Tuesday, March 1, 2022

प्राचीन व्यापारी मार्गाचा मागोवा, पढारवाडी - नाखिंदा घाट - पेठचा किल्ला - आंबिवली लेणी - कोठिंब्याची बारव .

  

तासुबाई डोंगररांगेत असलेल्या वांद्रे, मळेवाडी, पढारवाडी (पदरवाडी) या घाटमाथ्यावरिल गावातून बैलदरा घाट, बैलदरा घाट (पायर्‍यांची वाट), खेतोबा, कौल्याची धार, नाखिंदा घाट अशा अनेक प्राचिन घाटवाटा पेठ किल्ल्यामार्गे कोकणात उतरतात. पेठ उर्फ़ कोथळीगडाची विस्तिर्ण माची ही कोकणातून आणि घाटावरुन येणार्‍या मालाची देवाण - घेवाण , खरेदी - विक्री करण्यासाठी बाजारपेठ होती. या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी कोथळीगडा सारखा सह्याद्रिच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला, बेलाग किल्ला होता.

प्राचीन व्यापारी मार्ग म्हटला की, त्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ला, व्यापारी, पांथस्त, जनावरं यांच्यासाठी मार्गावर केलेली पाण्याची सोय, विश्रांतीसाठी लेणी (शैल गृह), वस्तूंच्या देवाण घेवाणीसाठी बाजारपेठ या गोष्टी आवश्यक होत्या. आजच्या नाखिंदा घाटाच्या ट्रेक मध्ये यापैकी कुठल्या गोष्टी दिसतात ते पाहायचे होते व त्याचे GPS Mapping करुन नकाशा बनवायचा होता.

 

पवनचक्क्या, पढारवाडी 

खंडाळा घाटातल्या वाहातूक कोंडीमुळे पहाटे पढारवाडीत पोहोचलो. धरणाच्या सानिध्यात असल्याने थंडी भरपूर होती. स्लिपिंग बॅगमध्ये शिरुन स्थिरस्थावर होईपर्यंत उठायची वेळ झाली होती. नाश्ता करुन डोंगररांगेवर दिसणार्या पवनचक्क्यांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पढारवाडी गाव तीन बाजुंनी डोंगराने वेढलेले असून एका बाजूला धरण आहे. गावातून जाणार्या डांबरी रस्त्याने १० मिनिटे चालल्यावर उजव्या बाजूला पायवाट झाडीत शिरली.

मातृवृक्ष ?



डोंगर उतारावरील झाडीत मोठ मोठे वृक्ष होते. नुकतेच "Finding the Mother Tree: Discovering the Wisdom of the Forest" हे "Suzanne Simard" यांचे पुस्तक वाचले होते. अरण्यातील जुन्या जाणत्या विशाल वृक्षांना त्यांनी " मातृवृक्ष " असं नामकरण केले आणि अशा प्रकारचे अनेक वृक्ष अमेरिका आणि कॅनडात शोधून काढले. अनेक पावसाळे, दुष्काळ पाहिलेले हे पुराणवृक्ष म्हणजे जंगलाचा प्राण असतात. प्रकाशसंश्र्लेषणाची प्रचंड क्षमता असलेले हे मातृवृक्ष जमिनीतील कर्ब धरुन ठेवणे, नायट्रोजनचा पुरवठा करणे, पाणी प्रवाही ठेवणे इत्यादी महत्वाची कार्य करुन जंगल नांदत ठेवतात. या वृक्षांच्या मुळावर असलेल्या बुरुशीच्या जाळ्यांनी (Mycorrhizal network) तरुण आणि लहान झाडांशी संपर्क ठेवतात. त्यांना जीवनसत्व, पाणी इत्यादी पुरवतात. तसेच किडं, हवामान बदल इत्यादी संकटांची सूचना जमिनी खालील संपर्क यंत्रणे व्दारे (Wood Wide Web) देतात. (जंगलातील झाडांच्या संपर्क यंत्रणेवर "Fantastic Fungi" ही डॉक्युमेंटरी Netflix वर आहे.) मातृवृक्षांबद्दल सगळ्यांना माहिती दिल्यावर ट्रेक संपेपर्यंत दिसणारे वेगवेगळे वृक्ष पाहुन हे या जंगलातले मातृवृक्ष असतील का यावर आम्ही चर्चा करत होतो.

 

पाण्याची टाकी, पढारवाडी 

पायवाटेने जातांना मध्येच कच्चा रस्ता आडवा आला. पवनचक्क्यांपर्यंत जाण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे. इथवर गाडीने येता येत. रस्ता ओलांडल्यावर पायवाट पुन्हा झाडीत शिरली . चढ चढून आम्ही पवनचक्क्यांच्या जवळ पोहोचलो. पवनचक्क्या डोंगराच्या माथ्यावर आहेत. याच पवनचक्क्यांच्या बाजूला डोंगरात एक नेढ आहे, नेढ्याला नाखिंद असेही म्हणतात. या नेढ्यावरुन घाटाला "नाखिंदा घाट" नाव पडल आहे. या पवनचक्क्या आणि नेढ पेठच्या किल्ल्यावरुन स्पष्ट दिसतात.  

