Thursday, June 15, 2017

जोधपूरची खाद्य भ्रमंती (what to eat & where to eat in Jodhpur)

जोधपूरची खाद्य भ्रमंती





       राजस्थान मधील जोधपूर हे वाळवंटाच्या काठावरच महत्वाच ऐतिहासिक शहर आहे. उष्णते पासून दिलासा मिळावा यासाठी य शहरातली घर निळ्या रंगाने रंगवली जात असत. त्यामुळे मेहरानगड या किल्ल्यावरुन पाहिले असता निळ्या रंगाची घर दूरवर पसरलेली दिसतात. त्यामुळे या शहराला ब्ल्यू सिटी या नावानेही ओळखले जाते. या शहराचा इतिहास आणि पर्यटन हे मेहरानगड या किल्ल्याशी जोडलेले आहे. राठोड राजघराण्यातील राव जोधा यांनी इसवीसन १४५९ मध्ये मेहरानगड किल्ला बांधला आणि मंदोर दुर्गावरुन आपली राजधानी जोधपूरला हालवली. त्याबरोबर जोधपूर शहराची भरभराट सुरु झाली, बाजारपेठ वसली त्यात इतर दुकानांबरोबर खाण्या-पिण्याची दुकाने होती. त्यामुळे एक खाद्य संस्कृती तयार झाली. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची इथे रेलचेल आहे. मिठाई खाण्याकडे स्थानिक जनतेचा अधिक ओढा आहे.





      
जोधपूर शहरात मेहरानगड किल्ल्याकडे चालत जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याच नाव आहे "नई सडक". हा रस्ता क्लॉक टॉवर मार्गे थेट मेहरानगड किल्ल्यापर्यंत जातो. या रस्त्यावर गेली १०० वर्ष जोधपूरची खाद्य संस्कृती जपणारी काही दुकाने आहेत. क्लॉक टॉवर महाराजा सरदारसिंहच्या काळात (इसवीसन १८८०-१९११) बांधला गेला. याच्या आसपास बाजार, हवेल्या आणि दाटीवाटीने वसलेली जुनी वस्ती आहे. क्लॉक टॉवरच्या गेटला लागुन "मिशरीलाल" हे मिठाईचे दुकान आहे. १९२७ साली स्थापन झालेल्या या दुकानात काळानुसार थोडे बदल करुन नवा साज चढवलेला आहे. या दुकानातली "माखनीया लस्सी" फ़ेमस आहे. अप्रतिम चवीच्या लस्सीवर मलईचा जो जाड तुकडा टाकलेला असतो त्यामुळे याची चव जीभेवर रेंगाळतच राहाते. एक ग्लास लस्सी पिउन समाधान होत नाही. लस्सीचा दुसरा ग्लास प्यायल्यावर इतर गोड पदार्थ चाखण्यासाठी जीभेवरची गोड चव घालवणे भाग असते. त्यासाठी या ठिकाणी तिखट पदार्थही (नमकीन) मिळतात. बेसनची वडी, गाजर हलवा, कलाकंद, मावा कचोरी हे गोड पदार्थ आणि तळलेले काजू ,शेव -चिवड्याचे विविध प्रकार, नमकीन कचोरी आणि मिरची वडा यातील आवडणारे पदार्थ खाऊन जड पोटाने आणि (अंतकरणाने) या जुन्या जाणत्या मिठाईवाल्याला निरोप देऊन किल्ल्याचा रस्ता पकडावा. किल्ला व्यवस्थित पाहून चालत किल्ल्यापासून १० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या जसवंत थाडा या प्रेक्षणीय स्थळा पर्यंत यावे. किल्ला आणि जसवंत थाडा बघण्यात ३ तास खर्च झालेले असतात आणि चालत फ़िरल्याने सकाळचा हेवी नाश्ताही जिरलेला असतो. जसवंत थाडाला रिक्षा पकडून नई सडक गाठावी. नई सडक वरचे प्रिती रेस्टॉरंट हे व्हेज खाणार्‍यांसाठी चांगला पर्याय आहे. कैर सांग्री ही इथली स्थानिक भाजी , वाळवंटात उगवेणार्‍या खुरट्या काटेरी झुडूपांवर येणार्‍या शेंगा खुडून त्यापासून भाजी आणि लोणचे बनवले जाते. हि भाजी गोळा करण्यासाठी लागणार्‍या कष्टांमुळे ती अतिशय महाग आहे. प्रिया रेस्टॉरंट मध्ये ही भाजी खायला मिळते. प्रिया रेस्टॉरंटच्या समोर जनता स्वीट होम आहे. याच्या बर्‍याच शाखा जोधपूर मध्ये आहेत. इथे बंगाली मिठाईचे वेगवेगळे प्रकार अप्रतिम मिळतात. याशिवाय मावा कचोरी, इमरती, मावा लाडू हे प्रकार चांगले मिळतात. याठिकाणी सॉफ़्ट आईस्क्रीम हा वगवेगळ्या फ़्लेवरमध्ये स्मुदी सारखा घट्ट पदार्थ मिळतो. सकाळचा हेवी नाश्ता, त्यानंतरचे फ़िरणे, जेवण, आईस्क्रीम यानंतर वामकुक्षी आवश्यक आहे.


