Thursday, March 25, 2021

शुकाचार्य (शुकाचारी) ते कोळदुर्ग ( माणदेशातील भटकंती ) Shukacharya (Shukachari Temple) Temple

Shukacharya Temple
Shukacharya Temple

" यु रिच्ड टू युवर डेस्टीनेशन" अस गूगल मॅपवाल्या बाईने सांगितले पण  आम्ही अशा जागी पोहोचलो होतो की, तिन्ही बाजूने डोंगर होते आणि रस्त्याचा "द एंड" झालेला. कोळादुर्ग, शुकाचार्य आणि बाणूरगड करुन दुपारी गोंदवल्याला प्रसादासाठी पोहोचायचे हा मुळ प्लान होता. त्यामुळे आज ट्रेक न करता थेट किल्ल्यावर गाडीने  जाऊन किल्ला पाहायचा असा आरामाचा प्लान बनवलेला होता. भर मार्च मध्ये या दुष्काळी भागात ट्रेक करण तसही सुखावह नव्हते. पण आपण ठरवतो एक आणि गूगलच्या मनात वेगळच असते याची प्रचिती आली.


रस्ता संपला तेथे डाव्या बाजूला एक गोशाळा होती. सकाळी सकाळी आमची गाडी बघून गोशाळेतून भगवी वस्त्र परिधान केलेले साधू बाहेर आले. कोळदुर्गाबद्दल त्यांना विचारल्यावर समोरच्या डोंगराकडे त्यांनी बोट दाखवले. तिथून गडावर जायला पायवाट होती पण माझ्या बरोबर बायको आणि मुलाला पाहून तुम्हाला जमणार नाही असे सांगून त्यांनी जवळ असलेल्या शुकाचार्याचे दर्शन घेऊन मग गाडीने पूर्ण वळसा मारुन कोळदुर्गावर जा असा त्यांनी सल्ला दिला. इतकी भटकंती करतांना मी सहसा स्थानिकांनी दिलेला सल्ला धुडकावत नाही. एक तर त्या भागात आपण नविन असतो. तिथल्या खाचाखोचा त्यांना माहिती असतात आणि कधी मदतीची गरज पडली तर हिच  लोक मदतीला येतात.

पायर्‍यांचा मार्ग ,शुकाचार्य

गोशाळे  जवळून सिमेंट मध्ये बांधलेल्या पायर्‍यांनी १० मिनिटात थेट शुकाचार्य समाधी मंदिरापाशी पोहोचलो. मंदिराचा परिसर दोन डोंगरांमधील घळीत  गर्द झाडीत आहे .(या भागातील बरीच मंदिरे डोंगर माथ्यावर आहेत.) मंदिरा जवळ बारमाही वाहाणारा झरा आहे. या झर्‍याच्या पाण्याची संततधार गोमुखातून कुंडात जमा होते. शुकाचार्यांचे समाधी मंदिर दगडी बांधणीचे आहे. मंदिरात शंकराची पिंड आहे. हे शुकाचार्यांचे तपस्थान आहे. व्यास ऋषींचे पुत्र शुकाचार्य यांची ही तपोभुमी आहे. कार्तिकेय, मारुती, भिष्माचार्य आणि शुकाचार्य हे चार ब्रम्हवेत्ते मानले जातात. शुकाचार्यांनी याठिकाणी पांडवांचे पणतू राजा परिक्षित याला सदगती मिळावी याकरिता सात दिवसात श्रीमद भागवत सांगितले होते . 

गुहा, शुकाचार्य

मंदिराचे अवशेष , शुकाचार्य 

गोमुख आणि कुंड , शुकाचार्य 








शुकाचार्य या ठिकाणी तपाला बसलेले असताना त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने अप्सरेला पाठवले. त्यावेळी शुकाचार्य या मंदिरात अंतर्धान पावले ,अशी आख्यायिका आहे. या मंदिराच्या डोंगराकडील बाजूच्या भिंतीत शुकाचार्यांची पाठमोरी प्रतिमा (आकॄती) दिसते. अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्याची पूजा केली जाते.  या मंदिराच्या बाजूला एका खडकात गुहा कोरलेली आहे. या गुहेतही एक पिंड आहे.  गुहे समोर एक समाधी आहे, त्यावर पिंड कोरलेली आहे. मंदिराच्या समोरील पारावर जून्या देवळाचे अवशेष आणि तुटलेल्या मुर्ती  ठेवलेल्या आहेत.  त्यात गणपती, विष्णु, व्याल, सर्पशिल्प, मंदिराच्या कळसाचा भाग इत्यादी गोष्टी आहेत. पारासाठी वापरलेल्या एका दगडावर " श्री शुकदेव देवस्थान" अशी अक्षर कोरलेली आहेत.  

अठराव्या शतकात नारायणगिरी व किसनगिरी यांचे याठिकाणी वास्तव्य होते. जंगलात सापडणार्‍या वन औषधींपासून त्यांनी विंचू दंशावर उतारा देणारे औषध शोधले. या भागातील स्थानिक आजही ते औषध वापरतात.   






