Tuesday, January 31, 2023

९०,००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, सुसरोंडी, पालशेत, तालुका :- गुहागर ( Acheulian cave at Susrondi, Palshet, Taluka Guhagar)

 

Acheulian cave at Susrondi

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पालशेत नावाचे प्राचीन गाव आहे. पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन (Periplus of the Erythraean Sea) या इसवीसनाच्या पहिल्या शतकात एका ग्रीक खलाशाने लिहिलेल्या पुस्तकात कोकण किनारपट्टीतील काही बंदरांचा उल्लेख आहे. त्यात ‘पालमपट्टई’  नावाच्या बंदराचा उल्लेख आहे. हे बंदर म्हणजे आजचे पालशेत असावे असे काही तज्ञांचे मत आहे.  या बंदरातून ग्रीस आणि रोम यांच्याशी व्यापार तिसऱ्या शतका दरम्यान चालत होता. पालशेत गावतील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ आजही मध्ययुगीन बंदराचे अवशेष पाहायला मिळतात.

आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, पालशेत

पालशेत गावातील सुसरोंडी  भागात अंदाजे ९०, ००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा सापडलेली आहे. याशिवाय या भागात मांडवकरवाडी (पालशेत), चिंद्रावळे (हेदवी-नरवण) इत्यादी अनेक गुहा विखुरलेल्या आहेत. या गुहांमुळे या भागाला गुहागर ("गुहाचे आगार" या अर्थी ) असे नाव पडले असावे. भारताला लाभलेल्या ७५०० किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी आत्तापर्यंत केवळ गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्या जवळच्या २५ ते ३० किलोमीटरच्या पट्ट्यात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा सापडलेल्या आहेत.  भारतात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा यापूर्वी डोंगरावर किंवा पठारी भागात सापडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गुहांचे महत्व अधोरेखित होते.

डेक्कन कॉलेजचे डॉ. अशोक मराठे यांनी २००१ मध्ये या गुहेमध्ये उत्खनन केले होते. त्यावेळी या गुहा त्यांना ज्यांनी दाखवल्या त्या ओक काकांनी आमच्या बरोबर गुहा दाखवायला यायचं मान्य केलं. ओक काका मुळचे पालशेत गावाचे.  लहानपणापासून त्यांनी पालशेतच्या आजूबाजूचे जंगल तुडवल आहे. आजही ते आपला व्यवसाय सांभळून जंगलातून भटकंती करत असतात. जंगलावर आणि इथल्या ऐतिहासिक गोष्टींवर त्यांचे नितांत प्रेम आहे. आम्हाला केवळ गुहा  दाखवायला आलेले ओक काका आमचे या विषयातील स्वारस्य बघून पालशेत आणि आजूबाजूच्या परिसरातील ऐतिहासिक वाटा, बारव, मंदिर या गोष्टी दाखवत दिवसभर फिरले.

Acheulian cave at Susrondi, Map by Mahendra Govekar

पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी (बारभाई) आहे. या बौद्धवाडीतून  एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. चिर्‍यांनी बांधलेल्या चढाईच्या वाटेला कोकणात घाटी म्हणतात. दोन्ही बाजूला चिर्‍यांच्या गडग्यांचे कुंपण केलेल्या आंब्या-काजूच्या बागा होत्या. त्याच्या दाट सावलीतून चढत जाणाऱ्या वाटेने १५ मिनिटात एका फाट्यावर येतो. येथून उजव्या बाजूची वाट दाट जंगलातून जाते. जानेवारी महिना असल्याने या वाटेवर असलेल्या अनेक झाडांचे मोहोर फ़ुलले होते त्याचा गोडूस धुंद सुवास आसमंतात भरुन राहीला. खुरीची पांढरी फ़ुले आणि अंजनाची जांभळी फ़ुले घोसाने फ़ुलली होती. त्यांचा दरवळ वातावरण सुगंधित करत होता.  या वाटेने  १० मिनिटे चढाई केल्यावर आम्ही सुसरोंडीच्या सड्यावर पोहोचलो.  खाली दुरवर दाट झाडीत लपलेली मांडवकरवाडीतली लाल कौलांची घर दिसत होती. त्या वाडीतही आदिमानव कालिन गुहा आहेत.

खुरीची फुलं
अंजन

सुसरोंडीचा  सडा उभा आडवा पसरलेला आहे. सड्यावर  लक्षात ठेवण्यासारखी कुठलीही खूण नाही. लोकांचा वावर नसल्याने मळलेल्या वाटा नाहीत. त्यामुळे गुहा बघायला जायचे असेल तर  गावातून माहीतगार सोबत असणे आवश्यक आहे. आमच्या बरोबर आलेले ओक काका लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच इथे येत होते. त्यामुळे त्यांनाही थोडी शोधाशोध करावी लागली, पण ते येथे अनेकदा येऊन गेल्यामुळे त्यांना दिशेचा अंदाज होता. त्या दिशेने थोडी शोधाशोध केल्यावर वाट सापडली. या वाटने  खाली उतरताना जांभ्या दगडात कोरलेल्या काही  पायाऱ्या लागल्या. पायाऱ्या उतरल्यावर एक ओढा  लागला. हा ओढा पुढे सुंदरी नदीला जाउन मिळतो. ओढा ओलांडून  पलीकडे  जाऊन पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने थोडे चालून गेल्यावर प्रवाह एका कड्यावरून  १५ ते २० फूट खाली उडी मारतो. पावसाळ्यात या ठिकाणी ७ धारा असलेला धबधबा पडतो. पण पावसाळ्यांत पाण्याच्या प्रवाहामुळे या ठिकाणी येणे धोकादायक आहे.

धबधबा आणि उजवीकडे गुहा

धबधब्याच्या कड्यावरून उजव्या बाजूला गुहेच तोंड दिसत होतो. या भागात माणसांचा वावर नसल्यामुळे जंगली प्राणी गुहेत असण्याची शक्यता होती. ओक काकांनी जवळचे धोंडे उचलून गुहेच्या दिशेने  फेकायला सुरुवात केली. आम्हालाही हाकारे घालायला सांगितले. त्यानंतर पाच मिनिटे वाट बघितली. गुहेत एखाद जंगली जनावर असेल तर त्याला बाहेर जाण्याची संधी मिळावी हा त्यामागे हेतू होता. थोडा वेळ थांबूनही गुहे जवळ काही हालचाल जाणवली नाही.  मग आम्ही धबधब्याच्या बाजूने खाली उतरायला सुरुवात केली. याठिकाणीही जांभ्या दगडात  कोरलेल्या पायाऱ्या पाहायला मिळाल्या.  प्रवाह ओलांडून धबधब्या जवळ पोहोचलो. पाण्याच्या प्रवाहामुळे धबधब्याच्या खाली खोल डोह तयार झाला होता. आजूबाजूच्या वृक्षाची मुळे धबधब्याच्या कातळ भिंतीवरून खाली उतरलेली होती. डोहातल्या  गर्द हिरव्या पाण्यात  त्याचं प्रतिबिंब पडलं होत. बालकवींची औदुंबर कविता आठवली.


पाण्यात पाय सोडून बसलेली झाडं 

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन , निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

इथे पाण्यात पाय सोडून बसलेला औदुंबर नसला तरी बालकवींनी वर्णन केलेले निसर्गदृश्य पाहात पाहातच आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो होतो.

आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहेचे तोंड 

         

ओक काका इसवीसन २००१ साली डॉ मराठे यांना इथे घेऊन आले तेंव्हा गुहेचे तोंड झाडी झूडूपांनी झाकलेले होते. गुहेत कोणी असेल तर बाहेर यावे यासाठी त्यांनी सोबत आणलेले फटाके गुहेच्या तोंडावर वरून टाकले. त्यांनतर सोबत आलेल्या एका कातकऱ्याला दोर बांधून गुहेच्या तोंडा जवळ उतरवले. त्याने झाडी झुडपे तोडून गुहेत प्रवेश केला. गुहेच्या भिंतींवर, छतावर त्यावेळी पाली आणि कोळ्यांचे राज्य होते. मशाली पेटवून आगीचा धाक दाखवून त्यांना पळवून लावण्यात आले. प्राथमिक शोध घेतांना या गुहेच्या जवळ अश्मयुगीन परशु / फ़रशी (Cleavers) सापडले. त्यामुळे त्यांनी सुसरोंडी येथे उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसात सध्या गुहेजवळ जाण्याचा मार्ग आहे तो बनवला. 

Entrance of Susrondi cave (from inside)

 जांभा दगडात बनलेल्या गुहेच्या तोंडातून आम्ही आत प्रवेश केला. कोकणात सर्वत्र दिसणारा लाल रंगाचा जांभा दगड हा ज्वालामुखीजन्य काळ्या पाषाणापासून म्हणजेच बेसॉल्ट पासून बनलेला आहे. लाखो वर्षे मंदगतीने बेसॉल्ट खडकाची झीज दोन प्रकारे होत असते.  १) भौतिक विच्छेदन (Physical disintegration) आणि २) रासायनिक विघटन (Chemical Decomposition). भौतिक विच्छेदनामुळे खडकाचे तुकडे  होतात  तर रासायनिक विघटनामुळे पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे असे दोन प्रकारचे पदार्थ तयार होतात. पाण्यात विरघळणारे पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात त्यामुळे दगड जाळीदार होतो आणि न विरघळणारे पदार्थ मागे राहातात. त्यातील लोहाच्या ऑक्साईडमुळे जांभा दगडाला तांबडा रंग येतो. कोकणात दिवस आणि रात्रीच्या तापमानात असलेला फ़रक आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काळ्या पाषाणाचे भौतिक विच्छेदन  आणि रासायनिक विघटन परिणामकारकरित्या होऊन जांभा दगड तयार झाला आहे.  सुसरोंडीच्या गुहेची निर्मिती अशाच प्रकारे जांभ्या दगडाचे भौतिक विच्छेदन  आणि रासायनिक विघटन होऊन झालेली आहे.

गुहेच तोंड १. मीटर रुंद आणि २.५ मीटर  उंच आहे. गुहेत प्रवेश केल्यावर आतील भाग ५ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद आहे. येथून गुहेत पूर्वेला आणि उत्तरेला जाणाऱ्या दोन वाटा फुटल्या आहेत . या वाटाची उंची जेमतेम २ मीटर आहे. त्यात सध्या वाटवाघुळांचे वास्तव्य असल्याने आत  जाता येत नाही. यातील उत्तरेकडील वाट लांबवर जाते असे स्थानिक लोक सांगतात. गुहेत आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खुणा शोधाण्यासाठी डॉ मराठे यांनी गुहेच्या तोंडाजवळ ३ मीटर लांब    मीटर रुंद आणि ४.२ मीटर  खोल खड्डा (Trench) घेतला. या उत्खननात विविध स्तरावर (खोलीवर ) त्यांना आदिमानवाने वापरेली २२ दगडी हत्यारे सापडली. त्या हत्यारांच्या  जडणघडणी वरून त्याचा काळ निश्चित करता येतो. त्यावरून साधारणपणे ९0000 वर्षांपासून याठिकाणी मानवाचे वास्तव्य होते असे दिसून आले.

मानवाच्या इतिहासाचा लाखो  वर्षाचा काळ दोन भागात विभागला जातो . प्रागैतिहासिक काळ (Prehistory) आणि ऐतिहासिक काळ (History). माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली त्याच्या पुढच्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात. हा जेमतेम ५००० वर्षाचा काळ आहे. त्या आधीचा लाखो वर्षाचा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ. या काळात मानव समुहाने राहात होता. तो भटक्या होता तरी उन, वारा पाऊस यांच्या पासून संरक्षण मिळवण्यासाठी तो नैसर्गिक गुहांचा आश्रय घेत होता.  कंदमुळे, फ़ळे गोळा करणे, शिकार करणे इत्यादीसाठी त्याने निसर्गात उपलब्ध असलेल्या दगडाचाच हत्यार म्हणूम वापर केला. सुरुवातीच्या काळात दगडाचे मोठे कपचे काढून ओबडधोबड हत्यारे बनवली जात. त्यांना Abbevillian tools म्हणून ओळखले जाते. काळानुरुप हत्यारात सुधारणा होऊन  ती प्रमाणबध्द , सुबक, धारदार आणि आकाराने छोटी झाली. त्यांना Acheulean tools म्हणून ओळखले जाते. त्यापुढील काळात लाकडात किंवा हाडामध्ये दगडी पाती अडकवून त्याने हत्यारे बनवली अशा हत्यारांना  Composite tools म्हणून ओळखले जाते. 

Paleolithic Age

लाखो वर्षाचा प्रागैतिहासिक काळ ३ भागात विभागलेला आहे.

१) पुराश्मयुग (Paleolithic Age)

अ)पूर्व पुराश्मयुग - १० लाख ते १ लाख वर्षे  (Lower Paleolithic Age)

ब) मध्य पुराश्मयुग - १.२५ लाख ते २५ हजार वर्षे (Middle Paleolithic Age)

क) उत्तर पुराश्मयुग - ३५ हजार ते १० हजारवर्षे (Upper Paleolithic Age)

या काळात मानव मुख्यत: अन्न संकलन आणि भटके जीवन जगत होता.

) मध्याश्मयुग (Mesolithic Age) - १२ हजार ते ५ हजार वर्षे  , याकाळात पशुपालन व शेती करुन मानव अन्न उत्पादन करु लागला. 

) नवाश्मयुग (Neolithic Age) - ४ हजार ते २५०० वर्षे , याकाळात मानव स्थिर जीवन जगू लागला.

Paleolithic Tools

Acheulian Stone tools found in cave at Susrondi Courtesy :-Paper published by Dr Marathe 

सुसरोंडीच्या गुहेत केलेल्या उत्खननात सापडलेली दगडी हत्यारे बेसॉल्ट दगडापासून बनवलेली होती. यात ३ हातकुर्‍हाड (Hand Axe) २ अश्म परशु / फ़रशी (Cleavers) , ४ कुदळ (Picks), १४ चाकू (Choppers), २४ तासणी (सोलणी) (Scrappers) ही हत्यारे सापडली. ही हत्यारे बनवण्यासाठी वापरण्यात आलेले दगड (Cores) आणि त्या दगडापासून हत्यारे बनवताना उडालेल्या ढलप्या (Flakes) ही याठिकाणी सापडल्या आहेत. इथे आणि वेळणेश्वर येथे केलेल्या उत्खननात सापडलेल्या मातीच्या नमुन्यांवरुन काही हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्या पेक्षा बरीच वर होती. त्यामुळे कंदमुळे, शिकार करुन अन्नसंकलन करणार्‍या आदिमानवाला समुद्रातूनही अन्न मिळत होते. जवळपासच्या भागात असलेल्या अन्नाच्या उपलब्धतेमुळे आणि गुहे जवळच असलेल्या गोड्या पाण्याच्या ओढ्यामुळे आदिमानवाने या गुहेचा आश्रय घेतला होता.


आदिमानवाच्या गुहेत बसून पुरातत्वशास्त्राच्या (Archaeology) अभ्यासक्रमात शिकलेला लाखो वर्षाचा मानवी इतिहास मी सगळ्यांना सांगितल्यावर शांतता पसरली. गुहेतल्या आदिम शांततेत आमच्याच श्वासाचा आवाज आम्हाला ऐकू येत होता. गुहेतून बाहेर पडून ओढ्याच्या काठाने प्रवाहाच्या दिशेने पुढे गेल्यावर एक छोटा धबधबा आणि त्याखाली असलेला डोह पाहायला मिळतो.

गुहा पाहायला आलेल्या वाटेने न उतरता दुसर्‍या वाटेने खाली उतरुन गावातील लक्ष्मी नारायण मंदिर गाठले. मंदिरा जवळ एक जांभ्या दगडात बांधलेली इंग्रजी 'L" अक्षराच्या आकाराची बारव आहे.. याच आवारात असलेल्या शिवमंदिरातील काळ्या पाषाणातील गणपतीची आणि नंदीची मुर्ती सुंदर आहे. मंदिराच्या पुढे पालशेतच्या प्राचीन बंदराचे अवशेष आहेत. या ठिकाणी ४ बुरुज आणि खाली उतरण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. या ठिकाणी केलेल्या उत्खननात नांगर आणि बोटी बांधण्याचा लोखंडी कड्या सापडल्या होत्या. या बुरुजांच्या काटकोनात एक ४ फ़ूट उंच भिंत आहे. त्याला ठराविक अंतरावर कमान असलेले दरवाजे आहेत. भरती ओहोटीचे पाणी बंदरात नियंत्रित करण्यासाठी Lock gates असतात तशी योजना येथे केलेली असावी. या भागात आता जंगल आणि बागायती असल्याने संपूर्ण परिसर पाहाता येत नाही. याशिवाय गावात प्राचीन वाट आणि त्यावरील अंतर दाखवणारे कोसाचे (मैलाचे) दगड   हे प्राचीन अवशेष पाहायला मिळाले. 

Lock Gates in Ancient Palshet dock 

Mile stone on ancient route at Palshet

हिच प्राचीन वाट पुढे पालशेत - वेळणेश्वर रस्त्यावर असलेल्या अडूर गावाच्या सड्यावर जाते. त्यावर असलेले कोसाचे दगड , पांथस्थांसाठी बांधलेली बारव आणि विश्रांतीसाठी पुरातन वृक्षांच्या भोवती बांधलेले पार पाहून आजच्या दिवसाची ऐतिहासिक सफ़र पुर्ण केली.

Step well, Adur

जाण्यासाठी :-

चिपळूण पासून पालशेत गाव ४५ किलोमीटर अंतरावर आहे. चिपळूणहून थेट पालशेतला जाण्यासाठी फ़ार कमी एसटीच्या बसेस आहेत. त्यामुळे चिपळुहून दर अर्ध्या तासाला सुटणार्‍या चिपळूण - गुहागर एसटीने शॄंगारतळी किंवा मोडका आगार याठिकाणी उतरुन रिक्षा अथवा वडापने पालशेतला जाता येते.

पालशेत गावातून दोन मार्गांनी सुसरोंडीच्या गुहेत जाता येते.

१)  पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी, बारभाई आहे. या बौद्धवाडीतून  एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. या चढाईच्या मार्गाने गुहेपर्यंत जाण्यास पाऊण ते एक तास लागतो.

२)  पालशेत गावातून पक्का रस्ता निवोशीला जातो . या रस्त्यावर एक मोबाईल टॉवर आहे त्याजवळून एक वाट सड्यारुन सुसरोंडीच्या गुहेजवळ जाते. या मार्गाने मोबाईल टॉवर ते गुहेपर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो.

पालशेत गावातील पुरातन अवशेषांचा नकाशा, 
Map by Mahendra Govekar

Ref :- 1) Acheulian cave at Sursondi, Kokan Maharashtra, by Ashok Marathe , Paper published in ,Current Science Vol 90 No 11,  10 June 2006.

2) भारताची कुळकथा :- डॉ. मधुकर केशव ढवळीकर

3) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती :- डॉ. गो.ब. देगलूरकर


Water stream near cave, Susrondi

केनियातील सुस्वा माउंटन येथे लाव्हारसामुळे तयार झालेल्या गुहेतून केलेला थरारक प्रवास वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

छत्तीसगड मध्ये लाईमस्टोन मध्ये तयार झालेल्या गुहेतून केलेला थरारक प्रवास वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

Photos by :- Amit Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

Map :- Mahendra Govekar © Copy right

Sunday, January 8, 2023

दक्षिणेचे प्रवेशव्दार असिरगड आणि बुर्‍हाणपूर , भाग - १ ( "key to the Deccan", Asirgarh Fort & Burhanpur , Part -1 )

 

Asirgarh Fort

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥

या श्लोकाचा अर्थ अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य और भगवान परशुराम असे सात चिरंजीव आहेत. हा श्लोक आठवण्याचे कारण म्हणजे अश्वत्थामा आणि असिरगड यांच्या भोवती गुंफ़लेली दंतकथा. असिरगडावर असिरेश्वराच मंदिर आहे. दररोज रामप्रहरी अश्वत्थामा मंदिरा समोर असलेल्या कुंडात आंघोळ करुन सुचिर्भूत होऊन असिरेश्वराची पूजा करतो. पूजेमध्ये तो पिंडीवर एक गुलाबाचे फ़ूल वाहातो. जे या भागात जवळपास कुठेही मिळत नाही. पूजा झाल्यावर अश्वत्थामा जंगलात निघून जातो. अनेक लोकांना तो किल्ल्याच्या परिसरात दिसल्याच्या काहाण्या सांगितल्या जातात. एका न्य़ुज चॅनलने पहाटे ५ वाजता जाऊन येथे शुटींग केले होते. त्यावेळीही त्यांना पिंडीवर गुलाबाचे ताजे फ़ुल आढळले होते.

बुर्‍हाणपूर - इंदुर रस्त्यावर असलेला असीरगड हा भारतातल्या अजिंक्य किल्ल्यांमधला एक किल्ला आहे. हा किल्ला लढून जिंकून घेता आला नाही फ़ंदफ़ितुरीने जिंकला गेला. मध्ययुगात बुर्‍हाणपूर ही राजधानी झाल्यावर तीचा पाठीराखा म्हणुन असिरगडला महत्व आले.  ‘बाब-ए-दक्खन’ (दक्षिणेचे प्रवेशव्दार ) और ‘कलोद-ए-दक्खन’ (दक्षिणेची किल्ली) म्हटले जात असे. असिरगड जिंकला की , तेथून दक्षिण भारतात मोहिमा काढणे सोपे पडत असे.

Asirgarh Maps Courtesy Google.com

असिरगड तीन भागात विभागलेला आहे. किल्ल्याच्या खालच्या डोंगराला "मलयगिरी" म्हणतात. त्याच्या वरच्या भागाला "कमरगड" म्हणतात. इंग्रजांच्या राजवटीत या दोन्ही भागाला मिळुन "Lower Fort"  या नावाने ओळखले जात होते. असिरगड गावातून पायर्‍यांच्या मार्गाने आणि गाडी रस्त्याने गडावर जाता येते.  गाडीने थेट किल्ल्यावर गेल्यास किल्ल्याच्या खालच्या भागात असलेले अवशेष पाहायचे राहून जातात. असिरगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍या चढायला सुरुवात केल्यावर १५ ते २० मिनिटात आपण किल्ल्याच्या भक्कम अशा पहिल्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराला लागून  बुरुज आणि तटबंदी आहे. तटबंदी व बुरुजाच्या वरच्या बाजूला चर्या आहेत. त्यामध्ये जंग्या ठेवलेल्या आहेत.  प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूला देवड्या आहेत. पुढे पायर्‍या चढून काटकोनात वळल्यावर डाव्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. त्यापुढे दुसरे प्रवेशव्दार आहे. पहिले आणि दुसरे प्रवेशव्दार तटबंदीने एकमेकाला इंग्रजी  'L" अक्षराच्या आकारात जोडलेले आहे. पहिले प्रवेशव्दार पडल्यावर शत्रूला लगेच किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये यासाठी अशी रचना केलेली आढळते. दुसर्‍या प्रवेशव्दारातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला देवड्या आहेत.  दुसरा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या खालच्या भागात पसरलेली तटबंदी आणि बुरुज पाहायला मिळतात.  पुढे पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला कमानी असलेली एक वास्तू आहे. परवाने तपासणारे अधिकारी आणि खालच्या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी असणार्‍या अधिकार्‍यांचे हे कार्यालय असण्याची शक्यता  आहे.

 

Entrance gate , Kamargad

या कार्यालयापासून उजवीकडे जंगलात एक वाट "चौ बुरुजा" कडे जाते. वाटेत एक पाण्याचे टाक आणि उध्वस्त वास्तू आहे. किल्ल्याच्या या टोकावर चार बुरुज बांधून ही जागा संरक्षित करण्यात आलेली आहे. चौ बुरुज पाहून पुन्हा पायर्‍यांच्या वाटेवर येऊन चढून गेल्यावर पायर्‍यांच्या डाव्या बाजूला किल्ल्याचे तिसरे प्रवेशव्दार आहे. सध्याची वाट या दरवाजातून न जाता बाजूने जाते.  अजून पुढे चढून गेल्यावर किल्ल्याच्या चौथ्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या आत देवड्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर किल्ल्यावर येणारा गाडी रस्ता लागतो. याच ठिकाणी पार्कींगही आहे. या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर मलयगिरी आणि कमरगड संपून असिरगड किल्ला Upper Fort सुरु होतो.

 हैहय ( यदु कुळातला, यादव वंशाचा) वंशाचा राजा आशा असिर याच्याकडे भरपूर पशुधन होते. त्यांच्या संरक्षणासाठी त्याने चौदाव्या शतकात हा किल्ला बांधला होता.  किल्ल्याची ख्याती ऐकुन फ़िरोजशहा तुघलकाचा सरदार नसीरखान फ़ारुखी याने आशा असिर राजाची भेट घेऊन त्याला किल्ल्यात आश्रय द्यायची विनंती केली. आशा असिरने त्याच्यावर विश्वास ठेऊन किल्ल्यात येण्याची परवानगी दिली. नसीरखानने पहिल्यांदा आपल्या बायकांना डोलीत बसवून किल्ल्यात पाठवले. आणि त्या मागोमाग हत्यारबंद शिपाई डोलीत बसून सहजासहजी किल्ल्यात शिरले. नसीरखानच्या परिवाराचे स्वागत करायला आलेल्या आशा असिर आणि त्याच्या पुत्रावर किल्ल्यात शिरलेल्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला करुन त्यांना मारुन टाकले. किल्ला नसीरखानाच्या ताब्यात केला. त्यानंतर बहादुरशहा फ़ारुखीच्या  काळात अकबराने हा किल्ला जिंकण्यासाठी १० वर्ष वेढा घातला. किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकण्याचे अनेक प्रयत्न विफ़ल झाल्यावर अकबराने बहादुरशहा फ़ारुखीला चर्चेसाठी बोलवले आणि कैद केले. १७ जानेवारी १६२१ रोजी असिरगडवर मुघलांचे निशाण फ़डकले. किल्ल्यावर मुघलांची टांकसाळ होती. असिरगड जिंकल्यावर अकबराने सोन्याची नाणी पाडली होती. त्यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. मराठ्यांकडून किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

 
Fortification at Main entrace gate, Asirgarh

असिरगड किल्ल्यापाशी आल्यावर तिथल्या सुरक्षा रक्षकाने आम्हाला सांगितले की, किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने किल्ला पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे किल्ल्यात जाता येणार नाही. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत एवढ्या लांब येऊन किल्ला न पाहात कस जाणार वगैरे अनेक विनंत्या केल्या. मागच्या वेळीही जळगाव ते बुर्‍हाणपूर  किल्ले बघत बघत असिरगड बघण्याचा प्लान केला होता. त्यावेळी  जळगाव जिल्यातल्या चौगाव किल्ल्यावर आमच्यावर दोन तास मधमाशांचा हल्ला झाला. आम्हाला चोपडा येथिल सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावे लागलेले. एवढे झाल्यावरही सर्वानुमते पुढचे किल्ले पाहात आम्ही पुढे बुर्‍हाणपूर पर्यंत गेलो, पण वेळेचे गणित चुकल्यामुळे फ़क्त बुर्‍हाणपूर पाहून परताव लागले होते.  असिरगड पाहाण्यासाठी यावेळी अमरावती  ते बुर्‍हाणपूर  किल्ले बघत बघत जाण्याचा प्लान केलेला . त्याप्रमाणे पहिला दिवस व्यवस्थित पार पडलेला . आता असिरगड समोर दिसत होता पण त्यात जाता येत नव्हते.

Entrace gate , Asirgad

आमच्या नशिबाने कामावर देखरेख करण्यासाठी मध्यप्रदेश पुरातत्व खात्याची  काही माणस आली. त्यांना विनंती केल्यावर त्यांनीही तेच कारण सांगितले. आम्ही मात्र पिच्छा सोडायला तयार नाही पाहिल्यावर आमची दया येऊन त्याने त्याच्या साहेबाला फ़ोन लावला त्याने आमच्याकडून "स्वत:च्या जबाबदारीवर जात आहोत" असे लिहून देण्यास सांगितले. तसेच सिक्युरिटी गार्ड तुमच्या बरोबर असेल त्याच्या बरोबर फ़िरावे लागेल असे सांगितले. त्यांचे आभार मानून किल्ल्याच्या  पहिल्या पायरीला नमस्कार करुन किल्ल्याकडे निघालो. तितक्यात पुरातत्व खात्याच्या माणसाने सिक्युरीटी गार्डला असिरेश्वर मंदिराची चावी दिली आणि तेही दाखवायला सांगितले.  

Asirgarh Map by Mahendra Govekar© Copy right 

डोंगरावरच्या कातळकड्यावर तटबंदी बांधून किल्ला संरक्षित करण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या पायर्‍या चढायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला चार फ़ारसी शिलालेख आहेत.  पुढे डाव्या बाजूला एक बुरुज अशा प्रकारे बांधलेला आहे की, त्यामुळे त्याच्या मागे असेलेल्या प्रवेशव्दारावर थेट हल्ला करता येणार नाही.  बुरुजा मागील प्रवेशव्दारातून पुढे पायर्‍या चढून गेल्यावर वाट कोटकोनात आणि समोर किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूला भव्य बुरुज आहेत. प्रवेशव्दारच्यावर ८ ते १० फ़ूट भिंत बांधलेली आहे.  प्रवेशव्दाराचे दरवाजे आणि त्यावरचे खिळे अजूनही शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर पायर्‍यांच्या वाटेने वर चढतानां डाव्या बाजूची १० फ़ूट उंच भिंत ढासळलेली होती. त्याच्या पूनर्बांधणीचे काम चालू होते. त्यासाठी किल्ला बंद ठेवण्यात आला होता.

 

राणी महाल,असिरगड

गडमाथ्यावर आल्यावर समोर दिसणार्‍या पायवाटेने चालण्यास सुरुवात केली. डाव्या बाजूला एक उध्वस्त वास्तू आहे. त्याच्या दरवाजावर खिळे ठोकलेले आहेत.  पुढे उजव्या बाजूला राणी महाल आहे. राणी महालाच्या पुढच्या आणि मागच्या बाजुस पहारेकर्‍यांसाठी खोल्या आहेत. किल्ल्यात बराच काळ इंग्रजांची वसाहत होती त्यामुळे किल्ल्यातील मुळ वास्तूंमध्ये त्याकाळात त्यांच्या सोयी प्रमाणे बदल करण्यात आले. नवीन वास्तू बांधल्या त्यामुळे नक्की वास्तू कशासाठी असावी हे त्याच्या बांधकाम शैली वरुन अंदाज करावा लागतो. राणी महालाच्या मागच्या बाजूला वीटांनी बांधलेल्या काही वास्तू आहेत. त्याचा आकार बघता कोठार म्हणून त्याचा उपयोग झाला असावा. या कोठारांच्या पुढे मामा भांजा तलाव आहेत . त्यापैकी एका तलावात विहिर आहे. इथे सांगितल्या जाणार्‍या दंतकथेनुसार तलावचे खोदकाम करतांना मामा आणि भाचे अंगावर भिंत पडून दगावले. त्यामुळे या तलावाला मामा भांजा तलाव म्हणतात. तलाव पाहून पुन्हा पायवाटेवर आल्यावर आपण भव्य मशिदीपाशी पोहोचतो.    

 

Inscription on pillar, Asirgarh

Mosque, Asirgarh

मशिदीकडे जाण्यासाठी दगडाच्या सुंदर वळणदार पायाऱ्या बांधलेल्या आहेत. त्या चढून गेल्यावर तीन कमानी असलेल्या दरवाजातून मशिदीच्या आवारात प्रवेश होतो. आयताकृती आकारात बांधलेल्या या मशिदिला चारही बाजूला बांध्याकाम आणि मध्ये मोठा चौक आहे. आत शिराल्यावर डाव्या बाजूला वजू करण्यासाठी हौद आहे. हौद भरण्यासाठी मागाच्या बाजूला विहीर आहे.  नमाज  पढण्यासाठी असलेल्या सभागृहाला २७ कमानी आणि  ५० खांब आहेत. दर्शनी खाबावर फारसीत शिलालेख कोरलेला आहे. बाजूच्या दोन बाजूला ओवाऱ्या काढलेल्या आहेत. मशिदीला दोन मीनार आहेत.

 

Remains of church, Asirgarh

मशिदीच्या पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला ब्रिटीशांची वसाहत आणि त्यातील चर्चचे अवशेष पाहायला मिळतात.  तेथून किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत जातांना उजव्या बाजूला एक मोठा तलाव आहे. या तलावाला लागून असलेल्या तटबंदीत काही खोल्या आहेत. किल्ल्याच्या पूर्व टोकावर अजून एका चर्चचे अवशेष आहेत.  चर्चपासून पुढे गेल्यावर आपण ३ विहिरींपाशी पोहोचतो. या विहिरी अतिशय खोल असून एका विहिरीत महाल आहे. उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी अशा प्रकारे पाण्याजवळ महाल बांधलेले बर्‍याच किल्ल्यांवर पाहायला मिळतात. या विहिरीला लागूनच असिरेश्वर महादेव मंदिर आहे.  विहिरीच्या बाजूचे कातळ कोरुन हे त्यात हे मंदिर बांधलेले आहे.  अश्वत्थामा दररोज रामप्रहरी सातपुड्याच्या जंगलातून किल्ल्यावर येतो. मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीत स्नान करुन , पिंडीवर अभिषेक करुन त्याला फ़ुल वाहातो अशी येथील लोकांची श्रध्दा आहे.

 

असिरेश्वर महादेव मंदिर

अश्वत्थामा पुजतो ती पिंड

विहिरीतील महाल 


आमच्या बरोबर आलेल्या सिक्युरिटी गार्डने मंदिराचे कुलूप उघडून आम्हाला आत नेले. गाभारा स्वच्छ होता. पिंडीवर भस्माचे पट्टे काढलेले होते. पिंडीवर फ़ूल नव्हते पण जंगलात मिळणारी दोन काटेरी फळे पिंडीवर वाहेलेली होती. सध्या किल्ला पर्यटकांसाठी बंद असल्याने किल्ल्यातील मंदिर कुलूपबंद असते असे सिक्युरीटी गार्डने सांगितले. त्याला इथे नोकरीला लागून आठवडाच झाला होता . त्यामुळे अश्वस्थामाची दंतकथा आणि एकूणच किल्ल्याबद्दल फ़ारशी माहिती नव्हती. या एकाच किल्ल्यावर मंदिर , मशिद आणि चर्च पाहायला मिळाले. 

 

तलाव, असिरगड 

तुरुंग, असिरगड 


मंदिराच्या बाजूला पूर्व टोकावरील किल्ल्याच्या आत बांधलेला टेहळणी  बुरुज आहे. बुरुजावर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. बुरुज पाहून तलावाच्या दुसर्‍या बाजूने प्रवेशव्दाराकडे जातांना वाटेत, इंग्रजांनी बांधलेल्या अनेक उध्वस्त इमारती पाहायला मिळतात. यातील काही इमारतींचा वापर तुरुंग म्हणून केला होता. पंजाबातील कुका चळवळीचे नेते राम सिंह आणि त्यांच्या अनेक अनुयायांना इंग्रजांनी याठिकाणी इसवीसम १८७२ मध्ये कैदेत ठेवले होते.  इथुन पुढे गेल्यावर मामा- भांजे तलावाच्या पुढे इंग्रजांचे कब्रस्थान आहे. तेथून किल्ल्याच्या प्रवेशव्दारपाशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते.  पुरातत्व खात्याचे कार्यालय गावात असल्यामुळे गडावरुन खाली उतरल्यावर आम्ही ते शोधत  गावातील पूरातन शिव मंदिरात पोहोचलो. मंदिर सुंदर आहे. मंदिरातील नंदीने चक्क कणीस तोंडात धरल्याचे दाखवलेले आहे. मंदिरा मागे एक छान बारव आहे. पुरातत्व खात्याच्या कर्मचार्‍यांचे आभार मानून आम्ही बुर्‍हाणपूरकडे जायला निघालो.

 बुर्‍हाणपूर बद्दल पुढच्या भागात ..................................................

 

शिवमंदिर, असिरगड गाव

कणीस तोंडात धरलेला नंदी

जाण्यासाठी :- बुर्‍हाणपूर रेल्वेने आणि रस्त्याने महाराष्ट्राशी जोडलेले आहे. बुर्‍हाणपूर - इंदुर रस्त्यावर  बुर्‍हाणपूरपासून २३ किलोमीटरवर अशिरगड किल्ला आहे. 

किल्ल्यावर सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो.


बारव, असिरगड गाव 
 
Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

Map :- Mahendra Govekar © Copy right