(नेढ्याबद्दल अधिक माहिती वाचण्याकरीता "निसर्गाचा अविष्कार चेमेदेव डोंगर आणि बितनगड Offbeat trek to Chemdev & Bitangad" हा लेख वाचा, लेख वाचण्याकरिता लिंकवर टिचकी मारा https://samantfort.blogspot.com/2019/11/blog-post.html)

 

  डोंगरमाथा ओलांडून पवनचक्कीच्या बाजूने खाली उतरल्यावर पाण्याची चार टाकी दिसली. टाक्यांमधल पाणी पिण्यायोग्य नव्हते. टाक्यांजवळ उभे राहिल्यावर खाली दूरवर असणार्‍या पेठ किल्ल्याचे पहिले दर्शन झाले. पायवाट कारवीच्या झुडूपांमधून उतरुन पठारावर आली. लांबलचक पसरलेल्या या पठारावरुन सह्याद्रि आणि कोकणाचा अफ़ाट नजारा दिसत होता. उजव्या बाजूला भिमाशंकर, पदरगड, तुंगी , खालच्या बाजूला खेतोबा दिसत होता. तर डाव्या बाजूला दूरवर ढाकची रांग दिसत होती. समोर खालच्या बाजूला सह्याद्रिच्या मुख्य डोंगररांगेपासून सुटावलेला तरिही मुख्य डोंगररांगेला धारेने जोडलेला पेठ उर्फ़ कोथळीगड किल्ला दिसत होता.

 

पेठ किल्ला

पठारावरुन डावीकडे चालायला सुरुवात केली . या भागात पठाराच्या खालच्या अंगाला एक टाकं आहे असे साईप्रकाश बेलसरे यांच्या ब्लॉगवर वाचले होते, पण ते टाकं काही आम्हाला सापडल नाही.

 

पेठ किल्ला, कौल्याची धार , भिमाशंकर डोंगररांग (उजवीकडे)

पठारावरुन १० मिनिटे चालल्यावर वाट थोडी खाली उतरुन जंगलात शिरली. या वाटेने साधारण पाच मिनिटे चालल्यावर वाटेला एक फ़ाटा फ़ुटला . तिथून सरळ जाणारी वाट कौल्याच्या धारेकडे जात होती, तर खाली उतरणारी वाट नाखिंदा घाटाची होती. कौल्याची धार आणि नाखिंदा घाट दोन्ही वाटा पेठवाडीत उतरतात.  आम्ही नाखिंदा घाटाने दाट जंगलातून खाली उतरायला सुरुवात केली. आमच्या डाव्या बाजूला कौल्याची धार आणि आणि त्याचे दोन्ही कातळ टप्पे दिसत होते. साधारणपणे अर्धातास उतरल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेले पाण्याचे एक टाकं दिसले. हे टाकं सध्या कोरडं पडलेल आहे. या मार्गावर सुरवाती पासून दिसणारी पाण्याची टाकी या व्यापारी मार्गाचे प्राचीनत्व सिध्द करत होती. पाण्याच्या टाक्याजवळ थोडावेळ विश्रांती घेऊन पुढचा टप्पा उतरायला सुरुवात केली

पाण्याची टाकी, नाखिंदा घाट


उतार संपून पेठच्या किल्ल्याच्या पदरात आल्यावर वाट छान वळसे घेत पेठवाडी जवळ आली. इथे शेताच्या बांधावर एक दगडी समाधी पाहायला मिळाली

(समाधी बद्दल अधिक माहिती वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा (https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html )

समाधी

थोड्यात वेळात पेठ माचीवर पोहोचलो. पढारवाडीतून पेठ माचीवर (पेठवाडीत) रमतगमत पोहोचायला आम्हाला दोन तास लागले. तिथल्या स्टॉलवर लिंबू सरबत पिऊन किल्ल्याच्या सर्वोच्च  माथ्याकडे निघालो. पहिल्या उध्वस्त दरवाजाच्या अलिकडे एक सुंदर व्ह्यु पॉईंट आहे. इथून फार सुंदर दृश्य दिसते. नाखिंद, पवनचक्क्या पासून ते भिमाशंकर रांग, पदरगड, तुंगी, मागे सिध्दगड आणि खालच्या बाजूला खेतोबा मंदिर दिसते .


कातळात कोरलेला पायर्‍या 


 














पेठ किल्ल्याचा माथा म्हणजे डोंगरावर असलेली कातळटोपी आहे. यात लेणी , पाण्याची टाकी आणि पेठच्या किल्ल्याचे वैशिष्ट्य असलेल्या, गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेला पायर्‍या आहेत. पायर्‍या चढून गडमाथ्यावर पोहोचण्या अगोदर कातळात कोरलेले एक प्रवेशव्दार आहे. किल्ल्याला या शिवाय दोन उध्वस्त प्रवेशव्दार आहेत. गडमाथ्यावर पाण्याच एक छोट तळ आहे. गडमाथ्यावरुन सर्व घाटवाटा आणि भिमाशंकर ते ढाक पर्यंतचा विस्तृत परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. यावरुन किल्ल्याचे स्थान किती मोक्याचे (महत्वाचे) आहे ते लक्षात येते. या कातळ टोपीला खालच्या बाजूने प्रदक्षिणा घालता येते . यामार्गावर पाण्याची टाकी आहेत. तसेच टेहळणीसाठी खोदेलेली एक गुहा पण आहे. पेठ माची वरुन गडमाथ्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.


