Showing posts with label Offbeat Rajasthan. Show all posts
Showing posts with label Offbeat Rajasthan. Show all posts

Wednesday, November 30, 2022

महाभारतातील विराट नगर ( Virat Nagar , the Ancient city in Mahabharat )

 

विराट नगर

जयपुरला तिसर्‍यांदा जात होतो. त्यामुळे जयपुर मधील नेहमीची प्रसिध्द स्थळे पाहाण्या ऐवजी वेगळी ठिकाण शोधत असताना "विराट नगर" सापडल. महाभारतातील विराट पर्वात उल्लेख असलेले विराट नगर ते हेच असा येथिल लोकांचा दावा आहे. भारतात अनेक प्राचीन गावांशी रामायण , महाभारतातल्या कथा जोडलेल्या आहेत त्यापैकी हे एक गाव.  जयपूरच्या आसपास  फ़िरतांना महाभारतातल्या कथांशी संबंधित अनेक ठिकाण आढळली.  त्यातही पाच पांडवां पैकी भीमाशी संबधित ठिकाण जास्त आढळली.

 जयपुर जवळील प्रसिध्द मंदिर खाटू श्यामजी . याची कथाही महाभारत आणि भीमाशी निगडीत आहे. भीमाला हिडींबेपासून झालेला मुलगा घटोत्कच. घटोत्कच आणि त्याची पत्नी अहिलावती यांना अंजनपर्व , मेघवर्ण आणि बर्बरिक ही तीन मुले होती.  त्यातील बर्बरिक देवी भक्त होता. त्याला देवीकडून तीन दिव्य बाण मिळाले  होते. महाभारताचे युध्द चालू होण्यापूर्वी बर्बरिकने त्याच्या आईला वचन दिले होते, " युध्दात जो हरेल त्याच्या बाजूने मी लढेन". (हारे का सहारा)

 ही गोष्ट श्रीकृष्णाला कळली , जर बर्बारिक, आईला दिलेल्या वचना प्रमाणे हरणार्‍या कौरवांच्या बाजूने लढला तर त्याच्याकडे असलेल्या तीन दिव्य बाणांमुळे तो युध्दाचा निकाल बदलून टाकेल . हे टाळण्यासाठी श्रीकृष्णाने ब्राह्मणाचे रुप घेतले आणि तो बार्बरिकला भेटायला गेला.  त्याच्या कडील  दिव्य बाणांची परिक्षा घेण्यासाठी श्रीकृष्णाने समोर दिसणार्‍या पिंपळाच्या झाडाच्या सर्व पानांना भोक पाडायला सांगितले. त्याप्रमाणे बर्बारिकने सोडलेल्या बाणाने झाडाच्या सर्व पानांना भोक पाडून तो  बाण ब्राम्हणाच्या पाया जवळ आला. कारण श्रीकृष्णाने एक पान पाया खाली लपवलेले होते. श्रीकृष्णाने पानावरुन पाय काढताच बाणाने त्या पानाचाही वेध घेतला. बाणाची दिव्य शक्ती पाहून ब्राम्हणरुपी श्रीकृष्णाने बार्बारिककडे दान मागितले. बर्बरिकने काय हवे ते माग असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने त्याचे शिर दान म्हणून मागितले. हे विचित्र दान ऐकल्यावर बर्बरिकला कळले या ब्राम्हणाच्या वेषात दुसरेच कोणीतरी आहे. त्याने ब्राम्हणाला मुळ रुपात प्रकट होण्याची विनंती केली. समोर साक्षात श्रीकृष्णाला पाहून त्याने आपले शिर त्याला अर्पण केले.  श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की कलियुगात तू माझ्या "श्याम" या नावाने पूजला जाशील. आता राजस्थानातील खाटू  या गावात बर्बरिक म्हणजेच "खाटू श्यामचे" मंदिर आहे. बर्बारिकने श्रीकृष्णाला युध्द पाहायचे आहे असे सांगितले. श्रीकृष्णाने त्याचे शिर खाटू जवळील उंच टेकडीवर ठेवले तेथून त्याने युध्द पाहिले

 

पांडू पोल, सरिस्का


महाभारतातील दुसरी प्रसिध्द कथा म्हणजे भीमाचे हनुमंताने केलेले गर्वहरण. ही सुध्दा याभागात घडली असे मानले जाते. सरिस्का अभयारण्यात " पांडू पोल " नावाची जागा आहे . (पोल म्हणजे दरवाजा इथे खिंड या अर्थी ) या खिंडीत ही प्रसिध्द घटना घडली असे मानले जाते. याठिकाणी हनुमान मंदिर आणि त्या जवळून वाहाणारा बारमाही झरा आहे.

 महाभारतातील विराट पर्वात  उल्लेख असलेली तिसरी घटना म्हणजे पांडव अज्ञातवासात वेष बदलून एक वर्ष विराट राजाच्या पदरी राहीले .अर्जुनाला मिळालेल्या शापामुळे त्याचे बृहन्नडा मध्ये रूपांतर झाले होते. त्याने राजकन्या उत्तरा हिची नृत्यशिक्षिका म्हणून भूमिका निभावली. युधिष्ठिराने कंक या नावाने विराट राजाचे मंत्रीपद हाती घेतले होते. द्रौपदी ही विराट नरेशाची पट्टराणी सुदेष्णा हिची केशभुषाकार म्हणून राहीली होती. नकुल हा अश्वपाल तर, सहदेव हा गोशाळा सांभाळत होता. भीम हा बल्लव म्हणुन भोजनगृहात काम करत होता. विराट नगर मध्ये एक टेकडी भीम डुंगरी नावाने  प्रसिध्द आहे.

 

Remains of Stupa, Virat Nagar

सध्याचे विराट नगर (बैराट) हे गाव हायवेच्या आसपास वसलेल्या टिपिकल गावांसारखेच आहे. गावातील सर्व प्राचीन , मध्ययुगीन अवशेष मात्र गावापासून दूर असलेल्या टेकड्य़ांवर व त्याच्या आसपास पसरलेले आहेत.  प्राचीन मंदिर आणि बौध्द स्तुप असलेली "बिजक की पहाडी" , गणपती मंदिर आणि संग्रहालय, सम्राट अशोकाचा शिलालेख, भीम की डुंगरी, मुगल गेट आणि जैन मंदिर ही  ऐतिहासिक ठिकाण आदिमानव काळापासून ते आज पर्यंत या मोठ्या कालखंडाच्या खूणा बाळगून आहे.