येथील गर्द झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, गोमुखातून कुंडात पडणार्‍या पाण्याचा नाद यामुळे आपण हळूहळू अंतर्मुख होत जातो. या शांत आणि रम्य परिसरातून आमचा पाय निघत नव्हता.  पण  कोळदुर्ग गाठायचा असल्याने थोड्या वेळाने वरच्या बाजूला असलेल्या रस्त्याकडे जाणार्‍या पायर्‍या चढायला  सुरुवात केली. १० पायर्‍या चढल्यावर दोन गावकरी भेटले. त्यांना कोळदुर्गावर जाण्याचा जवळाचा रस्ता विचारल्यावर त्यांनी पायर्‍यांजवळ  असलेली पायवाट दाखवली . त्यांची आणि आमची योग्य जागी भेट झाली होती. पायवाटेने  गर्द झाडीतून ५ मिनिटे चालल्यावर घळीच्या बाजूला असलेल्या डोंगरापाशी पोहोचलो. थोडे चढून गेल्यावर एक ६ फ़ूटी कातळटप्पा लागला. तो जपून चढून गेल्यावर मागे नजर टाकली. खाली गर्द झाडी आणि त्यातून डोकावणारे शुकाचार्याचे मंदिर सुंदर दिसत होते. आम्हाला वाट दाखवणारे गावकरी आम्ही कातळटप्पा चढून जाईपर्यंत आमच्यावर लक्ष ठेऊन पायर्‍यांवर उभे होते, त्यांचा हात हालवून निरोप घेतला आणि पाच मिनिटाची चढाई करुन पठारावर आलो. समोर दुरवर एक सिमेंट मध्ये बांधलेले मंदिर दिसत होते. मंदिरातील दत्त मुर्तीचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागिल पायवाटेने पुढे चालायला सुरुवात  केल्यावर दोन पायवाटा लागल्या. सरळ जाणारी वाट कुसबावडे गावात जाते. तर उजव्या बाजूला जाणारी वाट कोळदुर्गकडे जाते.

कातळटप्पा, कोळदुर्ग 

पठारावरुन शुकाचार्य परिसर

पठारावरील दत्तमंदिर 

उजव्या दिशेला चालायला सुरुवात केली . माण - खटाव तालुक्याचे व्यवच्छेदक लक्षण असलेला उघडा बोडका माळ आणि  त्यावर पसरलेली खुरटी झुडप यातून वाट काढत निघालो. वाटेत अनेक मोरपिसं पडलेली मिळाली. याभागात मोरांचा वावर असावा. मगाशी भेटलेल्या गावकर्‍यांनी याभागात रात्रीच्या वेळी तरस फ़िरतात असे सांगितले. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पठाराच्या टोकावर आलो. समोर किल्ल्याचे पठार दिसत होते. या दोन पठारांमध्ये २०० - ३०० फ़ूट लांबीचा  दरी सारखा  खोलगट भाग होता. त्यात शेती केलेली होती. खोलगट भागात उतरुन शेताच्या बांधावरुन तो पार केला. समोरचा चढ चढून गेल्यावर मोठ मोठाल्या खडकांची रचीव तटबंदी दिसली. तटबंदीच्या बाजूने गडावर प्रवेश केला.

पठारावरुन दिसणारा कोळदुर्ग 

दरी, कोळदुर्ग 

तटबंदी ,कोळदुर्ग 

गडावर दूरवर पसरलेले पठार आणि त्यावर दोन घरे  दिसत होती.  घराजवळ पोहोचे पर्यंत कुत्र्यांनी भुंकून भूंकून वात आणला होता.  किल्ल्यावरची दोन्ही घर चव्हाणांची आहेत. या घरांच्या मागच्या बाजूला म्हणजेच कोळदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेले पठार पळशी - बाणूरगड रस्त्याला जोडलेले आहे. कोळदुर्गाच्या इतर तीन बाजूना मात्र कडे आहेत.  रस्त्यापासून किल्ल्यापर्यंत चालत जायला १५ मिनिटे लागतात.  या मार्गानेच गाडीने थेट किल्ल्यावर यायचा आमचा प्लान होता पण मधेच नेटवर्क गेल्याने गुगल गंडले आणि भिवघाट गावातून भिवगड - पळशी - कोळदुर्ग या राज रस्त्याने थेट गडावर जाण्याची वाट सोडून रिरुट करुन नेलकरंजी - गोमेवाडी मार्गे हिवतड गावातील गोशाळे जवळ म्हणजे कोळदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील पायथ्याशी आणून सोडले होते.

अवशेष ,कोळदुर्ग 

पळशी - बाणूरगड  मार्गाने आल्यास किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश होतो. याठिकाणी दोन बुरुजांचे व तटबंदीचे अवशेष आहेत. तेथून थेट चव्हाणांच्या वस्ती पर्यंत पोहोचता येते.  या घरच्या समोरच्या बाजूला थोडे चालत गेल्यावर किल्ल्यावरील देवळाचे काही अवशेष, पिंड, तुटलेला नंदी, दोन वीरगळ आणि एक सतीगळ पाहायला मिळते. येथील इतर अवशेष, मुर्ती आणि वीरगळ ग्रामस्थांनी परळी येथील सिध्देशवर मंदिराच्या गाभार्‍याच्या भिंतीत बसवलेल्या आहेत.  हे पुरातन अवशेष पाहून पुढे गेल्यावर खालच्या बाजूला तलाव आहे.  तलावाचा बांध फ़ोडून तलावाच्या खोलगट जागी आता शेती केली जाते. या किल्ल्याच्या उत्तरेला कड्या लगत तुरळक तटबंदी आहे. किल्ल्याचा घेर फ़ार मोठा आहे पण किल्ल्यावर इतर काही अवशेष दृष्टीस पडत नाहीत. किल्ल्यावरुन उत्तरेला बाणूरगडावरील मंदिर दिसते.

