Sunday, January 8, 2023

दक्षिणेचे प्रवेशव्दार असिरगड आणि बुर्‍हाणपूर , भाग - १ ( "key to the Deccan", Asirgarh Fort & Burhanpur , Part -1 )

 

Asirgarh Fort

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥

या श्लोकाचा अर्थ अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य और भगवान परशुराम असे सात चिरंजीव आहेत. हा श्लोक आठवण्याचे कारण म्हणजे अश्वत्थामा आणि असिरगड यांच्या भोवती गुंफ़लेली दंतकथा. असिरगडावर असिरेश्वराच मंदिर आहे. दररोज रामप्रहरी अश्वत्थामा मंदिरा समोर असलेल्या कुंडात आंघोळ करुन सुचिर्भूत होऊन असिरेश्वराची पूजा करतो. पूजेमध्ये तो पिंडीवर एक गुलाबाचे फ़ूल वाहातो. जे या भागात जवळपास कुठेही मिळत नाही. पूजा झाल्यावर अश्वत्थामा जंगलात निघून जातो. अनेक लोकांना तो किल्ल्याच्या परिसरात दिसल्याच्या काहाण्या सांगितल्या जातात. एका न्य़ुज चॅनलने पहाटे ५ वाजता जाऊन येथे शुटींग केले होते. त्यावेळीही त्यांना पिंडीवर गुलाबाचे ताजे फ़ुल आढळले होते.

बुर्‍हाणपूर - इंदुर रस्त्यावर असलेला असीरगड हा भारतातल्या अजिंक्य किल्ल्यांमधला एक किल्ला आहे. हा किल्ला लढून जिंकून घेता आला नाही फ़ंदफ़ितुरीने जिंकला गेला. मध्ययुगात बुर्‍हाणपूर ही राजधानी झाल्यावर तीचा पाठीराखा म्हणुन असिरगडला महत्व आले.  ‘बाब-ए-दक्खन’ (दक्षिणेचे प्रवेशव्दार ) और ‘कलोद-ए-दक्खन’ (दक्षिणेची किल्ली) म्हटले जात असे. असिरगड जिंकला की , तेथून दक्षिण भारतात मोहिमा काढणे सोपे पडत असे.

Asirgarh Maps Courtesy Google.com

असिरगड तीन भागात विभागलेला आहे. किल्ल्याच्या खालच्या डोंगराला "मलयगिरी" म्हणतात. त्याच्या वरच्या भागाला "कमरगड" म्हणतात. इंग्रजांच्या राजवटीत या दोन्ही भागाला मिळुन "Lower Fort"  या नावाने ओळखले जात होते. असिरगड गावातून पायर्‍यांच्या मार्गाने आणि गाडी रस्त्याने गडावर जाता येते.  गाडीने थेट किल्ल्यावर गेल्यास किल्ल्याच्या खालच्या भागात असलेले अवशेष पाहायचे राहून जातात. असिरगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍या चढायला सुरुवात केल्यावर १५ ते २० मिनिटात आपण किल्ल्याच्या भक्कम अशा पहिल्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराला लागून  बुरुज आणि तटबंदी आहे. तटबंदी व बुरुजाच्या वरच्या बाजूला चर्या आहेत. त्यामध्ये जंग्या ठेवलेल्या आहेत.  प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूला देवड्या आहेत. पुढे पायर्‍या चढून काटकोनात वळल्यावर डाव्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. त्यापुढे दुसरे प्रवेशव्दार आहे. पहिले आणि दुसरे प्रवेशव्दार तटबंदीने एकमेकाला इंग्रजी  'L" अक्षराच्या आकारात जोडलेले आहे. पहिले प्रवेशव्दार पडल्यावर शत्रूला लगेच किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये यासाठी अशी रचना केलेली आढळते. दुसर्‍या प्रवेशव्दारातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला देवड्या आहेत.  दुसरा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या खालच्या भागात पसरलेली तटबंदी आणि बुरुज पाहायला मिळतात.  पुढे पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला कमानी असलेली एक वास्तू आहे. परवाने तपासणारे अधिकारी आणि खालच्या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी असणार्‍या अधिकार्‍यांचे हे कार्यालय असण्याची शक्यता  आहे.

 

Entrance gate , Kamargad

या कार्यालयापासून उजवीकडे जंगलात एक वाट "चौ बुरुजा" कडे जाते. वाटेत एक पाण्याचे टाक आणि उध्वस्त वास्तू आहे. किल्ल्याच्या या टोकावर चार बुरुज बांधून ही जागा संरक्षित करण्यात आलेली आहे. चौ बुरुज पाहून पुन्हा पायर्‍यांच्या वाटेवर येऊन चढून गेल्यावर पायर्‍यांच्या डाव्या बाजूला किल्ल्याचे तिसरे प्रवेशव्दार आहे. सध्याची वाट या दरवाजातून न जाता बाजूने जाते.  अजून पुढे चढून गेल्यावर किल्ल्याच्या चौथ्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या आत देवड्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर किल्ल्यावर येणारा गाडी रस्ता लागतो. याच ठिकाणी पार्कींगही आहे. या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर मलयगिरी आणि कमरगड संपून असिरगड किल्ला Upper Fort सुरु होतो.

 हैहय ( यदु कुळातला, यादव वंशाचा) वंशाचा राजा आशा असिर याच्याकडे भरपूर पशुधन होते. त्यांच्या संरक्षणासाठी त्याने चौदाव्या शतकात हा किल्ला बांधला होता.  किल्ल्याची ख्याती ऐकुन फ़िरोजशहा तुघलकाचा सरदार नसीरखान फ़ारुखी याने आशा असिर राजाची भेट घेऊन त्याला किल्ल्यात आश्रय द्यायची विनंती केली. आशा असिरने त्याच्यावर विश्वास ठेऊन किल्ल्यात येण्याची परवानगी दिली. नसीरखानने पहिल्यांदा आपल्या बायकांना डोलीत बसवून किल्ल्यात पाठवले. आणि त्या मागोमाग हत्यारबंद शिपाई डोलीत बसून सहजासहजी किल्ल्यात शिरले. नसीरखानच्या परिवाराचे स्वागत करायला आलेल्या आशा असिर आणि त्याच्या पुत्रावर किल्ल्यात शिरलेल्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला करुन त्यांना मारुन टाकले. किल्ला नसीरखानाच्या ताब्यात केला. त्यानंतर बहादुरशहा फ़ारुखीच्या  काळात अकबराने हा किल्ला जिंकण्यासाठी १० वर्ष वेढा घातला. किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकण्याचे अनेक प्रयत्न विफ़ल झाल्यावर अकबराने बहादुरशहा फ़ारुखीला चर्चेसाठी बोलवले आणि कैद केले. १७ जानेवारी १६२१ रोजी असिरगडवर मुघलांचे निशाण फ़डकले. किल्ल्यावर मुघलांची टांकसाळ होती. असिरगड जिंकल्यावर अकबराने सोन्याची नाणी पाडली होती. त्यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. मराठ्यांकडून किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

 
Fortification at Main entrace gate, Asirgarh

असिरगड किल्ल्यापाशी आल्यावर तिथल्या सुरक्षा रक्षकाने आम्हाला सांगितले की, किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने किल्ला पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे किल्ल्यात जाता येणार नाही. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत एवढ्या लांब येऊन किल्ला न पाहात कस जाणार वगैरे अनेक विनंत्या केल्या. मागच्या वेळीही जळगाव ते बुर्‍हाणपूर  किल्ले बघत बघत असिरगड बघण्याचा प्लान केला होता. त्यावेळी  जळगाव जिल्यातल्या चौगाव किल्ल्यावर आमच्यावर दोन तास मधमाशांचा हल्ला झाला. आम्हाला चोपडा येथिल सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावे लागलेले. एवढे झाल्यावरही सर्वानुमते पुढचे किल्ले पाहात आम्ही पुढे बुर्‍हाणपूर पर्यंत गेलो, पण वेळेचे गणित चुकल्यामुळे फ़क्त बुर्‍हाणपूर पाहून परताव लागले होते.  असिरगड पाहाण्यासाठी यावेळी अमरावती  ते बुर्‍हाणपूर  किल्ले बघत बघत जाण्याचा प्लान केलेला . त्याप्रमाणे पहिला दिवस व्यवस्थित पार पडलेला . आता असिरगड समोर दिसत होता पण त्यात जाता येत नव्हते.

Entrace gate , Asirgad

आमच्या नशिबाने कामावर देखरेख करण्यासाठी मध्यप्रदेश पुरातत्व खात्याची  काही माणस आली. त्यांना विनंती केल्यावर त्यांनीही तेच कारण सांगितले. आम्ही मात्र पिच्छा सोडायला तयार नाही पाहिल्यावर आमची दया येऊन त्याने त्याच्या साहेबाला फ़ोन लावला त्याने आमच्याकडून "स्वत:च्या जबाबदारीवर जात आहोत" असे लिहून देण्यास सांगितले. तसेच सिक्युरिटी गार्ड तुमच्या बरोबर असेल त्याच्या बरोबर फ़िरावे लागेल असे सांगितले. त्यांचे आभार मानून किल्ल्याच्या  पहिल्या पायरीला नमस्कार करुन किल्ल्याकडे निघालो. तितक्यात पुरातत्व खात्याच्या माणसाने सिक्युरीटी गार्डला असिरेश्वर मंदिराची चावी दिली आणि तेही दाखवायला सांगितले.  

Asirgarh Map by Mahendra Govekar© Copy right 

डोंगरावरच्या कातळकड्यावर तटबंदी बांधून किल्ला संरक्षित करण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या पायर्‍या चढायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला चार फ़ारसी शिलालेख आहेत.  पुढे डाव्या बाजूला एक बुरुज अशा प्रकारे बांधलेला आहे की, त्यामुळे त्याच्या मागे असेलेल्या प्रवेशव्दारावर थेट हल्ला करता येणार नाही.  बुरुजा मागील प्रवेशव्दारातून पुढे पायर्‍या चढून गेल्यावर वाट कोटकोनात आणि समोर किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूला भव्य बुरुज आहेत. प्रवेशव्दारच्यावर ८ ते १० फ़ूट भिंत बांधलेली आहे.  प्रवेशव्दाराचे दरवाजे आणि त्यावरचे खिळे अजूनही शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर पायर्‍यांच्या वाटेने वर चढतानां डाव्या बाजूची १० फ़ूट उंच भिंत ढासळलेली होती. त्याच्या पूनर्बांधणीचे काम चालू होते. त्यासाठी किल्ला बंद ठेवण्यात आला होता.

 

राणी महाल,असिरगड

गडमाथ्यावर आल्यावर समोर दिसणार्‍या पायवाटेने चालण्यास सुरुवात केली. डाव्या बाजूला एक उध्वस्त वास्तू आहे. त्याच्या दरवाजावर खिळे ठोकलेले आहेत.  पुढे उजव्या बाजूला राणी महाल आहे. राणी महालाच्या पुढच्या आणि मागच्या बाजुस पहारेकर्‍यांसाठी खोल्या आहेत. किल्ल्यात बराच काळ इंग्रजांची वसाहत होती त्यामुळे किल्ल्यातील मुळ वास्तूंमध्ये त्याकाळात त्यांच्या सोयी प्रमाणे बदल करण्यात आले. नवीन वास्तू बांधल्या त्यामुळे नक्की वास्तू कशासाठी असावी हे त्याच्या बांधकाम शैली वरुन अंदाज करावा लागतो. राणी महालाच्या मागच्या बाजूला वीटांनी बांधलेल्या काही वास्तू आहेत. त्याचा आकार बघता कोठार म्हणून त्याचा उपयोग झाला असावा. या कोठारांच्या पुढे मामा भांजा तलाव आहेत . त्यापैकी एका तलावात विहिर आहे. इथे सांगितल्या जाणार्‍या दंतकथेनुसार तलावचे खोदकाम करतांना मामा आणि भाचे अंगावर भिंत पडून दगावले. त्यामुळे या तलावाला मामा भांजा तलाव म्हणतात. तलाव पाहून पुन्हा पायवाटेवर आल्यावर आपण भव्य मशिदीपाशी पोहोचतो.    

 

Inscription on pillar, Asirgarh

Mosque, Asirgarh

मशिदीकडे जाण्यासाठी दगडाच्या सुंदर वळणदार पायाऱ्या बांधलेल्या आहेत. त्या चढून गेल्यावर तीन कमानी असलेल्या दरवाजातून मशिदीच्या आवारात प्रवेश होतो. आयताकृती आकारात बांधलेल्या या मशिदिला चारही बाजूला बांध्याकाम आणि मध्ये मोठा चौक आहे. आत शिराल्यावर डाव्या बाजूला वजू करण्यासाठी हौद आहे. हौद भरण्यासाठी मागाच्या बाजूला विहीर आहे.  नमाज  पढण्यासाठी असलेल्या सभागृहाला २७ कमानी आणि  ५० खांब आहेत. दर्शनी खाबावर फारसीत शिलालेख कोरलेला आहे. बाजूच्या दोन बाजूला ओवाऱ्या काढलेल्या आहेत. मशिदीला दोन मीनार आहेत.

 

Remains of church, Asirgarh

मशिदीच्या पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला ब्रिटीशांची वसाहत आणि त्यातील चर्चचे अवशेष पाहायला मिळतात.  तेथून किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत जातांना उजव्या बाजूला एक मोठा तलाव आहे. या तलावाला लागून असलेल्या तटबंदीत काही खोल्या आहेत. किल्ल्याच्या पूर्व टोकावर अजून एका चर्चचे अवशेष आहेत.  चर्चपासून पुढे गेल्यावर आपण ३ विहिरींपाशी पोहोचतो. या विहिरी अतिशय खोल असून एका विहिरीत महाल आहे. उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी अशा प्रकारे पाण्याजवळ महाल बांधलेले बर्‍याच किल्ल्यांवर पाहायला मिळतात. या विहिरीला लागूनच असिरेश्वर महादेव मंदिर आहे.  विहिरीच्या बाजूचे कातळ कोरुन हे त्यात हे मंदिर बांधलेले आहे.  अश्वत्थामा दररोज रामप्रहरी सातपुड्याच्या जंगलातून किल्ल्यावर येतो. मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीत स्नान करुन , पिंडीवर अभिषेक करुन त्याला फ़ुल वाहातो अशी येथील लोकांची श्रध्दा आहे.