 

बिजक की पहाडीची पायवाट

विराट नगर भटकंतीची सुरुवात "बिजक की पहाडी" या स्थानिक नावाने ओळखल्या जाणार्‍या टेकड्यांच्या रांगापासून झाली. गावाबाहेर असलेल्या या टेकड्यांच्या पायथ्याशी जाण्याकरिता पक्का रस्ता बनवलेला आहे . रस्ता जिथे संपतो तिथे मोठ मोठ्या खडकांनी बनलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आपण पोहोचतो.  पायथ्यापासून एक फ़रसबंदी चढणाचा रस्ता टेकडीवर जातो. पहिली टेकडी चढून गेल्यावर थोडी सपाटी लागते. इथून चारही बाजूला अरवली पर्वताची डोंगर रांग दिसते.   उजव्या बाजूला एका टेकडीवर भगवा ध्वज फ़डकताना दिसतो. त्या दिशेने चढ चढतांना वाटेत अनेक वेगवेगळ्या आकाराचे खडक आजूबाजूला पाहायला मिळतात. या भागात लोकांचा वावर नसल्याने पक्षीही भरपूर प्रमाणात आहेत आणि तेही जवळुन पाहायला मिळतात. हे सर्व पाहात १५ ते २० मिनिटात   मगरीच्या तोंडा सारख्या दिसणार्‍या एका मोठ्या दगडापाशी पोहोचलो. मगरीने जबडा उघडावा तसा त्याचा आकार होता. मगरीच्या नागपुड्याच्या भोकांसारख एक मोठा खड्डाही त्या दगडाला पडला आहे.  या दगडाखाली असलेल्या गुहेत श्रीराम मंदिर आहे. पांडवांनी अज्ञातवासात असतांना याची स्थापना केली अशी लोकांची श्रध्दा आहे.  गुहेत जाऊन श्रीरामच दर्शन घेऊन थोडावेळ आजूबाजूचा परिसर पाहात आणि शांतता अनुभवत बसून राहिलो.

 

श्रीराम मंदिर, बिजक की पहाडी


मंदिराच्या टेकडीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकडीला कुंपण घातलेले होते. पुढचा टप्पा चढून कुंपण पार करुन सपाटीवर प्रवेश केला . या भागात पूरातत्व खात्याने उत्खनन करुन शोधून काढलेला बौध्द स्तुप,  भिख्खुंच्या राहण्याच्या जागा , पाण्याचे कुंड यांचे अवशेष आहेत. बौध्द स्तुप आज अस्तित्वात नसला तरी त्याचा पाया आणि प्रदक्षिणा मार्ग पाहायला मिळातो.  स्तुपाचा व्यास ८.२३ मिटर असुन त्याचा घुमट २६ अष्टकोनी खांबावर तोललेला होता. हे खांब बसवण्यासाठी असलेल्या खाचां आजही पाहायला मिळतात . या खाचांमुळे एखाद्या दाते (Gear) असलेल्या यंत्राच्या चाकाप्रमाणे स्तुपाचे अवशेष दिसतात. स्तुपा जवळ असलेला सम्राट अशोकाचा शिलालेख इसवी सन १८४० मध्ये ब्रिटिश सेनाधिकारी कॅप्टन बर्ट याने कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयात नेऊन ठेवला. आजही  तो तिथे पाहायला मिळतो.

Remains of Virat Nagar


Water tank at Bijak ki Pahadi


विराट नगरच्या इतिहासात डोकावल्यास , ख्रिस्तपूर्व पाचवे ते सहावे शतकातील घडामोडींनी प्राचीन भारत खंडाच्या इतिहासावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. सिंधू संस्कृतीचा र्‍हास झाल्यावर तेथील लोक पूर्वेकडे यमुना आणि गंगेच्या खोर्‍यापर्यंत आणि दक्षिणेकडे पसरले. त्यांनी लहान वसाहती आणि खेडी तयार केली, त्या वसाहती किंवा गावांना 'जनपद' असे म्हणतात. कालांतराने ज्या जनपदांची अर्थव्यवस्था, व्यापार मजबूत होता. त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी सैन्यदल उभारली.आणि शेजारील कमजोर व लहान जनपदे जिंकून आपल्या राज्यात सामील करून घेतली. अशी लहान लहान जनपदे मिळून तयार झालेल्या मोठ्या राज्यांना 'महाजनपदे' म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी छोटी छोटी १६  राज्ये स्थापन झाली . ती "१६ महाजनपद" या नावांने ओळखली जातात.  बौध्द आणि जैन ग्रंथात  १)अंग, २) अस्माक,३) अवंती, ४) चेडी, ५) गंधर्व, ६)काशी, ७) कंबोज, ८) कोसला, ९) कुरु , १०) मगध, ११) मल्ल , १२) मत्स्य , १३) पांचाल, १४)सुरसेना, १५) वाज्जी, १६) वत्स  या १६ महाजनपदांचा उल्लेख येतो.


 

१६ महाजनपद, Courtesy google.com

प्राचीन भारतात  १६ महाजनपदे होती. त्यातील मत्स्य महाजनपद हे आजच्या जयपुर, अलवार , भरतपुर या भागात पसरलेले होते . विराट राजाने स्थापन केलेले विराट नगर ही  मत्स्य महाजनपदाची राजधानी होती.  मौर्यांच्या काळात विराट नगर हे भारतातले प्रमुख शहर आणि बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते.  त्याच काळात या स्तुपाची निर्मिती करण्यात आली.

Cave temple, Virat Nagar
 

स्तुपाचे अवशेष असलेल्या टेकडीच्या वर चढून गेल्यावर , एक गुहा मंदिर पाहायला मिळते. या परिसरात झालेल्या उत्खननात विटांचे काही चौथरे पाहायला मिळतात. येथून खालच्या टेकडीवर दिसणार्‍या  स्तूपाच्या अवशेषाकडे पाहिल्यावर (Arial View) काहीतरी गुढ चिन्ह ,आकार दिसायला लागतो. पुरातत्व खात्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर , नीटनेटका आणि सुशोभित ठेवलेला आहे. 

 

गणेश मंदिर, विराट नगर

बिजक की पहाडी उतरुन संग्रहालय आणि गणपती मंदिर पाहाण्यासाठी गावात शिरलो. गावातील अरुंद रस्त्यावरुन वाट काढत . एका टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो . ही टेकडी पण मोठमोठ्या खडकांनी बनलेली होती. या टेकडीच्या पायथ्याशी एक तलाव व संग्रहालय आहे. टेकडीच्या अर्ध्या उंचीवर स्वयंभु गणेश मंदिर आहे. इथले वातावरण बिजक की पहाडीच्या एकदम विरुध्द होत. तिथे एवढ्या मोठ्या परिसरात आम्ही दोघच होतो. इथे मात्र प्रचंड गर्दी होती, टेकडी खालचे पार्कींग फ़ुल होते. प्रसाद, हार विकणारी दुकान आणि त्यामध्ये असलेली गर्दी यातून वाट काढत गणपतीचे दर्शन घेतले . पायथ्याशी असलेल्या संग्रहालयात शिरलो. संग्रहालय अतिशय सुंदर आहे. विराट नगरचा इतिहास वस्तू रुपात खूप चांगल्या प्रकारे मांडलेला आहे, सोबत पूरक माहितीही लिहिलेली आहे.  

 

Clay Objects, Virat Nagar 

Punch Marked Coins, Virat Nagar

Indo Greek Coins, Virat Nagar

विराट नगरच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांवर अनेक गुहा आहेत. या गुहांमधून आदिमानवाचे वास्तव्य होते. इसवी सन १८७१ -७२ मध्ये कॅनिंग हॅम यांनी विराट नगर मधील अवशेष शोधून काढले.  या गुहांमध्ये आणि या परिसरात पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात  मिळालेल्या अश्मयुगीन दगडी हत्यारांवरून अश्मयुगीन मानवाचे वास्तव्य या ठिकाणी एक लाख ते पन्नास हजार वर्षांपूर्वी पासून होते असे मत श्री एन.आर. बॅनर्जी यांनी मांडले आहे. त्यांनी कैलास नाध दीक्षित यांच्याबरोबर या ठिकाणी १९६०-६२ मध्ये उत्खनन केले होते .  विराट नगर येथे केलेल्या उत्खननात विविध काळातील दगडी हत्यारे, मातीचे भांडी, मूर्ती, विटा, दागिने, लोखंडाची हत्यारे सापडली  आहेत .  याशिवाय  अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या  काळातील नाणी सापडलेली आहेत. यात Punch Mark coins, Indo Greek coins ( यावर ग्रीक आणि खरोष्टी लिपीत मजकूर लिहिलेला आहे ), मुघलांची नाणी  इत्यादी आहेत.  या सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत इसवी सन ६३४ मध्ये चिनी प्रवासी ह्यूएनत्संग  (युआनच्वांग)  विराट नगरला आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात विराट नगरचा उल्लेख केलेला आहे. संग्रहालय पाहाण्यसाठी शुल्क नाही , तरीही बाहेर एवढी गर्दी असूनही संग्रहालय पहायला मात्र दोन चार जणच आले होते.  आपल्याच संस्कृती,  इतिहासा बद्दल असलेली अनास्था दुसर काय ?

संग्रहालय बघितल्यावर पुढची तीन ठिकाण गावाच्या दुसऱ्या भागात होती. भीम डुंगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर "सम्राट अशोक शिलालेख" अशी दिशा दर्शक पाटी पाहून त्या दिशेने चालत निघालो. पुरातत्व खात्याने तिथे जाण्यासाठी पायावाट व्यवस्थित बांधून काढलेली आहे. ज्या दगडावर शिलालेख होता त्यावरही काँक्रीटची शेड बांधलेली आहे. पण शिलालेख मात्र त्या ठिकाणी नाही.

सम्राट अशोक शिलालेख,

पुन्हा रस्त्यावर येऊन भीम डुंगरीच्या पायाथ्याशी आलो. या डोंगरावर भीमाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. डोंगराच्या पायथ्याशी गुहा आहे त्यात भीम वास्तव्य करत होता, पाऊलाच्या आकाराचे  पाण्याचे कुंड आहे. भीमाने लाथ मारून ते कुंड निर्माण केले असे समजले जाते. डोंगराच्या मध्यावर एका गुहेत ११ मुखी शिवलिंग आहे. तिथेच भीमाचे आणि हनुमंताचे देऊळ आहे. भीम आणि हनुमंत हे दोघेही पवनपुत्र, त्यांचे एकत्र देऊळ भारतात केवळ या ठिकाणी आहे. या डोंगरावर अनेक गोलाकार मोठ्या आकाराचे खडक आहेत त्यांना भीम गट्टे म्हणतात. भीम याने खेळत असे . या दगडांना पडलेले खड्डे त्याच्या बोटांमुळे पडले आहेत असे स्थानिक लोक मानतात.

 


भीम डुंगरी उतरुन मुघल गेट म्हणजेच पंचमहाल जवळ पोहोचलो. हा पंच महाल आमेरच्या राजाने शाही यात्रींसाठी बांधला होता. अजमेरला जातांना आणि या परिसरात शिकारीला आल्यावर  अकबर या ठिकाणी थांबत असे. या दुमजली महालात घुमटाकार छत असलेल्या खोल्या आहेत. छतांवर आणि भिंतींवर नक्षीकाम केलेले आहे. महाला समोर कारंजे आहे.  मुघल स्थापत्य शैलीत बांधलेल्या या महालावर असलेल्या पाच छत्र्यांमुळे हा महाल पंचमहाल म्हणून ओळखला जातो.    

मुघल गेट (पंचमहाल)


जैन मुनी विमल सुरी यांनी विराट नगरच्या डोंगरात तपश्चर्या केली. विराट नगर मध्ये आजही भव्य जैन मंदिर आहे. विराट नगर मध्ये असलेले जैन नासिया मंदिर १६ व्या शतकात बांधले होते. मुघल गेट समोर असलेल्या या जैन मंदिराच्या बांधणीवर मुघल स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो.

 

Jain Temple , Virat Nagar


Adinatha, Virat Nagar


विराट नगर मधील हिंदू, बौध्द, जैन आणि मुस्लिम धर्माचे वेगवेगळ्या काळातील अवशेष, वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. 

 

 

जाण्यासाठी :-

 विराट नगरला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट जयपुर येथे आहे. जयपुर ते विराट नगर हे अंतर १०३ किलोमीटर आहे.  या भागात बसेस कमी आणि अनियमित चालत असल्यामुळे खाजगी गाडी करून जावे.

जयपूर - भानगड -  विराट नगर हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.

झपाटलेला (?) किल्ला,  भानगढ  (Bhangarh , the most haunted (?) fort) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

https://samantfort.blogspot.com/2022/11/bhangarh-haunted-fort.html

"सरीस्का व्याघ्र प्रकल्प" विराट नगर पासून १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे सरिस्का जवळ राहुनही "विराट नगर" पाहाता येते.

  

Shree Ram Mandir built by Pandava


Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

Friday, June 16, 2017

ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) Offbeat Places near Jodhpur,Rajasthan

ओसिया


राजस्थानातील जोधपूरला पाहण्याच्या यादीत क्लॉक टॉवर, मेहरानगढ किल्ला, जसवंतथाडा, मंडोर इत्यादी ठिकाण होती. स्थानिक रिक्षावाले, हॉटेलवाल्यांशी गप्पा मारतंना ओसिया गावाच नाव समजले. त्या ठिकाणी सचिया मातेच मंदिर आहे आणि ओसिया पासून जवळच वाळूच्या टेकड्या आहेत आणि उंटावरुन किंवा जीप मधून तुम्ही त्यावर फ़िरु शकता असेही कळले. जोधपूर पासून ६० किमीवर अंतरावर ओसियॉ गाव आहे. बसने गावात पोहोचल्यावर गावाच्या बाहेरच रस्त्यालगत दगडात बांधलेली अप्रतिम मंदिर दिसली. बस मधून उतरुन थेट मंदिरे गाठली. नेहमी प्रमाणे पूरातत्व खात्याच्या निळ्या फ़लकाने स्वागत केले. स्मारक संरक्षित असले तरी त्याला काहीही संरक्षण नव्हते. शेळ्या मेंढ्यांचा मंदिरात मुक्त वावर होता आणि गावाची कचराकुंडीही तेथेच होती. रस्ताच्या एका बाजूला ३ आणि दुसर्‍या बाजूला एक मंदिर होते. रस्त्या लगत असलेल्या मंदिराचा कळस तुटलेला होता. पण त्याचा गजपृष्ठाकृती सभा मंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दगडात केलेले हे काम पाहाण्यासारखे आहे. छतावर आणि खांबांवर कोरीवकाम आहे. गर्भगृहात मुर्ती नाही. त्याच्या बाजूचे हरीहरचे मंदिर हे शिल्पकामाचा अप्रतिम नमुना आहे. शेव आणि वैष्णव पंथातील वाद पराकोटीला पोहोचला होता तेंव्हा तो मिटवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर केला गेला. त्यातूनच मुर्तीशास्त्रात हरीहर या कल्पनेचा उदय झाला. यात एकाच मुर्तीत उजव्या बाजूला शिव आणि डाव्या बाजूला विष्णू त्याच्या आयुध, अलंकार आणि वाहानांसह कोरलेला असतो.उजवीकडे शंकराच्या जटा, गळ्यातील रुंडमाळा, हातात डमरु, त्रिशुळ, पायाषी गण आणि नंदी दाखवलेले असतात, तर डाव्या बाजूला विष्णूचा मुकुट, गळ्यात वैजयंती माळा, हातात शंख, चक्र आणि पायाशी गरुड दाखवलेला असतो. या मंदिराच्याही गर्भगृहात मुर्ती नाही. पण मंदिराच्या सभा मंडपातील खांब, छत यावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हरीहर, त्रिविक्रम अवतार, नरसिंहावतार, शंकराची केवलमुर्ती, गणपती, महिषासुर मर्दीनीची मुर्ती आणि इतर मुर्ती कोरलेल्या आहेत. मुर्तींच्या वरच्या शिल्प पटावर रामायण , महाभारत, पुराणातील कथा आणि काही मैथुन शिल्प कोरलेली आहेत. तिसरे मंदिर शंकराचे आहे ते सध्या पुजेत आहे. या मंदिराच्या पुढे एक सुंदर पुष्कर्णी बांधलेली आहे. सध्या मात्र ती कचर्‍याच्या विळख्यात सापडलेली आहे. 




ओसिया हे थर वाळवंटाच्या काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्वाचे स्थान होते. ८ व्या शतकात याठिकाणी प्रतिहार घराण्याची सत्ता होती. त्यांनी ८ ते १२ शतकाच्या दरम्यान याठिकाणी अनेक हिंदु आणि जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे. हि तीन मंदिर पाहून छोट्या टेकडीवर असलेल्या सचिया माता मंदिराकडे जातांना आजुबाजूला हाराची, प्रसादाची दुकान हॉटेल्स दिसतात. सचिया माता म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. याठिकाणी मुख्य मंदिरात सचिया माता व त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबा मातेची मंदिरे आहेत. ही मुळ मंदिरे ८ व्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे अनेक रुपात कोरलेले व्याल ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  ८ व्या शतकात बांधलेले महावीर मंदिर हे सुध्दा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही दोन्ही मंदिरात सध्या पूजा होते.

 \


 


या भागात काही रिसॉर्ट आहेत. डेझर्ट सफ़ारी, तंबूतील निवास, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशी पॅकेजेस ते देतात, पण ती खूपच महागडी आहेत. अशा मुद्दाम (आर्टीफ़िशियली) तयार केलेल्या रिसॉर्ट मध्ये राहाण्यापेक्षा येथील गावात टिपिकल राजस्थानी घरात राहाण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. टेकड्यांपासून ५ किमीवर असलेल्या खेमसरगावातील सिवरों की ढाणी या वस्तीवर आमच्या जीपवाल्याचे घर होते. तेथे त्याने जेवणाची व्यवस्था केली होती. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. पुन्हा वाळूच्या टेकड्यांवरुन उड्या मारत जीप वस्तीत पोहोचली. रस्त्यात एक फ़ोर व्हील ड्राईव्ह जीप मुलांना घेऊन शाळेत जातांना दिसली, हिच येथल्या मुलांची स्कुल बस. पाच सहा घरांची वस्ती असलेल्या सीवरों की धानी वस्तीजवळ मोर, नीलगाय आणि हरणांनी दर्शन दिले. मातीच्या कंपाऊंडच्या आत तीन गोलकार, गवताने शाकारलेली घर होती. त्यातील एक स्वयंपाक घर, दुसरी राहाण्याची खोली आणि एक पाहूण्यांसाठी जेवणाची खोली होती. मध्यभागी अंगण होते. बाहेर काही उंट झाडाखाली बांधलेले होते. जीप नसल्यास प्रवासाचे हे दुसरे साधन होते. राजस्थानी पध्दतीचे गरमागरम जेवण जेऊन परत ओसिया गाठले. ओसियाहून जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला जाता येते.






मंदोर दुर्ग (Mandore Fort)



जेवण झाल्यावर परत ओसियाला येऊन जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या  ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला उतरावे. या ठिकाणी ६ व्या शतकातला मंदोर दुर्ग, जोधपूरच्या राजांची समाधी मंदिरे आणि म्युझियम आहे. मांडव्य ऋषींच्या वास्तव्यामुळे टेकड्यांच्या सानिध्यात असलेल्या नगराला  मांडिव्यपूर असे नाव पडले. या नगरात मंदोदरी राहात होती. तीचे रावणाशी लग्न झाल्यामुळे मंदोर शहरातील लोक रावणाला आपला जावई मानतात. त्यांनी मंदोर मध्ये रावणाचे मंदिर बांधलेले आहे, दसर्‍याला देशभर रावणाला जाळण्याची प्रथा आहे, पण मंडोर मध्ये तो दिवस रावणाच्या श्राध्दाचा दिवस म्हणून पाळला जातो. 



       मंदोर दुर्ग दोन टेकड्यांवर वसलेला आहे. त्यामधील दरीतून जाणारा पाण्याचा प्रवाह वापरुन सुंदर जोधपूरच्या राजांनी सुंदर उद्यान बनवलेले आहे. स्थानिकांच्या अनास्थेमुळे या ठिकाणी अस्वच्छता आहे. जोधपूरच्या राजघराण्यातील राजांची येथे लाल दगडात बांधलेली समाधी मंदिरे आहेत. मंदोर गार्डन मधील समाधी मंदिरे पाहून व्यवस्थित बनवलेल्या पायर्‍यांच्या मार्गाने मंदोर दुर्गावर जाता येते. इसवीसनाच्या सहाव्या शतकापूर्वी या ठिकाणी दुर्ग होतो. ही प्रतिहार राजवंशाची राजधानी होती. इसवीसनाच्या १४ व्या शतकात प्रतिहारांनी हा किल्ला राठोडांना दिला.  १३९५ मध्ये गुजरातच्या सुतलानाने या किल्ल्याला वेढा घातला पण त्याला किल्ला जिंकता आला नाही. इसवीसन १४५३ मध्ये राव जोधा याने किल्ला जिंकून घेतला. त्याने आपली राजधानी मंदोर दुर्गावरुन जोधपूरच्या किल्ल्यावर हालवली. तेंव्हा पासून याकिल्ल्याचे महत्व कमी झाले. आज किल्ल्यावर एक मंदिर सोडल्यास बाकी सर्व वास्तू उध्वस्त झालेल्या आहेत. किल्या वरील वास्तूंच्या  अवशेषांवरुन या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर वस्ती होती. मंदोर दुर्ग पाहून जोधपूर सिटी बसने संध्याकाळी जोधपूरला परतता येते. 





 




 अमित सामंत

#OffbeatRajasthan

राजस्थानातील इतर अपरिचित ठिकाणांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

1) राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....(Ranapratap ....Chittorgad Fort, Ahar Museum, Haldighati Memorial & Chetak Smarak, Kumbhalgad, Ranakpur Temple)

2) जोधपूरची खाद्य भ्रमंती (what to eat & where to eat in Jodhpur)

राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....(Ranapratap ....Chittorgad Fort, Ahar Museum, Haldighati Memorial & Chetak Smarak, Kumbhalgad, Ranakpur Temple)

राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....



राजस्थान म्हटल की आपल्या डोळ्यासमोर येते ते दुरवर पसरलेल वाळवंट, कलात्मक आणि सुंदर हवेल्या, महाल आणि सुस्थितीत असलेले किल्ले. राजस्थानला फ़िरायला जायचे म्हटले अनेक जण जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, जयपूर आणि उदयपूर या परिचित शहरांना भेट देतात. या व्यतिरिक्त राजस्थानात अनेक ठिकाणे पाहाण्या सारखी आहेत. राजस्थान म्हणजे   अकबराच्या बलाढ्य फ़ौजेशी सामना करणारे वीर महाराणा प्रताप. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुजनीय आहेत,त्याप्रमाणेच राजस्थानात महाराणा प्रताप पुजनीय आहेत. ज्यावेळी राजस्थानचे इतर राजे मोघलांना शरण गेले होते. आपल्या मुली, बहिणी मोघलांच्या जनानखान्यात पाठवून त्यांचे मनसबदार बनले होते. त्यावेळी महाराणा प्रताप आपल्या छोट्याश्या मेवाड राज्याच्या स्वातंत्र्यासाठी मुठभर फ़ौजेसह लढत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या आरामदायी आणि विलासी जिवनाचा त्याग केला होता. मेवाडचे राजा असूनही त्यांचे जीवन आपल्या कुटुंबियांसह राना-वनात, डोंगर दर्‍यात भटकण्यात गेले. स्वधर्म आणि स्वातंत्र्यासाठी लढणारे महाराणा प्रताप अनेकांचे प्रेरणा स्थान आहेत. महाराणा प्रताप, त्यांचा बलिदान देणारा घोडा चेतक, हल्दीघाटीची लढाई यावर शेकडो काव्य रचलेली आहेत. महाराणा प्रतापांनी ज्या किल्ल्यात जन्मले तो कुंभलगड किल्ला, ज्या किल्ल्यात त्यांचा सर्वाधिक काळ गेला तो चित्तोडगड आणि ज्या भागात अकबराची सेना आणि महाराणा प्रतापांची सेना यांचे युध्द झाले ती हल्दीघाटी ही सर्व ठिकाणे उदयपूर पासून जवळ आहेत. उदयपूरला दोन दिवस मुक्काम करुन आपल्याला ही सर्व प्रेरणादायी ऐतिहासिक ठिकाणे पाहाता येतात. त्याबरोबर नाथव्दाराचे श्रीनाथजींचे मंदिर आणि रणकपूरचे जैन मंदिर संकुल पाहाता येते.

चितोडगड (Chittorgad Fort)




   उदयपुर हे राजस्थानातले महत्वाचे शहर आहे. याला तलावांचे शहर असेही म्हणतात. सिटी पॅलेस, जगदिश्वर मंदिर, पिचोला लेक, फ़तेह सागर लेक ही उदयपूर शहरतली महत्वाची ठिकाण एका दिवसात पाहून होतात. उदयपूर पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी चितोडगड पाहाण्यासाठी सकाळीच निघावे. उदयपुरहून चितोडगड १०९ किमीवर आहे. ट्रेन, बस किंवा खाजगी गाडीने चितोडगडला जाता येते . चितोडगड किल्ला प्रचंड मोठा आहे. संपूर्ण किल्ला पाहायचा असेल तर किल्ल्याच्या आतमध्ये १३ किलोमीटर फिरावे लागते. त्यामुळे गाडी घेउनच फिरण योग्य ठरते. मेवाडच्या इतिहासात चितोडगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे . मेवाडच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना या किल्ल्यात घडल्या. अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती पडू नये यासाठी राणी पद्मिनीने केलेला जोहार सर्वाना माहिती आहे. पण याकिल्ल्यावर एकूण ३ वेळा जोहार झाले आहेत. पन्नादाई या राजा उदयसिंहच्या दाईने स्वत:च्या मुलाचा बळी देउन भावी राजाला म्हणजे उदयसिंहाला याच किल्ल्यातून वाचवून कुंभलगडावर नेऊन ठेवले होते. या उदयसिंहाच्या पुत्राने म्हणजेच राणा प्रतापने अकबराशी लढा देऊन इतिहास घडवला. चितोडगड परत जिंकून घेता आला नाही हे शल्य उराशी घेउन राणाप्रतापने प्राण सोडले होते. असा हा चितोडगड नीट पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. मैदानी भागात आडवा पसरलेला चितोडगडचा एकुलता एक डोंगर दुरवरुनच नजरेस पडतो. नैसर्गिक संरक्षण फ़ारसे नसल्यामुळे किल्ल्याला एकामागोमाग एक सात दरवाजे आहेत, दुहेरी तटबंदी आहे. या दरवाजांना पोल म्हणतात. पाडन पोल, भैरव पोल, हनुमान पोल, गणेश पोल, लक्श्मण पोल, राम पोल ७ ही दार पार करुन आपण किल्ल्यावर पोहोचल्यावर अनेक सुंदर मंदिरे, महाल, विजयस्तंभ, किर्तीस्तंभ हे मनोरे यांच्या साहाय्याने किल्ला आपल्या समोर उलगड जातो.




      चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक उजैनचा प्रशासक होता त्याच्या क्षेत्रात चितोड येत असे. अशोकाच्या काळात ग्रीकांनी पश्चिम भारतावर आक्रमण केले त्यावेळी चितोड शहांच्या अधिपत्या खाली गेले. जवळजवळ ३ शतके चितोड शकांकडे होता. त्यानंतर आलेल्या गुलोहितांनी हा भाग जिंकून घेतला. त्यांनी स्वत:चे संवत सुरु केले, नाणी पाडली. पाचव्या शतकापासून ८ व्या शतका पर्यंत गुहील घराण्याच्या ताब्यात हा गड होता. इसवीसन ७३५ मध्ये मुहमद बीन कासिमने चितोडवर आक्रमण केले त्यावेळी बाप्पा रावळ यांनी त्याला पळवून लावले आणि गुहील राजा मानमौर्यापासून चितोड हिरावून घेतला.बाप्पांनी काबूल, कंधाहार, इराण, उजबेकीस्थान येथील राजांवर विजय मिळवला. शिवपूजक असलेले बाप्पा रावळ यांचे एकलिंगजी हे आराध्य दैवत होते. एकलिंगजी हे राजे आणि आपण त्याचे दिवाण असे ते मानत असत. बाप्पा रावळ आणि त्याच्या वंशजांनी पुढील काळात परकीय आक्रमकां विरुध्द कायम लढा दिला. बाप्पा रावळाचा वंश पुढील काळात भारतभर पसरला. बाराव्या शतकात राणा कर्णसिंहानंतर रावळ घराण्याचे दोन भाग झाले. त्याच्या दोन पुत्रांपासून रावळ घराणे आणि सिसोदिया घराणे अशा दोन शाखा तयार झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे याच सिसोदिया वंशाचे होते.  १३ व्या शतकात राणा रावक सिंह यांचा पुत्र कुंभकर्ण हा नेपाळला गेला. नेपाळच्या राजवंशाचा हा मुळ पुरुष आहे असे मानले जाते.








     किल्ल्यावरील मंदिरे, फ़तेह प्रकाश महाल, राणा कुंभ महाल, पाहात आपण मीरा मंदिरापाशी पोहोचतो. अप्रतिम कोरीवकाम असलेले भव्य कुंभशाम मंदिर आहे. मंदिरावर आतील आणि बाहेरील बाजूंनी दशवतारतील मुर्ती आहेत. मंदिराच्या आवारात मीरबाईचे मंदिर आहे. मीराबाई ही जोधपूरची राजकन्या होती. तिचा विवाह राणा संगाचा जेष्ठ पुत्र भोजराज ह्याच्याशी झाला होता. मीरा मंदिराच्या बाजूला विजय स्तंभ आहे. चितोडगडावरील हा विजयस्तंभ दुरवरुनही आपल्या नजरेस पडतो. इसवीसन १४४८ मध्ये राणा कुंभाने माळव्याचा सुभेदार मुहम्मद शहा खिलजी याचा पराभव केला. या विजया प्रित्यर्थ हा १२२ फ़ूट उंच आणि ३० फ़ूट रुंद विजयस्तंभ उभारण्यात आला. त्यावर आत आनि बाहेर दशवतार, रामायण , महाभारतातील प्रसंग दाखवणार्‍या अनेक मुर्ती कोरलेल्या आहेत. या विजय स्तंभाच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तिला जोहार स्थळी म्हणतात. चितोडगडावर ३ जोहार झालेले आहेत. इसवीसन १३०२ मध्ये चितोडवर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केले. त्यावेळी किल्ला शत्रूच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाल्यावर राजा रतनसिंहाची पत्नी राणी पद्मिनीसह दुर्गातल्या स्त्रियांनी जोहार केला आणि रतनसिंहाने केसरीया करुन प्राणार्पण केले."गढोमे गढ चितोडगढ बाकी सब गढीया, राणी मे राणी पद्मिनी महाराणी बाकी सब रणैय्या". इसवीसन १५३५ मध्ये बहादुरशहाने चितोडगडावर आक्रमण केले तेंव्हा राणी कर्णावतींने गडावरील स्त्रियांसह जोहार केला. इसवीसन १५६७ मध्ये अकबराने चितोडगडावर हल्ला केला तेंव्हा गडावरील स्त्रियांनी जोहार केला होता. विजयस्तंभाजवळ असलेले जोहर स्थान पाहून गलबलून येते.


Rani Padmini Mahal, Chittorgad Fort,



चितोडगडा वरील राणी पद्मिनीचा पाण्यातील महाल आहेत्याच्या पायऱ्यांवर बसलेल्या राणी पद्मिनीचे दर्शन तलावाच्या काठावर असलेल्या महालातील आरशातून अल्लाउद्दीन खिलजी झाले होते. आजही या ठिकाणी महालात आरसे लावलेले आहेत. त्यातुन राणी पद्मिनीच्या तलावातील महालाच्या पायर्‍या दिसतात. गडावर ठिकठिकाणी पाण्याचे तलाव आहेत. राजस्थाना सारख्या कमी पावसाच्या प्रदेशात गडावरील वस्तीला पाणी पुरावे यासाठी गडावर तलाव, कुंड खोदलेले होते. गडावरील दुसरा मनोरा म्हणजे किर्ती स्तंभ हा ७५ फ़ूट उंच आहे. त्यावरही अप्रतिम कोरीव काम असून चारही बाजूला भगवान आदिनाथाच्या मुर्ती आहेत. या जैन स्तंभाच्या बाजूला जैन मंदिर आहे. किल्ल्यावर फ़तेह प्रकाश पॅलेस जवळ असलेले सतबीस देवी हे जैन मंदिर १२व्या दगडात बांधलेले हे मंदिर शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. या मंदिरात आणि रणकपूरच्या जैन मंदिरात अनेक साम्य स्थळे आहेत. . चितोडगड वरील मंदिरे आणि त्यावरील कोरीवकाम हा वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो इतकी वैविध्यता मंदिरांमध्ये आहे.