कोळदुर्ग ते हिवतड वाट

किल्ला पाहून झाल्यावर पुन्हा चव्हाणांच्या घरापाशी आलो. आमची गाडी गोशाळेपाशी आहे हे कळल्यावर त्यांच्यापैकी एकजण जवळची पायवाट दाखवायला आला. चव्हाणांच्या घरासमोर असलेल्या किल्ल्याच्या पूर्व टोकावरून एक ठळक पायवाट खालच्या हिवतड गावात उतरते. या वाटेने १० मिनिटात गोशाळेपाशी पोहोचलो.  अशा प्रकारे शुकाचार्य मंदिर ते कोळदुर्ग ते गोशाळा असा १ तासाचा सोपा ट्रेक गूगल आणि साधू महाराजांच्या कृपेने झाला.

हिवतड गावातून कोळदुर्ग

जाण्यासाठी :-

कोळदुर्ग - शुकाचार्य आणि  बाणूरगड ही तिन्ही ठिकाणे एका दिवसात पाहाता येतात. कोळदुर्गावर जाण्यासाठी प्रथम कराड गाठावे. कराड - पंढरपूर रस्त्याने (४२ किमी वरील) विटा गाव गाठावे विटा गावातून थेट बाणूर गडावर जाण्यासाठी एसटी बसेस आहेत. या बसने शुकाचार्यला उतरावे. खाजगी वहान असल्यास विटा गावाच्या पुढे २२ किमीवरील खानापूर हे तालुक्याचे गाव गाठावे. खानापूरच्या पुढे भिवघाट गाव आहे त्यापूढे शुकाचार्य, पळशी आणि बाणूरगडाचा फ़ाटा १० किमीवर आहे. पळशीच्या सिध्देशवर मंदिराच्या गाभार्‍याच्या भिंतीत कोळदुर्ग वरुन आणलेल्या मुर्ती आणि वीरगळी बसवलेल्या आहेत. त्या पाहून ४ किमी अंतरावरील शुकाचार्य गाठावे. शुकाचार्यच्या बाजूच्या डोंगरावर कोळदुर्ग आहे. खाजगी वहानाने थेट बाणूर गडावर जाता येते. 

(माणदेशातील किल्ले भाग - १ हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा )

https://samantfort.blogspot.com/2018/10/vardhangad-mahimangad-bhushangad.html




सिध्देश्वर मंदिर परळी येथील भिंतीतील वीरगळ आणि मुर्ती

Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 

विशेष आभार :- संग्राम बारावकर, आटपाडी



Sunday, February 7, 2021

चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती) One day trek near Mumbai, Nashik

उंबरदरा

अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर हे घाटमाथ्यावरचे प्राचीन गाव. सध्याच्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे गाव प्राचीन व्यापारी मार्गावर आहे. या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या अलंग - मदन - कुलंग या दुर्ग त्रिकुटापैकी अलंगच्या कुशीत वसलेले मुळ गाव धरणामुळे आता विस्थापित झालेले आहे. पूर्वीच्या काळी व्यापा‍र्‍यांचे तांडे सह्याद्रीची डोंगररांग पार करुन घाटघर गावात विश्रांतीसाठी थांबत असत. त्यासाठी प्राचीन काळापासून आजपर्यंत चोंढ्या घाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), घाटनदेवी घाट (पायथ्याचे गाव :- मेट), निसणीची वाट, नळीची वाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), ऊंबरदरा (पायथ्याचे गाव :- चोंढ्या) या चार घाटवाटा अस्तित्वात आहेत. 

चोंढ्या घाट

आसनगाव मार्गे शहापूरहून देहेणे गाठले . देहेणे गावाच्या पुढे रस्त्याला दोन फाटे फुटतात. एक आजोबा डोंगराकडे जातो, तर दुसरा चोंढ्या धरणाकडे जातो. चोंढ्या गाव पार केले की घाट सुरु होतो. या रस्त्यालाही दोन फाटे फुटतात. एक धरणाच्या भिंतीकडे जातो, तर दुसरा रस्ता वर चढत स्वीच यार्डकडे जातो. नळीची वाट आणि उंबरदऱ्याची वाट या घाटघरला जाणार्‍या वाटा या स्वीच यार्डच्या आसपास उतरतात. देहेणे गावापासून धरणा पर्यंतचे अंतर ७ किलोमीटर आहे तर चोंढ्या गावापासून ५ किलोमीटर आहे. आम्ही आमची चढाई चोंढ्या घाटातून करणार होतो. त्याची नक्की सुरुवात कुठे होते हे आम्हाला माहिती नव्हते . धरणाच्या वरच्या बाजूला आल्यावर रस्त्याच्या बाजूला पार्कींगसाठी भरपूर मोकळी जागा ठेवलेली दिसली. येथून खाली धरणाची भिंत, त्या मागचा जलाशय आणि मागे आकाशात अंगठा उंचावलेले शिपनूर शिखर दिसत होते. शिपनूरपासून सुरु झालेल्या डोंगरांगेने जलाशयाला वेढा घातला होता. जलाशयाच्या स्तब्ध पाण्यावर या सगळ्याचे पडलेले प्रतिबिंब सकाळच्या कोवळ्या उन्हात एखाद्या सुंदर चित्रासारखेच दिसत होते .  आम्ही उभे असलेल्या या "डॅम व्ह्यू पॉईंट " (स्थानिक लोक याला एम (M) पॉईंट म्हणतात) पासून एक पायवाट धरणाच्या भिंतीपर्यंत गेली होती. या भिंतीपर्यंत जाऊन तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांना वाट विचारावी म्हणून खाली उतरुन गेलो. पण तेथे कोणी नव्हते. पुन्हा गाडी पाशी येउन डोंगराच्या दिशेला थोडी शोधाशोध केल्यावर एक पायऱ्याची वाट दिसली. हीच चोंढ्या घाटाची वाट होती. रितसर वाटेला लागलो. घाटवाटेच्या पहील्या १०० एक पायऱ्या व्यवस्थित सिमेंट मध्ये बांधून काढलेल्या आहेत. या भागात दोन धरण आहेत. घाट माथ्यावर घाटघर धरण आणि कोकणात चोंढ्या धरण. घाटघर धरणात साठलेले पाणी दिवसा पाईपां मार्फत चोंढ्या धरणात आणले जाते . त्यावर टर्बाईन्स फिरवून वीज निर्मिती केली जाते. रात्रीच्या वेळी वीजेची मागणी घटल्यावर, हिच तयार होणारी वीज वापरुन चोंढ्या धरणातील पाणी पंपाव्दारे पुन्हा घाटघर धरणात भरले जाते. अशाप्रकारे पाण्याचे एका धरणातून दुसऱ्या धरणात दिवस रात्र चक्र चालू असल्याने दोन्ही धरणांच्या पाणी साठ्याच्या पातळीत दिवसा व रात्री फरक पडतो .