 

असिरेश्वर महादेव मंदिर

अश्वत्थामा पुजतो ती पिंड

विहिरीतील महाल 


आमच्या बरोबर आलेल्या सिक्युरिटी गार्डने मंदिराचे कुलूप उघडून आम्हाला आत नेले. गाभारा स्वच्छ होता. पिंडीवर भस्माचे पट्टे काढलेले होते. पिंडीवर फ़ूल नव्हते पण जंगलात मिळणारी दोन काटेरी फळे पिंडीवर वाहेलेली होती. सध्या किल्ला पर्यटकांसाठी बंद असल्याने किल्ल्यातील मंदिर कुलूपबंद असते असे सिक्युरीटी गार्डने सांगितले. त्याला इथे नोकरीला लागून आठवडाच झाला होता . त्यामुळे अश्वस्थामाची दंतकथा आणि एकूणच किल्ल्याबद्दल फ़ारशी माहिती नव्हती. या एकाच किल्ल्यावर मंदिर , मशिद आणि चर्च पाहायला मिळाले. 

 

तलाव, असिरगड 

तुरुंग, असिरगड 


मंदिराच्या बाजूला पूर्व टोकावरील किल्ल्याच्या आत बांधलेला टेहळणी  बुरुज आहे. बुरुजावर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. बुरुज पाहून तलावाच्या दुसर्‍या बाजूने प्रवेशव्दाराकडे जातांना वाटेत, इंग्रजांनी बांधलेल्या अनेक उध्वस्त इमारती पाहायला मिळतात. यातील काही इमारतींचा वापर तुरुंग म्हणून केला होता. पंजाबातील कुका चळवळीचे नेते राम सिंह आणि त्यांच्या अनेक अनुयायांना इंग्रजांनी याठिकाणी इसवीसम १८७२ मध्ये कैदेत ठेवले होते.  इथुन पुढे गेल्यावर मामा- भांजे तलावाच्या पुढे इंग्रजांचे कब्रस्थान आहे. तेथून किल्ल्याच्या प्रवेशव्दारपाशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते.  पुरातत्व खात्याचे कार्यालय गावात असल्यामुळे गडावरुन खाली उतरल्यावर आम्ही ते शोधत  गावातील पूरातन शिव मंदिरात पोहोचलो. मंदिर सुंदर आहे. मंदिरातील नंदीने चक्क कणीस तोंडात धरल्याचे दाखवलेले आहे. मंदिरा मागे एक छान बारव आहे. पुरातत्व खात्याच्या कर्मचार्‍यांचे आभार मानून आम्ही बुर्‍हाणपूरकडे जायला निघालो.

 बुर्‍हाणपूर बद्दल पुढच्या भागात ..................................................

 

शिवमंदिर, असिरगड गाव

कणीस तोंडात धरलेला नंदी

जाण्यासाठी :- बुर्‍हाणपूर रेल्वेने आणि रस्त्याने महाराष्ट्राशी जोडलेले आहे. बुर्‍हाणपूर - इंदुर रस्त्यावर  बुर्‍हाणपूरपासून २३ किलोमीटरवर अशिरगड किल्ला आहे. 

किल्ल्यावर सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो.


बारव, असिरगड गाव 
 
Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

Map :- Mahendra Govekar © Copy right


Wednesday, November 30, 2022

महाभारतातील विराट नगर ( Virat Nagar , the Ancient city in Mahabharat )

 

विराट नगर

जयपुरला तिसर्‍यांदा जात होतो. त्यामुळे जयपुर मधील नेहमीची प्रसिध्द स्थळे पाहाण्या ऐवजी वेगळी ठिकाण शोधत असताना "विराट नगर" सापडल. महाभारतातील विराट पर्वात उल्लेख असलेले विराट नगर ते हेच असा येथिल लोकांचा दावा आहे. भारतात अनेक प्राचीन गावांशी रामायण , महाभारतातल्या कथा जोडलेल्या आहेत त्यापैकी हे एक गाव.  जयपूरच्या आसपास  फ़िरतांना महाभारतातल्या कथांशी संबंधित अनेक ठिकाण आढळली.  त्यातही पाच पांडवां पैकी भीमाशी संबधित ठिकाण जास्त आढळली.

