Wednesday, November 30, 2022

महाभारतातील विराट नगर ( Virat Nagar , the Ancient city in Mahabharat )

 

विराट नगर

जयपुरला तिसर्‍यांदा जात होतो. त्यामुळे जयपुर मधील नेहमीची प्रसिध्द स्थळे पाहाण्या ऐवजी वेगळी ठिकाण शोधत असताना "विराट नगर" सापडल. महाभारतातील विराट पर्वात उल्लेख असलेले विराट नगर ते हेच असा येथिल लोकांचा दावा आहे. भारतात अनेक प्राचीन गावांशी रामायण , महाभारतातल्या कथा जोडलेल्या आहेत त्यापैकी हे एक गाव.  जयपूरच्या आसपास  फ़िरतांना महाभारतातल्या कथांशी संबंधित अनेक ठिकाण आढळली.  त्यातही पाच पांडवां पैकी भीमाशी संबधित ठिकाण जास्त आढळली.

 जयपुर जवळील प्रसिध्द मंदिर खाटू श्यामजी . याची कथाही महाभारत आणि भीमाशी निगडीत आहे. भीमाला हिडींबेपासून झालेला मुलगा घटोत्कच. घटोत्कच आणि त्याची पत्नी अहिलावती यांना अंजनपर्व , मेघवर्ण आणि बर्बरिक ही तीन मुले होती.  त्यातील बर्बरिक देवी भक्त होता. त्याला देवीकडून तीन दिव्य बाण मिळाले  होते. महाभारताचे युध्द चालू होण्यापूर्वी बर्बरिकने त्याच्या आईला वचन दिले होते, " युध्दात जो हरेल त्याच्या बाजूने मी लढेन". (हारे का सहारा)

 ही गोष्ट श्रीकृष्णाला कळली , जर बर्बारिक, आईला दिलेल्या वचना प्रमाणे हरणार्‍या कौरवांच्या बाजूने लढला तर त्याच्याकडे असलेल्या तीन दिव्य बाणांमुळे तो युध्दाचा निकाल बदलून टाकेल . हे टाळण्यासाठी श्रीकृष्णाने ब्राह्मणाचे रुप घेतले आणि तो बार्बरिकला भेटायला गेला.  त्याच्या कडील  दिव्य बाणांची परिक्षा घेण्यासाठी श्रीकृष्णाने समोर दिसणार्‍या पिंपळाच्या झाडाच्या सर्व पानांना भोक पाडायला सांगितले. त्याप्रमाणे बर्बारिकने सोडलेल्या बाणाने झाडाच्या सर्व पानांना भोक पाडून तो  बाण ब्राम्हणाच्या पाया जवळ आला. कारण श्रीकृष्णाने एक पान पाया खाली लपवलेले होते. श्रीकृष्णाने पानावरुन पाय काढताच बाणाने त्या पानाचाही वेध घेतला. बाणाची दिव्य शक्ती पाहून ब्राम्हणरुपी श्रीकृष्णाने बार्बारिककडे दान मागितले. बर्बरिकने काय हवे ते माग असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने त्याचे शिर दान म्हणून मागितले. हे विचित्र दान ऐकल्यावर बर्बरिकला कळले या ब्राम्हणाच्या वेषात दुसरेच कोणीतरी आहे. त्याने ब्राम्हणाला मुळ रुपात प्रकट होण्याची विनंती केली. समोर साक्षात श्रीकृष्णाला पाहून त्याने आपले शिर त्याला अर्पण केले.  श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की कलियुगात तू माझ्या "श्याम" या नावाने पूजला जाशील. आता राजस्थानातील खाटू  या गावात बर्बरिक म्हणजेच "खाटू श्यामचे" मंदिर आहे. बर्बारिकने श्रीकृष्णाला युध्द पाहायचे आहे असे सांगितले. श्रीकृष्णाने त्याचे शिर खाटू जवळील उंच टेकडीवर ठेवले तेथून त्याने युध्द पाहिले

 

पांडू पोल, सरिस्का


महाभारतातील दुसरी प्रसिध्द कथा म्हणजे भीमाचे हनुमंताने केलेले गर्वहरण. ही सुध्दा याभागात घडली असे मानले जाते. सरिस्का अभयारण्यात " पांडू पोल " नावाची जागा आहे . (पोल म्हणजे दरवाजा इथे खिंड या अर्थी ) या खिंडीत ही प्रसिध्द घटना घडली असे मानले जाते. याठिकाणी हनुमान मंदिर आणि त्या जवळून वाहाणारा बारमाही झरा आहे.

 महाभारतातील विराट पर्वात  उल्लेख असलेली तिसरी घटना म्हणजे पांडव अज्ञातवासात वेष बदलून एक वर्ष विराट राजाच्या पदरी राहीले .अर्जुनाला मिळालेल्या शापामुळे त्याचे बृहन्नडा मध्ये रूपांतर झाले होते. त्याने राजकन्या उत्तरा हिची नृत्यशिक्षिका म्हणून भूमिका निभावली. युधिष्ठिराने कंक या नावाने विराट राजाचे मंत्रीपद हाती घेतले होते. द्रौपदी ही विराट नरेशाची पट्टराणी सुदेष्णा हिची केशभुषाकार म्हणून राहीली होती. नकुल हा अश्वपाल तर, सहदेव हा गोशाळा सांभाळत होता. भीम हा बल्लव म्हणुन भोजनगृहात काम करत होता. विराट नगर मध्ये एक टेकडी भीम डुंगरी नावाने  प्रसिध्द आहे.

 

Remains of Stupa, Virat Nagar

सध्याचे विराट नगर (बैराट) हे गाव हायवेच्या आसपास वसलेल्या टिपिकल गावांसारखेच आहे. गावातील सर्व प्राचीन , मध्ययुगीन अवशेष मात्र गावापासून दूर असलेल्या टेकड्य़ांवर व त्याच्या आसपास पसरलेले आहेत.  प्राचीन मंदिर आणि बौध्द स्तुप असलेली "बिजक की पहाडी" , गणपती मंदिर आणि संग्रहालय, सम्राट अशोकाचा शिलालेख, भीम की डुंगरी, मुगल गेट आणि जैन मंदिर ही  ऐतिहासिक ठिकाण आदिमानव काळापासून ते आज पर्यंत या मोठ्या कालखंडाच्या खूणा बाळगून आहे.

 

बिजक की पहाडीची पायवाट

विराट नगर भटकंतीची सुरुवात "बिजक की पहाडी" या स्थानिक नावाने ओळखल्या जाणार्‍या टेकड्यांच्या रांगापासून झाली. गावाबाहेर असलेल्या या टेकड्यांच्या पायथ्याशी जाण्याकरिता पक्का रस्ता बनवलेला आहे . रस्ता जिथे संपतो तिथे मोठ मोठ्या खडकांनी बनलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आपण पोहोचतो.  पायथ्यापासून एक फ़रसबंदी चढणाचा रस्ता टेकडीवर जातो. पहिली टेकडी चढून गेल्यावर थोडी सपाटी लागते. इथून चारही बाजूला अरवली पर्वताची डोंगर रांग दिसते.   उजव्या बाजूला एका टेकडीवर भगवा ध्वज फ़डकताना दिसतो. त्या दिशेने चढ चढतांना वाटेत अनेक वेगवेगळ्या आकाराचे खडक आजूबाजूला पाहायला मिळतात. या भागात लोकांचा वावर नसल्याने पक्षीही भरपूर प्रमाणात आहेत आणि तेही जवळुन पाहायला मिळतात. हे सर्व पाहात १५ ते २० मिनिटात   मगरीच्या तोंडा सारख्या दिसणार्‍या एका मोठ्या दगडापाशी पोहोचलो. मगरीने जबडा उघडावा तसा त्याचा आकार होता. मगरीच्या नागपुड्याच्या भोकांसारख एक मोठा खड्डाही त्या दगडाला पडला आहे.  या दगडाखाली असलेल्या गुहेत श्रीराम मंदिर आहे. पांडवांनी अज्ञातवासात असतांना याची स्थापना केली अशी लोकांची श्रध्दा आहे.  गुहेत जाऊन श्रीरामच दर्शन घेऊन थोडावेळ आजूबाजूचा परिसर पाहात आणि शांतता अनुभवत बसून राहिलो.

 

श्रीराम मंदिर, बिजक की पहाडी


मंदिराच्या टेकडीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकडीला कुंपण घातलेले होते. पुढचा टप्पा चढून कुंपण पार करुन सपाटीवर प्रवेश केला . या भागात पूरातत्व खात्याने उत्खनन करुन शोधून काढलेला बौध्द स्तुप,  भिख्खुंच्या राहण्याच्या जागा , पाण्याचे कुंड यांचे अवशेष आहेत. बौध्द स्तुप आज अस्तित्वात नसला तरी त्याचा पाया आणि प्रदक्षिणा मार्ग पाहायला मिळातो.  स्तुपाचा व्यास ८.२३ मिटर असुन त्याचा घुमट २६ अष्टकोनी खांबावर तोललेला होता. हे खांब बसवण्यासाठी असलेल्या खाचां आजही पाहायला मिळतात . या खाचांमुळे एखाद्या दाते (Gear) असलेल्या यंत्राच्या चाकाप्रमाणे स्तुपाचे अवशेष दिसतात. स्तुपा जवळ असलेला सम्राट अशोकाचा शिलालेख इसवी सन १८४० मध्ये ब्रिटिश सेनाधिकारी कॅप्टन बर्ट याने कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयात नेऊन ठेवला. आजही  तो तिथे पाहायला मिळतो.

Remains of Virat Nagar


Water tank at Bijak ki Pahadi


विराट नगरच्या इतिहासात डोकावल्यास , ख्रिस्तपूर्व पाचवे ते सहावे शतकातील घडामोडींनी प्राचीन भारत खंडाच्या इतिहासावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. सिंधू संस्कृतीचा र्‍हास झाल्यावर तेथील लोक पूर्वेकडे यमुना आणि गंगेच्या खोर्‍यापर्यंत आणि दक्षिणेकडे पसरले. त्यांनी लहान वसाहती आणि खेडी तयार केली, त्या वसाहती किंवा गावांना 'जनपद' असे म्हणतात. कालांतराने ज्या जनपदांची अर्थव्यवस्था, व्यापार मजबूत होता. त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी सैन्यदल उभारली.आणि शेजारील कमजोर व लहान जनपदे जिंकून आपल्या राज्यात सामील करून घेतली. अशी लहान लहान जनपदे मिळून तयार झालेल्या मोठ्या राज्यांना 'महाजनपदे' म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी छोटी छोटी १६  राज्ये स्थापन झाली . ती "१६ महाजनपद" या नावांने ओळखली जातात.  बौध्द आणि जैन ग्रंथात  १)अंग, २) अस्माक,३) अवंती, ४) चेडी, ५) गंधर्व, ६)काशी, ७) कंबोज, ८) कोसला, ९) कुरु , १०) मगध, ११) मल्ल , १२) मत्स्य , १३) पांचाल, १४)सुरसेना, १५) वाज्जी, १६) वत्स  या १६ महाजनपदांचा उल्लेख येतो.


 

१६ महाजनपद, Courtesy google.com

प्राचीन भारतात  १६ महाजनपदे होती. त्यातील मत्स्य महाजनपद हे आजच्या जयपुर, अलवार , भरतपुर या भागात पसरलेले होते . विराट राजाने स्थापन केलेले विराट नगर ही  मत्स्य महाजनपदाची राजधानी होती.  मौर्यांच्या काळात विराट नगर हे भारतातले प्रमुख शहर आणि बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते.  त्याच काळात या स्तुपाची निर्मिती करण्यात आली.

Cave temple, Virat Nagar
 

स्तुपाचे अवशेष असलेल्या टेकडीच्या वर चढून गेल्यावर , एक गुहा मंदिर पाहायला मिळते. या परिसरात झालेल्या उत्खननात विटांचे काही चौथरे पाहायला मिळतात. येथून खालच्या टेकडीवर दिसणार्‍या  स्तूपाच्या अवशेषाकडे पाहिल्यावर (Arial View) काहीतरी गुढ चिन्ह ,आकार दिसायला लागतो. पुरातत्व खात्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर , नीटनेटका आणि सुशोभित ठेवलेला आहे. 

 

गणेश मंदिर, विराट नगर

बिजक की पहाडी उतरुन संग्रहालय आणि गणपती मंदिर पाहाण्यासाठी गावात शिरलो. गावातील अरुंद रस्त्यावरुन वाट काढत . एका टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो . ही टेकडी पण मोठमोठ्या खडकांनी बनलेली होती. या टेकडीच्या पायथ्याशी एक तलाव व संग्रहालय आहे. टेकडीच्या अर्ध्या उंचीवर स्वयंभु गणेश मंदिर आहे. इथले वातावरण बिजक की पहाडीच्या एकदम विरुध्द होत. तिथे एवढ्या मोठ्या परिसरात आम्ही दोघच होतो. इथे मात्र प्रचंड गर्दी होती, टेकडी खालचे पार्कींग फ़ुल होते. प्रसाद, हार विकणारी दुकान आणि त्यामध्ये असलेली गर्दी यातून वाट काढत गणपतीचे दर्शन घेतले . पायथ्याशी असलेल्या संग्रहालयात शिरलो. संग्रहालय अतिशय सुंदर आहे. विराट नगरचा इतिहास वस्तू रुपात खूप चांगल्या प्रकारे मांडलेला आहे, सोबत पूरक माहितीही लिहिलेली आहे.  

 

Clay Objects, Virat Nagar 

Punch Marked Coins, Virat Nagar

Indo Greek Coins, Virat Nagar

विराट नगरच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांवर अनेक गुहा आहेत. या गुहांमधून आदिमानवाचे वास्तव्य होते. इसवी सन १८७१ -७२ मध्ये कॅनिंग हॅम यांनी विराट नगर मधील अवशेष शोधून काढले.  या गुहांमध्ये आणि या परिसरात पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात  मिळालेल्या अश्मयुगीन दगडी हत्यारांवरून अश्मयुगीन मानवाचे वास्तव्य या ठिकाणी एक लाख ते पन्नास हजार वर्षांपूर्वी पासून होते असे मत श्री एन.आर. बॅनर्जी यांनी मांडले आहे. त्यांनी कैलास नाध दीक्षित यांच्याबरोबर या ठिकाणी १९६०-६२ मध्ये उत्खनन केले होते .  विराट नगर येथे केलेल्या उत्खननात विविध काळातील दगडी हत्यारे, मातीचे भांडी, मूर्ती, विटा, दागिने, लोखंडाची हत्यारे सापडली  आहेत .  याशिवाय  अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या  काळातील नाणी सापडलेली आहेत. यात Punch Mark coins, Indo Greek coins ( यावर ग्रीक आणि खरोष्टी लिपीत मजकूर लिहिलेला आहे ), मुघलांची नाणी  इत्यादी आहेत.  या सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत इसवी सन ६३४ मध्ये चिनी प्रवासी ह्यूएनत्संग  (युआनच्वांग)  विराट नगरला आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात विराट नगरचा उल्लेख केलेला आहे. संग्रहालय पाहाण्यसाठी शुल्क नाही , तरीही बाहेर एवढी गर्दी असूनही संग्रहालय पहायला मात्र दोन चार जणच आले होते.  आपल्याच संस्कृती,  इतिहासा बद्दल असलेली अनास्था दुसर काय ?

संग्रहालय बघितल्यावर पुढची तीन ठिकाण गावाच्या दुसऱ्या भागात होती. भीम डुंगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर "सम्राट अशोक शिलालेख" अशी दिशा दर्शक पाटी पाहून त्या दिशेने चालत निघालो. पुरातत्व खात्याने तिथे जाण्यासाठी पायावाट व्यवस्थित बांधून काढलेली आहे. ज्या दगडावर शिलालेख होता त्यावरही काँक्रीटची शेड बांधलेली आहे. पण शिलालेख मात्र त्या ठिकाणी नाही.

सम्राट अशोक शिलालेख,

पुन्हा रस्त्यावर येऊन भीम डुंगरीच्या पायाथ्याशी आलो. या डोंगरावर भीमाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. डोंगराच्या पायथ्याशी गुहा आहे त्यात भीम वास्तव्य करत होता, पाऊलाच्या आकाराचे  पाण्याचे कुंड आहे. भीमाने लाथ मारून ते कुंड निर्माण केले असे समजले जाते. डोंगराच्या मध्यावर एका गुहेत ११ मुखी शिवलिंग आहे. तिथेच भीमाचे आणि हनुमंताचे देऊळ आहे. भीम आणि हनुमंत हे दोघेही पवनपुत्र, त्यांचे एकत्र देऊळ भारतात केवळ या ठिकाणी आहे. या डोंगरावर अनेक गोलाकार मोठ्या आकाराचे खडक आहेत त्यांना भीम गट्टे म्हणतात. भीम याने खेळत असे . या दगडांना पडलेले खड्डे त्याच्या बोटांमुळे पडले आहेत असे स्थानिक लोक मानतात.

 


भीम डुंगरी उतरुन मुघल गेट म्हणजेच पंचमहाल जवळ पोहोचलो. हा पंच महाल आमेरच्या राजाने शाही यात्रींसाठी बांधला होता. अजमेरला जातांना आणि या परिसरात शिकारीला आल्यावर  अकबर या ठिकाणी थांबत असे. या दुमजली महालात घुमटाकार छत असलेल्या खोल्या आहेत. छतांवर आणि भिंतींवर नक्षीकाम केलेले आहे. महाला समोर कारंजे आहे.  मुघल स्थापत्य शैलीत बांधलेल्या या महालावर असलेल्या पाच छत्र्यांमुळे हा महाल पंचमहाल म्हणून ओळखला जातो.    

मुघल गेट (पंचमहाल)


जैन मुनी विमल सुरी यांनी विराट नगरच्या डोंगरात तपश्चर्या केली. विराट नगर मध्ये आजही भव्य जैन मंदिर आहे. विराट नगर मध्ये असलेले जैन नासिया मंदिर १६ व्या शतकात बांधले होते. मुघल गेट समोर असलेल्या या जैन मंदिराच्या बांधणीवर मुघल स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो.

 

Jain Temple , Virat Nagar


Adinatha, Virat Nagar


विराट नगर मधील हिंदू, बौध्द, जैन आणि मुस्लिम धर्माचे वेगवेगळ्या काळातील अवशेष, वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. 

 

 

जाण्यासाठी :-

 विराट नगरला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट जयपुर येथे आहे. जयपुर ते विराट नगर हे अंतर १०३ किलोमीटर आहे.  या भागात बसेस कमी आणि अनियमित चालत असल्यामुळे खाजगी गाडी करून जावे.

जयपूर - भानगड -  विराट नगर हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.

झपाटलेला (?) किल्ला,  भानगढ  (Bhangarh , the most haunted (?) fort) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

https://samantfort.blogspot.com/2022/11/bhangarh-haunted-fort.html

"सरीस्का व्याघ्र प्रकल्प" विराट नगर पासून १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे सरिस्का जवळ राहुनही "विराट नगर" पाहाता येते.

  

Shree Ram Mandir built by Pandava


Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

31 comments:

  1. अतिशय छान लेख

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे वास्तूंचे / मंदिरांचे सुंदर परीक्षण आणि सुंदर माहिती

    ReplyDelete
  3. फारच सुंदर वर्णन, शिवकाळ तून महाभारत, बुद्ध काळा विषयी पण. अमित तुझी इतिहास मांडणी खूप छान. आणि प्रवास वर्ण आणि इतिहास खूपच छान मेळ घातला आहेस. सिंपली ग्रेट. धन्यवाद एका नवीन स्थानाची माहिती करून दिल्या बद्दल.

    ReplyDelete
  4. Nice description as usual

    ReplyDelete
  5. अमित, नितांत सुंदर लेख.तू केलेले स्थळ वर्णन आणि सोबत पूरक छायाचित्रं यामुळे ही जागा भेट देऊन कधी एकदाचे पहातोअसे झाले आहे.तुला पुढच्या ट्रिप साठी शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर लेख आहे. विस्तारपूर्वक लिखाण आहे. महाभारत याचे मला खूप औत्सुक्य आहे. तुझे निरीक्षण आणि लिखाण जबरदस्त आहे. खूप छान वाटले.
    विराट नगर हस्तीनापुरच्या इतके जवळ होते. (त्या काळात खूप दूर वाटत असेल), पण तरीही दुर्योधन पांडवांना शोधू शकला नाहीं याचे आश्चर्य वाटते. एक तर त्याची गुप्तहेर संघटना दुर्बल असावी. कारण कुरुसम्राट या नात्याने तो त्या काळातील आर्यावर्तात एक सामर्थ्यशाली युवराज होता. असो.

    ReplyDelete
  7. नरेंद्र बाळकृष्ण कुलकर्णीNovember 30, 2022 at 11:32 PM

    अमित नेहमी प्रमाणे खूप छान आणि सखोल माहिती दिली आहे. महाभारतातील घटनांचा उल्लेख वाचनीय आहे.
    किती दिवस लागले हे सर्व फिरायला? जस्ट माहितीसाठी.

    👍👍🙏🙏

    ReplyDelete
  8. अतिशय माहिती पूर्ण लेख, खूप छान

    ReplyDelete
  9. छान, अप्रतिम लेख. मांडणीही मस्त..

    ReplyDelete
  10. व्वा.. हे फारच इंटरेस्टिंग आहे..खूप छान माहिती आहे..मला अशा पुराणातल्या कथा आणि त्या ज्याच्याशी जोडल्यात ती ठिकाणे पाहायला खूप आवडते. मी त्याच्या सत्य असत्यात पडत नाही. बकेट list मध्ये ठेवते.. कधी योग आला तर नक्की जाईन.फोटोही मस्त..

    ReplyDelete
  11. छान, अप्रतिम लेख.

    ReplyDelete
  12. खूपच सुंदर लेखणी...

    ReplyDelete
  13. खूपच छान लेख

    ReplyDelete
  14. Very nice informative blog on such an offbeat place.... 👍

    ReplyDelete
  15. समीर गुळवणेDecember 1, 2022 at 8:39 AM

    खूप छान लेख अमीत

    ReplyDelete
  16. खूप छान आणि माहितीपूर्ण लेख अमित.....

    ReplyDelete
  17. दिपक पाताडेDecember 1, 2022 at 5:46 PM

    खूप छान लेख

    ReplyDelete
  18. जबरदस्त माहिती खजाना.

    ReplyDelete
  19. अतिशय बारीक बारीक खुणा व त्या बाबतची माहिती दिली आहेस. मस्तच लिहिलं आहेस

    ReplyDelete
  20. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  21. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन.. वर्णन मस्त.. बसल्याजागी विराट नगर फिरून आले..
    - Aarti Dugal

    ReplyDelete
  22. अमित जी खूपच अभ्यास पूर्ण माहिती दिलीत.इतिहासात घेऊन गेलात. धन्यवाद

    ReplyDelete
  23. फार सुंदर .नवीन ठिकाण माहित झाले.

    ReplyDelete
  24. Very nice information and clear pics

    ReplyDelete
  25. अभ्यास, निरीक्षण ,लिखाण ,मांडणी आणि वाचकांसमोर वास्तव चित्र कस उभाराव हे आपल्या कडून शिकतोय,,,, खूप छान माहिती ,,,,

    ReplyDelete
  26. सुंदर लेख. सौंदर्य लेखनातील. सौंदर्य मांडणीतील. पौराणिक कथा व इतिहास याची सांगड घालत असताना चौकस बुद्धी काहीतरी पुराव्याच्या शोधात असते. आपले लेख वाचताना ते सापडते. सिंधू संस्कृती व महाजनपदे यांचा संबंध, आदिमानवाच्या अस्तित्त्वाचा काल, हिंदु बौद्ध व जैन या भारतीय संस्कृतींचा परस्पर संबंध विशेषत्त्वाने एकत्रित भूतकालाची जाणीव करुन देतात. अप्रतिम माहिती. पुन्हा एकदा धन्यवाद डोंगरभाऊ.

    ReplyDelete
  27. मस्त झालाय लेख.

    ReplyDelete
  28. सुंदर लिखाण उत्कृष्ट छायाचित्रण महाभारतातील माहीत नसलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete