Friday, June 16, 2017

राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....(Ranapratap ....Chittorgad Fort, Ahar Museum, Haldighati Memorial & Chetak Smarak, Kumbhalgad, Ranakpur Temple)

राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....



राजस्थान म्हटल की आपल्या डोळ्यासमोर येते ते दुरवर पसरलेल वाळवंट, कलात्मक आणि सुंदर हवेल्या, महाल आणि सुस्थितीत असलेले किल्ले. राजस्थानला फ़िरायला जायचे म्हटले अनेक जण जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, जयपूर आणि उदयपूर या परिचित शहरांना भेट देतात. या व्यतिरिक्त राजस्थानात अनेक ठिकाणे पाहाण्या सारखी आहेत. राजस्थान म्हणजे   अकबराच्या बलाढ्य फ़ौजेशी सामना करणारे वीर महाराणा प्रताप. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुजनीय आहेत,त्याप्रमाणेच राजस्थानात महाराणा प्रताप पुजनीय आहेत. ज्यावेळी राजस्थानचे इतर राजे मोघलांना शरण गेले होते. आपल्या मुली, बहिणी मोघलांच्या जनानखान्यात पाठवून त्यांचे मनसबदार बनले होते. त्यावेळी महाराणा प्रताप आपल्या छोट्याश्या मेवाड राज्याच्या स्वातंत्र्यासाठी मुठभर फ़ौजेसह लढत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या आरामदायी आणि विलासी जिवनाचा त्याग केला होता. मेवाडचे राजा असूनही त्यांचे जीवन आपल्या कुटुंबियांसह राना-वनात, डोंगर दर्‍यात भटकण्यात गेले. स्वधर्म आणि स्वातंत्र्यासाठी लढणारे महाराणा प्रताप अनेकांचे प्रेरणा स्थान आहेत. महाराणा प्रताप, त्यांचा बलिदान देणारा घोडा चेतक, हल्दीघाटीची लढाई यावर शेकडो काव्य रचलेली आहेत. महाराणा प्रतापांनी ज्या किल्ल्यात जन्मले तो कुंभलगड किल्ला, ज्या किल्ल्यात त्यांचा सर्वाधिक काळ गेला तो चित्तोडगड आणि ज्या भागात अकबराची सेना आणि महाराणा प्रतापांची सेना यांचे युध्द झाले ती हल्दीघाटी ही सर्व ठिकाणे उदयपूर पासून जवळ आहेत. उदयपूरला दोन दिवस मुक्काम करुन आपल्याला ही सर्व प्रेरणादायी ऐतिहासिक ठिकाणे पाहाता येतात. त्याबरोबर नाथव्दाराचे श्रीनाथजींचे मंदिर आणि रणकपूरचे जैन मंदिर संकुल पाहाता येते.

चितोडगड (Chittorgad Fort)