 जयपुर जवळील प्रसिध्द मंदिर खाटू श्यामजी . याची कथाही महाभारत आणि भीमाशी निगडीत आहे. भीमाला हिडींबेपासून झालेला मुलगा घटोत्कच. घटोत्कच आणि त्याची पत्नी अहिलावती यांना अंजनपर्व , मेघवर्ण आणि बर्बरिक ही तीन मुले होती.  त्यातील बर्बरिक देवी भक्त होता. त्याला देवीकडून तीन दिव्य बाण मिळाले  होते. महाभारताचे युध्द चालू होण्यापूर्वी बर्बरिकने त्याच्या आईला वचन दिले होते, " युध्दात जो हरेल त्याच्या बाजूने मी लढेन". (हारे का सहारा)

 ही गोष्ट श्रीकृष्णाला कळली , जर बर्बारिक, आईला दिलेल्या वचना प्रमाणे हरणार्‍या कौरवांच्या बाजूने लढला तर त्याच्याकडे असलेल्या तीन दिव्य बाणांमुळे तो युध्दाचा निकाल बदलून टाकेल . हे टाळण्यासाठी श्रीकृष्णाने ब्राह्मणाचे रुप घेतले आणि तो बार्बरिकला भेटायला गेला.  त्याच्या कडील  दिव्य बाणांची परिक्षा घेण्यासाठी श्रीकृष्णाने समोर दिसणार्‍या पिंपळाच्या झाडाच्या सर्व पानांना भोक पाडायला सांगितले. त्याप्रमाणे बर्बारिकने सोडलेल्या बाणाने झाडाच्या सर्व पानांना भोक पाडून तो  बाण ब्राम्हणाच्या पाया जवळ आला. कारण श्रीकृष्णाने एक पान पाया खाली लपवलेले होते. श्रीकृष्णाने पानावरुन पाय काढताच बाणाने त्या पानाचाही वेध घेतला. बाणाची दिव्य शक्ती पाहून ब्राम्हणरुपी श्रीकृष्णाने बार्बारिककडे दान मागितले. बर्बरिकने काय हवे ते माग असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने त्याचे शिर दान म्हणून मागितले. हे विचित्र दान ऐकल्यावर बर्बरिकला कळले या ब्राम्हणाच्या वेषात दुसरेच कोणीतरी आहे. त्याने ब्राम्हणाला मुळ रुपात प्रकट होण्याची विनंती केली. समोर साक्षात श्रीकृष्णाला पाहून त्याने आपले शिर त्याला अर्पण केले.  श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की कलियुगात तू माझ्या "श्याम" या नावाने पूजला जाशील. आता राजस्थानातील खाटू  या गावात बर्बरिक म्हणजेच "खाटू श्यामचे" मंदिर आहे. बर्बारिकने श्रीकृष्णाला युध्द पाहायचे आहे असे सांगितले. श्रीकृष्णाने त्याचे शिर खाटू जवळील उंच टेकडीवर ठेवले तेथून त्याने युध्द पाहिले

 

पांडू पोल, सरिस्का


महाभारतातील दुसरी प्रसिध्द कथा म्हणजे भीमाचे हनुमंताने केलेले गर्वहरण. ही सुध्दा याभागात घडली असे मानले जाते. सरिस्का अभयारण्यात " पांडू पोल " नावाची जागा आहे . (पोल म्हणजे दरवाजा इथे खिंड या अर्थी ) या खिंडीत ही प्रसिध्द घटना घडली असे मानले जाते. याठिकाणी हनुमान मंदिर आणि त्या जवळून वाहाणारा बारमाही झरा आहे.

 महाभारतातील विराट पर्वात  उल्लेख असलेली तिसरी घटना म्हणजे पांडव अज्ञातवासात वेष बदलून एक वर्ष विराट राजाच्या पदरी राहीले .अर्जुनाला मिळालेल्या शापामुळे त्याचे बृहन्नडा मध्ये रूपांतर झाले होते. त्याने राजकन्या उत्तरा हिची नृत्यशिक्षिका म्हणून भूमिका निभावली. युधिष्ठिराने कंक या नावाने विराट राजाचे मंत्रीपद हाती घेतले होते. द्रौपदी ही विराट नरेशाची पट्टराणी सुदेष्णा हिची केशभुषाकार म्हणून राहीली होती. नकुल हा अश्वपाल तर, सहदेव हा गोशाळा सांभाळत होता. भीम हा बल्लव म्हणुन भोजनगृहात काम करत होता. विराट नगर मध्ये एक टेकडी भीम डुंगरी नावाने  प्रसिध्द आहे.