भातखळा

पायऱ्या संपल्यानंतर आम्ही एका मोठ्या वीजेच्या टॉवर खाली आलो. धरणाच्या पाण्यावर तयार झालेली वीज ग्रीडशी जोडण्यासाठी हे टॉवर्स उभारलेले आहेत. टॉवरच्या पुढे पायवाट एका मोकळ्या पठारावर आली. समोरुन घाटवाट उतरुन एक गावकरी येत होता. त्याच्याकडून ही वाट बरोबर असल्याची खात्री केली. गावकरी या वाटेने तासभरात घाटघरला पोहोचतात असे त्याने सांगितले. आम्ही उभे होतो. त्या पठाराला  "भातखळा" म्हणतात असेही त्याने सांगितले . अशा घाटवाटांवर गावकऱ्यांचे नेहमीचे विश्रांतीचे टप्पे असतात आणि त्यांना स्थानिक नावही असतात. जिथे दम खाण्यासाठी, थोडा विसावा घेण्यासाठी थांबतात. अशा ठिकाणी बऱ्याचदा एखादा डेरेदार वृक्ष आणि बसण्याजोगा एखादा खडक तरी नक्कीच असतो.  चोंढ्या धरणाच्या जागी गाव असताना या भागात भात शेती केली जात होती म्हणून हा "भाताचा खळा" . याचा पुढचा स्टॉप "आंब्याचा मोढा" आणि त्यानंतरचा "म्हसोबा" हेही त्याच्याकडून कळले. तिथे फोनची रेंज होती. त्यामुळे घाटघर मधल्या एकनाथला फोन केला . दुपारचे जेवण त्याच्याकडे सांगितले होते आणि उंबरदर्‍याच्या वाटेने तोच आम्हाला खाली घेउन येणार होता. एकनाथ म्हसोबा जवळ भेटतो बोलला . 

Shipnur , Ajoba from Chondya ghaat
शिपनुर-आजोबा-चोंढ्या धरण

पठार पार करुन दाट झाडीत शिरलो. वाट मळलेली होती. गप्पा मारत, रमतगमत चढत होतो. आता शिपनूरच्या मागे आजोबाचे शिखर दिसत होते. तासाभरात म्हसोबापाशी पोहोचलो . येथे एका अनघड दगडाला शेंदूर लावलेला. त्या ठिकाणी उदबत्यांची पाकीटे. दिवे, माचीसचे बॉक्स पडलेले होते. म्हसोबाच्या मागच्या बाजूला असलेल्या खड्कावर एका झाडाच्या मनगट एवढ्या मुळाने वेटोळा घातलेला होता . त्यावर या उघड्या आभाळा खालच्या देवळाची घंटा बांधलेली होती. घाटवाटांवर प्रवास सुखकर आणि निर्धोक व्हावा यासाठी अशाप्रकारचे अनघड दगडांचे देवी देवता स्थापन केलेले पाहायला मिळतात. आधुनिक घाट रस्त्यांवरही छोटी देवळं पाहायला मिळतात.    

म्हसोबा 

एकनाथने म्हसोबासमोर अगरबत्ती लावली. म्हसोबा पासून तीन वाटा फ़ुटतात.  सरळ जाणारी वाट घाटघर गावात जात होती. उजवीकडे जाणारी वाट कोकणकड्याकडे जात होती आणि डावीकडे जाणारी वाट म्हसोबाच्या बाजूने पाण्याकडे जात होती. डावीकडच्या वाटेने थोडे उतरुन गेल्यावर समोर डोंगराचा कातळकडा उभा ठाकला होता. याठिकाणी कातळात चर खोदून एक छोटासा खड्डा बनवलेला होता. कातळातून झिरपणारे पाणी चरातून या खड्ड्यात जमा होईल अशी योजना होती. पण जानेवारीतही  याठिकाणी पाणी नव्हते, पण ठिकाण सुंदर होते.  