   उदयपुर हे राजस्थानातले महत्वाचे शहर आहे. याला तलावांचे शहर असेही म्हणतात. सिटी पॅलेस, जगदिश्वर मंदिर, पिचोला लेक, फ़तेह सागर लेक ही उदयपूर शहरतली महत्वाची ठिकाण एका दिवसात पाहून होतात. उदयपूर पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी चितोडगड पाहाण्यासाठी सकाळीच निघावे. उदयपुरहून चितोडगड १०९ किमीवर आहे. ट्रेन, बस किंवा खाजगी गाडीने चितोडगडला जाता येते . चितोडगड किल्ला प्रचंड मोठा आहे. संपूर्ण किल्ला पाहायचा असेल तर किल्ल्याच्या आतमध्ये १३ किलोमीटर फिरावे लागते. त्यामुळे गाडी घेउनच फिरण योग्य ठरते. मेवाडच्या इतिहासात चितोडगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे . मेवाडच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना या किल्ल्यात घडल्या. अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती पडू नये यासाठी राणी पद्मिनीने केलेला जोहार सर्वाना माहिती आहे. पण याकिल्ल्यावर एकूण ३ वेळा जोहार झाले आहेत. पन्नादाई या राजा उदयसिंहच्या दाईने स्वत:च्या मुलाचा बळी देउन भावी राजाला म्हणजे उदयसिंहाला याच किल्ल्यातून वाचवून कुंभलगडावर नेऊन ठेवले होते. या उदयसिंहाच्या पुत्राने म्हणजेच राणा प्रतापने अकबराशी लढा देऊन इतिहास घडवला. चितोडगड परत जिंकून घेता आला नाही हे शल्य उराशी घेउन राणाप्रतापने प्राण सोडले होते. असा हा चितोडगड नीट पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. मैदानी भागात आडवा पसरलेला चितोडगडचा एकुलता एक डोंगर दुरवरुनच नजरेस पडतो. नैसर्गिक संरक्षण फ़ारसे नसल्यामुळे किल्ल्याला एकामागोमाग एक सात दरवाजे आहेत, दुहेरी तटबंदी आहे. या दरवाजांना पोल म्हणतात. पाडन पोल, भैरव पोल, हनुमान पोल, गणेश पोल, लक्श्मण पोल, राम पोल ७ ही दार पार करुन आपण किल्ल्यावर पोहोचल्यावर अनेक सुंदर मंदिरे, महाल, विजयस्तंभ, किर्तीस्तंभ हे मनोरे यांच्या साहाय्याने किल्ला आपल्या समोर उलगड जातो.




      चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक उजैनचा प्रशासक होता त्याच्या क्षेत्रात चितोड येत असे. अशोकाच्या काळात ग्रीकांनी पश्चिम भारतावर आक्रमण केले त्यावेळी चितोड शहांच्या अधिपत्या खाली गेले. जवळजवळ ३ शतके चितोड शकांकडे होता. त्यानंतर आलेल्या गुलोहितांनी हा भाग जिंकून घेतला. त्यांनी स्वत:चे संवत सुरु केले, नाणी पाडली. पाचव्या शतकापासून ८ व्या शतका पर्यंत गुहील घराण्याच्या ताब्यात हा गड होता. इसवीसन ७३५ मध्ये मुहमद बीन कासिमने चितोडवर आक्रमण केले त्यावेळी बाप्पा रावळ यांनी त्याला पळवून लावले आणि गुहील राजा मानमौर्यापासून चितोड हिरावून घेतला.बाप्पांनी काबूल, कंधाहार, इराण, उजबेकीस्थान येथील राजांवर विजय मिळवला. शिवपूजक असलेले बाप्पा रावळ यांचे एकलिंगजी हे आराध्य दैवत होते. एकलिंगजी हे राजे आणि आपण त्याचे दिवाण असे ते मानत असत. बाप्पा रावळ आणि त्याच्या वंशजांनी पुढील काळात परकीय आक्रमकां विरुध्द कायम लढा दिला. बाप्पा रावळाचा वंश पुढील काळात भारतभर पसरला. बाराव्या शतकात राणा कर्णसिंहानंतर रावळ घराण्याचे दोन भाग झाले. त्याच्या दोन पुत्रांपासून रावळ घराणे आणि सिसोदिया घराणे अशा दोन शाखा तयार झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे याच सिसोदिया वंशाचे होते.  १३ व्या शतकात राणा रावक सिंह यांचा पुत्र कुंभकर्ण हा नेपाळला गेला. नेपाळच्या राजवंशाचा हा मुळ पुरुष आहे असे मानले जाते.








     किल्ल्यावरील मंदिरे, फ़तेह प्रकाश महाल, राणा कुंभ महाल, पाहात आपण मीरा मंदिरापाशी पोहोचतो. अप्रतिम कोरीवकाम असलेले भव्य कुंभशाम मंदिर आहे. मंदिरावर आतील आणि बाहेरील बाजूंनी दशवतारतील मुर्ती आहेत. मंदिराच्या आवारात मीरबाईचे मंदिर आहे. मीराबाई ही जोधपूरची राजकन्या होती. तिचा विवाह राणा संगाचा जेष्ठ पुत्र भोजराज ह्याच्याशी झाला होता. मीरा मंदिराच्या बाजूला विजय स्तंभ आहे. चितोडगडावरील हा विजयस्तंभ दुरवरुनही आपल्या नजरेस पडतो. इसवीसन १४४८ मध्ये राणा कुंभाने माळव्याचा सुभेदार मुहम्मद शहा खिलजी याचा पराभव केला. या विजया प्रित्यर्थ हा १२२ फ़ूट उंच आणि ३० फ़ूट रुंद विजयस्तंभ उभारण्यात आला. त्यावर आत आनि बाहेर दशवतार, रामायण , महाभारतातील प्रसंग दाखवणार्‍या अनेक मुर्ती कोरलेल्या आहेत. या विजय स्तंभाच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तिला जोहार स्थळी म्हणतात. चितोडगडावर ३ जोहार झालेले आहेत. इसवीसन १३०२ मध्ये चितोडवर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केले. त्यावेळी किल्ला शत्रूच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाल्यावर राजा रतनसिंहाची पत्नी राणी पद्मिनीसह दुर्गातल्या स्त्रियांनी जोहार केला आणि रतनसिंहाने केसरीया करुन प्राणार्पण केले."गढोमे गढ चितोडगढ बाकी सब गढीया, राणी मे राणी पद्मिनी महाराणी बाकी सब रणैय्या". इसवीसन १५३५ मध्ये बहादुरशहाने चितोडगडावर आक्रमण केले तेंव्हा राणी कर्णावतींने गडावरील स्त्रियांसह जोहार केला. इसवीसन १५६७ मध्ये अकबराने चितोडगडावर हल्ला केला तेंव्हा गडावरील स्त्रियांनी जोहार केला होता. विजयस्तंभाजवळ असलेले जोहर स्थान पाहून गलबलून येते.


Rani Padmini Mahal, Chittorgad Fort,



चितोडगडा वरील राणी पद्मिनीचा पाण्यातील महाल आहेत्याच्या पायऱ्यांवर बसलेल्या राणी पद्मिनीचे दर्शन तलावाच्या काठावर असलेल्या महालातील आरशातून अल्लाउद्दीन खिलजी झाले होते. आजही या ठिकाणी महालात आरसे लावलेले आहेत. त्यातुन राणी पद्मिनीच्या तलावातील महालाच्या पायर्‍या दिसतात. गडावर ठिकठिकाणी पाण्याचे तलाव आहेत. राजस्थाना सारख्या कमी पावसाच्या प्रदेशात गडावरील वस्तीला पाणी पुरावे यासाठी गडावर तलाव, कुंड खोदलेले होते. गडावरील दुसरा मनोरा म्हणजे किर्ती स्तंभ हा ७५ फ़ूट उंच आहे. त्यावरही अप्रतिम कोरीव काम असून चारही बाजूला भगवान आदिनाथाच्या मुर्ती आहेत. या जैन स्तंभाच्या बाजूला जैन मंदिर आहे. किल्ल्यावर फ़तेह प्रकाश पॅलेस जवळ असलेले सतबीस देवी हे जैन मंदिर १२व्या दगडात बांधलेले हे मंदिर शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. या मंदिरात आणि रणकपूरच्या जैन मंदिरात अनेक साम्य स्थळे आहेत. . चितोडगड वरील मंदिरे आणि त्यावरील कोरीवकाम हा वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो इतकी वैविध्यता मंदिरांमध्ये आहे.