 

Remains of Stupa, Virat Nagar

सध्याचे विराट नगर (बैराट) हे गाव हायवेच्या आसपास वसलेल्या टिपिकल गावांसारखेच आहे. गावातील सर्व प्राचीन , मध्ययुगीन अवशेष मात्र गावापासून दूर असलेल्या टेकड्य़ांवर व त्याच्या आसपास पसरलेले आहेत.  प्राचीन मंदिर आणि बौध्द स्तुप असलेली "बिजक की पहाडी" , गणपती मंदिर आणि संग्रहालय, सम्राट अशोकाचा शिलालेख, भीम की डुंगरी, मुगल गेट आणि जैन मंदिर ही  ऐतिहासिक ठिकाण आदिमानव काळापासून ते आज पर्यंत या मोठ्या कालखंडाच्या खूणा बाळगून आहे.

 

बिजक की पहाडीची पायवाट

विराट नगर भटकंतीची सुरुवात "बिजक की पहाडी" या स्थानिक नावाने ओळखल्या जाणार्‍या टेकड्यांच्या रांगापासून झाली. गावाबाहेर असलेल्या या टेकड्यांच्या पायथ्याशी जाण्याकरिता पक्का रस्ता बनवलेला आहे . रस्ता जिथे संपतो तिथे मोठ मोठ्या खडकांनी बनलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आपण पोहोचतो.  पायथ्यापासून एक फ़रसबंदी चढणाचा रस्ता टेकडीवर जातो. पहिली टेकडी चढून गेल्यावर थोडी सपाटी लागते. इथून चारही बाजूला अरवली पर्वताची डोंगर रांग दिसते.   उजव्या बाजूला एका टेकडीवर भगवा ध्वज फ़डकताना दिसतो. त्या दिशेने चढ चढतांना वाटेत अनेक वेगवेगळ्या आकाराचे खडक आजूबाजूला पाहायला मिळतात. या भागात लोकांचा वावर नसल्याने पक्षीही भरपूर प्रमाणात आहेत आणि तेही जवळुन पाहायला मिळतात. हे सर्व पाहात १५ ते २० मिनिटात   मगरीच्या तोंडा सारख्या दिसणार्‍या एका मोठ्या दगडापाशी पोहोचलो. मगरीने जबडा उघडावा तसा त्याचा आकार होता. मगरीच्या नागपुड्याच्या भोकांसारख एक मोठा खड्डाही त्या दगडाला पडला आहे.  या दगडाखाली असलेल्या गुहेत श्रीराम मंदिर आहे. पांडवांनी अज्ञातवासात असतांना याची स्थापना केली अशी लोकांची श्रध्दा आहे.  गुहेत जाऊन श्रीरामच दर्शन घेऊन थोडावेळ आजूबाजूचा परिसर पाहात आणि शांतता अनुभवत बसून राहिलो.

 

श्रीराम मंदिर, बिजक की पहाडी


मंदिराच्या टेकडीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकडीला कुंपण घातलेले होते. पुढचा टप्पा चढून कुंपण पार करुन सपाटीवर प्रवेश केला . या भागात पूरातत्व खात्याने उत्खनन करुन शोधून काढलेला बौध्द स्तुप,  भिख्खुंच्या राहण्याच्या जागा , पाण्याचे कुंड यांचे अवशेष आहेत. बौध्द स्तुप आज अस्तित्वात नसला तरी त्याचा पाया आणि प्रदक्षिणा मार्ग पाहायला मिळातो.  स्तुपाचा व्यास ८.२३ मिटर असुन त्याचा घुमट २६ अष्टकोनी खांबावर तोललेला होता. हे खांब बसवण्यासाठी असलेल्या खाचां आजही पाहायला मिळतात . या खाचांमुळे एखाद्या दाते (Gear) असलेल्या यंत्राच्या चाकाप्रमाणे स्तुपाचे अवशेष दिसतात. स्तुपा जवळ असलेला सम्राट अशोकाचा शिलालेख इसवी सन १८४० मध्ये ब्रिटिश सेनाधिकारी कॅप्टन बर्ट याने कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयात नेऊन ठेवला. आजही  तो तिथे पाहायला मिळतो.

Remains of Virat Nagar


Water tank at Bijak ki Pahadi


विराट नगरच्या इतिहासात डोकावल्यास , ख्रिस्तपूर्व पाचवे ते सहावे शतकातील घडामोडींनी प्राचीन भारत खंडाच्या इतिहासावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. सिंधू संस्कृतीचा र्‍हास झाल्यावर तेथील लोक पूर्वेकडे यमुना आणि गंगेच्या खोर्‍यापर्यंत आणि दक्षिणेकडे पसरले. त्यांनी लहान वसाहती आणि खेडी तयार केली, त्या वसाहती किंवा गावांना 'जनपद' असे म्हणतात. कालांतराने ज्या जनपदांची अर्थव्यवस्था, व्यापार मजबूत होता. त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी सैन्यदल उभारली.आणि शेजारील कमजोर व लहान जनपदे जिंकून आपल्या राज्यात सामील करून घेतली. अशी लहान लहान जनपदे मिळून तयार झालेल्या मोठ्या राज्यांना 'महाजनपदे' म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी छोटी छोटी १६  राज्ये स्थापन झाली . ती "१६ महाजनपद" या नावांने ओळखली जातात.  बौध्द आणि जैन ग्रंथात  १)अंग, २) अस्माक,३) अवंती, ४) चेडी, ५) गंधर्व, ६)काशी, ७) कंबोज, ८) कोसला, ९) कुरु , १०) मगध, ११) मल्ल , १२) मत्स्य , १३) पांचाल, १४)सुरसेना, १५) वाज्जी, १६) वत्स  या १६ महाजनपदांचा उल्लेख येतो.


 

१६ महाजनपद, Courtesy google.com

प्राचीन भारतात  १६ महाजनपदे होती. त्यातील मत्स्य महाजनपद हे आजच्या जयपुर, अलवार , भरतपुर या भागात पसरलेले होते . विराट राजाने स्थापन केलेले विराट नगर ही  मत्स्य महाजनपदाची राजधानी होती.  मौर्यांच्या काळात विराट नगर हे भारतातले प्रमुख शहर आणि बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते.  त्याच काळात या स्तुपाची निर्मिती करण्यात आली.

Cave temple, Virat Nagar
 

स्तुपाचे अवशेष असलेल्या टेकडीच्या वर चढून गेल्यावर , एक गुहा मंदिर पाहायला मिळते. या परिसरात झालेल्या उत्खननात विटांचे काही चौथरे पाहायला मिळतात. येथून खालच्या टेकडीवर दिसणार्‍या  स्तूपाच्या अवशेषाकडे पाहिल्यावर (Arial View) काहीतरी गुढ चिन्ह ,आकार दिसायला लागतो. पुरातत्व खात्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर , नीटनेटका आणि सुशोभित ठेवलेला आहे. 

 

गणेश मंदिर, विराट नगर

बिजक की पहाडी उतरुन संग्रहालय आणि गणपती मंदिर पाहाण्यासाठी गावात शिरलो. गावातील अरुंद रस्त्यावरुन वाट काढत . एका टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो . ही टेकडी पण मोठमोठ्या खडकांनी बनलेली होती. या टेकडीच्या पायथ्याशी एक तलाव व संग्रहालय आहे. टेकडीच्या अर्ध्या उंचीवर स्वयंभु गणेश मंदिर आहे. इथले वातावरण बिजक की पहाडीच्या एकदम विरुध्द होत. तिथे एवढ्या मोठ्या परिसरात आम्ही दोघच होतो. इथे मात्र प्रचंड गर्दी होती, टेकडी खालचे पार्कींग फ़ुल होते. प्रसाद, हार विकणारी दुकान आणि त्यामध्ये असलेली गर्दी यातून वाट काढत गणपतीचे दर्शन घेतले . पायथ्याशी असलेल्या संग्रहालयात शिरलो. संग्रहालय अतिशय सुंदर आहे. विराट नगरचा इतिहास वस्तू रुपात खूप चांगल्या प्रकारे मांडलेला आहे, सोबत पूरक माहितीही लिहिलेली आहे.  

 

Clay Objects, Virat Nagar 

Punch Marked Coins, Virat Nagar

Indo Greek Coins, Virat Nagar

विराट नगरच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांवर अनेक गुहा आहेत. या गुहांमधून आदिमानवाचे वास्तव्य होते. इसवी सन १८७१ -७२ मध्ये कॅनिंग हॅम यांनी विराट नगर मधील अवशेष शोधून काढले.  या गुहांमध्ये आणि या परिसरात पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात  मिळालेल्या अश्मयुगीन दगडी हत्यारांवरून अश्मयुगीन मानवाचे वास्तव्य या ठिकाणी एक लाख ते पन्नास हजार वर्षांपूर्वी पासून होते असे मत श्री एन.आर. बॅनर्जी यांनी मांडले आहे. त्यांनी कैलास नाध दीक्षित यांच्याबरोबर या ठिकाणी १९६०-६२ मध्ये उत्खनन केले होते .  विराट नगर येथे केलेल्या उत्खननात विविध काळातील दगडी हत्यारे, मातीचे भांडी, मूर्ती, विटा, दागिने, लोखंडाची हत्यारे सापडली  आहेत .  याशिवाय  अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या  काळातील नाणी सापडलेली आहेत. यात Punch Mark coins, Indo Greek coins ( यावर ग्रीक आणि खरोष्टी लिपीत मजकूर लिहिलेला आहे ), मुघलांची नाणी  इत्यादी आहेत.  या सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत इसवी सन ६३४ मध्ये चिनी प्रवासी ह्यूएनत्संग  (युआनच्वांग)  विराट नगरला आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात विराट नगरचा उल्लेख केलेला आहे. संग्रहालय पाहाण्यसाठी शुल्क नाही , तरीही बाहेर एवढी गर्दी असूनही संग्रहालय पहायला मात्र दोन चार जणच आले होते.  आपल्याच संस्कृती,  इतिहासा बद्दल असलेली अनास्था दुसर काय ?

संग्रहालय बघितल्यावर पुढची तीन ठिकाण गावाच्या दुसऱ्या भागात होती. भीम डुंगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर "सम्राट अशोक शिलालेख" अशी दिशा दर्शक पाटी पाहून त्या दिशेने चालत निघालो. पुरातत्व खात्याने तिथे जाण्यासाठी पायावाट व्यवस्थित बांधून काढलेली आहे. ज्या दगडावर शिलालेख होता त्यावरही काँक्रीटची शेड बांधलेली आहे. पण शिलालेख मात्र त्या ठिकाणी नाही.

सम्राट अशोक शिलालेख,

पुन्हा रस्त्यावर येऊन भीम डुंगरीच्या पायाथ्याशी आलो. या डोंगरावर भीमाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. डोंगराच्या पायथ्याशी गुहा आहे त्यात भीम वास्तव्य करत होता, पाऊलाच्या आकाराचे  पाण्याचे कुंड आहे. भीमाने लाथ मारून ते कुंड निर्माण केले असे समजले जाते. डोंगराच्या मध्यावर एका गुहेत ११ मुखी शिवलिंग आहे. तिथेच भीमाचे आणि हनुमंताचे देऊळ आहे. भीम आणि हनुमंत हे दोघेही पवनपुत्र, त्यांचे एकत्र देऊळ भारतात केवळ या ठिकाणी आहे. या डोंगरावर अनेक गोलाकार मोठ्या आकाराचे खडक आहेत त्यांना भीम गट्टे म्हणतात. भीम याने खेळत असे . या दगडांना पडलेले खड्डे त्याच्या बोटांमुळे पडले आहेत असे स्थानिक लोक मानतात.

 


भीम डुंगरी उतरुन मुघल गेट म्हणजेच पंचमहाल जवळ पोहोचलो. हा पंच महाल आमेरच्या राजाने शाही यात्रींसाठी बांधला होता. अजमेरला जातांना आणि या परिसरात शिकारीला आल्यावर  अकबर या ठिकाणी थांबत असे. या दुमजली महालात घुमटाकार छत असलेल्या खोल्या आहेत. छतांवर आणि भिंतींवर नक्षीकाम केलेले आहे. महाला समोर कारंजे आहे.  मुघल स्थापत्य शैलीत बांधलेल्या या महालावर असलेल्या पाच छत्र्यांमुळे हा महाल पंचमहाल म्हणून ओळखला जातो.    

मुघल गेट (पंचमहाल)


जैन मुनी विमल सुरी यांनी विराट नगरच्या डोंगरात तपश्चर्या केली. विराट नगर मध्ये आजही भव्य जैन मंदिर आहे. विराट नगर मध्ये असलेले जैन नासिया मंदिर १६ व्या शतकात बांधले होते. मुघल गेट समोर असलेल्या या जैन मंदिराच्या बांधणीवर मुघल स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो.

 

Jain Temple , Virat Nagar


Adinatha, Virat Nagar


विराट नगर मधील हिंदू, बौध्द, जैन आणि मुस्लिम धर्माचे वेगवेगळ्या काळातील अवशेष, वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. 

 

 

जाण्यासाठी :-

 विराट नगरला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट जयपुर येथे आहे. जयपुर ते विराट नगर हे अंतर १०३ किलोमीटर आहे.  या भागात बसेस कमी आणि अनियमित चालत असल्यामुळे खाजगी गाडी करून जावे.

जयपूर - भानगड -  विराट नगर हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.

झपाटलेला (?) किल्ला,  भानगढ  (Bhangarh , the most haunted (?) fort) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

https://samantfort.blogspot.com/2022/11/bhangarh-haunted-fort.html

"सरीस्का व्याघ्र प्रकल्प" विराट नगर पासून १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे सरिस्का जवळ राहुनही "विराट नगर" पाहाता येते.

  

Shree Ram Mandir built by Pandava


Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5