        पायवाट, डुक्कर पाडा

 किल्ला पाहून पेठ माचीवर परत आलो. किल्ल्यावर येण्यासाठी मुख्य वाट आंबिवली गावातून आहे. याशिवाय डुक्कर पाडा उर्फ़ देवाचा पाडा (जामरुंग) येथून एक वाट किल्ल्यावर येते. या वाटेने यापूर्वी एकदा किल्ल्यावर आलो होतो. किल्ल्यावर कमीत कमी वेळात येणारी ही वाट आहे.  पेठवाडी बाहेर असणारी शेतं ओलांडून १० मिनिटात वाटेला लागलो आणि उतरायला सुरुवात केली. या वाटेवर दाट झाडी आहे. आंब्याचे मोठे मोठे वृक्ष या भागात आहे. त्यामुळे या वाटेला "आंब्याचे पान" असेही म्हणतात. वाट उतरताना डाव्या बाजूला एक ओढा आपली सोबत करत असतो. अर्ध्या तासात आम्ही डांबरी सडकेवर पोहोचलो. इथे "रिच फ़िल्ड" नावाची बंगल्यांची कॉलनी आहे. या कॉलीनीतून गडावर जाणारी पायवाट आहे. डुक्करपाड्यातून गाडीने ६ किलोमीटरवरील चिल्हार नदी काठी असलेल्या आंबिवलीच्या बौध्द लेण्यांपाशी पोहोचलो. चिल्हार नदी काठी असल्यामुळे या लेण्यांना "चिल्हार लेणी" या नावानेही ओळखतात. हा परिसर पुरातत्व खात्याने नितांत सुंदर ठेवला आहे. लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता, नदी पात्रात उतरण्यासाठी घाट बनवलेला आहे.     

चिल्हार नदी

शूर्पारक, कल्याण या बंदरातून आणि कान्हेरी सारख्या धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणावरून कार्ले - भाजे या ठिकाणी जाणाऱ्या व्यापारी मार्गावरील विश्रांतीचे ठिकाण म्हणून हे लेणे चौथ्या शतकाच्या सुमारास खोदण्यात आले होते. पेठ किल्ला आणि बाजारपेठही याच व्यापारी मार्गावर आहे.

आंबिवली लेणी

लेण्याचा परिसर फार सुंदर आहे लेण्या समोरून खालच्या बाजूला एक सुंदर वळण घेऊन चिल्हार नदी वाहते. त्यावर एक बंधारा असून तेथे नदीत उतरण्यासाठी प्रशस्त पायऱ्या ही बांधल्या आहेत. लेण्यांतून समोर भीमाशंकर डोंगररांग आणि त्यातील तुंगी, पदरगड हे किल्ले दिसतात. अशा रम्य ठिकाणी हे लेणे खोदलेले आहे. लेण्यासमोर मोठे प्रांगण आहे. लेण्याचे व्हरांडा आणि दालन असे दोन भाग आहेत. व्हरांडा चार खांबांवर तोललेला असून त्यातील दोन खांब अष्टकोनी आणि दोन खांब सोळा कोनी आहेत. या खांबांचे स्तंभशीर्ष उलट्या ठेवलेल्या घटा सारखे आहेत. त्यावर हर्मिके सारखी रचना आहे. व्हरांड्यात दोन बाजूला दोन दगडी बाकडे आहेत.


टाकं, आंबिवली लेणी

व्हरांड्यातून आतील दालनात जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत. पण त्यातील एक दरवाजा जाळी लावून बंद करण्यात आला आहे. आतील दालन प्रशस्त असून त्याच्या तीन बाजूंच्या भिंती प्रत्येकी चार खोल्या अशा एकूण बारा खोल्या खोदलेल्या आहेत. सध्या यापैकी काही खोल्यांमध्ये गणपती, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. लेण्याच्या उजव्या बाजूला थोड्या वरच्या बाजूस पाण्याची दोन टाकी खोदलेली आहेत. त्यातील एका टाक्यात बारमाही पाणी असते.

 

बारव, कोठिंबे

दगडी ढोणी


आंबिवलीची बौध्द लेणी पाहून ८ किलोमीटर अंतरावर असणार्‍या कोठींबे गावात, रस्त्यालगत असलेल्या पुरातन बारव पाशी (Step Well) पोहोचलो. कर्जत मार्गावर रस्त्या लगत असलेल्या या आयताकृती विहिरीत उतरण्यासाठी पाय‌र्‍या आहेत. या विहिरीत बारमाहि पाणी असते. विहिरीच्या बाजूला एक दगडी ढोणी आहे.

 

GPS ने रेकॉर्ड केलेली व्यापारी मार्गाची भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर


पढारवाडीच्या डोंगरावर असलेली पाण्याची टाकी  - नाखिंदा घाटातील पाण्याची टाकी -  व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी असलेला  पेठ किल्ला - आंबिवली लेणी (शैलगृह) व्यापार्‍यांसाठी असलेले विश्रांती स्थान - कोठिंब्याची बारव या प्राचीन व्यापारी मार्गावरील महत्वाच्या खुणांची नोंद घेत आजच्या ट्रेकची सांगता झाली.    


 जाण्यासाठी :-

पढारवाडी :- तळेगाव MIDC तून पढारवाडीला जाणारा रस्ता आहे. अंतर अंदाजे ५० किलोमीटर आहे

डुक्करपाडा (देवाचा पाडा) जामरुंग :- कर्जत रेल्वे स्टेशन ते डुक्करपाडा हे अंतर अंदाजे ३० किलोमीटर आहे. (आंबिवलीच्या पुढे किलोमीटर) कर्जतहून डुक्करपाड्याकरीता टॅक्सी मिळतात. डुककरपाड्यात "रिच फ़िल्ड" नावाची बंगल्यांची कॉलनी आहे. या कॉलनीतून गडावर जाणारी पायवाट आहे.

 


पढारवाडी ते पवचक्की - अर्धातास

पवनचक्की ते नाखिंदा घाट १५ मिनिटे

नाखिंदा घाट ते पेठ माची सव्वा तास

पेठ माची ते गडमाथा अर्धा तास

पेठ माची ते डुक्करपाडा पाऊण तास 

 


घाटवाटांवरिल इतर ब्लॉग :-

1) रडतोंडी घाट - पार घाट - प्रतापगड - मधुमकरंदगड - हातलोट घाट, जावळीच्या खोर्‍यातील भटकंती (Radtondi ghat, Par ghat, Pratapgad, Madhumakrandgad, Hatlot ghat) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा. 


2) चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती, One day trek near Mumbai, Nashik) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.
डुक्करपाडा वाटेवरुन, पेठ किल्ला


Photos by :- Amit Samant, Mahendra Govekar, Ketaki Mahajan © Copy right

Map :- Mahendra Govekar © Copy right


Saturday, September 25, 2021

रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत (Rambaug Point , Matheran to Pokharwadi, Karjat)

              कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेनंतर ट्रेकिंगला सुरुवात करायची होती. अनेक महिने ट्रेक न केल्यामुळे  सगळ्यांची कॉन्फिडन्स लेव्हल एकदम "हाय" होती. ट्रेकसाठी विचारल्यावर लोकांनी जी कारण सांगितली त्यावर "ट्रेकला न येण्याची १०१ कारणे" हे पुस्तकं लिहिता येईल. त्यामुळे जे उरले होते, त्यांच्याशी चर्चा करून त्यातल्या त्यात सोपा ट्रेक ठरवला. रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत.

 


माथेरानला जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. त्यातल्या कर्जत बाजूकडून येणाऱ्या वाटांपैकी खाटवणं ते अलेक्झांडर पॉईंट आणि बुरुजवाडी / दांडवाडी ते रामाबाग पॉईंट या वाटा गावाकऱ्यांच्या रोजच्या वापरातल्या असल्याने मळलेल्या आहेत. या गावातील लोकांची रोजंदारीसाठी रोज माथेरनला जा - ये चालू असते. यापैकी खाटवणं ते अलेक्झांडर पॉईंट ही वाट शेवटच्या टप्प्यात तीव्र चढाईची आहे, तर बुरुजवाडी / दांडवाडी ते रामाबाग पॉईंट ही वाट मध्यम चढाईची आणि फ़िरत फ़िरत जाणारी आहे. त्यामुळे भर पावसात रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत ही वाट उतरायची असे ठरवून आम्ही सकाळीच माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर पोहोचलो.

 


दस्तुरीपासून रामबाग पॉईंट ४ किलोमीटर अंतरावर आहे. माथेरानचा माथा पावसाळ्यात ढगात गुरफ़टलेला असतो. धुक्यात गुरफ़टलेल्या जंगलातील वाटेने पावसाळी कुंद वातावरणात लाल मातीची वाट तुडवत बाजारपेठ गाठली. नाश्त्यासाठी एकच केतकर हॉटेल उघडलेले होते. पर्यटकां ऐवजी स्थानिक लोकांचीच हॉटेलात वर्दळ होती. अशा ठिकाणी नेहमीच चांगले चविष्ट पदार्थ मिळतात. भरपेट नाश्ता करुन अलेक्झांडर पॉईंटकडे निघालो. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण शोधणार्‍या मॅलेटच्या जावयाचे (भाचीच्या नवर्‍याचे) नाव या पॉईंटला दिलेले आहे. मुख्य रस्ता सोडून आतल्या रस्त्यावर आल्यावर झाडांची दाटी अधिकच वाढली. सततच्या पावसामुळे झाडावर आलेले शेवाळं (मॉस) आणि बांडगुळ त्यांच्या रंगामुळे उठून दिसत होती. रस्त्याच्या कडेला असलेली वारुळं पावसात "पॅक बंद" केलेली दिसत होती. पॉईंट जवळ आल्यावर धुक्यातून एक कुटुंब समोर आले. त्यांच्या वेषावरुन ते खालच्या गावातून आलेले वाटत होते. थांबून त्यांच्याशी गप्पा मारल्या, ते सर्वजण खाटवण गावात राहातात आणि हॉटेलात काम करण्यासाठी रोज माथेरानला डोंगर चढून येतात. आम्ही रामबागेतून उतरणार आहे असे सांगितल्यावर त्यांच्यातल्या एकाने आम्हाला, "खाटवण पर्यंत वाट दाखवतो तुम्हाला जसे वाटतील तेवढे पैसे द्या असे सांगितले". पण आम्हाला त्या वाटेने उतरायचे नसल्याने आम्ही रामबाग पॉईंटकडे निघालो.

 



माथेरानच्या बहुतेक पॉइंटसना तो शोधणार्‍या साहेबांची, त्याच्या नातेवाईकांची किंवा खाली असणार्‍या गावांची नाव दिली आहेत. अलेक्झांडर पॉईंट पासून माथेरानच्या दक्षिण टोकावर असलेल्या चौक पॉईंट पर्यंत असलेल्या कड्या खाली सुंदर जंगल आहे. हे जंगल रामबाग किंवा रामाची बाग या स्थानिक नावाने ओळखले जाते. त्यावरुन या पॉइंट "रामबाग" हे नाव मिळाले. गॅझेटीअर मध्ये या पॉइंट्चा उल्लेख नाही. त्यामुळे हा नंतरच्या काळातला असावा. रामबाग पॉइंटच्या रेलिंगपाशी पोहोचलो . अजूनही आम्ही ढगात असल्याने आजूबाजूचा परिसर दिसणे शक्यच नव्हते. रेलिंगच्या उजवीकडून एक फ़रसबंदी वाट खालच्या जंगलात उतरत होती. त्या वाटेवरुन डोक्यावर हिरव्या गवताचा भारा घेउन दोघे जण चढून येत होते. आम्हाला बघून ते थांबले. बुरुजवाडीतून चारा घेउन ते माथेरानच्या घोडेवाल्यांना विकायला चालले होते. त्यांना वाट विचारुन घेतली. वाट ठळक आणि मळलेली आहे कुठेही चुकायची शक्यता नाही असे सांगून त्यांने आम्हाला वाटेला लावले.

 

फ़रसबंदी वाट

                                                                

उजव्या हाताला माथेरानच्या डोंगराचा कातळकडा आणि डाव्या हाताला दरी अशी ती वाट उतरत होती. वाटेवर दोन छोटे धबधबे लागले, पण पाऊस नसल्याने पाणी कातळाला चिकटून वहात होते. वाट वरच्या कड्याला समांतर पुढे जात होती. या वाटेने अंदाजे पंधरा मिनिटे उतरल्यावर लिटील चौक पॉइंटच्या खाली आलो. आता वाट कड्यापासून डावीकडे वळून दाट जंगलात शिरली. उंच वृक्षांच्या दाटीतून वळणा वळणाने जाणार्‍या वाटेवर छोटे छोटे ओढे लागत होते. आता आम्ही ढगांच्या बाहेर आलो असलो तरी झाडांचे माथे अजूनही ढगात होते. त्यातून झिरपणार्‍या हिरव्या ओल्या प्रकाशामुळे वातावरण गुढ झाले होते. या वातावरणाने भारल्या सारखे सर्वजण निशब्दपणे उतरत होतो. वृक्षांच्या पायथ्याशी मोकळ्या जागेत झुडपं वाढली होती. त्यावर सुंदर फ़ुलं उमलली होती. सुर्यप्रकाश अजून जंगलात न शिरल्यामुळे फ़ुलपाखरं मात्र दिसत नव्हती. अशा गुढरम्य वातावरणातून अर्धातास चालून जंगलाच्या बाहेर आल्यावर समोर एक छोट पठार पसरलेल होते. पठारावरुन समोर सोंडाई किल्ल्याचा डोंगर, डावीकडे माथेरानच्या गारबेट पॉईंटचा डोंगर दिसत होता. मागे वळून पाहिल्यावर आम्ही चालून आलो ते जंगल पठाराच्या सीमेवर उभे होते आणि त्यामागे माथेरानचा माथा ढगात लपलेला दिसत होता.                 

 

 


थोडी विश्रांती आणि छायाचित्रण करून पठरावरून उतरायला सुरुवात केली. आता उतार तीव्र झाला होता अशा वेळी सोबतीला असणारी कारवीची झुडुपं दोन्ही बाजूला होती. त्यातून चालत १० मिनिटात  कड्याच्या  टोकापाशी पोहोचलो. इथून दिसणारे दृश्य अप्रतिम होते. कड्याच्या बाजूने डोंगराची एक सोंड दरीत झेपावत होती. खाली दुरवर मोरबे धरणाचा जलाशय दिसत होता. त्यावर राखाडी करडे ढग ओथंबून आले होते. समोरच्या बाजूला सोंडाई किल्ल्याचा डोंगर आणि डावीकडे गारबेटचा डोंगर असा मस्त "पॅनोरमा व्हू" इथून  दिसत होता .

चौकी पॉईंट वरुन मोरबे धरण

कारवीतून वाट

पावसामुळे सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण झाली  होती. त्यातही पोपटी ते गर्द हिरवा, अशा हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या. इथे गावकऱ्यांनी दगड, वीटा आणि टाईल्सचे तुकडे वापरून बसण्याकरीता "L" आकारात ओटे बांधलेले आहेत. त्यावर "चौकी पॉईंट" माथेरान अशी अक्षरे कोरलेली आहेत. या वाटेवरून रोज प्रवास करणारे या जागी थोडा वेळ थांबून आपला शीण नक्कीच घालावत असतील, ही जागाच तशी होती . इथून खाली बुरुजवाडी, दांडवाडीतील घर, शेतं आणि त्यामधून धरणाच्या जलशयापर्यंत जाणारा डांबरी रस्ता दिसत होता. माथेरान कडून येणारा एक मोठा ओढा या जलाशयाला मिळत होता. ओढ्यावरच्या पुलाच्या पलीकडे पोखरवाडी गाव दिसत होते.

पठारावरुन सोंडाई किल्ला 


पोखरवाडी पर्यंत अजून मोठा टप्पा गाठायचा होता. त्यामुळे जागेचा मोह सोडून उतारायला सुरुवात  केली. तीव्र उताराचा टप्पा पार करून लांबलचक पठारावर आलो. आता माथेरानच्या  डोंगराच्या पाठून इरशाळ गड दिसायला लागला. पठार संपल्यावर पुन्हा उतरण सुरु झाली. समोरून गावातला एक तरुण  पिकावर फवारणी करण्यासाठी वापरतात तो स्प्रे पंप पाठीवर  घेऊन  चढत  होता. ऑक्टोबर महिन्यात पायवाटेच्या बाजूचे गवत उंच वाढते, त्यामुळे वाटेने जायला त्रास होतो. त्यासाठी गावकरी वर्गणी काढून ही फ़वारणी करतात. त्यामुळे पायवाटेच्या बाजूचे गवत जळून जाते. 