पुन्हा म्हसोबापाशी येऊन उजवीकडील प्रशस्त वाट पकडली या वाटेवर कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. आता धरणात बुडालेल्या मुळ घाटघर गावाकडे जाणारी ही प्राचीन वाट होती. यावाटेने पाच मिनिटे चढून गेल्यावर पठारावर पोहोचलो. याठिकाणी पाण्याची दोन टाकी आहेत. एक कड्या लगत आहे. दुसरे त्याच्या थोडे वऱच्या बाजूला आहे. याठिकाणाहून मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत होता. पाठीवरच्या सॅक उतरवून सर्वजण समोरचा नजारा पाहात बसलो. कड्यावर काही गावकरी बायका आणि पुरुषही विखरुन बसले होते. त्यांनाही भर उन्हात हा नजारा बघत बसलेले बघून आश्चर्य वाटले. कारण डोंगर, दर्‍या, निसर्ग या त्यांच्या नेहमीच्या जगण्यातल्या गोष्टी असल्यामुळे त्यांना आपल्या शहरी लोकांसारखे अप्रुप नसते. या लोकांचे एकनाथकडे कौतुक केल्यावर तो बोलला काही नेटवर्कची रेंज इथेच मिळते त्यामुळे मोबाईलवर बोलायला गावातले लोक इथपर्यंत येतात.    

पाण्याची दोन टाकी 



पठारावरुन गावची वाट धरली. वाटेत सुंदर जांभळ्या, गुलाबी रंगांच्या छोट्या फ़ुलांच्या गुच्छांनी लगडलेली झाडं दिसत होती. त्या फ़ुलांचा सडा खालच्या कातळावर पडून तोही जांभळा झाला होता. गावकरी या झाडाला करप या नावाने ओळखतात. हे अंजनाचे (Memecylon umbellatum) झाडं होते. त्याची सुंदर फ़ुलं बघुन गोविंदाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवल्या.


अंजन 

ऱाकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा , फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा !!


अंजनाच्या कळ्या 

Memecylon umbellatum


एक उंचवटा चढून झाडीतून बाहेर आलो. गावातल्या घरांच्या पार्श्वभूमीवर समोर अलंग - मदन - कुलंगचे दुर्ग त्रिकुट उठून दिसत होते. 

अलंग - मदन - कुलंग

एकनाथच्या सारवलेल्या अंगणात "सॅका" टाकून थेट जेवायला बसलो . भाकरी पिठले , चटणी , कांदा अशा गावरान मेन्यूवर यथेच्छ आडवा हात मारुन अंगणात आडवे झालो . अशा वेळी निघणाऱ्या जुन्या ट्रेकच्या आठवणी , पुढच्या अनेक ट्रेकचे हवेतल प्लानिंग त्यावर चर्चा झाली . भर दुपारी डांबरी सडकेवर येउन कोकणकड्याच्या दिशेने वाटचाल चालू केली . 


घाटघर धरणाच्या जलायशयाच्या बाजूने जाताना एकनाथने मुळ गावाची जागा दाखवली . रात्री पंपिंग करुन खालच्या धरणातले पाणी वरच्या धरणात कुठपर्यंत चढते तेही दाखवले. मुख्य रस्ता सोडून दाट झाडीतल्या पायवाटेने इरीगेशन डिपार्टमेंटच्या इमारतीना वळसा घालून कोकणकड्यावर पोहोचलो . तेथे कड्यावर सुरक्षेसाठी लांबच्या लांब उंच लोखंडी ग्रील बसवलेले आहे . त्यामुळे तेथून लगेच काढता पाय घेतला आणि पुढे उंबरदरा पॉइंटच्या दिशेने निघालो . वाट दाट झाडीतून होती . उंबरदरा पॉईंटच्या अगोदर वाट खाली एका छोट्याश्या घळीत उतरली.  तेथे एका खाचेत पाण्याचा झरा अचानक प्रकट झाला होता. त्या वाहात्या थंडगार पाण्याने  बाटल्या भरुन घेतल्या . 

झरा

एक चढ चढून गेल्यावर उंबरदरा पॉईंट पाशी पोहोचले येथे  लोखंडी पाईपांचे रेलिंग बसवलेले होते . तेथून डोंगराच्या बेलाग कड्यामधील घळीतून खालचे धरण दिसत होते. ऱेलींग ओलांडून पायवाटेला लागलो . उंबराच्या दाट झाडीतून बाहेर आलो आणि दोन्ही बाजूला सरसरुन आकाशाला भिडलेले सरळसोट कातळकडे . त्यावरुन वर्षानुवर्षे निखळलेल्या खडकांची खालपर्यंत परसलेली रास त्यातून खळखळाट करत वहाणारे पाणी आणि कड्यांच्या या रचनेमुळे वहाणारा भणाणणारा वारा . सगळच अचंबित करणार होते . कितीतरी वेळ आम्ही सह्याद्रीचे हे रुप अनुभवत तिथेच थांबलो होतो. सांदण, हरिशचंद्र गडाच्या नळीच्या वाटे  सोबत अशा अनेक वाटा फिरुन झाल्या होत्या, पण सह्याद्री प्रत्येक वेळी वेगळच पण विलोभनीय रुप दाखवत असतो . माझ्या मते तरी एका वाटेची तिथल्या रचनेची , तिथून दिसणाऱ्या दृश्याशी, तिथल्या हवेतल्या गंधाशी दुसऱ्या ठिकाणाशी तुलना करु नये . प्रत्येकाचा बाज वेगळाच असतो.

