ली दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला भिंतीवर एक फ़ारसी लिपीतील शिलालेख आहे आणि समोर प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात दरवाजाच्या डाव्या बाजूला ६ देवड्या आहेत. या देवड्यांच्या शेवटी एक जीना आहे. त्याठिकाणी एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. दरवाजाच्या समोरच्या बाजूला  एक मजली इमारत आहे. त्या इमारतीला अंबरखाना म्हणतात. या इमारतीच्या भिंतीत एक व्यालाचे शिल्प पाहायला मिळते. राष्ट्रकुट काळातील किल्ल्यातील मंदिर आणि इतर वास्तू पाडून त्याचेच दगड किल्ल्याच्या पूर्नबांधणीसाठी त्यानंतरच्या इस्लामी शासकांनी वापरल्यामुळे असे अवशेष जागोजागी पाहायला मिळतात. किल्ल्याच्या बाहेरच्या भागात दरवाजा जवळ अंबरखाना (धान्यकोठार) असण्याची शक्यता कमी आहे. कारण किल्ल्याच्या आतही एक अंबरखाना आहे. या इमारतीचा उपयोग कचेरी सारखा होत असावा. कंधार प्रशासकीय किल्ला असल्याने, प्रशासकीय कामासाठी आलेल्या लोकांना किल्ल्यात प्रवेश करण्याची आवश्यकता पडू नये त्यांची काम बाहेरच्या बाहेर व्हावीत याकरीता याठिकाणी कचेरी असण्याची शक्यता जास्त आहे. आता या इमारतीत पुरातत्त्व खात्याच कार्यालय आहे. या अंबरखान्याच्या मागच्या बाजूस जो भव्य बुरुज आहे त्याला टेहळणी बुरुज म्हणतात. या बुरुजावर एक कमानदार छत असलेली एक खोली आहे. या खोलीत बसून किल्ल्याच्या दरवाजावर तसेच बाहेर नजर ठेवता येते.  

कंधार आणि मानसपुरी परिसरात सापडलेली शिल्प,कंधार किल्ला  

लोहबंदी दरवाजा, मछली दरवाजा आणि प्रांगणातल्या इमारती हा भाग बाह्य आणि आतल्या तटबंदीच्या मध्ये आहे. प्रांगणाच्या टोकाला आतील तटबंदीत एक भव्य दरवाजा आहे. या दरवाजाला रंगीन दरवाजा किंवा महाकाली दरवाजा म्हणतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला महाकाली बुरुज उर्फ़ धन बुरुज आहे. या बुरुजावर फ़ारसी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. रंगीन दरवाजाच्या डाव्या बाजूला भव्य बुरुज आहे. तो बुरुज शहा बुरुज किंवा इब्राहिमी बुरुज या नावाने ओळखला जातो. औरंगजेबाच्या काळात बहादूरशहा या किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने किल्ल्याच मजबूतीकरण केले. त्यावेळी हा भक्कम बुरुज बांधला. या बुरुजावर बाहेरच्या बाजूला एक आणि आतील बाजूला २ फ़ारसी लिपीतील शिलालेख आहेत.  रंगीन दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला भक्कम खांबांवर तोललेल्या कमानदार ओवर्‍या आहेत. या कमानदार छ्तावर पूर्वी चुन्यात कोरीवकाम केलेले होते व त्यात रंग भरलेले होते म्हणून या दरवाजाला रंगीन दरवाजा असे नाव पडले होते. पण पूरातत्व खात्याने दुरुस्ती करतांना येथे सिमेंटचा गिलावा केल्यामुळे केवळ उजव्या बाजूच्या कोपर्‍यात आपल्याला नक्षीचा एक रंगीत तुकडा पाहायला मिळतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला आपल्याला भव्य दगडी शिल्पाचे अवशेष दिसतात. यात नाकापासून डोक्या पर्यंतचा भाग, पावल, बीजपूरक फ़ळ धरलेले हात दिसतात. इ.स. १९६० मध्ये कंधार जवळ असलेल्या मानसपुरी गावातील श्री मानसपुरे यांच्या शेतात हे अवशेष मिळाले होते. राष्ट्रकुट नृपती कृष्ण तिसरा याने कंधार लेखात उल्लेख केलेल्या क्षेत्रपालीची ही मुर्ती असावी असा अंदाज आहे. कंधार गावात केलेल्या उत्खननात गणेशाच्या मुर्ती, पार्श्वनाथाचे मुर्ती व इतर अनेक मुर्ती मिळालेल्या त्याही या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे अवशेष पाहिल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूला महावीर जैनांची बसलेली मुर्ती आहे. ती मुर्ती पाहून त्याच्या बाजूला असलेल्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाकाली / धन बुरुजात एक वास्तू दिसते. या वास्तूत एक भूयार आहे. ही वास्तू तिजोरी किंवा जवाहिरखाना म्हणून वापरण्यात येत होती. त्यावरूनच महालकाली बुरुजाला धन बुरुज असे नाव नंतरच्या काळात पडले असावे. या वास्तूच्या समोरच्या बाजूस मशिदेचे उत्तराभिमुख प्रवेशव्दार आहे ते ओलांडून आपण मशिदीपाशी पोहोचतो. काकतीय राजा सोमदेव व महादेव यांनी याठिकाणी शिवमंदिर बांधले होते. ते पाडून निजामाच्या काळात मशिद बांधण्यात आली. शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुजवून त्याठिकाणी उत्तराभिमुख प्रवेशव्दार बांधण्यात आले. पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुजवले असले तरी त्याच्या दोन्ही बाजूना असलेली नागशिल्प आणि आजही पाहायला मिळतात. मशिदीच्या इमारतीची लांबी ५० फ़ूट व रूंदी २५ फ़ूट आहे. मशिदीवर तीन घुमट आहेत. मशिदीवर चार फ़ारसी लिपीतील शिलालेख आहेत. मशिदी समोर १५ फ़ूट लांब आणि १५ फ़ूट रूंद आणि ४ फ़ूट खोल तलाव आहे. या तलावाच्या मागच्या बाजूला शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार होते ते बंद करून त्याठिकाणी दोन मजली महाल बांधलेला आहे. मशिदीच्या बाजूला चुन्याचा घाणा, जात आणि शिवलिंग ठेवलेल आहे. 

