Tuesday, September 24, 2013

" पेव फुटणे " (Flowers in Sahyadri :-- Costus speciosus)

      
  " बॉम्बस्फोटा नंतर अफवांचे पेव फुटले ", "अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले" असे अनेक मथळे वर्तमानपत्रात आपण वाचत असतो. लहानपणी न समजून ही अनेक गोष्टी पाठ केल्या होत्या, त्यापैकी "पेव फुटणे - भराभर बाहेर पडणे",  हा वाकप्रचार ही पाठ करून १ मार्कही मिळवला होता. पण या शब्दाचा अर्थ पुढे कधीतरी मला माझ्याच अंगणात सापडेल असं मात्र वाटल नव्हत. सप्टेंबर महिन्यात गणपतीला गावी गेलो होतो, आमच्या सुपारीच्या बागेत जिथे नेहमी मोकळी जागा असते तिथे एकाच प्रकारच्या झुडूपांच गचपण माजल होत. त्या झुडूपांवर क्रेपच्या कागदासारखी दिसणारी पांढर्‍या रंगाची नरसाळ्या सारखी सुंदर फ़ुले फ़ुललेली होती. गावातल्या मित्राला त्याच नाव विचारल तर म्हणाला हे पेवाच झाड... आणि शाळेत केवळ घोकंपट्टी करून पाठ केलेल्या "पेव फुटणे" या वाकप्रचारचा अर्थ खर्‍या अर्थाने मला कळला. 

पेवच फुल (Costus speciosus)
Costus speciosus (family:- Zingiberaceae)

       

सुपारीच्या बागेत मला झालेल्या या साक्षात्कारामुळे "पेव" बद्दल कुतूहल निर्माण झाले. पेवच शास्त्रीय नाव Costus speciosus असून त्याच कुदुंब (family) Zingiberaceae आहे. ही "आल्याच्या" (आपण चहात, जेवणात वापरतो ते आलं) कुटुंबातील वनस्पती आहे. आल्यासारखे याचे कंद जमिनीत पसरतात. त्यातुन फ़ुटणारी झुडूपं आजुबाजूची जमिन व्यापून टाकतात. त्याठिकाणी इतर वनस्पतींना वाढायला वाव मिळत नाही. त्यामुळे आपल्याला "पेवच बेट" दिसायला लागत. दरवर्षी जुलै महिन्यात जमिनित असलेल्या कंदांमधून पेव उगवत, सप्टेंबर मध्ये त्याला फुलं येतात आणि नोव्हेंबर मध्ये हे झाड सुकून जा्ते. जेमतेम ४ ते ५ महिन्यांच आयुष्य असलेल हे झुडूप आहे.
पेवच बेट


         पेव ही झुडूप (shrub) या प्रकारात मोडणारी वनस्पती आहे. २ ते ३ मीटर उंच वाढणारी ही वनस्पती दाट सावलीत वाढते. त्यामुळे याच्या पानांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते.पान १५ ते ३० सेंटीमीटर लांब असतात. दाट झाडीखाली वाढणार्‍या या झुडूपाच्या पानांना झाडीतून झिरपणारा सूर्यप्रकाशाचा कवडसा पकडता यावा याकरीता पेवाच्या पानांची रचना मुख्य दांड्याभोवती सर्पीलाकार (Spiral) गोल जिन्यासारखी केलेली असते. याचा अजून एक फायदा म्हणजे एका पानाची सावली दुसर्‍या पानावर पडत नाही. 

  पेवच्या पानांची सर्पिलाकार रचना        


     पेवच्या बेटाकडे आपल लक्ष वेधले जाते ते हिरव्या बेटावर डोलणार्‍या त्याच्या नरसाळ्या सारख्या दिसणार्‍या पांढर्‍या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी -लाल रंगाची रुपांतरीत पाने पाहायला मिळतात. पूर्ण फुललेल फुलाचं तोंड खालच्या बाजूला झुकलेल असत. फुल पांढर्‍या रंगाच असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. यामुळे परागीभवनासाठी येणार्‍या किटकांना मकरंद (मध) कुठल्या दिशेला आहे त्याचे मार्गदर्शन होते. या लांब दांड्याच्या फुलातील मकरंद (मध) पिण्यासाठी / परागीभवनासाठी लांब सोंड असलेल ग्रास डेमन (Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae)  हे फुलपाखरू पेवच्या बेटातून उडतांना दिसत. हे कृष्णधवल रंगाचे फुलपाखरू असून पंखांवर पांढरे ठिपके असतात. या फुलपाखराला सावलीत, जमिनीलगत उडायला आवडते. त्याची सोंड त्याच्या आकाराच्या दुप्पट असते. उडतांना फुलपाखराची सोंड (Probosis) कॉईल सारखी गुंडाळलेली असते. पेवसारख्या लांब दांड्याच्या फुलावर बसल्यावर हे फुलपाखरू आपली सोंड उलगडून फुलातील मकरंद (मध) पिते. निसर्गातील हे परस्परावलंबन आश्चर्यचकीत करणारे आहे.

पेवच फुल आणि त्यावरील ग्रास डेमन फुलपाखरू 









Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae

      पेवच्या कंदांचा उपयोग प्राचीन काळापासून आयुर्वेदात ताप, दमा, खोकला आणि जंत यावरील औषधात होतो. ज्ञानेश्वरीतही पेवा़चा उल्लेख आलेला आहे.
  
जे भुलीचे भरिव। जे विकल्पाचे वोतिव। किंबहुना "पेव" विंचवाचे॥८-४५॥ ज्ञानेश्वरी.
  










                     





संदर्भ :-   1) Flowers of Sahyadri :- Shrikant Ingahallikar ,  2) महाराष्ट्रातील फुलपाखरे :- डॉ. राजू कसंबे.


"सह्याद्रीतील रानफ़ुलं"  हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.....

Sunday, September 1, 2013

अंतुर किल्ल्यावरचा गुप्त (भूयारी) मार्ग (Secret Passage on Antur Fort , DIst :- Aurangabad)

       

   अंतुर किल्ल्यावरील भव्य बुरुज
 
      किल्ल्यावरील चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे अबाल वृध्दांची नेहमीच उत्कण्ठा वाढवतात. लहानपणापासून वाचलेल्या अनेक रहस्य कथा, साहस कथांमधून आपल्याला या गोष्टी आधीच भेटलेल्या असतात, त्यांनी आपल्या मनाचा एक कप्पा व्यापलेला असतो. त्यात भर म्हणजे किल्ल्यावरील गुप्त मार्ग, भूयारे यांच्या भोवती तयार झालेल्या दंतकथांमुळे त्यांना एक गुढतेचे वलय प्राप्त झालेले असते. भूयारे आणि गुप्त वाटा यांच्या बद्दल जनमानसात अनेक अतिरंजीत समज पिढ्यान पिढ्या पसरलेले असतात. (उदा :- सिंधुदुर्ग किल्ल्यातील भूयार समुद्राखालून मालवण शहरात जात हो्ते., कुलाबा किल्ल्यातील भुयार समुद्राखालून अलिबाग मधील कान्होजी आंग्रे यांच्या वाड्यापर्यंत जाते. अशा भूयारांबाबत अनेक कथा वेगवेगळ्या किल्ल्यांवर ऎकायला मिळतात) त्या शास्त्रकाट्यावर पारखून न घेता त्यावर अंधविश्वास ठेवला जातो, याला कारण म्हणजे या भूयारांनी नकळत व्यापलेला आपल्या मनातील कप्पा. खरतर चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे ही किल्ल्याची महत्वाची अंग होती. त्याकाळचे राजकारण, युध्द, फंद - फितुरी यांच्याच साक्षीने होत होती.  महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्यावरील चोर (गुप्त) मार्ग अचानक पाहाण्याची संधी मिळाली आणि आम्ही हरखूनच गेलो.