उंबरदरा 



आमची पावलं खिळली असली तरी एकनाथ पार खाली जाऊन आमची वाट बघत उभा होता . आम्हीही निघालो .दृश्य कितीही मोहक असले तरी या दगडातून उतरताना शेवटी शेवटी जीव मेटाकुटीला येतो हे अनुभवाने माहिती होते . उंबर दऱ्याच्या घळीतून उतरायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात मोकळ्यावर आलो . कातळभिंती थोड्या दूर गेल्या . हलणारे दगड , त्या दगडातून वहाणारे पाणी , दगडांवर साठलेले शेवाळे या सगळ्यांना सांभाळत खाली उतरत होतो . आधाराला मधे मधे उगवलेली आणि तग धरून असलेली उंबराची झाड होती . या उंबरांच्या झाडांमुळे या ठिकाणाला उंबरदरा नाव मिळाले आहे .  खरतर ही  घाटवाट नसून ओढ्याची वाट होती.  त्यात २६ जुलै २००६ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे या वाटेवर अनेक दरडी कोसळल्या आणि गावातल्या लोकांनी ही वाट वापरणे बंद केले.
 
बिकट वाट

उतरायला सुरुवात केल्यावर साधारणपणे अर्ध्या तासात आम्ही अशाच एका मोठ्या खडकापाशी आलो . वरुन पडलेल्या या शिलाखंडाने पुढे जाणारी वाट अडवलेली होती . त्यावर चढून जाऊन विरुध्द बाजूने उतरणे जवळ जवळ अशक्य होते . पण या ठिकाणी खडकाच्या खाली जेमतेम एक माणूस उतरु शकेल एवढीच जागा होती . त्यातून पाणी वाहात होते . एकनाथने त्यावर पडलेले दगड बाजूला केले आणि त्याने त्या चिंचोळ्या तोंडाच्या छिद्रात उतरुन आम्हाला कुठे पाय ठेवायचा कसे उतरायचे याचे प्रात्येक्षिक दाखवले. वाहाते पाणी , शेवाळलेले दगड आणि जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढी जागा यामुळे प्रत्येकाला कोणाचा आधार न घेता उतरायचे होते . साधारणपणे दिड पुरुष उंचीच्या या छिद्रात उतरुन आम्ही एक एक करुन दुसऱ्या बाजूने बाहेर आलो . 

छिद्राचे तोंड


दुसरी बाजू


व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणवर टिचकी मारा.

या थरारक अनुभवा नंतर  पुन्हा दगडांची वाट उतरायला सुरुवात केली . एके ठिकाणी  ओढ्याने उंचावरून उडी मारली होती . त्यामुळे पुन्हा पुढची वाट बंद झाली होती . मग ओढ्याच्या बाजूने जंगलातून जाणाऱ्या घसार्‍याच्या वाटेने उतरायला सुरुवात केली . काही वेळाने पुन्हा ओढ्यात उतरुन दगडगोट्यातून चालायला सुरुवात केली . उतरायला सुरुवात केल्यापासून साधारणपणे दिड तासाने ओढ्याची वाट सोडून उजव्या बाजूच्या डोंगरावर चढायला सुरुवात केली . उंबरदरा पासून येणारा हा ओढा पुढे चोंढ्या धरणाच्या जलाशयाला जाऊन मिळतो.

चोंढे धरण

डोंगरावर जाणारी पायवाट पकडून १०  मिनिटात स्वीच यार्ड पाशी पोहोचलो . येथे डोंगरात इरीगेशन डिपार्टमेंटने एक मोठा बोगदा खोदलेला आहे . हा बोगदा ग्रील लावून बंद केलेला असतो . तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परवानगी दिली तरच बोगद्यातून जाता येते . अन्यथा बोगदा असलेला डोंगर चढून रस्त्यावर उतरावे लागते . बोगद्याच्या पुढे  डांबरी रस्त्याने १५ मिनिटे चालल्यावर आम्ही ट्रेक चालू केला त्या ठिकाणी  M पॉईंटवर पोहोचलो .  उंबरदरा उतरायला आम्हाला दोन तास लागले होते . एकनाथचा निरोप घेतला तो चोंढ्या घाटाने घाटघरला निघाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो .


चोंढ्या घाट - उंबरदरा हा ट्रेक एक दिवसाचा ट्रेक आहे . चोंढ्या घाट ट्रेक वर्षभरात केंव्हाही करता येइल . उंबरदरा मात्र पाणी ओसरल्यावर डिसेंबर नंतर मे महिन्यापर्यंत करता येइल . उंबरदरा उतरण्यासाठी गाईडची आवश्यकता आहे .