मशिद, कंधार

मशिदीच्या बाजूने जाणार्‍या जीन्याने अंबरी बुरुजावर जाता येते. निजामाचा सेनापती मलिक अंबरने या बुरुजाची फ़ेरबांधणी केली. त्यामुळे हा किल्ल्यावरील सर्वात भव्य आणि मोठा बुरुज मलिक अंबरच्या नावाने ओळखला जातो. या बुरुजावर मकरमुख असलेली मोठी १५ फ़ूट लांब बांगडी तोफ़ आहे. तोफ़ेला दोन्ही बाजूला गोलाकार कडी आहेत. अंबरी बुरुजावरून फ़ांजीवर उतरून दक्षिण दिशेकडे चालत जाताना आपल्याला उजव्या बाजूला बुरुज तर डाव्या बाजूला किल्ल्याच्या आतल्या वास्तू दिसतात. अंबरी बुरुजा पासून दुसर्‍या बुरुजावर एक खोली आहे. पुढे गेल्यावर फ़ांजीला लागून डाव्या बाजूला एक उध्वस्त वास्तू आहे. तो शाही हमामखाना म्हणजेच शाही स्नानगृह आहे. किल्ल्यातील राणी महालात आणि राजवाड्यातही स्नानगृह आहेत त्या व्यतिरीक्त हे स्नानगृह बांधलेल आहे. यात पाणी आणण्यासाठी तांब्याचे नळ वापरलेले आहेत ते आजही पाहायला मिळतात. स्नानगृह पाहून परत फ़ांजीवर येऊन पुढे चालायला सुरुवात केल्यावर पुढच्या बुरुजावर खोली आहे. त्याच्या पुढील बुरुज (अंबरी बुरुजा पासून चौथा बुरुज ) दर्गा बुरुज या नावाने ओळखला जातो. कारण या बुरुजाच्या खाली खंदकात एका उंचवट्यावर दर्गा बांधलेला आहे. बुरुजावर चढल्यावर आपल्याला खंदकातील दर्गा आणि खंदकाच्या भिंतीत बाहेरुन पाणी आणण्यासाठी केलेला कमानदार बोगदा पाहायला मिळतो.  दर्गा बुरुजावरुन फांजीवर उतरल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून एका वास्तूचे छत दिसते . या छताला ९ गोल आकाराची,  ३ फुट व्यासाची तोंड दिसतात . हे किल्ल्यावरचे कैदखाने (तुरुंग) आहेत . त्याची उंची २० फूट आहे. यात कैद्यांना वरुनच सोडले जात असे तसेच कैद्यांना अन्न पाणी याच ठिकाणीहून सोडण्यात येत असे.



कैदखाने पाहून परत फांजीवर येउन दक्षिण तटबंदीतील शेवटच्या बुरुजापाशी पोहोचतो. हा बुरुज बहाद्दरपूर गावाच्या दिशेला असल्यामुळे त्याच नाव बहाद्दरपूर बुरुज आहे. बुरुजावर एक खोली व तोफ आहे. बुरुजावरुन खाली उतरुन आता फांजीवरुन पूर्वेला चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून (किल्ल्याचा आतल्या बाजूला) कैदखाना आणि त्याला लागूनच एक इमारत आहे. या इमारतीला लागून खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. पायर्‍यांनी खाली उतरल्यावर या ठिकाणी किल्ल्यावरील धान्यकोठार आहे. प्रवेशव्दाराच्या आतमध्ये कमानी असलेली ८ दालने आहे. अंबरखान्यात हवा खेळती राहावी यासाठी ३ फ़ूट उंचीचे व २ फ़ुट रुंदीचे झरोके ठेवलेले आहेत. वास्तूच्या बाहेर पाहारेकर्‍यांसाठी ३ खोल्या आहेत.  अंबरखान्याची वास्तू इंग्रजी "L" आकाराचे असून पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण तटबंदीला समांतर बांधलेली आहे. अंबरखाना पाहून परत फांजीवर येउन पुढे चालायला सुरुवात केल्यावर पूर्व तटबंदीतल्या शेवटच्या बुरुजापाषी पोहोचतो या बुरुजाचे नाव मानसपूरी बुरुज आहे. मानसपूर गावाच्या दिशेने असल्यामुळे त्याला हे नाव पडलेले आहे. मानसपूर बुरुजावर एक तोफ आणि एक खोली आहे.
शीश महाल (काच महाल), कंधार

मानसपूर बुरुजावरुन उतरून उत्तरेकडे चालत गेल्यावर दुसर्‍या बुरुजाखाली एक खोली आहे. त्यावर एक फ़ारसी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ आहे. बुरुजावरुन फांजीवर उतरुन चालत गेल्यावर उत्तर टोकावरचा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजावर एक तोफ आहे. बुरुजा समोर तटबंदीला लागून तीन मजली राणी महालाचे अवशेष आहेत . राणी महालात जाण्यासाठी फांजीवरुन जीना आहे . पुढे एक प्रवेशव्दार आहे. त्यातून आत गेल्यावर एक कमानदार बोळ आहे त्याच्या शेवटी पायर्‍या आहेत त्या चढून गेल्यावर आपला राणी महालाच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश होतो. या ठिकाणी अनेक दालन, त्यातील कोनाडे,  हौद,  स्नानगृह,  शौचालय आणि त्यात तांब्याच्या नळांद्वारे खेळवलेले पाणी पाहायला मिळते. राणी महालाच्या पुढे राजमहाल शहा बुरुजा पर्यंत पसरलेला आहे. राज महालातून शहा बुरुजावर चढून जाताना दोन कमानी असलेली छोटी प्रवेशद्वार आहेत.  एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. बुरुजावर चढून गेल्यावर दुसरा शिलालेख आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ तोंड खाली करुन उभी करुन ठेवलेली आहे. शहा बुरुज पाहून परत राणी महालात येउन खाली उतरणार्‍या पायर्‍याच्या वाटेवर पुन्हा दोन प्रवेशद्वार आहेत. राजमहाल, राणी महाल ही महत्वाची ठिकाणे दोन्ही बुरुज आणि इतर किल्ल्यापासून वेगळी करण्यासाठी सर्व दिशांना प्रवेशद्वार ठेवलेली आहेत. खाली उतरल्यावर आपण मानसपुरीहून मिळालेल्या मुर्ती ठेवल्या आहेत तेथे पोहोचतो. याठिकाणी आपली किल्ल्याची तटबंदीवरुन संपूर्ण प्रदक्षिणा होते. शहा बुरुजाच्या पायथ्याशी आणि जीन्याजवळ काही वास्तूंचे अवशेष आहेत. राजमहालात आणि राणी महालात काम करणार्या अधिकारी आणि नोकर वर्गासाठी या वास्तू बाधलेल्या असाव्यात.
दारु कोठार, कंधार

तटबंदी वरून किल्ला पाहिल्यावर किल्ल्याच्या आतील वास्तू पाहाण्यासाठी रंगिन दरवाजाच्या समोरच्या भागात जावे. या ठिकाणी एक चौकोनी विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. या परिसरात झालेल्या उत्खननात येथे सार्वजनिक हमामखाना (स्नानगृह ) असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या बाजूला जी दोन मजली उध्वस्त वास्तू दिसते ती नक्षी महाल या नावाने ओळखली जाते. या महालात ५ हौद व स्नानगृह व शौचालय यांच्या वेगळ्या वास्तू आहेत. हा महाल मुघल सरदार बहादूरखानने बांधला होता. नक्षी महालाच्या बाजूला एक प्रवेशव्दार आहे त्यातून आत गेल्यावर आपण एका उद्यानात पोहोचतो. या जागी शाही उद्यान होते. येथे असलेल्या हौदांमध्ये तांब्याच्या नळांव्दारे पाणी खेळवून कारंजी उडवली जात. हौदातील तांब्याचे नळ आजही पाहायला मिळतात. या उद्यानाच्या दुसर्‍या बाजूला एक प्रवेशव्दार आहे ते राजाबाघ प्रवेशव्दार या नावाने ओळखले जाते. हे सुंदर बांधणीचे प्रवेशव्दार राष्ट्रकुट काळातले असून त्याकाळी त्यावर दोन्ही बाजूला शरभाचे शिल्प होते. दरवाजा दुरुस्त करतांना पुरातत्व खात्याने ती शिल्प काढून टाकाली. त्यावरून याला पूढच्या काळात व्याघ्र दरवाजा आणि नंतर मुस्लिम शासकांच्या काळात बाघ दरवाजा असे नाव प्रचलित झाले. या व्याघ्र दरवाजाच्या बाजूला शीश महाल (काच महाल) आहे. हा महाल उत्तराभिमुख असून दोन मजली आहे.हा महाल १५ फ़ूट लांब व १० फ़ूट रुंद आहे. या महालात अनेक कोनाडे,  देवळ्या चुन्यात कोरलेल्या आहेत. यात विविध रंगाच्या काचा आरसे बसवून हा महाल सजवण्यात आला होता. या महालाच्या पूर्व भिंतीवर एक पाण्याचा छोटा कृत्रिम धबधबा ही तयार केला होता. त्यासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी येथे तांब्याचा नळही दिसणार नाही अशाप्रकारे आतल्या बाजूला बसवलेला आहे. या ठिकाणी लावलेल्या काचा आणि आरश्यांमुळे या महालाला शीशमहाल हे नाव पडल आहे. शीश महाल पाहून वाघ दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या कमानीतून बाहेर पडल्यावर समोर एक पाण्याचा हौद दिसतो, तर डाव्या बाजूला अनेक कमानी असलेले इंग्रजी "L" आकाराचे दारु कोठार आहे. त्यात अनेक आकारचे तोफ़गोळे पडलेले पाहायला मिळतात. दारू कोठार पाहून आल्या मार्गाने वाघ दरवाजा पाशी यावे. वाघ दरवाजातून बाहेर गेल्यावर उजव्या बाजूला दर्गा आहे. ही वास्तू १० फ़ुट लांब, १० फ़ूट रुंद आणि १० फ़ूट उंच आहे. त्यावर घुमटाकार छत आहे. ही एका सुफ़ी संताची कबर आहे . दर्ग्याच्या बाजूला कमानी असलेल्या वास्तू आहेत. त्याच्या बाजूला अनेक कोनाडे असलेला दोन मजली महाल आहे. महालाच्या समोर एक छत्री आहे.ती मुघल काळात राजपूत सरदाने बांधली असावी. या संकुलातून बाहेर पडतांना दोन कमानी आहेत. त्याच्या डाव्या बाजूला ज्या वास्तू आहेत त्यांना घोड्याच्या पागा म्हणतात. शाही घोडे येथे बांधले जात. कमानीतून बाहेर पडून उजव्या बाजूला वळल्यावर आपण लालमहालाच्या परिसरात जातो. निजामाच्या काळात हा महाल आणि त्यासमोरचा सुंदर तलाव बांधण्यात आला. तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी बांधलेली नक्षीदार नाली पाहाण्यासारखी आहे. या महालाच्या दक्षिण बाजूच्या कुंपणाच्या भिंतीत अनेक कोनाडे आहेत. याठिकाणी कबूतर खाना होता. लाल महाल पाहून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर समोर एक प्रवेशव्दार दिसते त्यातून पुढे गेल्यावर परिस विहिर आहे. त्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. बाजूला हत्तीची शिल्प कोरलेली आहेत. पायर्यांनी खाली न उतरता डाव्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आपण एका प्रांगणात येतो. याठिकाणी विहीरीच्या भिंतीला लागून जलमहाल बांधलेला आहे.उन्हाळ्याच्या दिवसात थंदावा मिळावा याकरिता या जलमहालाची निर्मिती राष्ट्रकुटांच्या काळात करण्यात आली होती. या महालाचे प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. जलमहाल १८ फ़ूट लांब आणि ११ फ़ूट रुंद आहे. त्याच्या छताची उंची १२ फ़ूट आहे. जलमहालाला विहिरीच्या बाजूला ३ खिडक्या आहेत. त्यातून विहिरीच्या पाण्यावरुन येणारी गार हवा महालात येते. महाल दोन मजली होता. पूर्णपणे दगडाने बांधलेला असल्याने बाहेरच्या उष्णतेने तो तापत नाही. आज महालाचा वरचा मजला नष्ट झालेला आहे. महालाच्या आतल्या बाजूस एका दगडी व्दार पट्टीवर गणपती आणि फ़ुल कोरलेली आहेत. या जलमहालात प्रवेश केल्यावर डाव्या १० फ़ूट लांब २ फ़ूट रुंद आणि ८ फ़ूट उंच खोली आहे. मुख्य जलमहालाला लागून एक वास्तू आहे . हा सुध्दा एक छोटा जलमहालच आहे. याचे प्रवेशव्दार उत्तराभिमुख असून ४ फ़ूट उंच आणि२ फ़ूट रुंद आहे. या जलमहालाला एकच झरोका आहे.   
पारस विहिर आणि जलमहाल