बुरुजा खालील कातळातील गुहा व तटबंदी, अंतुर

त्याच झाल असं की, २०१३ च्या पावसाळ्यात पेडका, लोंझा ,कण्हेरगड, अंतुर या दुर्लक्षित किल्ल्यांचा अभ्यास करून www.trekshitiz.com  या साईटवर माहिती लिहीण्यासाठी आम्ही चाळीसगावात दाखल झालो. सकाळी लोंझा किल्ला पाहून अंतुर किल्ला गाठला. अंतुर जरी दुर्लक्षित किल्ला असला तरी किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायचा असेल तर दोन ते तीन तास लागतात. त्यात आम्ही नोंदी करीत, नकाशा बनवत किल्ला पाहात होतो. त्यामुळे किल्ला पाहायला अंमळ जास्तच वेळ लागला. त्यात भर पडली ती अर्धा - एक तास आम्हाला झोडपून काढणार्‍या पावसाची. संपूर्ण किल्ला पाहून संध्याकाळी ६.०० च्या सुमारास आम्ही अंतुर किल्ल्याच्या भव्य, सुंदर बुरुजासमोर बसून तो नजरेत साठवण्याचा प्रयत्न करत होतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण प्रसन्न होतं, वारा भन्नाट वहात होता. त्यामुळे दिवसभराचा शीण हळूहळू उतरत होता. खंदका पलिकडे बुरुजाच्या अर्ध्या उंचीवर बसून आम्ही त्या भव्य बुरुजाचे निरीक्षण करत होतो.

 अंतुर किल्ला दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगर रांगेच्या टोकावर बांधलेला आहे. मुख्य डोंगररांगेपासून किल्ला वेगळा करुन तो संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत करण्यासाठी त्याकाळच्या स्थापतींनी येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे २५० फूट लांब, १०० फूट रूंद व ३० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे २००० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दक्षिण बाजूला  उंचावर भव्य बुरुज व तटबंदी बांधलेली आहे. तर पूर्व- पश्चिम बाजूला खोल दरी आहे. शत्रु या खिंडीच्या पलिकडच्या बाजूस आल्यास बुरुजा आडून शत्रूवर हल्ला करणे सोपे होते. त्यातूनही जर शत्रू खंदकात पोहोचलाच, तर बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. दोन्ही बाजूला खोल दरी व मागील बाजूस असलेल्या खंदकाच्या भिंतीमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत. ही खाच बनवण्यामागे हा विचार असावा. खिंडीच्या किल्ल्याकडील भागात अंदाजे १०० ते १५० फुट उंचीचा कातळ आहे. त्या कातळावर तेवढ्याच उंचीचा भव्य बुरुज बनवण्यात आला आहे. या बुरुजाच्या बाहेरच्या बाजूस ३० फूट ते ५० फूट उंच तटबंदी बांधून तो संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत करण्यात आला आहे.

या बुरुजाचे खंदकच्या पलिकडे बसून निरीक्षण करतांना असे दिसून आले की, बुरुजाच्या खाली असलेल्या कातळाच्या तळाकडे उजव्या बाजूला एक भगदाड पडलेलं आहे. तशीच नजर फिरत वर आली, तर बुरुजाच्या खालच्या कातळात साधारण मध्यभागी एक गुहा दिसत होती. गुहेपासून थोड्या अंतरावर डावीकडे भिंत बांधून कातळात पडलेलं भगदाड बुजवल्याच दिसत होत. या भिंतीत जंग्याही ठेवलेल्या दिसत होत्या. किल्ला बांधतांना एवढा विचारपूर्वक बांधणारे स्थापती कातळात मध्येच भिंत बांधून त्यात जंग्या कारणाशिवाय बांधतील हे पटत नव्हत. मग नजर थोडीशी "झुम आऊट" करून या तीनही गोष्टी एकत्र पाहील्यावर त्यांना एकत्र सांधणारा काही दुवा असावा असे वाटायला लागले. गेल्याच वर्षी औरंगाबाद जिल्ह्या्तीला सुतोंडा किल्ला पाहीला होता. त्यालाही असाच कातळात कोरलेला खंदक होता आणि त्या खंदकातच किल्ल्याचे प्रवेशव्दार देवड्या व छोटासा भूयारी मार्ग कातळात कोरून काढलेला होता.