आहार म्युझियम (Ahar Museum)



Ahar Museum





दिवसभर किल्ला पाहून झाल्यावर चितोडगड किल्ल्या खाली असलेल्या हॉटेलात पोटपूजा करुन १५ किमी वरील सावरीया गाठावे. येथे श्रीकृष्णाचे काळया पाषाणातील मंदिर आहे. मंदिर पाहून उदयपूरमध्ये शिरतांनाच आहार/अहाड म्युझियम दिसते. या ठिकाणी धुळाकोट नावाची टेकडी होती तिथे पूरातत्व खात्याने उत्खनन केल्यावर अंदाजे ४००० वर्षापूर्वी या ठिकाणी असलेल्या वस्तीचे (तांबावती नगरी) अवषेश मिळाले. त्याकाळी जी संस्कृती नांदत होती ती आता आहार/अहाड सभ्यता या नावाने ओळखली जाते. या ठिकाणी केलेल्या उत्खननात सापडलेल्या ताम्रपाषाण युगातील दैनंदिन वापराच्या वस्तू, लघु अश्म अस्त्रे (microliths) ,विविध भांडी, चुली, तांब्यांच्या कुर्‍हाडी, मासेमारीचे गळ, इत्यादी वस्तू, ऐतिहासिक, इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक काळातील मुर्ती यांचे याठिकाणी कायम स्वरुपी प्रदर्शन पुरातत्त्व विभागाने मांडलेले आहे. म्युझियमच्या मागे धुळकोट ही टेकडी आहे. म्युझियमच्या रक्षकांना विनंती केल्यास ते कुलूपबंद असलेली ही उत्खनन केलेली जागा पाहायला देतात. येथे घरांच्या भिंती, सोक पिट इत्यादी गोष्टी पाहाता येतात.




अशाप्रकारे पहिला संपूर्ण दिवस इतिहासाच्या सानिध्यात घालवल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी हल्दीघाटी, नाथव्दारा आणि कुंभलगडासाठी निघावे. हि तीनही ठिकाणे एकाच दिवसात पाहायची असल्याने गाडी करणे आवश्यक आहे. रणकपूरचे जैन मंदिरही पाहायचे असल्यास अजून एक दिवस लागतो. त्यासाठी कुंभलगड येथे मुक्काम करावा लागतो. आपल्या लोणावळा खंडाळा सारखे कुंभलगड हे उदयपूरच्या लोकांचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे अनेक हॉटेल्स आहेत. उदयपूरहून पुढे जोधपूरला जायचे असल्यास दुसर्‍या दिवशी रणकपूर पाहून राणी या गावामार्गे ४ तासात जोधपूरला जाता येते.   

हल्दीघाटी मेमोरीयल आणि चेतक स्मारक (Haldighati Memorial & Chetak Smarak)


Chetak Samadhi

१८ जुन १५७६ ला हल्दीघाटी येथे राणाप्रताप आणि अकबरच्या सैन्यात (जयपुरचा राजपुत्र मानसिंह याच्या नेतृत्वाखाली) एक दिवसाचे घनघोर युध्द झाल. जरी हे युध्द हल्दी घाटीचे युध्द म्हणून प्रसिध्द असले तरी ते युध्द हल्दीघाटाच्या जवळ असणार्‍या खणमोर गावा जवळील मैदानावर झाले. या युध्दात १८००० जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी तिथे पडलेल्या पावसामुळे तेथे रक्ताचे तळे तयार झाले तो भाग रक्ततलाई या नावाने ओळखला जातो. तिथे युध्दात कामी आलेल्या सैनिकांचे स्मारक बनवलेले आहे. खमणोर गावाजवळ मानसिंहाचा तळ होता तो भाग शाही बगीचा या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी सुंदर बाग बनवलेली आहे. दिवस मावळतांना युध्दाचे पारडे फिरल्याने राणाप्रताप आपल्या जखमी चेतक घोड्यावरून हल्दीघाटीत आला. तेथे पावसामुळे वाहाणार ओढा ओलांडताना अतिश्रमाने चेतक घोड्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी चेतक घोड्याने प्राण सोडला तेथे राणाप्रताप यांनी चेतक स्मारक आणि शिवमंदिर उभारले आहे.  उदयपूर पासून ५० किमीवर चेतक स्मारक आणि हल्दीघाटी म्युझियम आहे. चेतक स्मारकात छत्री आणि त्यात असलेली घोडेगळ पाहाता येते. हा परिसर सुंदर ठेवलेला आहे. चेतक स्मारकाच्या जवळ डॉं. श्रीमाली या माणसाने आयुष्यभर खपून, स्वतःचा पैसा खर्च करुन, देणग्या मिळवून हल्दीघाटी म्युझियम उभारलय. त्यात असलेल्या मिनी थेटर मध्ये हल्दीघाटीच्या लढाईवर दोन ध्वनीचित्रफिती दाखवण्यात येतात. चित्रफ़िती पाहून झाल्यावर एका गुहे सदृश्य भागातून आपल्याला पुढे नेत राणाप्रतापांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग, चितोड्गड आणि कुंभलगड या किल्ल्यांची माहीती प्रतिकृतींच्या व्दारे दिली जाते. त्याला निवेदनाची आणि छायाप्रकाशाची जोड देऊन प्रसंग उठावदार केले आहेत.





Ranapratap Memorial

  एकेकाळी रक्ताच्या रंगाने लाल झालेली हल्दीघाटी आजकाल गुलाबाच्या रंगाने लाल झालेली आहे. या भागात मोठ्याप्रमाणावर गुलाबाची शेती होते. हि गुलाब एक्सपोर्ट होतातच पण गुलाबापासून बनवलेल्या वस्तू गुलकंद, गुलाबपाणी इत्यादी वस्तू हल्दीघाटीत सगळीकडे तसेच म्युझियम मध्ये विकत मिळतात.  हल्दीघाटी म्युझियमच्या मागच्या बाजूस एका टेकडीवर राणाप्रतापांचा भव्य पुतळा उभारलेला आहे. याठिकाणाहून हल्दीघाटी परीसर दिसतो. त्याची दुर्गमता ध्यानात येते. हल्दीघाटी म्युझियम पासून नाथव्दारा २० किमीवर आहे. नाथव्दाराला जातांना रस्त्यात एक छोटासा घाट आणि खिंड लागते. या खिंडीतली माती हळदी सारख्या पिवळ्या रंगाची आहे. त्यामुळेच या घाटीला हल्दीघाटी या नावाने ओळखले जाते. या रस्त्याने पुढे जातांना शाही बगिचा, खमणोर आणि रक्त तलाई ही ठिकाणे लागतात. नाथव्दाराला श्रीनाजींचे दर्शन घेऊन आणि पोटपूजा करून ५० किमी वरील कुंभलगड किल्ला गाठावा. किल्ल्याच्या थेट दारपर्यंत गाडी जाते.     

कुंभलगड (Kumbhalgad)


Kumbhalgad

भारतातल्या सर्वात जुन्या अरवली पर्वतरांगेतला सर्वात उंच किल्ला (३७६६ फूट) म्हणजे कुंभलगड, चीनच्या भिंती नंतर सर्वात लांब मानव निर्मित तटबंदी ४४ किलोमीटर म्हणजे कुंभलगड. कुंभलगडाची अशी अनेक वैशिष्ट्य आपण ऐकलेली असतात. त्यामुळे किल्ला पाहाण्याची उत्सुकता वाढते. किल्ल्याचे भव्य बुरुज आणि दुहेरी तटबंदी आपले स्वागत करतात. कुंभलगडाचे प्राचीन काळी नाव होते मच्छिंद्रगड.  ८०० वर्ष अंधारत राहीलेल्या या किल्ल्याचे भाग्य राणा हमीरच्या काळात परत उदयाला आले. हमीरचे बालपण या किल्ल्यावर गेले होते. इसवीसन १४३३ मध्ये महाराणा कुंभाने हा किल्ला नव्याने बांधला. मेवाड मधल्या ८४ किंल्ल्यांपैकी ३२ किल्ले एकट्या राणा कुंभने बांधले आहेत. राणा कुंभाने कुंभलगडाला आपली दुसरी राजधानी बनवले. इसवीसन १५९७ ला जेष्ठ शुक्ल तृतीयेला 2 जून (९ मे १५४० इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे) महाराणा प्रतापसिंहाचा जन्म कुंभलगडावर झाला. 



Kumbhalgad

किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर चढण्यासाठी व्यवस्थित मार्ग बनवलेला आहे. राम पोल, भैरव पोल, निंबू पोल, पगडा पोल हे दरवाजे ओलांडत आपला बाले किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याला याशिवाय आरेट पोल, हल्ला पोल, हनुमान पोल इत्यादी दरवाजे तटबंदीत आहेत. बालेकिल्ल्यावर राणाकुंभ महाल आहे. त्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर महाराणा प्रतापांचे जन्मस्थान आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च भागात फ़तेह प्रकाश नावाचा राजवाडा आहे. या राजवाड्याच्या गच्चीवरून संपूर्ण किल्ला, दूरवर पसरलेली तटबंदी आणि आजूबाजूचा दुर्गम परिसर दिसतो. किल्ल्यावर अनेक मंदिर आहेत. किल्ला उतरुन परत पहिल्या प्रवेशव्दारापाशी येऊन मंदिर पाहायला जाता येते. किल्ला आणि मंदिर पाहून होईपर्यंत दिवस मावळायला लागलेला असतो. याठिकाणी दररोज संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो असतो. यात किल्ल्याचा आणि मेवाडचा इतिहास सांगितला जातो. लाईट आणि साउंड शो संपल्यावर आपल्याला उदयपूरला जाता येते किंवा कुंभलगडला मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी रणकपूरचे जैन मंदिर पाहाण्यासाठी जाता येते.      


ऱणकपूरचे जैन मंदिर संकुल (Ranakpur Temple)

                                                                            

Jain Temple Ranakpur
                                                    
कुंभलगड ते रणकपूर हे अंतर ३३ किमी आहे. पण घाट रस्ता असल्यामुळे पोहोचायला साधारणपणे २ तास लागतात. रणकपूरचे जैन मंदिर पर्यटकांसाठी दुपारी १२ वाजता उघडते. घाट रस्त्याने  निसर्गाची शोभा पाहात आपण रणकपूरच्या सूर्य मंदिरापाशी पोहोचतो. रणकपूरच्या जैन मंदिर संकुला बाहेर हे मंदिर आहे. मंदिरावर अप्रतिम कोरीवकाम आहे. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस गजपट्टी बरोबर अश्वपट्टी पण आहे. सूर्याच्या रथाचे घोडे यावर कोरलेले आहेत. सूर्यमंदिर पाहील्यावर आपली उत्सुकता वाढलेली असते तशात हिरव्यागार डोंगराच्या पार्श्वभूमीवर भव्य मंदिर आणि अनेक कळसांची रांग दिसायला लागते. मेवाडचा राजा कुंभ याच्या प्रधान संघवी धारनाथ पोरवाल याने १५ व्या शतकात हे सुंदर जैन मंदिर बांधले. अरवली पर्वत रांगेत मघई नदी काठी असलेले हे जैन मंदिर म्हणजे संगमरवराला पडलेल अप्रतिम स्वप्न आहे. या मंदिराच्या गर्भगृहाला चार प्रवेशव्दार असून या मंदिरात भगवान आदिनाथांच्या चार मुर्ती आहेत. त्यामुळे मंदिराला चतुर्मुख मंदिर या नावाने ओळाखले जाते. याशिवाय मंदिरात सर्व तिर्थंकरांच्या मुर्ती आहेत. मंदिराला मुख्य कळस आणि इतर ७६ छोटे कळस आहेत. मंदिराच्या आतल्या बाजूला संगमरावरावर जे कोरीव काम केले आहे त्याला तोड नाही. ८४ कोरीव खांब, ४ महामंडप, २० रंग मंडप यांच्या छतावर आतल्या बाजूने केलेले कोरीवकाम नाजूक आणि सुंदर आहे. रणकपूरचे मंदिर कलाकुसरीत ताजमहालापेक्षा काकणभर सरसच आहे. मुख्य मंदिरा बरोबर याठिकाणी पार्श्वनाथांचे मंदिर आहे. मंदिर पाहून आपण १७० किमीवरील जोधपूर गाठू शकता किंवा १६० किमीवरील उदयपूरला परत येऊ शकता.




तीन दिवसाची ही सहल आपल्याला राजस्थानचे एक वेगळे रुप दाखवते. या परिसरात फ़िरल्यावर अरवली पर्वत रांगा, त्यातील निबीड अरण्य यांच्या सहाय्याने महाराणा प्रताप यांनी कशाप्रकारे अकबराच्या बलाढ्य सैन्याशी आयुष्यभर सामना केला, हल्दीघाटीचे युध्द लढले याची आपल्याला कल्पना येते आणि त्यांच्या बद्दलचा आदर दुणावतो. 

जाण्यासाठी :- उदयपूर हे शहर रस्ता, रेल्वे आणि हवाईमार्गाने देशातील सर्व शहरांशी जोडलेले आहे. उदयपूरला राहाणाची आणि खाण्याची व्यवस्था आहे. उदयपूरला राहून ३ दिवसात अशाप्रकारे कार्यक्रम बनवता येईल.
दिवस १ :- उदयपूर दर्शन, मुक्काम उदयपूर
दिवस २ :- उदयपूर- चितोडगड -सावरीया - आहार/अहाड म्युझियम - उदयपूर (मुक्काम उदयपूर)
दिवस ३ :- उदयपूर- हल्दीघाटी- नाथव्दारा- कुंभलगड  (मुक्काम कुंभलगड)
दिवस ४ :- कुंभलगड - रणकपूर - उदयपूर किंवा जोधपूरला मुक्काम








अमित सामंत

ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) या जोधपूर जवळील Offbeat ठिकाणांची माहिती वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा 

#ranapratap#ranapratapmuseum#haldighati#haldighatimemorial#chetaksmarak#chittorgadh#chittodgadh#kumbhalgad#ranapratapbirthplace#ranakpurjaintemple#

14 comments:

  1. खूप छान लिहिलंय.. एकदम डोळ्यासमोर उभं राहतंय चित्रं!!👍

    ReplyDelete
  2. अमितदादा फारच अप्रतिम लेखन������
    खूप मज्जा आली वाचून..

    ReplyDelete
  3. खूप छान लेखन केले आहे.इत्यंभूत किल्ल्याचे वर्णन अप्रतिम केले आहे.

    ReplyDelete
  4. सुंदर लेख , खुप छान माहिती

    ReplyDelete
  5. प्रसाद कुलकर्णीMay 9, 2021 at 12:07 AM

    सुंदर माहितीपुर्ण लेख

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख आणि इतंभूत माहिती दिली आहे..👌
    मस्त..

    ReplyDelete
  7. खूपच छान माहिती.... डोळ्यांसमोर इतिहास उभा राहिला.

    ReplyDelete
  8. आशिष वैद्यJune 2, 2022 at 6:01 AM

    अतिशय उत्तम आणि इतंभूत माहीत , डोळ्यासमोर इतिहास उभा राहिला,

    किल्ल्याचे वर्णन सुंदर

    किल्ला कसा असू शकेल याचा प्रत्यय आला

    ReplyDelete
  9. Very insightful content.

    ReplyDelete
  10. फारच छान!

    ReplyDelete
  11. राजस्थान फिरुन आलो.👌👌

    ReplyDelete
  12. फारच सुंदर लेख, मराठ्यांचा इतिहास माहीत होता पण ह्या लेखामुळे राजपुतांचा इतिहास थोडा फार माहिती झाला, विशेष म्हणजे राणा प्रताप आणि चीतोडगड.

    ReplyDelete