पारस विहिर आणि जलमहाल पाहून बाहेर आल्यावर तटबंदीच्या दिशेने गेल्यावर एक मशीदची इमारत दिसते, तीला एक खांबी मशिद म्हणतात. मशिदीच्या मागच्या बाजूला तटबंदी लगत घोड्याच्या पागा आहेत. मशिद पाहून परत विहिरीच्या प्रवेशद्वारापाशी येउन बाहेर पडल्यावर एक स्टेज आणि त्याच्या दोन्ही बाजूला इमारत दिसते . हा रंगमहाल आहे. या ठिकाणी नाचगाण्याचे कार्यक्रम होत असत. समोर बसण्यासाठी पटांगण आहे. मागच्या भिंतीत दिवे लावण्यासाठी कोनाडे केलेले आहेत. रंगमहाल पाहून समोर असलेल्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आपण राणी महाला समोरील बारादरी या इमारतीपाशी पोहोचतो. या इमारतीला चारही बाजूला मिळून कमानदार १२ खिडक्या आहेत. बारादरी महालाच्या दक्षिणेस १० वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. ही किल्ल्यावरील अधिकार्‍यांची निवासस्थाने असावीत.
लालमहाल


बारदरी पाहून रंगीन दरवाजापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ल्यावर या व्यतिरिक्त अनेक वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला तटा बुरुजांवर काही शिल्प आहेत. मानसपूरी बुरुजावर शरभ आणि हत्तीचे शिल्प आहेत. बहाद्दुरपुरा बुरुजावर दोन शरभ शिल्प आहेत. दर्ग्या जवळील बुरुजावत माकडाची शिल्प आहेत. किल्ल्याच्या बाहेरुन खंदका पलिकडून फ़ेरी मारतांना ही शिल्प पहाता येतात.

बारदरी


कंधार किल्ल्या सोबत आजूबाजूला असलेली ऐतिहासिक ठिकाणही किल्ल्या बरोबर पाहाता येतात.
१) कंधार गावात राष्ट्रकुटांनी बांधलेला जगत्तुंग सागर हा तलाव आहे.
२) कंधार किल्ल्यापासून १ किलोमीटरवर मानसपुरी हे गाव आहे. या गावात किल्ल्यात सापडलेल्या मुर्ती शांतीघाटावर ठेवलेल्या आहेत.
३) कंधार किल्ल्यापासून अर्धा किलोमीटरवर बहाद्दरपुरा हे गाव आहे. या गावात रस्त्यालगत आणि म्युझियम मध्ये काही मुर्ती ठेवलेल्या आहेत.

ही तीनही ठिकाणे पाहून मुखेड गावाकडे मोर्चा वळवला.

एखाद्या ठिकाणी भटकायला जातांना त्या परिसरावर मिळतील तितकी पुस्तक ,इंटरनेट वर उपलब्ध असलेली माहिती वाचायची सवय लागली आहे . इंटरनेटवर उपलब्ध असलेली गॅझेटियर हा भटकणाऱ्यासाठी खजिना आहे. इंग्रजानी स्वत:च्या सोयीसाठी बनवलेल्या या गॅझेटियर मध्ये भरपूर माहीती असते . त्यातच मुखेड, तडखेल , होट्टलच्या मंदिराची माहिती मिळाली ही तीनही ठिकाण आता बघायची होती.

शिव मंदिर, मुखेड

कंधारहुन मुखेड ३२ किलोमीटरवर आहे . मुखेड छोट गाव आहे . गावातल्या दाट वस्तीत शंकराचे पुरातन मंदिर आहे . मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि सिमेंटीकरणाने त्यामुळच्या सुंदर मंदिराचे केलेले विद्रूपीकरण डोळ्यात सलायला लागल होते. मंदिराच्या सभागृहाच्या पुढे कॉंक्रीटचा स्लॅब आणि पिलर टाकून एक्सटेंशन दिल होते. मुळचा कळस कोसळलेला आहे त्या जागी अतिशय बेढब कळस बांधला होता. मंदिरातील खांबावर सुंदर नक्षीकाम आणि मुर्ती कोरल्ता आहेत . त्या खांबावर आणि सर्वच दगडी बांधकामांवर गुलाबी ऑईलपेंट लावला होता. गर्भगृहाचे तर निळ्या टाईल्स लावून बाथरुम करुन टाकल होते . मंदिराच्या बाह्यभिंती कशा काय माहिती नाही पण या अत्याचारापासून वाचल्या होत्या . त्यावर सुरसुंदऱ्यान्च्या मुर्ती आहेत . एकंदरीत मुखेडच्या मंदिराने निराशाच केली.  

सिध्देश्वर मंदिर, होट्टल

मुखेड - होट्टल अंतर ५० किलोमीटर आहे. (नांदेड - होट्टल ९० किमी) आता होट्टल गाठण आवश्यक होते. पावसाळी वातावरण आणि वेळेशी चाललेली मारामारी यामुळे आम्ही जेवणाचा विचार सर्वानुमते रद्द केला आणि देगलूर गाठले . महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेल हे मोठ गाव. इथल्या लोकांच्या पेहरावात आणि भाषेच्या लहेजातही थोडा फरक होता. होट्टलचा रस्ता विचारुन आणि अमृततुल्य चहा पिउन होट्टल गाठल. गावा बाहेर दोन मंदिरांच संकुल आहे . जसजस मंदिरांच्या जवळ जायला लागलो तसतशी त्याची भव्यता आणि सुंदरता डोळ्यात भरायला लागली  संध्याकाळची वेळ असल्याने गावातली सगळी मुल मंदिर परिसरात खेळायला जमली होती. आम्ही म्हणजे त्यांना आयतीच करमणूक होती. जेथे जाऊ तेथे तू माझा सांगाती या उक्तीप्रमाणे ते आमच्या मागेमागे फिरत होते. फोटो काढणे कठीण झाले होते . त्यावर उपाय म्हणून त्यासर्वाना गोळा करुन एक ग्रूप फोटो काढला . त्यांना प्रत्येकाला तो दाखवला , मग मुल पांगली आणि आम्ही शांत पणे मंदिर पाहायला सुरुवात केली . 

सिध्देश्वर मंदिर, होट्टल


या ठिकाणी दोन मंदिर बाजूबाजूला असून एका मंदिराला सिध्देश्वर मंदिर आणि दुसर्‍या मंदिराला महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते.  पुरातत्व खात्याने मंदिराची नुकतीच पुनर्बांधणी करुन त्याला गतवैभव प्राप्त करुन दिलेले आहे. होट्टल गावात चालुक्यांनी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. त्यातील सोमेश्वर मंदिराला चालुक्य राजा विक्रमादित्य याने इसवीसन ११०१ मध्ये त्याच्या २६ व्या राज्यारोहण दिनानिमित्त दान दान दिल्याचा शिलालेख मंदिरात आहे. त्या अर्थी हे मंदिर ११ व्या शतकापूर्वी अस्तित्वात होते. या सिध्देश्वर मंदिराच्या बाह्यभिंतींवर अनेक सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. नृत्य गणेशाची एक सुंदर मुर्ती बाह्यभिंतीवर पाहायला मिळते. या गणेशाच्या बाजूला एक दगडी घट बसवलेला आहे. त्यात पाणी ओतले असता ते थेट गर्भगृहातील पिंडीवर पडेल अशी व्यवस्था केलेली आहे. देवकोष्ठात शंकराच्या विविध मुर्ती आहेत. गर्भगृहाच्या व्दारपट्टीवर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. छतावर सुंदर नक्षीकाम आहे. बाजूला असलेल्या महादेव मंदिरात सिध्देश्वर मंदिरापेक्षा शिल्प कमी प्रमाणात आहेत.   शिवाय गावात सोमेश्वर मंदिर आहे. सोमेश्वर मंदिर त्रिदल रचनेचे असून याला तीन गर्भगृहे आहेत.  ती अनुक्रमे ब्रम्हा, विष्णू, महेश यांची आहेत. 

दगडी घट,सिध्देश्वर मंदिर, होट्टल

नृत्य गणेश

सुरसुंदरी

सुरसुंदरी

सुरसुंदरी

















देगलूर ते तडखेड अंतर १२ किलोमीटर आहे. गावात शिरलो तेंव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. शंकर मंदिर कुठेय ? अस विचारल्यावर गावातल्या लोकांनी आम्हाला भरवस्तीत नेल आणि सिमेंटने बांधलेले एक मंदिर दाखवल . ते ओबडधोबड सिमेंटमध्ये बांधलेले मंदिर पाहून आल्या पावली मागे फिरावे अस वाटायला लागले. पण एवढे आलोच आहोत तर पाहून जाउया म्हणून मंदिराच्या जवळ गेलो तर दोन गाय वासरु खांब खांब पडलेले होते . त्यावर सुबक गाय वासरु कोरलेले होते आणि खाली तेलगू लिपीतला शिलालेख होता . गाय वासरू दगड महाराष्ट्रात अनेक गावात गायवासरु दगड उर्फ़ धेनुगळ पाहायला मिळतात धेनूगळ हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.
धेनुगळ, तडखेड 

शिलालेख , तडखेड 


मंदिरात शिरलो गर्भगृहाच्या बाजूला ४.' ५ " उंच आणि २ ' रुंद शिलालेख आहे . त्याची वरील बाजूस कलश कोरलेला आहे . त्याख्हालच्या पट्टीवर मध्यभागी पिंड कोरलेली आहे. त्या बाजूला चंद्र सुर्य कोरलेले आहेत आणि सर्वात बाहेरील बाजूस दोन्ही बाजूला बैल आणि तलवार कोरलेली आहे. . खाली तब्बल ४० ओळींचा तेलुगू लिपीतील शिलालेख आहे . कल्याणी चालुक्यांची सत्ता या भागावर होती त्यावेळी त्यांनी कोरुन घेतलेले अनेक तेलगु लिपीतील शिलालेख महाराष्ट्र पाहायला मिळतात. मंदिराच्या आजूबाजूच्या घरांचा बांधणीमध्ये जुन्या मंदिराचे अनेक अवशेष वापरलेले दिसत होते . एक चांगला ठेवा काळाच्या उदरात गडप झाला . आता पाऊसही सुरु झाला होता . रात्री उशिरा नांदेडला पोहोचलो. 

सकाळी नाश्ता करुन थेट गोळे गावातली गढी गाठली . मध्ययुगापासून  मराठवाड्यात अनेक वर्ष अस्थिर राजकीय परिस्थिती होती.  त्यामुळे परकीय सैन्य , दरोडेखोर यांच्या पासून संरक्षण होण्यासाठी गावच्या पाटलांनी , इनामदारानी गढ्या बांधलेल्या पाहायला मिळतात. ही गढी बामणाची म्हणजेच ब्राम्हण कुटुंबाची होती . ते सध्या इथे राहात नाहीत . गढी ज्याच्याकडे सांभाळायला होती तो कुलूप लावून बाजाराच्या गावी गेला होता. कोणीतरी आपल्या गावातली गढी बघायला आलय म्हटल्यावर गावातल्या मुलाना चेव आला . त्यांनी मोबाईलवर त्याला फोन लावला पण तो बधेना. मग आमची गाडी घेउन ती मुल १० किमीवरील त्या बाजाराच्या गावात गेली आणि त्याला घेउन आली . तो पर्यंत आम्ही गढीच्या बाजूला असलेला चौसोपी वाडा पाहीला. वाड्याच्या मालकाने चांगल्या प्रकारे ठेवला होता .
गोळे गावातली गढी 

जीप मध्ये चावीवाल्याला घेउन गावातली मुल विजयी वीराप्रमाणे आली आणि अख्खा गाव आमच्या बरोबर गढी बघायला आला . मग त्या चावीवाल्याने सगळ्यांना हाकलवल. तरी काही बायका आमचे कपडे उडून वाड्यात पडलेत ते घ्यायचेत म्हणून आले . २० फुटी भिंतीवरुन वाळत घातलेले कपडे कसे काय वाड्यात गेले हा प्रश्न आम्हाला पडला . 

चौसोपी वाडा

अशा प्रकारे गावातल्या लोकांची पांगापांग केल्यावर चावीवाल्याने दार उघडल . गढी म्हणजे मिनी किल्लाच असतो. छोट्या दरवाजाच्या आत पाहारेकर्यांसाठी देवडी होती . पुढे तटबंदी काटकोनात वळून दुसरा मोठा दरवाजा होता . त्याला दिंडी होती दिंडीतून आत गेल्यावर चौसोपी वाडा होता . सागात आणि शिसवी लाकडात बनवलेल्या या एक मजली वाड्याची पडझड झाली होती . वाड्याला लागून विहीर होती. तटबंदीवर चढण्यासाठी जीना होता . तटबंदीत बंदुकीतून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्यांची रचना केलेली होती . वाडा पाहून नांदेड गाठल . नांदेडचा सचखंड श्री हुजुर साहेब गुरुव्दारा आणि परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवलेला आहे. ते पाहूनच मन प्रसन्न झाले. गुरुव्दाराचे दर्शन घेउन लंगर गाठला . लंगर मधील स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेउन नांदेड किल्ला पाहाण्यासाठी निघालो.

गोदावरी नदीच्या काठी वसलेले नांदेड हे प्राचीन शहर आहे. या शहरात गोदावरी नदीच्या उत्तर तटावर नंदगिरी नावाचा किल्ला होता. आज किल्ल्याचे काही अवशेषच उरले आहेत. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही त्यावर नांदेड महानगरपालिकेने पाण्याच्या दोन टाक्या आणि बंगले बांधून किल्ल्याचा उरलेला भागही गिळंकृत केला आहे. किल्ल्यावरील पुष्कर्णीचे चुकीच्या पध्दतीने नुतनीकरण केलेले आहे.
पुष्कर्णी, नांदेड किल्ला

नांदेड शहराच्या जुन्या भागातील अरब गल्लीत गोदावरीच्या पात्रा लगत किल्ल्याचे अवशेष उरलेले आहेत. नंदीतट, नंदीनगर, नंदीग्राम, इत्यादी नावाने इतिहासात प्रसिध्द असलेल हे नगर नंद वंशातील राजाने वसवलेले होते. पैठण ही नंदवंशाची दक्षिण भारतातली राजधानी होती.तर नंदआहार आणि नवनंदडेरा ही उपराजधानी होती. याच नवनंदडेरा या नावाचा अपभ्रंश होऊन नांदेड हे आजचे नाव प्रचलित झाले. नांदेड हे शहर उपराजधानी आनि व्यापारी केंद्र असल्याने त्याकाळी त्या शहराला संरक्षणासाठी तटबंदी असणार. नांदेड हा नगर किल्ला होता.सातवहानांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपिठ होते.सांचीच्या स्तुपावरील दानलेखात त्याचा उल्लेख आहे. वाकाटक त्यानंतर चालुक्य ,राष्ट्रकुट व गंग यांच्या काळात नांदेड हे प्रसिध्द शैक्षणिक केंद्र आणि वैभवशाली नगर म्हणुन प्रसिध्द होते.त्यानंतरच्या काळात बहामनी, मुघल आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाकडे हा किल्ला होता.  

नांदेड जिल्ह्यात रेणूका देवीचा माहूरगड हा किल्लाही आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.