खंदकात कसे उतरायचे हा आता मुख्य प्रश्न होता. आमच्याकडे ३० फूटी रोप होता, पण वेळ कमी होता. खाली उतरण्यासाठी रस्ता शोधतांना उजव्या बाजूला चक्क कातळात कोरलेल्या ३ पायर्‍या दिसल्या. त्या उतरून गेल्यावर दरीच्या बाजूने एक चिंचोळी वाट खंदकात उतरत होती. खंदकात उतरल्यावर झुडूपामागे लपलेल्या भगदाडापाशी पोहोचलो.  


या भगदाडाच्या वरच्या बाजूस चुन्यात लावलेले दगड दिसत होते.एकेकाळी दगड लावून हे भगदाड बंद केलेले असावे. पूर्वीच्या काळी एक - दोन मुख्य प्रवेशव्दार सोडली तर इतर चोर दरवाजे, भिंती बांधून चिणून टाकले जात असत. भगदाडाची उंची २.५ ते ३ फूट होती. आत मध्ये मिट्ट काळोख होता. पावसाळा असल्याने अशा अंधार्‍या भागात साप, विंचू असण्याची दाट शक्यता होती. हातात काठी आणि टॉर्च घेऊन भगदडातून आत प्रवेश केला वाट काटकोनात वळून वर चढत होती. 

भूयाराचा अंर्तभाग, अंतुर


कातळात कोरलेल्या पायर्‍यांवरून १० मिनिटे चढल्यावर प्रकाश आणि गार हवेचा झोत जाणवायला लागला आणि आम्ही चक्क किल्ल्याखालील कातळाच्या मध्यभागी असलेल्या गुहेत पोहोचलो होतो. इथे भन्नाट वारा होता, समोर खंदकाची पलिकडची बाजू (जिथे काही वेळापूर्वी आम्ही बसलो होतो) ती दिसत होती. 



बुरुजा खालील कातळातील गुहा व तटबंदी, अंतुर
                                                     

 गुहेच्या आतल्या बाजूला बुरुजावर जाणारी भूयारी वाट दिसत होती. त्या वाटेवर थोडे अंतर चढल्यावर समोर वरून सुटून खाली पडलेल्या दगडांची रास दिसत होती. त्यामुळे हा भूयारी मार्ग अजून चिंचोळा झाला होता. त्या दगडांच्या राशीवर चढून पुढे सरकल्यावर आतून वटवाघळांचा आवाज व त्याच्या शीटेचा गुदमवणारा वास येत होता. आता बाहेर संध्याकाळचे ६.३० वाजून गेले होते. यापूढील मार्गाबद्दल काहीच अंदाज येत नव्हता, त्यामुळे माघारी परतण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. पुढच्या वेळी पूर्ण तयारीनीशी या गुप्तमार्गात शिरायचे असे ठरवून आम्ही परतीचा प्रवास चालू केला.

दगडांमुळे मार्ग बंद झाला होता.
      अंतुर किल्ल्यावरील या भूयारी मार्गाची नोंद पुरातत्व खात्याकडे नक्कीच असणार. त्यांनी जर हा गुप्त मार्ग मोकळा करून सर्वांसाठी खुला केला तर, या किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांच्या (अंतुर किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत १२ महिने वहानाने जाता येत) संख्येत वाढ होईल. त्यांना नविन काही पाहिल्याच समाधान मिळेल.