   



  वामकुक्षी नंतर उमेद भवन पॅलेस पाहाण्यासाठी बाहेर पडावे. संध्याकाळी फ़िरायला बाहेर पडतांना थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. गरमागरम चहा पिण्याची इच्छा होते. पण चहा न पिता गरमागरम दुध घ्यावे. त्यावर मलईचा पातळ स्लॅब घालून मिळ्तो. जोधपूर मध्ये अनेक ठिकाणी गरमागरम दुध विकणारी दुकान आहेत. चुलीवर दुध रटरटत असत, त्याच्या बाजूला कढईत मंद आचेवर गरम होणार्‍या दुधावरची मलई काढून त्याची व्यवस्थित घडी करुन बाजूच्या ट्रे मध्ये मांडून ठेवलेली पाहायला मिळते. दुध मागितल्यावर गरमागरम दुध ग्लासात भरुन वरुन ही मलईची घडी टाकली जाते.


      उमेद भवन पाहून झाल्यावर क्लॉक टॉवरकडे मोर्चा वळवावा. नई सडक आणि क्लॉक टॉवर जवळील बाजारात अनेक स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू, मोजडी इत्यादी मिळतात.त्यामुळे देशी, विदेशी पर्यटकांची येथे गर्दी असते. या नई सडकच्या टोकाला शाही समोसा नावाचे जोधपूर मधले समोसा आणि मसाला मिरचीचे फ़ेमस दुकान आहे . येथे दिवसरात्र गर्दी होती. गर्दीत शिरुन सामोसा आणि मिरची घेतली. त्या बरोबर चटणी नव्हती. आपल्या सवयी प्रमाणे चटणी मागितल्यावर दुकानदार म्हणाला,"उसकी जरुरत नही अंदरही है" मोठ्या अपेक्षेने सामोस खायला सुरुवात केली आणि पहिल्याच घासाला अपेक्षाभंग झाला. सामोश्याच्या सारणात चिंचेचा कोळ घातला होता. त्यामुळे सामोसा आम्बट लागत होता म्हणून त्याला चटणीची गरज नाही असे दुकानदाराने सांगितले असावे. सामोश्याने अपेक्षाभंग झाल्यावर मिरची खायला सुरुवात केली त्यातही ते आंबट सारण भरलेल होते. आम्हाला जरी हे पदार्थ आवडले नाहीत तरी स्थानिक लोक गर्दी करुन खात होते. रात्रीच्या दिव्यांनी उजळलेला क्लॉक टॉवर पार करुन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एका दुकानासमोर बरीच गर्दी दिसली. आमलेट शॉप अस नाव असलेल्या दुकानात एक म्हातारे गृहस्थ आमलेट बनवत होते आणि बाहेर खायला विदेशी पर्यटकांची गर्दी होती. दुकानात जागा नसल्यामुळे सर्वजण रस्त्यावर बसूनच खात होते. लोन्ली प्लॅनेटसह अनेक परदेशी पुस्तकांनी गौरवलेल्या या दुकानात अंड्याचे विविध प्रकार मिळतात. उकडलेल्या अंड्या पासून, फ़्लपी आमलेट, टोस्ट आमलेट, पोटॅटो आमलेट पर्यंत असंख्य प्रकार इथे खायला मिळतात. किमान दोन प्रकार खाऊन पूढे जाणे म्हणजे फ़ाऊल आहे. शाही सामोसा खातांना झालेल्या अपेक्षाभंगाचे दु;ख आमलेट शॉपमुळे कमी झाले. 


दुसर्‍या दिवशी जोधपूरच्या पावटा सर्कलपासून सुटणार्‍या बसने ६० किमी वरील ओसिया गाठावे. ओसिया हे थर वाळवंटाच्या काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्वाचे स्थान होते. ८ व्या शतकात याठिकाणी प्रतिहार घराण्याची सत्ता होती. त्यांनी ८ ते १२ शतकाच्या दरम्यान याठिकाणी अनेक हिंदु आणि जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे. हि तीन मंदिर पाहून छोट्या टेकडीवर असलेल्या सचिया माता मंदिराकडे जातांना आजुबाजूला हाराची, प्रसादाची दुकान हॉटेल्स दिसतात. सचिया माता म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. याठिकाणी मुख्य मंदिरात सचिया माता व त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबा मातेची मंदिरे आहेत. ही मुळ मदिरे ८ व्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे अनेक रुपात कोरलेले व्याल ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  ८ व्या शतकात बांधलेले महावीर मंदिर हे सुध्दा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही दोन्ही मंदिरात सध्या पूजा होते.


      ओसियातील मंदिरी पाहायला २ तास लागतात. त्यानंतर जीप भाड्याने घेऊन आपण १० किमीवर असलेल्या वाळूंच्या टेकड्यांवर जीपने जाऊ शकतो. मुख्य रस्ता सोडून जीप वाळूच्या रस्त्याला लागते आणि उंच सखल टेकड्यांवरून जातांना रोलर कोस्टरचे थ्रील अनुभवता येते. या ठिकाणी असलेल्या वाळूच्या सर्वात उंच टेकडीवर पोहोचल्यावर उंट सफ़ारीही करता येते. या भागात काही रिसॉर्ट आहेत. डेझर्ट सफ़ारी, तंबूतील निवास, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशी पॅकेजेस ते देतात, पण ती खूपच महागडी आहेत. अशा मुद्दाम (आर्टीफ़िशियली) तयार केलेल्या रिसॉर्ट मध्ये राहाण्यापेक्षा येथील गावात टिपिकल राजस्थानी घरात राहाण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. टेकड्यांपासून ५ किमीवर असलेल्या खेमसरगावातील सिवरों की ढाणी या वस्तीवर आमच्या जीपवाल्याचे घर होते. तेथे त्याने जेवणाची व्यवस्था केली होती. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. पुन्हा वाळूच्या टेकड्यांवरुन उड्या मारत जीप वस्तीत पोहोचली. रस्त्यात एक फ़ोर व्हील ड्राईव्ह जीप मुलांना घेऊन शाळेत जातांना दिसली, हिच येथल्या मुलांची स्कुल बस. पाच सहा घरांची वस्ती असलेल्या सीवरों की धानी वस्तीजवळ मोर, नीलगाय आणि हरणांनी दर्शन दिले. मातीच्या कंपाऊंडच्या आत तीन गोलकार, गवताने शाकारलेली घर होती. त्यातील एक स्वयंपाक घर, दुसरी राहाण्याची खोली आणि एक पाहूण्यांसाठी जेवणाची खोली होती. मध्यभागी अंगण होते. बाहेर काही उंट झाडाखाली बांधलेले होते. जीप नसल्यास प्रवासाचे हे दुसरे साधन होते. राजस्थानी पध्दतीचे गरमागरम जेवण जेऊन परत ओसिया गाठले. ओसियाहून जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला जाता येते. ६ व्या शतकातला मंदोर दुर्ग ,जोधपूरच्या राजांची समाधी मंदिर आणि म्युझियम पाहून संध्याकाळी जोधपूरला परतता येते.


      सकाळी व्हेज जेवण झाल्यामुळे संध्याकाळी नॉनव्हेज खाऊया या उद्देशाने स्थानिक लोकांकडे चौकशी केली. त्यावेळी कलिंगा हॉटेलचे नाव कळले. स्टेशन जवळ असल्याने रिक्षा करुन कलिंगा गाठले. कलिंगा हे जरा महाग पण मुंबई सारख पॉश एसी रेस्टॉरंट आहे. जोधपूर रेल्वे  स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या हॉटेलात व्हेज आणि नॉनव्हेज खायला मिळते.राजस्थानी स्पेशल काय आहे विचारल्यावर लाल मास (म्हणजे बकर्‍याचे लाल मसाल्यात केलेले मटण) आहे असे सांगण्यात आले. रोटी बरोबर मटण खाल्ल्यावर जोधपूरकरांच्या सवयी प्रमाणे गोड खाणे आवश्यक होते. रिक्षा पकडून शाही सामोसाच्या मागच्या गल्लीत असलेले चतुर्भुजचे दुकान गाठले. एका चिंचोळ्या गल्लीत हे पुरातन दुकान आहे. दुकानात कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही. पण इथल्या माव्याच्या पदार्थांना तोड नाही. गुलाबजाम, कलाकंद तर तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळतात. जमिनीवर बसलेला मॅनेजर कम कॅशिअर आणि त्याच्या बाजूला बसलेला वजन करुन देणारा माणूस एवढाच स्टाफ़, गुलाबजाम आणि कलाकंद येथे थेट वर्तमान पत्राच्या तुकड्यावर देतात. खवय्ये गिर्‍हाईक रस्त्यावर उभ राहून रिक्षा चुकवत गुलाबजाम रिचवत असतात. गुलाबजाम खाऊन थोडे दुसर्‍या दिवशीच्या प्रवासासाठी बांधून घेऊन जोधपूरची खाद्य भ्रमंती आटोपती घेतली. 



अमित सामंत


No comments:

Post a Comment