आहार म्युझियम (Ahar Museum)



Ahar Museum





दिवसभर किल्ला पाहून झाल्यावर चितोडगड किल्ल्या खाली असलेल्या हॉटेलात पोटपूजा करुन १५ किमी वरील सावरीया गाठावे. येथे श्रीकृष्णाचे काळया पाषाणातील मंदिर आहे. मंदिर पाहून उदयपूरमध्ये शिरतांनाच आहार/अहाड म्युझियम दिसते. या ठिकाणी धुळाकोट नावाची टेकडी होती तिथे पूरातत्व खात्याने उत्खनन केल्यावर अंदाजे ४००० वर्षापूर्वी या ठिकाणी असलेल्या वस्तीचे (तांबावती नगरी) अवषेश मिळाले. त्याकाळी जी संस्कृती नांदत होती ती आता आहार/अहाड सभ्यता या नावाने ओळखली जाते. या ठिकाणी केलेल्या उत्खननात सापडलेल्या ताम्रपाषाण युगातील दैनंदिन वापराच्या वस्तू, लघु अश्म अस्त्रे (microliths) ,विविध भांडी, चुली, तांब्यांच्या कुर्‍हाडी, मासेमारीचे गळ, इत्यादी वस्तू, ऐतिहासिक, इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक काळातील मुर्ती यांचे याठिकाणी कायम स्वरुपी प्रदर्शन पुरातत्त्व विभागाने मांडलेले आहे. म्युझियमच्या मागे धुळकोट ही टेकडी आहे. म्युझियमच्या रक्षकांना विनंती केल्यास ते कुलूपबंद असलेली ही उत्खनन केलेली जागा पाहायला देतात. येथे घरांच्या भिंती, सोक पिट इत्यादी गोष्टी पाहाता येतात.




अशाप्रकारे पहिला संपूर्ण दिवस इतिहासाच्या सानिध्यात घालवल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी हल्दीघाटी, नाथव्दारा आणि कुंभलगडासाठी निघावे. हि तीनही ठिकाणे एकाच दिवसात पाहायची असल्याने गाडी करणे आवश्यक आहे. रणकपूरचे जैन मंदिरही पाहायचे असल्यास अजून एक दिवस लागतो. त्यासाठी कुंभलगड येथे मुक्काम करावा लागतो. आपल्या लोणावळा खंडाळा सारखे कुंभलगड हे उदयपूरच्या लोकांचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे अनेक हॉटेल्स आहेत. उदयपूरहून पुढे जोधपूरला जायचे असल्यास दुसर्‍या दिवशी रणकपूर पाहून राणी या गावामार्गे ४ तासात जोधपूरला जाता येते.   

हल्दीघाटी मेमोरीयल आणि चेतक स्मारक (Haldighati Memorial & Chetak Smarak)


Chetak Samadhi

१८ जुन १५७६ ला हल्दीघाटी येथे राणाप्रताप आणि अकबरच्या सैन्यात (जयपुरचा राजपुत्र मानसिंह याच्या नेतृत्वाखाली) एक दिवसाचे घनघोर युध्द झाल. जरी हे युध्द हल्दी घाटीचे युध्द म्हणून प्रसिध्द असले तरी ते युध्द हल्दीघाटाच्या जवळ असणार्‍या खणमोर गावा जवळील मैदानावर झाले. या युध्दात १८००० जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी तिथे पडलेल्या पावसामुळे तेथे रक्ताचे तळे तयार झाले तो भाग रक्ततलाई या नावाने ओळखला जातो. तिथे युध्दात कामी आलेल्या सैनिकांचे स्मारक बनवलेले आहे. खमणोर गावाजवळ मानसिंहाचा तळ होता तो भाग शाही बगीचा या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी सुंदर बाग बनवलेली आहे. दिवस मावळतांना युध्दाचे पारडे फिरल्याने राणाप्रताप आपल्या जखमी चेतक घोड्यावरून हल्दीघाटीत आला. तेथे पावसामुळे वाहाणार ओढा ओलांडताना अतिश्रमाने चेतक घोड्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी चेतक घोड्याने प्राण सोडला तेथे राणाप्रताप यांनी चेतक स्मारक आणि शिवमंदिर उभारले आहे.  उदयपूर पासून ५० किमीवर चेतक स्मारक आणि हल्दीघाटी म्युझियम आहे. चेतक स्मारकात छत्री आणि त्यात असलेली घोडेगळ पाहाता येते. हा परिसर सुंदर ठेवलेला आहे. चेतक स्मारकाच्या जवळ डॉं. श्रीमाली या माणसाने आयुष्यभर खपून, स्वतःचा पैसा खर्च करुन, देणग्या मिळवून हल्दीघाटी म्युझियम उभारलय. त्यात असलेल्या मिनी थेटर मध्ये हल्दीघाटीच्या लढाईवर दोन ध्वनीचित्रफिती दाखवण्यात येतात. चित्रफ़िती पाहून झाल्यावर एका गुहे सदृश्य भागातून आपल्याला पुढे नेत राणाप्रतापांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग, चितोड्गड आणि कुंभलगड या किल्ल्यांची माहीती प्रतिकृतींच्या व्दारे दिली जाते. त्याला निवेदनाची आणि छायाप्रकाशाची जोड देऊन प्रसंग उठावदार केले आहेत.





Ranapratap Memorial

  एकेकाळी रक्ताच्या रंगाने लाल झालेली हल्दीघाटी आजकाल गुलाबाच्या रंगाने लाल झालेली आहे. या भागात मोठ्याप्रमाणावर गुलाबाची शेती होते. हि गुलाब एक्सपोर्ट होतातच पण गुलाबापासून बनवलेल्या वस्तू गुलकंद, गुलाबपाणी इत्यादी वस्तू हल्दीघाटीत सगळीकडे तसेच म्युझियम मध्ये विकत मिळतात.  हल्दीघाटी म्युझियमच्या मागच्या बाजूस एका टेकडीवर राणाप्रतापांचा भव्य पुतळा उभारलेला आहे. याठिकाणाहून हल्दीघाटी परीसर दिसतो. त्याची दुर्गमता ध्यानात येते. हल्दीघाटी म्युझियम पासून नाथव्दारा २० किमीवर आहे. नाथव्दाराला जातांना रस्त्यात एक छोटासा घाट आणि खिंड लागते. या खिंडीतली माती हळदी सारख्या पिवळ्या रंगाची आहे. त्यामुळेच या घाटीला हल्दीघाटी या नावाने ओळखले जाते. या रस्त्याने पुढे जातांना शाही बगिचा, खमणोर आणि रक्त तलाई ही ठिकाणे लागतात. नाथव्दाराला श्रीनाजींचे दर्शन घेऊन आणि पोटपूजा करून ५० किमी वरील कुंभलगड किल्ला गाठावा. किल्ल्याच्या थेट दारपर्यंत गाडी जाते.     

कुंभलगड (Kumbhalgad)


Kumbhalgad

भारतातल्या सर्वात जुन्या अरवली पर्वतरांगेतला सर्वात उंच किल्ला (३७६६ फूट) म्हणजे कुंभलगड, चीनच्या भिंती नंतर सर्वात लांब मानव निर्मित तटबंदी ४४ किलोमीटर म्हणजे कुंभलगड. कुंभलगडाची अशी अनेक वैशिष्ट्य आपण ऐकलेली असतात. त्यामुळे किल्ला पाहाण्याची उत्सुकता वाढते. किल्ल्याचे भव्य बुरुज आणि दुहेरी तटबंदी आपले स्वागत करतात. कुंभलगडाचे प्राचीन काळी नाव होते मच्छिंद्रगड.  ८०० वर्ष अंधारत राहीलेल्या या किल्ल्याचे भाग्य राणा हमीरच्या काळात परत उदयाला आले. हमीरचे बालपण या किल्ल्यावर गेले होते. इसवीसन १४३३ मध्ये महाराणा कुंभाने हा किल्ला नव्याने बांधला. मेवाड मधल्या ८४ किंल्ल्यांपैकी ३२ किल्ले एकट्या राणा कुंभने बांधले आहेत. राणा कुंभाने कुंभलगडाला आपली दुसरी राजधानी बनवले. इसवीसन १५९७ ला जेष्ठ शुक्ल तृतीयेला 2 जून (९ मे १५४० इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे) महाराणा प्रतापसिंहाचा जन्म कुंभलगडावर झाला. 



Kumbhalgad

किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर चढण्यासाठी व्यवस्थित मार्ग बनवलेला आहे. राम पोल, भैरव पोल, निंबू पोल, पगडा पोल हे दरवाजे ओलांडत आपला बाले किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याला याशिवाय आरेट पोल, हल्ला पोल, हनुमान पोल इत्यादी दरवाजे तटबंदीत आहेत. बालेकिल्ल्यावर राणाकुंभ महाल आहे. त्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर महाराणा प्रतापांचे जन्मस्थान आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च भागात फ़तेह प्रकाश नावाचा राजवाडा आहे. या राजवाड्याच्या गच्चीवरून संपूर्ण किल्ला, दूरवर पसरलेली तटबंदी आणि आजूबाजूचा दुर्गम परिसर दिसतो. किल्ल्यावर अनेक मंदिर आहेत. किल्ला उतरुन परत पहिल्या प्रवेशव्दारापाशी येऊन मंदिर पाहायला जाता येते. किल्ला आणि मंदिर पाहून होईपर्यंत दिवस मावळायला लागलेला असतो. याठिकाणी दररोज संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो असतो. यात किल्ल्याचा आणि मेवाडचा इतिहास सांगितला जातो. लाईट आणि साउंड शो संपल्यावर आपल्याला उदयपूरला जाता येते किंवा कुंभलगडला मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी रणकपूरचे जैन मंदिर पाहाण्यासाठी जाता येते.      


ऱणकपूरचे जैन मंदिर संकुल (Ranakpur Temple)

                                                                            

Jain Temple Ranakpur
                                                    
कुंभलगड ते रणकपूर हे अंतर ३३ किमी आहे. पण घाट रस्ता असल्यामुळे पोहोचायला साधारणपणे २ तास लागतात. रणकपूरचे जैन मंदिर पर्यटकांसाठी दुपारी १२ वाजता उघडते. घाट रस्त्याने  निसर्गाची शोभा पाहात आपण रणकपूरच्या सूर्य मंदिरापाशी पोहोचतो. रणकपूरच्या जैन मंदिर संकुला बाहेर हे मंदिर आहे. मंदिरावर अप्रतिम कोरीवकाम आहे. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस गजपट्टी बरोबर अश्वपट्टी पण आहे. सूर्याच्या रथाचे घोडे यावर कोरलेले आहेत. सूर्यमंदिर पाहील्यावर आपली उत्सुकता वाढलेली असते तशात हिरव्यागार डोंगराच्या पार्श्वभूमीवर भव्य मंदिर आणि अनेक कळसांची रांग दिसायला लागते. मेवाडचा राजा कुंभ याच्या प्रधान संघवी धारनाथ पोरवाल याने १५ व्या शतकात हे सुंदर जैन मंदिर बांधले. अरवली पर्वत रांगेत मघई नदी काठी असलेले हे जैन मंदिर म्हणजे संगमरवराला पडलेल अप्रतिम स्वप्न आहे. या मंदिराच्या गर्भगृहाला चार प्रवेशव्दार असून या मंदिरात भगवान आदिनाथांच्या चार मुर्ती आहेत. त्यामुळे मंदिराला चतुर्मुख मंदिर या नावाने ओळाखले जाते. याशिवाय मंदिरात सर्व तिर्थंकरांच्या मुर्ती आहेत. मंदिराला मुख्य कळस आणि इतर ७६ छोटे कळस आहेत. मंदिराच्या आतल्या बाजूला संगमरावरावर जे कोरीव काम केले आहे त्याला तोड नाही. ८४ कोरीव खांब, ४ महामंडप, २० रंग मंडप यांच्या छतावर आतल्या बाजूने केलेले कोरीवकाम नाजूक आणि सुंदर आहे. रणकपूरचे मंदिर कलाकुसरीत ताजमहालापेक्षा काकणभर सरसच आहे. मुख्य मंदिरा बरोबर याठिकाणी पार्श्वनाथांचे मंदिर आहे. मंदिर पाहून आपण १७० किमीवरील जोधपूर गाठू शकता किंवा १६० किमीवरील उदयपूरला परत येऊ शकता.




तीन दिवसाची ही सहल आपल्याला राजस्थानचे एक वेगळे रुप दाखवते. या परिसरात फ़िरल्यावर अरवली पर्वत रांगा, त्यातील निबीड अरण्य यांच्या सहाय्याने महाराणा प्रताप यांनी कशाप्रकारे अकबराच्या बलाढ्य सैन्याशी आयुष्यभर सामना केला, हल्दीघाटीचे युध्द लढले याची आपल्याला कल्पना येते आणि त्यांच्या बद्दलचा आदर दुणावतो. 

जाण्यासाठी :- उदयपूर हे शहर रस्ता, रेल्वे आणि हवाईमार्गाने देशातील सर्व शहरांशी जोडलेले आहे. उदयपूरला राहाणाची आणि खाण्याची व्यवस्था आहे. उदयपूरला राहून ३ दिवसात अशाप्रकारे कार्यक्रम बनवता येईल.
दिवस १ :- उदयपूर दर्शन, मुक्काम उदयपूर
दिवस २ :- उदयपूर- चितोडगड -सावरीया - आहार/अहाड म्युझियम - उदयपूर (मुक्काम उदयपूर)
दिवस ३ :- उदयपूर- हल्दीघाटी- नाथव्दारा- कुंभलगड  (मुक्काम कुंभलगड)
दिवस ४ :- कुंभलगड - रणकपूर - उदयपूर किंवा जोधपूरला मुक्काम








अमित सामंत

ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) या जोधपूर जवळील Offbeat ठिकाणांची माहिती वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा 

#ranapratap#ranapratapmuseum#haldighati#haldighatimemorial#chetaksmarak#chittorgadh#chittodgadh#kumbhalgad#ranapratapbirthplace#ranakpurjaintemple#