गावाच्या अलिकडे असलेल्या पठारावर एक नितळ पाण्याचा ओढा आडवा आला. त्यात डुंबून पुढे निघालो. बुरुजवाडी आणि दांडवाडी मधून पायवाट डांबरी रस्त्याला लागली. (पायवाटेची सुरुवात लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रस्त्याच्या कडेला ट्रान्सफ़ॉर्मर आहे. त्याच्या बाजूने पायवाट सुरु होते.) इथे डांबरी रस्ता असूनही रिक्षावाल्याने पोखरवाडीच्या पुलापाशी का बोलवले हा प्रश्न आम्हाला पडला. दांडवाडी ओलांडल्यावर डांबरी रस्त्याच्या दुतर्फ़ा भात शेती होती. मागे माथेरानचा माथा अजूनही ढगात गुरफ़टलेला होता. रस्त्याने ५ मिनिटे चालल्यावर उतार सुरु झाला. या उतारावरचा रस्ता पूर्ण उखडलेला होता. हा रस्त्याचा उतार सुरु होतो तेथेच उजव्या बाजूला एक पायवाट खाली उतरत होती त्या पायवाटेने १० मिनिटात पोखरवाडीच्या पुला जवळ पोहोचलो आणि आमचा अर्ध्या दिवसाचा सुंदर ट्रेक संपला.



दांडवाडीतून माथेरान

दांडवाडी ते पोखरवाडी रस्ता

कर्जत - पेण रस्त्यावर  सोंडाई  किल्ल्याकडे जाणारा फाटा आहे. हा रस्ता मोरबे धरणाच्या काठाकाठाने जातो. या रस्त्यावर पोखरवाडी हे गाव आहे. कर्जतहून पोखरवाडीत जाण्यासाठी रिक्षा आणि मारुती व्हॅन मिळतात. पोखरवाडी गावातून सरळ जाणारा रस्ता सोंडाई वाडीकडे जातो तर डाव्या बाजूचा रस्ता दांड वाडी, बुरुजवाडी मार्गे खाटवण पर्यंत जातो. या रस्त्यावर धरणाचे बॅक वॉटर जिथे संपते तिथे माथेरानच्या डोंगरागेतून येणारा एक मोठा ओढा धरणाला मिळतो. या ओढ्यावर असलेला पूल ओलांडल्यावर लगेच उजव्या बाजूला एक पायावाट डोंगरावर जाते. या वाटेने आपण अर्ध्या तासात दांडवाडीत पोहोचतो. दांडवाडी आणि बुरुजवाडीच्या मध्ये डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला ट्रान्सफ़ॉर्मर आहे. त्याच्या बाजूने जाणारी पायवाट माथेरान पर्यंत जाते.

ओढा, पोखरवाडी

रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी हे अंतर उतरुन पार करायला आम्हाला २.३० तास लागले. पोखरवाडी ते रामबाग पॉईंट हे अंतर चढून जाण्यासाठी ३ ते ३.३० तास लागू शकतात. आम्ही केला तो ट्रेक अर्ध्या दिवसाचा होता. हा ट्रेक पूर्ण दिवसाचाही करता येतो. त्यासाठी बुरुजवाडीचा पुढे असलेले खाटवण गाव गाठून तेथून अलेक्झांडर पॉईंट पर्यंत चढाई करावी आणि उतरताना वर सांगितले त्याप्रमाणे रामबाग पॉईंट वरुन खाली उतरावे. 



बळवंतगडाचा वेढा हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
                              https://samantfort.blogspot.com/2016/07/blog-post.html


Photos by :- Amit Samant  © Copy right

Thursday, March 25, 2021

शुकाचार्य (शुकाचारी) ते कोळदुर्ग ( माणदेशातील भटकंती ) Shukacharya (Shukachari Temple) Temple

Shukacharya Temple
Shukacharya Temple

" यु रिच्ड टू युवर डेस्टीनेशन" अस गूगल मॅपवाल्या बाईने सांगितले पण  आम्ही अशा जागी पोहोचलो होतो की, तिन्ही बाजूने डोंगर होते आणि रस्त्याचा "द एंड" झालेला. कोळादुर्ग, शुकाचार्य आणि बाणूरगड करुन दुपारी गोंदवल्याला प्रसादासाठी पोहोचायचे हा मुळ प्लान होता. त्यामुळे आज ट्रेक न करता थेट किल्ल्यावर गाडीने  जाऊन किल्ला पाहायचा असा आरामाचा प्लान बनवलेला होता. भर मार्च मध्ये या दुष्काळी भागात ट्रेक करण तसही सुखावह नव्हते. पण आपण ठरवतो एक आणि गूगलच्या मनात वेगळच असते याची प्रचिती आली.


रस्ता संपला तेथे डाव्या बाजूला एक गोशाळा होती. सकाळी सकाळी आमची गाडी बघून गोशाळेतून भगवी वस्त्र परिधान केलेले साधू बाहेर आले. कोळदुर्गाबद्दल त्यांना विचारल्यावर समोरच्या डोंगराकडे त्यांनी बोट दाखवले. तिथून गडावर जायला पायवाट होती पण माझ्या बरोबर बायको आणि मुलाला पाहून तुम्हाला जमणार नाही असे सांगून त्यांनी जवळ असलेल्या शुकाचार्याचे दर्शन घेऊन मग गाडीने पूर्ण वळसा मारुन कोळदुर्गावर जा असा त्यांनी सल्ला दिला. इतकी भटकंती करतांना मी सहसा स्थानिकांनी दिलेला सल्ला धुडकावत नाही. एक तर त्या भागात आपण नविन असतो. तिथल्या खाचाखोचा त्यांना माहिती असतात आणि कधी मदतीची गरज पडली तर हिच  लोक मदतीला येतात.

पायर्‍यांचा मार्ग ,शुकाचार्य

गोशाळे  जवळून सिमेंट मध्ये बांधलेल्या पायर्‍यांनी १० मिनिटात थेट शुकाचार्य समाधी मंदिरापाशी पोहोचलो. मंदिराचा परिसर दोन डोंगरांमधील घळीत  गर्द झाडीत आहे .(या भागातील बरीच मंदिरे डोंगर माथ्यावर आहेत.) मंदिरा जवळ बारमाही वाहाणारा झरा आहे. या झर्‍याच्या पाण्याची संततधार गोमुखातून कुंडात जमा होते. शुकाचार्यांचे समाधी मंदिर दगडी बांधणीचे आहे. मंदिरात शंकराची पिंड आहे. हे शुकाचार्यांचे तपस्थान आहे. व्यास ऋषींचे पुत्र शुकाचार्य यांची ही तपोभुमी आहे. कार्तिकेय, मारुती, भिष्माचार्य आणि शुकाचार्य हे चार ब्रम्हवेत्ते मानले जातात. शुकाचार्यांनी याठिकाणी पांडवांचे पणतू राजा परिक्षित याला सदगती मिळावी याकरिता सात दिवसात श्रीमद भागवत सांगितले होते . 

गुहा, शुकाचार्य

मंदिराचे अवशेष , शुकाचार्य 

गोमुख आणि कुंड , शुकाचार्य 








शुकाचार्य या ठिकाणी तपाला बसलेले असताना त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने अप्सरेला पाठवले. त्यावेळी शुकाचार्य या मंदिरात अंतर्धान पावले ,अशी आख्यायिका आहे. या मंदिराच्या डोंगराकडील बाजूच्या भिंतीत शुकाचार्यांची पाठमोरी प्रतिमा (आकॄती) दिसते. अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्याची पूजा केली जाते.  या मंदिराच्या बाजूला एका खडकात गुहा कोरलेली आहे. या गुहेतही एक पिंड आहे.  गुहे समोर एक समाधी आहे, त्यावर पिंड कोरलेली आहे. मंदिराच्या समोरील पारावर जून्या देवळाचे अवशेष आणि तुटलेल्या मुर्ती  ठेवलेल्या आहेत.  त्यात गणपती, विष्णु, व्याल, सर्पशिल्प, मंदिराच्या कळसाचा भाग इत्यादी गोष्टी आहेत. पारासाठी वापरलेल्या एका दगडावर " श्री शुकदेव देवस्थान" अशी अक्षर कोरलेली आहेत.  

अठराव्या शतकात नारायणगिरी व किसनगिरी यांचे याठिकाणी वास्तव्य होते. जंगलात सापडणार्‍या वन औषधींपासून त्यांनी विंचू दंशावर उतारा देणारे औषध शोधले. या भागातील स्थानिक आजही ते औषध वापरतात.   






येथील गर्द झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, गोमुखातून कुंडात पडणार्‍या पाण्याचा नाद यामुळे आपण हळूहळू अंतर्मुख होत जातो. या शांत आणि रम्य परिसरातून आमचा पाय निघत नव्हता.  पण  कोळदुर्ग गाठायचा असल्याने थोड्या वेळाने वरच्या बाजूला असलेल्या रस्त्याकडे जाणार्‍या पायर्‍या चढायला  सुरुवात केली. १० पायर्‍या चढल्यावर दोन गावकरी भेटले. त्यांना कोळदुर्गावर जाण्याचा जवळाचा रस्ता विचारल्यावर त्यांनी पायर्‍यांजवळ  असलेली पायवाट दाखवली . त्यांची आणि आमची योग्य जागी भेट झाली होती. पायवाटेने  गर्द झाडीतून ५ मिनिटे चालल्यावर घळीच्या बाजूला असलेल्या डोंगरापाशी पोहोचलो. थोडे चढून गेल्यावर एक ६ फ़ूटी कातळटप्पा लागला. तो जपून चढून गेल्यावर मागे नजर टाकली. खाली गर्द झाडी आणि त्यातून डोकावणारे शुकाचार्याचे मंदिर सुंदर दिसत होते. आम्हाला वाट दाखवणारे गावकरी आम्ही कातळटप्पा चढून जाईपर्यंत आमच्यावर लक्ष ठेऊन पायर्‍यांवर उभे होते, त्यांचा हात हालवून निरोप घेतला आणि पाच मिनिटाची चढाई करुन पठारावर आलो. समोर दुरवर एक सिमेंट मध्ये बांधलेले मंदिर दिसत होते. मंदिरातील दत्त मुर्तीचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागिल पायवाटेने पुढे चालायला सुरुवात  केल्यावर दोन पायवाटा लागल्या. सरळ जाणारी वाट कुसबावडे गावात जाते. तर उजव्या बाजूला जाणारी वाट कोळदुर्गकडे जाते.

कातळटप्पा, कोळदुर्ग 

पठारावरुन शुकाचार्य परिसर

पठारावरील दत्तमंदिर 

उजव्या दिशेला चालायला सुरुवात केली . माण - खटाव तालुक्याचे व्यवच्छेदक लक्षण असलेला उघडा बोडका माळ आणि  त्यावर पसरलेली खुरटी झुडप यातून वाट काढत निघालो. वाटेत अनेक मोरपिसं पडलेली मिळाली. याभागात मोरांचा वावर असावा. मगाशी भेटलेल्या गावकर्‍यांनी याभागात रात्रीच्या वेळी तरस फ़िरतात असे सांगितले. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पठाराच्या टोकावर आलो. समोर किल्ल्याचे पठार दिसत होते. या दोन पठारांमध्ये २०० - ३०० फ़ूट लांबीचा  दरी सारखा  खोलगट भाग होता. त्यात शेती केलेली होती. खोलगट भागात उतरुन शेताच्या बांधावरुन तो पार केला. समोरचा चढ चढून गेल्यावर मोठ मोठाल्या खडकांची रचीव तटबंदी दिसली. तटबंदीच्या बाजूने गडावर प्रवेश केला.

पठारावरुन दिसणारा कोळदुर्ग 

दरी, कोळदुर्ग 

तटबंदी ,कोळदुर्ग 

गडावर दूरवर पसरलेले पठार आणि त्यावर दोन घरे  दिसत होती.  घराजवळ पोहोचे पर्यंत कुत्र्यांनी भुंकून भूंकून वात आणला होता.  किल्ल्यावरची दोन्ही घर चव्हाणांची आहेत. या घरांच्या मागच्या बाजूला म्हणजेच कोळदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेले पठार पळशी - बाणूरगड रस्त्याला जोडलेले आहे. कोळदुर्गाच्या इतर तीन बाजूना मात्र कडे आहेत.  रस्त्यापासून किल्ल्यापर्यंत चालत जायला १५ मिनिटे लागतात.  या मार्गानेच गाडीने थेट किल्ल्यावर यायचा आमचा प्लान होता पण मधेच नेटवर्क गेल्याने गुगल गंडले आणि भिवघाट गावातून भिवगड - पळशी - कोळदुर्ग या राज रस्त्याने थेट गडावर जाण्याची वाट सोडून रिरुट करुन नेलकरंजी - गोमेवाडी मार्गे हिवतड गावातील गोशाळे जवळ म्हणजे कोळदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील पायथ्याशी आणून सोडले होते.

अवशेष ,कोळदुर्ग 

पळशी - बाणूरगड  मार्गाने आल्यास किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश होतो. याठिकाणी दोन बुरुजांचे व तटबंदीचे अवशेष आहेत. तेथून थेट चव्हाणांच्या वस्ती पर्यंत पोहोचता येते.  या घरच्या समोरच्या बाजूला थोडे चालत गेल्यावर किल्ल्यावरील देवळाचे काही अवशेष, पिंड, तुटलेला नंदी, दोन वीरगळ आणि एक सतीगळ पाहायला मिळते. येथील इतर अवशेष, मुर्ती आणि वीरगळ ग्रामस्थांनी परळी येथील सिध्देशवर मंदिराच्या गाभार्‍याच्या भिंतीत बसवलेल्या आहेत.  हे पुरातन अवशेष पाहून पुढे गेल्यावर खालच्या बाजूला तलाव आहे.  तलावाचा बांध फ़ोडून तलावाच्या खोलगट जागी आता शेती केली जाते. या किल्ल्याच्या उत्तरेला कड्या लगत तुरळक तटबंदी आहे. किल्ल्याचा घेर फ़ार मोठा आहे पण किल्ल्यावर इतर काही अवशेष दृष्टीस पडत नाहीत. किल्ल्यावरुन उत्तरेला बाणूरगडावरील मंदिर दिसते.

कोळदुर्ग ते हिवतड वाट

किल्ला पाहून झाल्यावर पुन्हा चव्हाणांच्या घरापाशी आलो. आमची गाडी गोशाळेपाशी आहे हे कळल्यावर त्यांच्यापैकी एकजण जवळची पायवाट दाखवायला आला. चव्हाणांच्या घरासमोर असलेल्या किल्ल्याच्या पूर्व टोकावरून एक ठळक पायवाट खालच्या हिवतड गावात उतरते. या वाटेने १० मिनिटात गोशाळेपाशी पोहोचलो.  अशा प्रकारे शुकाचार्य मंदिर ते कोळदुर्ग ते गोशाळा असा १ तासाचा सोपा ट्रेक गूगल आणि साधू महाराजांच्या कृपेने झाला.

हिवतड गावातून कोळदुर्ग

जाण्यासाठी :-

कोळदुर्ग - शुकाचार्य आणि  बाणूरगड ही तिन्ही ठिकाणे एका दिवसात पाहाता येतात. कोळदुर्गावर जाण्यासाठी प्रथम कराड गाठावे. कराड - पंढरपूर रस्त्याने (४२ किमी वरील) विटा गाव गाठावे विटा गावातून थेट बाणूर गडावर जाण्यासाठी एसटी बसेस आहेत. या बसने शुकाचार्यला उतरावे. खाजगी वहान असल्यास विटा गावाच्या पुढे २२ किमीवरील खानापूर हे तालुक्याचे गाव गाठावे. खानापूरच्या पुढे भिवघाट गाव आहे त्यापूढे शुकाचार्य, पळशी आणि बाणूरगडाचा फ़ाटा १० किमीवर आहे. पळशीच्या सिध्देशवर मंदिराच्या गाभार्‍याच्या भिंतीत कोळदुर्ग वरुन आणलेल्या मुर्ती आणि वीरगळी बसवलेल्या आहेत. त्या पाहून ४ किमी अंतरावरील शुकाचार्य गाठावे. शुकाचार्यच्या बाजूच्या डोंगरावर कोळदुर्ग आहे. खाजगी वहानाने थेट बाणूर गडावर जाता येते. 

(माणदेशातील किल्ले भाग - १ हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा )

https://samantfort.blogspot.com/2018/10/vardhangad-mahimangad-bhushangad.html




सिध्देश्वर मंदिर परळी येथील भिंतीतील वीरगळ आणि मुर्ती

Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 

विशेष आभार :- संग्राम बारावकर, आटपाडी