चोंढ्या धरण - चोंढ्या घाट - घाटघर :- १ ते १.५ तास


घाटघर - उंबरदरा पॉइंट :- अर्धा तास


उंबरदरा पॉइंट - उबंरदरा घाट - चोंढ्या धरण :- २ ते २.५ तास

 

GPS ने रेकॉर्ड केलेली चोंढ्या घाट - घाटघर- उंबरदरा भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर



शिपनुर

Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right

Video by :- Pallavi 

Map :- Mahendra Govekar © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 


रडतोंडी घाट - पार घाट - प्रतापगड - मधुमकरंदगड - हातलोट घाट, जावळीच्या खोर्‍यातील भटकंती हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

https://samantfort.blogspot.com/2020/01/blog-post.html

Saturday, January 23, 2021

फ़ुलपाखरांच्या रानात (congregation of Butterflies)


Butterfly
congregation of Butterflies

जंगलात शिरलो तेंव्हा नुकतेच झुंजूमुंज होत होते. जंगलातल्या शांततेत झाडांच्या पानांवरुन खाली पाचोळ्यावर पडणार्‍या दवा़च्या थेंबांचा आवाज येत होता. मध्येच दिवस थार्‍याकडे परतणार्‍या पिंगळ्य़ाचा आवाज जंगलातली शांतता भेदून गेला. हवेतील गारवा, जमिनीवर पडणार्‍या दवाच्या सुगंधात, अपरिचित फ़ुलांच्या सुगंध मिसळुन तयार झालेल्या धुंद वातावरणात, अनेक चढ - उतार, आडवे येणारे ओहोळ पार करत जंगलात बरेच आत शिरलो. 


पायवाट सोडून खाली दिसणार्‍या ओढ्याच्या कोरड्या पात्राकडे उतरायला सुरुवात केली. सूर्य उगवला असला तरी या खोलगट भागात अजून प्रकाश पोहोचला नव्हता. या उतारावर मोठे मोठे वृक्ष होते.  त्यांनी जमिनीवर त्यांच्या फ़ांद्यांची छत्री धरलेली होती. फ़ांद्यांवरुन सरळसोट खाली आलेल्या वेलींवर मातकट रंगाची अनेक पाने लगडलेली होती .  जमिनी पासून अंदाजे ५ ते ६ फुटावर भरपूर पाने दिसत होती आणि त्याखाली जमिनी पर्यंत  पाने विरळ झालेली होती.  ज्या तज्ञ मित्रासोबत इथपर्यंत आलो होतो . त्याने जवळ जाउन पाहायला सांगितले .  जवळ गेल्यावर जे दिसले त्याने हरखुन गेलो . त्या  वेलीवर  Striped Tiger (Danaus genutia Cramer) "ढाण्या कवडा" जातीची असंख्य फुलपाखरे बसलेली होती . आजूबाजूला निरखून  पाहायला सुरुवात केल्यावर आजूबाजूच्या वेलींवर, झाडांवर झुपक्यानी फुलपाखरे लगडलेली होती .  त्या परिसरात अशी शेकडो फुलपाखरे झाडांवर वेलींवर बसलेली होती. याला फुलपाखरांचे "congregation" (संमेलन/ एकत्रीकरण) म्हणतात.



व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणवर टिचकी मारा
(सावली सोडून, उन अंगावर येईल अशी बसलेली फ़ुलपाखरे)

Striped Tiger  Butterfly (Danaus genutia Cramer)
Striped Tiger (Danaus genutia Cramer) 

दरवर्षी हिवाळ्याच्या महिन्यात स्थलांतरासाठी फ़ुलपाखरे येथे जमा होतात. फ़ुलपाखरांचे आयुष्य पाहाता दरवर्षी या ठिकाणी जमा होणारी पिढी नवीन (पुढची पिढी) असते. मग या जागेचा पत्ता या फ़ुलपाखरांना कसा मिळतो ? स्थलांतर करुन कुठे जायचे हे त्यांना कसे समजते?  दिशांचे ज्ञान कसे होते ? असे अनेक प्रश्न पडत होते.

"ढाण्या कवडा"

फुलपाखरांचे असे संमेलन (congregation) दोन कारणांसाठी भरते . १) स्थलांतरासाठी :-  यात एकाच जातीची फुलपाखरे स्थलांतर करण्यापूर्वी एका जागी जमा होतात . काही दिवस तेथे राहातात आणि मग एकत्र स्थलांतर करतात . याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे "मोनार्क" फुलपाखरे. कॅनडा आणि अमेरीकेच्या उत्तर भागातून ३००० किलोमीटरचे अंतर कापून ही फुलपाखरे मॅक्सिकोत जातात. दररोज ८० किलोमीटर अंतर कापत, दोन महिन्यांनी ही फ़ुलपाखरे ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. त्यासाठी सुर्याचे स्थान, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र यांचा फ़ुलपाखरांना उपयोग होतो.  हलक्या वजनाचे, एवढ्या कमी इंधनात चालणारे इंजिन बनवणे अजून विज्ञानाला सुध्दा शक्य झालेले नाही ( डिस्कव्हरी , नॅशनल जिओग्राफि इत्यादी चॅनलवर मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतरावर  डॉक्युमेंटरीज आहेत.) . अती थंडी , पाउस,  इत्यादी कारणांसाठी फुलपाखरे स्थलांतर करतात .

२) मड पडलिंग (Mud puddling)  :- फुलपाखरांना क्षारांची, खनिजांची आवश्यकता असते . बऱ्याचदा चिखलात फुलपाखरे मोठ्या प्रमाणावर एकत्र बसलेली दिसतात. याला मड पडलिंग (Mud puddling) म्हणतात.  फ़ुलपाखरे जमिनीतून कॅल्शियम, फ़ॉस्फ़ेट, सोडीयम, नायट्रोजन इत्यादी खनिजे (Minerals) शोषून घेतात आणि मिलनाच्या वेळी मादीला भेट देतात. मड पडलिंगसाठी अनेक जातींची फुलपाखरे एकाच ठिकाणी जमलेली पाहायला मिळतात.

Mud puddling

याशिवाय फ़ुलपाखरे एकत्र येऊन स्थलांतर (Aggression of butterflies) करण्याचे कारण म्हणजे दुष्काळ, खाण्याची अनुपलब्धता. फ़ुलपाखरांच्या अळ्यांनी मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणावर अन्न फ़स्त केल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे अन्नाची अनुपलब्धता झाल्यास अळ्यांपासून जन्माला आलेली एकाच जातीची फ़ुलपाखरे एकत्र स्थलांतर करतात.    



फुलपाखरू थंड रक्ताचे असल्याने सुर्याची उष्णता मिळाल्या शिवाय त्याचे चलनवलन चालू होणार नव्हते . त्यामुळे आमच्या समोरची सर्व फुलपाखरे निश्चल होती आणि त्यामुळेच ती त्या वेलींशी , झाडाशी आणि वातावरणाशी समरुप झाली होती . तज्ञ मार्गदर्शक सोबत नसता तर या झाडांच्या बाजूने जाऊनही आम्हाला ती दिसली नसती .


फुलपाखरां प्रमाणे आम्हीही सूर्यप्रकाश जंगलाच्या त्या खोलगट भागात यायची वाट बघत होतो . हळूहळू सूर्य किरणे वृक्षांच्या पानामधील फटीतून वेलींवर पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फुलपाखरे जिथे जिथे बसली होती त्याच भागात बरोबर सूर्याची किरणे पहिल्यांदा पोहोचली . वेलीवरच्या ज्या भागात सावली होती तेथे एकही फुलपाखरू बसलेले नव्हते, ती मधली जागा रिकामी ठेवलेली होती आणि जेथे थेट सूर्यप्रकाश येत होता त्या भागात फुलपाखरांची दाटी होती. जेथे पानातून गाळून आलेले उन्हाचे कवडसे पडले होते त्या भागात एखाद दुसरे फ़ुलपाखरु बसलेले होते.  दुसरी लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे सगळी फुलपाखरे झाडाच्या, वेलींच्या पूर्वेकडील भागांवरच बसली होती. जेणेकरून सूर्यापासून लवकरात लवकर उर्जा मिळेल आणि त्यांचे भक्षक सजग होण्या आधी त्यांना अन्न गोळा करण्यासाठी उडून जाता येइल .

congregation of Butterflies

सुर्यप्रकाश पडल्यावर काही काळाने वाळक्या पानांसारख्या दिसणाऱ्या फुलपाखरांमध्ये "जान" आली. त्यांनी हळूहळू पंख उलगडायला सुरुवात केली . त्यामुळे त्या झाडांना, वेलीना असंख्य रंगीबेरंगी पंख फुटल्यासारखे वाटायला लागले .... सुरुवातीला एक दोन फुलपाखरांनी आपला रातथारा सोडून हवेत गिरकी मारली आणि अचानक असंख्य फुलपाखरे आकाशात उडाली...... आकाशात अनेक रंगांची उधळण झाली.  एक अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा पाहायला मिळाला .

congregation of Butterflies
congregation of Butterflies


जंगल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर फक्त  वाघ , बिबट्या , हत्ती असे मोठे प्राणी येतात . त्यांना पाहाण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करतात.  खरतर जंगलातील परिसंस्थेत किटकां पासून वाघांपर्यंत सर्वानाच सारखे महत्व असते . फुलपाखरू या परिसंस्थेमधील महत्वाचा घटक आहे . फुलांचे परागीभवन करण्यात फुलपाखरांचा मोठा वाटा आहे . पक्षांचे आणि काही सरपटणाऱ्या प्राण्यांचे ते भक्ष्यही आहे . वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलांचा , गवताळ कुरणांचा होणारा ऱ्हास , किटकनाशकाचा अनिर्बंध वापर  यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक धोक्यात आलेला आहे .सह्याद्रीत फ़ुलपाखरे एकत्र जमण्याचा काळ हिवाळ्याचा असतो. हवामान बदलामुळे हल्ली त्यावेळीही पाऊस पडतो. या हवामान बदलाचाही फ़ुलपाखरांच्या एकत्रीकरणावर आणि स्थलांतरावर परिणाम होत असणार.



सरकारी पातळीवरही शिकारी प्राण्यांचा अधिवास टिकवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातात . पण दरवर्षी एकाच ठिकाणी जमून स्थलांतर करणार्‍या फ़ुलपाखरांचा अभ्यास अपवादानेच भारतात झालेला आहे. दक्षिण भारतातील फ़ुलपाखरांचा पश्चिम घाट ते पूर्वघाट स्थलांतर या विषयावर डॉ. कृष्णमेघ कुंटे यांचा शोध निबंध आणि मिलिंद दिगंबर पाटील यांचा सह्याद्रीतील (कोकणातील) फ़ुलपाखरांचे स्थलांतर यावरील शोधनिबंध आंतरजालावर उपलब्ध आहेत. अशा प्रकारे केलेले शास्त्रीय संशोधन आपल्याला फ़ुलपाखरांच्या अधिवासाबद्दल अजून माहिती देतील आणि ते अधिवास वाचवण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील.


फ़ुलपाखरांचे स्थलांतर


Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 

अदृश्य किटकांच्या जगात (Leaf Mining Worm, Bag Worm, Spittle bugs or Frog hopper) हा किटकांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा...