Sunday, February 25, 2018

स्वराज्याची तिसरी राजधानी :- जिंजी Ginjee Fort (Rajagiri, Krishnagiri, Chandrayan Durg)



Rajagiri Fort (Ginjee Fort)


राजगड, रायगड या किल्ल्यांनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी तामिळनाडुतील जिंजी होती हेच बर्याच जणांना माहिती नसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत इसवीसन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला. . संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर मोघलांनी रायगडाला वेढा घातला. एप्रिल १६८९ ला रायगडावरुन निघालेले . राजाराम महाराज मोगल सैन्याला हुलकावणी देत तर कधी दोन हात करत नोव्हेंबर १६८९ ला जिंजीला पोहोचले. जिंजी या भक्कम बेलाग किल्ल्याला आपली राजधानी बनवून त्यांनी २६ डिसेंबर १६९८ पर्यंत वर्षे राज्यकारभार पाहीला. अशा या आपल्या तिसर्या राजधानालीला म्हणजेच जिंजी किल्ल्याला भेट देण्यासाठी चेनै गाठावे लागते.


शिलाखंडांवर बांधलेली दगडांची तटबंदी आणि त्यावरील वीटांनी बांधलेल्या चर्या 
जिंजीला जायचे ठरल्यावर जिंजी संबंधीची माहिती मिळेल तेथून वाचायला सुरुवात केली. त्यावरुन लक्षात आले की, जिंजीचा आवाका खूपच मोठा आहे आणि त्याची व्यवस्थित भटकंती करायची तर किमान दोन दिवस आवश्यक आहेत. त्याप्रमाणे भटकंतीची आखणी केली आणि तिकीट बुक केली. जिंजी हे बर्यापैकी मोठ गाव असले तरी तिथे राहाण्यासाठी हॉटेल्स दोन तीनच आहेत. त्यातील एकच हॉटेलशिवन”, "Makemytrip" वर सापडल. रेट जरा जास्त होते पण मोठा प्रवास आणि दिवसभरची किल्ल्याची भटकंती केल्यावर अनोळखी प्रदेशात पाठ टेकायला निवांत जागा पाहिजे. त्यामुळे नेहमीचा डायरेक्ट जाऊन धडकण्याचा शिरस्ता सोडून ऑनलाईन हॉटेल बुक केल. Makemytrip कडून कन्फ़र्मेशनचा ईमेल आला. त्या पाठोपाठ हॉटेलच्या मालकाकडून मला मेल आला. हा ईमेल अर्थात Makemytrip केलेला पण मला सी सी केलेला. त्यात त्याने म्ह्टल होते की, बुकींग हॉटेलकडून कन्फ़र्म नाही, कारण Makemytrip ने त्यांच्या साईट्वर दाखवलेल्या रेट पेक्षा आमचे रेट जास्त आहेत आणि ते आम्हाला मिळाले तरच बुकींग कन्फ़र्म होईल. अशा वेळी त्रागा करण्यात काही अर्थ नसतो. मी हॉटेलच्या मालकाला रिप्लाय लिहिला, मी महाराष्ट्रातून तुमच्या गावातला सुंदर किल्ला पाहायला येतोय, तरी तुमच्यातला वाद मिटवून माझी गैरसोय होणार नाही अस बघा. दुसर्या दिवशी त्याचा मला रिप्लाय आला. तुम्ही निश्चिंतपणाने जिंजीला या तुमच स्वागत आहे. तुम्हाला आमच्या किल्ल्याची माहिती किठून मिळाली? मला तुम्हाला भेटायला आवडेल. चला एक प्रॉब्लेम सुटला म्हणता म्हणता इंटरनेटवर शोधताना एक गोष्ट कळली, की किल्ला पाहाण्याची वेळ ते असली तरी वाजल्या नंतर किल्ल्यावरुन परत खाली पाठवतात. हे कळल्यावर चैनैहून बसने जायचा विचार रद्द करुन कार बुक केली आणि आमची वेळे बरोबर शर्यत सुरु झाली. चेनैला सकाळी पोहोचलो. गाडीवाल्याला थेट नाश्त्यासाठी न्यायला सांगितले. चेनै बाहेरच्या हायवे वरच्या एका हॉटेलात त्याने नेले. आज दिवसभर किल्ला पाहायचा असल्याने जेवणाला सुट्टी होती त्यामुळे दाबून नाश्ता केला. हॉटेल मध्ये वेगवेगळ्या डोशांचे मोठ्ठे फ़ोटो लावलेले भाषा कळत नसल्याने त्या फ़ोटोंकडे बोट दाखवून ते सगळे मागवून खाल्ले. त्यावर काफ़ी प्यायलो. आमचा खाण्याचा आवाका पाहून काफ़ी प्यायल्यावरही अजून काही हवय का ? अस वेटरने नम्रतेने विचारल.(महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला आहे, अस तो त्यानंतर सर्वांना सांगत सुटला असावा.) . जिंजीला तासभरात पोहोचलो हॉटेलात सामान टाकून थेट किल्ला गाठला.       


३ नंतर किल्ल्यावर प्रवेश नाही.

किल्ला प्रवेशाच्या वेळा 


चेनै पासून १६० किलोमीटरवर जिंजी गाव आहे. गावाच्या बाहेर साधारणपणे एक किलोमीटवर तीन किल्ले आहेत, राजगिरी (राजाचा किल्ला), कृष्णगिरी (राणीचा किल्ला) आणि चंद्रायनदुर्ग ( चक्कीली दुर्ग) या तीन किल्ल्यांचा मार्गात येणार्‍या काही टेकड्यांचा मिळुन जिंजीचा किल्ला बनलेला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याची तटबंदी काही टेकड्यांना कवेत घेऊनच पुढे जाते. त्यामुळे काही कागदपत्रात जिंजीचा किल्ला ६ किल्ल्यांचा मिळून बनलेला आहे असे उल्लेख आहेत. छ. शिवाजी महाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकल्या नंतर त्या प्रदेशातील इतर चौक्या, ठाणी तोडून फ़क्त किल्ल्याला बळकट करायचे ठरवले. त्यासाठी त्यांना किल्ल्याची तटबंदी तोडण्यासाठी सुरंग लावण्यात वाकबदार असणारे लोक हवे होते. मराठ्यांकडे असे लोक नसल्याने त्यांनी इंग्रजांकडे मागितले. इंग्रजांनी चालढकल केली पण सुरुंग लावणारी माणसे दिली नाहीत. महाराजांनी आपल्या माणसांकरवी किल्ला त्यांना हवा तसा बांधून घेतला. या संदर्भात पॉंडेचरीच्या गव्हर्नरने लिहिलेल्या वृतांतात तो म्हणतो, " शिवाजीने जुन्या किल्ल्याची तटबंदी पाडून , नविन तटबंदी आणि बुरुज बांधून घेतले. नैसर्गिकपणे बेलाग असलेला हा किल्ला त्यामुळे युध्दातही जिंकणे कठीण जाईल ". 

कृष्णगिरी किल्ला ते राजगिरी आणि चंद्रायन दुर्गा पर्यंत जाणारी तटबंदी आणि खंदक 
जिंजी गाव सोडल्यावर रस्त्याच्या बाजूला सर्वप्रथम राजागिरी पासून कृष्णगिरी किल्ल्यापर्यंत जाणारी तटबंदी आणि खंदक दिसतो. ही तटबंदी फ़ोडूनच NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई हा महामार्ग बनवलेला आहे. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कृष्णगिरी किल्ला दिसतो. थोडे अंतर पुढे गेल्यावर राजागिरीचा किल्ला रस्त्याच्या डाव्या बाजूला दिसतो. या तिनही किल्ल्यांना दुहेरी तटबंदी आहे. एक तटबंदी तीनही किल्ल्यांना वेढते, तिची लांबी १३ किलोमीटर आहे. या तटबंदीने एकूण ११ स्क्वेअर किलोमीटर भूभाग व्यापलेला आहे. त्याशिवाय प्रत्येक किल्ल्या भोवती स्वत:ची वेगळी तटबंदी आहे. या तटबंदीला लागून ८० फ़ूट रुंद खंद्क आहे. किल्ल्याचे तटबंदीची उंची १५ ते २० फ़ूट असून ती दगडांनी बांधलेली आहे. त्यावर फ़ूट उंचीच्या वीटांनी बांधलेल्या चर्या आहेत. तटबंदी , बुरुज आणि चर्यांमध्ये जागोजागी जंग्या ठेवलेल्या आहेत

राजगिरी

   राजागिरी किल्ल्याचा डोंगर दुरवरुन बसलेल्या हत्ती सारखा दिसतो. राजगिरी किल्ल्याला स्थानिक लोक "राजाचा किल्ला" म्हणुन ओळखतात. या किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. पुरातत्व खात्याने हा किल्ला आणि परिसर व्यवस्थित राखलेला आहे. जिंजीच्या राजागिरी, कृष्णगिरी, चंद्रायनदुर्ग (चक्कीली दुर्ग) आणि इतर छोट्या मोठ्या टेकड्याना कवेत घेणाऱ्या तटबंदीत वेल्लोर आणि पॉंडिचेरी ही दोन प्रवेशद्वार आहेत. त्यातील वेल्लोर प्रवेशव्दार NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई महामार्गावर आहे. पण तेथून किल्ल्यात  प्रवेश करता येत नाही . तसेच पॉंडिचेरी गेट मधूनही किल्ल्यात प्रवेश करता येत नाही. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदी फोडून रस्ता बनवलेला आहे. किल्ल्याची बाहेरील तटबंदी आतील तटबंदी यांच्या मधून हा रस्ता थेट किल्ल्याच्या दुसर्या प्रवेशव्दारापर्यंत जातो. या रस्त्यावर डाव्या बाजूला एक पुरातन शिव मंदिर आहे . त्या मंदिरा भोवती हिरवळ आणि झाडे राखून बगिचा बनवलेला आहे. मंदिर पाहून रस्त्यावरुन किल्ल्याच्या प्रवेशव्दाराकडे जातांना उजव्या बाजूला आतील तटबंदीला लागून असलेला खंदक दिसतो. जिंजी गावा जवळुन वाहाणार्‍या संकरपरानी नदीचे पाणी एकेकाळी या खंदकात खेळवलेले होते.
 
किल्ल्याच्या आतील तटबंदीत ठराविक अंतरावर बुरुज आहेत. याच बरोबर तटबंदीवर जागोजागी असलेले कॅप्सुल बुरुज आपले लक्ष वेधून घेतात. फ़्रेंचांच्या ताब्यात हा किल्ला असताना त्यांनी हे बुरुज बांधले असावेत. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला तटबंदीत किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. सध्या या दरवाजातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. या दरवाजा समोर  "साद अल उल्लाखान मशिद आहे". मशिदीच्या बाजूलाच पार्कींग एरिया आहे. तिथून पुढे जाणारा रस्ता पॉंडिचेरी प्रवेशव्दाराकडे आणि व्यंकटरामण मंदिराकडे जाते. पण तिकडे जाता आधी आपला मोर्चा किल्ल्याकडे वळवावा. खंदकावर बांधलेल्या पक्क्या पुलावरुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. याठिकाणी पुरातत्त्व खात्याची चौकी आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी १५/- रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते. याच तिकिटात राजागिरी आणि कृष्णगिरी हे दोन किल्ले एका दिवसात पाहाता येतात. ऱाजागिरी किल्ल्याची प्रवेशव्दारे सकाळी वाजता उघडतात आणि संध्याकाळी वाजता बंद होतात, पण दुपारी वाजल्यानंतर किल्ल्यावर जाता येत नाही. ( किल्ल्याचा परिसर खुप मोठा आहे, तसेच किल्ल्याचा काही भाग वनक्षेत्रात येतो. त्यामुळे हा नियम करण्यात आलेला आहे.)

किल्ल्यावरील सर्व दरवाजे आयताकृती आहेत

प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत.
किल्ल्यावरील सर्व दरवाजे आयताकृती आहेत. कमान असलेला एकही दरवाजा येथे नाही. दुसऱ्या दरवाजातून आत शिरल्यावर काटकोनात तिसरा दरवाजा आहे. याठिकाणी पुरातत्त्व खात्याने किल्ल्याच्या परिसरात मिळालेल्या मुर्तींचे प्रदर्शन उघड्यावरच भरवलेले आहे. ते पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कोरडी विहीर आहे. विहिरीच्या मागील बाजूस उंचावर एक सुटा गोल बुरूज आहे. उंचावरील स्थानामुळे तिन्ही दरवाजांवर टेहळणीसाठी या बुरुजाचा उपयोग होतो. किल्ल्याचा तिसरा दरवाजा ओलांडून किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा आवाका आपल्या ध्यानात येतो. राजागिरी किल्ला टप्प्यात पसरलेला आहे. पहिल्या टप्प्यात मैदानी भाग असून त्यावर सात मजली मंगल महाल, धान्य कोठारे, दारु कोठार, अश्वशाळा, सदर इत्यादी महत्वाच्या वास्तू आहेत. या सर्व वास्तू भव्य आहेत. याशिवाय या भागात दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्याच्या दुसरा टप्पा डोंगराचा आहे. हा डोंगर म्हणजे प्रचंड आकाराच्या खडकांची उतरंड आहे. एकमेकांवर रचून ठेवल्या सारख्या दिसणार्या या खडकांमधील माती पावसामुळे कधीकाळी वाहून गेलेली आहे. त्यामुळे या टप्प्यात तुरळक झाडे आहेत. तामिळनाडूच्या गरम आणि दम वातावरणात हा टप्पा चढून जाणे म्हणजे आव्हान आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते फ़ेब्रुवारी हा काळ किल्ला पाहाण्यासाठी उत्तम आहे. अर्थात याकाळातही उन्हाचा तडाखा जाणवतोच. किल्ल्याच्या दुसर्या टप्प्यात खडक फ़ोडून केलेली वाट खडकांच्या आधाराने बांधलेली तटबंदी आणि त्यातील दरवाजे आहेत. हा टप्पा चढून गेल्यावर माची सारखा सपाट भाग लागतो. या ठिकाणी भरपूर झाडी आहे. या सपाटीचा उपयोग करुन या ठिकाणी मंदिरे, वाडे आणि तलाव बांधलेले आहेत. किल्ल्याचा शेवटचा टप्पा म्हणजे बालेकिल्ला हा एका मोठ्या नैसर्गिक खंदकाने किल्ल्यापासून वेगळा झालेला आहे. त्यावर पक्का पुल बनवलेला आहे. या पुलावरुन बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशव्दारे आहेत. अशाप्रकारे पायथ्यापासून बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एकूण १३ प्रवेशव्दारे पार करावी लागतात.

किल्ल्याचा चौथा दरवाजा आणि त्यामागिल चौकोनी सुटा बुरुज
किल्ल्याचा चौथा दरवाजा पार केल्यावर उजव्या बाजूला सुटा चौकोनी बुरूज आहे. या बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. बुरुजावर चढून गेल्यावर मध्यभागी तोफ गोल फिरवण्यासाठी जो लोखंडी रुळ (रॉड)बसवतात त्यासाठी बनवलेला खड्डा दिसतो. या ठिकाणी एकेकाळी तोफ असावी. चौथ्या दरवाजातून आत आल्यावर समोरच मंदिरासारखा कळस असलेला सात मजली कल्याण महाल आपले लक्ष वेधून घेतो. कल्याण महाल ही किल्ल्यातील सर्वात सुंदर वास्तू आहे. या वास्तूत प्रवेश करण्यासाठी छोटे प्रवेशव्दार आहे. आत गेल्यावर चहूबाजूंनी कमानदार ओवऱ्या आहेत. मधल्या भागात मोठ्या पुष्कर्णी सारखी रचना केलेली आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यावर ठरावीक अंतरावर पाणी येण्यासाठी बसवलेले पाईप दिसतात. जवळच्या तलावातून या पुष्कर्णीत पाणी आणले जात असावे. पुष्कर्णीच्या मध्यभागी एक चौथरा बांधलेला आहे. सुदैवाने मंगल महालाचे सातही मजले चढून जाता येतात. प्रत्येक मजल्यावर कमानदार हवेशीर खोल्या आहेत. महालाच्या गच्चीवरून दुरवरचा प्रदेश दिसतो. समोरच राजागिरी किल्ल्याचा डोंगर दिसतो. डाव्या बाजूला चक्कीली दुर्ग तर मागच्या बाजूला दुरवर कृष्णगिरी किल्ला दिसतोमंगल महालाच्या मागच्या बाजूला महाबतखानाची मशीद आहे. मोगलांच्या काळात ही मशिद बांधली गेली. मशिदीच्या पुढील बाजूस हत्ती खाना आणि घोड्यांचा पागा (तबेला) असलेली इमारत आहे. या इमारतीच्या काटकोनात कचेरीची आणि त्याला लागुन महालाची दोन मजली इमारत आहे. या (L) एल आकारात असलेल्या इमारतीं मधील प्रशस्त भागात सदर असावी. याठिकाणी महाला समोर एक उंच चौथरा आहे . त्या चौथऱ्यावर एक मोठा दगडी लोड ठेवलेला आहे. या चौथर्यावर चढण्यासाठी पायर्या आहेत. राजा या चौथर्यावर बसत असावा. या चौथर्या समोर काही अंतर सोडून पायर्यांसारखी रचना केलेली आहे. ही इतर दरबारी व्यक्तींना बसण्यासाठी केलेली सोय असावीहा सर्व भाग पाहून किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला दिसणाऱ्या इमारतींकडे जावे. या भागात मोठे वृक्ष आहेत. त्या भोवती पार बांधून बसायची सोय केलेली आहे. या परीसरात हिरवळ राखलेली आहे. याठिकाणी पाण्याचा नळ आहे. किल्ल्यावर सध्या असलेली पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय असल्याने इथे पिण्याचे पाणी भरून घ्यावे. स्थानिक पर्यटक किल्ल्याच्या या भागापर्यंतच येतात. प्रत्यक्ष किल्ल्यावर फारच थोडे लोक जातात.

कल्याण मंगल महाल

कल्याण मंगल महाल

कमानदार ओवऱ्या कल्याण मंगल महाल

पुष्कर्णी, कल्याण मंगल महाल

हत्ती खाना आणि घोड्यांचा पागा (तबेला)

           
सदर आणि दगडी लोड

किल्ल्याच्या या भागात गजपृष्ठाकार छत असलेल्या धान्य कोठारांच्या इमारती आहेत. भव्य आणि प्रशस्त असलेल्या या कोठारात धान्य साठवण्यासाठी वेगवेगळी दालने आहेत. धान्यकोठारांच्या समोरच्या दारुकोठार आहे. त्याच्या बाजूला व्यायामशाळा आहे. या वास्तूच्या मागे एक सुंदर तलाव आहे. या तलावाला "हत्ती तलाव" या नावाने ओळखले जाते. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आणि छोटेखानी प्रवेशद्वार आहे. तलाव पाहून पुढे गेल्यावर तटबंदी डोंगराला भिडते त्याठिकाणी तटबंदीच्या बाहेर 2 तलाव आहेत. डोंगरावरून वहात येणारे पाणी अडवून हे तलाव तयार केलेले आहेत. या तलावांकाठी अंजनेयाचे (मारुती) मंदिर आणि काली अम्मन मंदिर आहे. हे तलाव आणि मंदिर पाहाण्यासाठी किल्ल्याच्या बाहेर पडून व्यंकटरामण मंदिराच्या पुधे जाणार्‍या रस्त्याने जावे लागते. त्यामुळे संपूर्ण किल्ला पाहून झाल्यावर सर्वात शेवटी हा भाग पाहावा.

धान्य कोठार

धान्यकोठार आतील एक दालन 
          
हत्ती तलाव


   
धान्य कोठार आणि इतर इमारतींजवळ किल्ल्याचा सपाटीवरचा भाग संपतो. समोर किल्ल्याचा डोंगर उभा असतो. प्रचंड मोठे शिलाखंड एकमेकांवर रचून बनवल्या सारखा दिसणाऱ्या या डोंगरावर शिलाखंड फोडून किल्ला बनवावा ही अचाट कल्पना ज्या कोणाला सुचली त्याला मानायलाच हवेहे मोठे मोठे शिलाखंड फोडण्यासाठी कोणतेही आधुनिक अवजारे आणि तंत्र त्याकाळी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या पारंपारिक ज्ञानाचा वापर करुन हे शिलाखंड फोडून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता तयार केला त्याचबरोबर किल्ल्याची तटबंदी , बुरुज , महाल , कोठारे , मंदिरे बांधून काढलेली आहेतमोठमोठे दगड सरळ रेषेत / काटकोनात तोडण्यासाठी त्या दगडावर छिन्नीने अंदाजे  सेंटीमीटर रुंद  x सेंटीमीटर लांब आणि सेंटीमीटर खोल खाचा तयार केल्या जात असत. दोन बाजूबाजूच्या खाचा मधले अंतर साधारणपणे सेंटीमीटर  ठेवलेले असते. या खाचाममध्ये लाकडाची पाचर घट्ट बसवली जात असे. या पाचरीवर पाणी ओतले जाई. पाण्यामुळे लाकडाची पाचर फ़ुगत असे (प्रसरण पावत असे) आणि त्याच्या दबावामुळे दगड तुटून पडे. अशा प्रकारे तोडलेले दगड आपल्याला किल्ल्यावर जागोजागी पाहायला मिळतात. त्याच बरोबर अपूर्ण राहीलेले दगडही पाहायला मिळतात.


प्रचंड मोठे शिलाखंड एकमेकांवर रचून बनवल्या सारखा दिसणारा डोंगर

पाचवा दरवाजा 

दगड फ़ोडण्यासाठी दगडावर छिन्नीने केलेल्या खाचा 


         


   किल्ल्याचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर २५ पायऱ्यानंतर किल्ल्याचा पाचवा दरवाजा आहे. दरवाजाच्या बाजूला चौकोनी बुरुज आहेत . दरवाजाच्या आत पाहारेकर्यांसाठी देवड्या आहेत . थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर पाचव्या दरवाजाच्या काटकोनात सहावा दरवाजा आहे. या दरवाजा नंतर खडा चढ आहे. तो चढून गेल्यावर किल्ल्याचा सातवा दरवाजा आहे. सातवा दरवाजा पार केला की उजव्या बाजूला तोफ आहे. या ठिकाणाहून किल्ल्याचा परिसर सुंदर दिसतो. खालच्या बाजूला कल्याण महाल आणि इतर इमारती, डावीकडे कृष्णगिरी आणि राजगिरीपासून कृष्णगिरी पर्यंत गेलेली दुहेरी तटबंदी आणि खंदक पाहायला मिळतो. याठिकाणी थोडा विसावा घेऊन पुढे जावे कारण आपण आता किल्ल्याच्या विरूध्द बाजूला जाणार असतो. तोफेच्या मागेच किल्ल्याचा आठवा दरवाजा आहे . हा दरवाजा पार करून पायऱ्या चढून पुढे गेल्यावर सपाटी चालू होते. याठिकाणी उजव्या बाजूला कड्याखाली कमलाकन्नी अम्मन मंदिर आहे. मंदिर पाहून परत पायवाटेवर येउन पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटे मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर गणपतीच्या दोन मुर्ती आहेत. त्यांना दक्षिण भारतीय पध्दतीने पांढरे आणि रंगीत काठ असलेले धोतर नेसवलेले आहे. मंदिराच्या मागे असलेल्या कातळभिंतीवर देवीचे सुंदर चित्र काढलेले आहे. मंदिरा समोर एक आडवा दगड आहे. कुंकवाने माखलेल्या या दगडावर मध्यभागी रेड्याचे तोंड आणि दोन्ही त्रिशुळ, बाजूला धनुष्य आणि बाण कोरलेले आहेतहा रेड्याला बळी देण्याचा दगड असावा. या मंदिराच्या बाजूला झाडीत उघड्यावर शंकराची पिंड आहे.

      या मंदिरासमोर पायवाटेवर वनखात्याचा बंदुकधारी गार्ड बसलेला असतो. कारण येथून एक पायवाट चक्कीली दुर्गावर जाते. तो सध्या अभयारण्याचा भाग असल्याने तेथे जाण्यास मनाई आहे. हाच गार्ड वाजायला आले की किल्ल्यावर गेलेल्या सर्वाना शोधून खाली पाठवतो.

 
बांधीव तलाव

रेड्याला बळी देण्याचा दगड

    
पायवाटेवरुन पुढे जाताना डाव्या बाजूला एक बांधीव तलाव आहे. झाडीत लपल्यामुळे तो पटकन दिसत नाही. तलावाच्या पुढे वाडे आहेत. या भागात जंगल माजलेले असल्याने जास्त पुढे जाता येत नाही. वाडे पाहून परत पायवाटेवर यावे. आता सपाटी संपून पुन्हा चढ चालू होतो. पायऱ्याचा रस्ता एक यु (U) टर्न घेउन पुढे चढत जातो. याठिकाणी किल्ल्याचे नऊवे प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या वरचा भाग विटानी बनवलेला आहे. त्याला चुन्याने गिलावा करुन त्यावर नक्षी बनवलेली आहे . त्यामुळे इतर दरवाजामध्ये हा दरवाजा उठून दिसतो. या दरवाजाच्या कडे तोंड करुन उभे राहील्यावर उजव्या बाजूला बाजूला जो कातळकडा आहे त्याचा आकार आम्हाला हनुमंताच्या तोंडासारखा दिसला. नववा दरवाजा पार केल्यावर एका मोठ्या दगडावर हनुमंताची मुर्ती कोरलेली आहे.

नऊवे प्रवेशव्दार वरच्या बाजूला हनुमंताच्या तोंडा सारखा आकार असलेला खडक
  
नऊव्या प्रवेशव्दारावरील नक्षी


दगडावर कोरलेला हनुमान


पायऱ्याच्या वाटेने यु (U) टर्न घेउन पुढे चढत गेल्यावर किल्ल्याचा दहावा दरवाजा लागतो. सपाटी नंतरचा सलग चढ चढून दमल्याने इथे थोडा वेळ विश्रांती घ्यावी . हा दरवाजा ओलांडला की वाट खाली उतरायला लागते . या ठिकाणी तिहेरी तटबंदी आहे . पायऱ्यांच्या डाव्या बाजूला म्हणजेच दरीच्या बाजूला, पायऱ्यांच्या उजव्या बाजूला आणि त्यापुढे असलेल्या शिलाखंडावर अशी तीन टप्प्यांवर तटबंदी बांधलेली आहे. शिलाखंड आणि पायऱ्यांच्या बाजूला असलेली तटबंदी यामध्ये एक कोरडा बांधिव तलाव आहेवाटेचा उतार थांबल्यावर परत वाट वळते आणि चढायला सुरुवात करते. साधारणपणे ५० पायऱ्या चढल्यावर आपण किल्ल्याच्या अकराव्या प्रवेशव्दारापाशी येतो. या ठिकाणी प्रवेशव्दारालगत तटबंदीवर कॅप्सुल बुरुज आहे. या बुरुजाकडे जाणारी वाट एका कमानीतून जाते. दरवाजा पार केल्यावर वाट पुन्हा वळते आता आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलेलो असतो .या ठिकाणी एक सुटा बुरुज आहे. टेहळणीसाठी या बुरुजाचा उपयोग होत असावाखाली दुरवर NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई महामार्ग दिसतो. येथून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी एक जीना बांधलेला आहे . खड्या चढणीचा हा जीना चढल्यावर समोर एक पुल दिसतो. बालेकिल्ला आणि किल्ल्याचा इतर भाग यामध्ये याठिकाणी नैसर्गिक खोल खाच आहे. बालेकिल्ल्याचा भाग सरळसोट कातळकड्यानी बनवलेला असल्याने पुल ओलांडल्या शिवाय बालेकिल्ल्यावर प्रवेश मिळणे शक्य नाही. कदाचित पूर्वीच्या काळी येथे उचलता येणारा पुल असावा. पुल पार केल्यावर समोरच किल्ल्याचा बारावा  दरवाजा आहे . काही पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याचा तेरावा दरवाजा लागतोहा दरवाजा पार केला की आपला किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर प्रवेश होतो. किल्ल्याचा माथ्यावर अनेक वास्तू आहेत. धान्यकोठार, जवाहिरखाना, दारु कोठार, मजली महाल, रंगनाथ मंदिर, तोफ़ आणि इतर वास्तू गड माथ्यावर आहेत. ऱंगनाथ मंदिरात कोणतीही मुर्ती नाही. राजागिरी हा या भागातील सर्वोच्च डोंगर असल्याने त्यावरुन दूरवरचा प्रदेश, कृष्णगिरी आणि चंद्रायन दुर्ग हे किल्ले दिसतात.

अकरावे प्रवेशव्दार 

बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बांधलेला जीना 

बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी नैसर्गिक खाचेवर बांधलेला पुल

रंगनाथ मंदिर

 मजली महाल



            पायथ्यापासून सर्व वास्तू, प्रवेशद्वारे व्यवस्थित पाहात गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी ते तास लागतात. किल्ला पाहून आल्या मार्गाने खाली उतरावे. किल्ला उतरताना चंद्रायन (चक्कीली) दुर्गाच्या पायथ्याशी दक्षिणी पध्दतीचे गोपूर असलेले व्यंकटरामण मंदिर आपल्याला खुणावत असते. त्या मंदिरात जाण्यासाठी किल्ल्याच्या दुसर्या प्रवेशव्दारातून बाहेर पडावे लागते. व्यंकटरमणा मंदिराला भेट द्यावी, तेथून पुढे गेल्यावर पॉंडिचेरी दरवाजा  आहे. तो पाहील्यावर किल्ला पाहून होतो. किल्ल्याचा वेल्लोर दरवाजा पहाण्यासारखी पुन्हा NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई महामार्गावर यावे लागते. महामार्गावरुन  वेल्लोरच्या दिशेने चालत गेल्यावर साधारणपणे १५ मिनिटांनी डाव्या बाजूला एक पायवाट वेल्लोर दरवाजापाशी जाते.

व्यंकटरामण मंदिर
चंद्रायन दुर्गाच्या पायथ्याशी असलेला तलाव 

चंद्रायन दुर्गावरील अवशेष

चंद्रायन दुर्ग खरतर राजागिरीला खेटून आहे. राजागिरी चढतांना त्यावरील वास्तू स्पष्ट दिसतात. पण हा किल्ला वनखात्याच्या अख्यातरीत असल्याने त्यावर प्रवेशबंदी आहे. त्यामुळे हा किल्ला आपल्याला पाहाता येत नाही. या किल्ल्यावर स्थानिक तांत्रिकपंथाच्या लोकांचे देऊळ असल्याने जाण्यास बंदी आहे, अशी माहितीही कळली. तिकिट खिडकी वरच्या पूरातत्व खात्याच्या माणसाला विचारले पण त्यालाही काही सांगत आले नाही. 

दिवसभर किल्ला पाहून घामाने आंघोळ झाली होती आणि अंगावर धुळीची पुट चढली होती . हॉटेलवर जाऊन स्वच्छ आंघोळ केली. त्यानंतर भुकेची जाणीव तीव्रतेने व्हायला लागली . जेवणाला अजून वेळ होता. त्यामुळे हलका नाश्ता करायचा विचार केला. हॉटेलच्या थोड पुढे बस स्थानक होते. बस स्थानका जवळ एखाद वाहात हॉटेल असतच. लोकांची कायम ये जा असल्याने अशा ठिकाणी ताजे गरम पदार्थ पण मिळतात. या व्याख्येत बसणारे "हॉटेल वसंत" जिंजी बस स्थानका समोर आहे. इडली, वडे, डोसे काफी आणि अनलिमिटेड सांबार चटणी इथे मिळते . याशिवाय उत्तम साउथ इंडीयन आणि बंगाली मिठाई इथे मिळते. त्याचा यथेच्छ आस्वाद घेउन गावात फेरफटका मारला . किल्ल्याबद्दची पुस्तक मिळतात का पाहीले . बऱ्याच ठिकाणी स्थानिक लेखकानी लिहीलेली किल्ल्यांवरची पुस्तके असतात. त्यात वेगळी माहिती मिळते . इथे भाषेचा खुप मोठा प्रॉब्लेम होता. तरी दोन दुकान मिळाली पण त्यातली पुस्तक तामिळमध्ये असल्याने काही कळण्याची शक्यता नव्हती . किल्ल्याचा नकाशा असता तरी पुस्तक घेतल असत पण तोही नव्हता.

         

चिकन चेट्टीनाड बरोबर भला मोठा डोसा.
रात्री हॉटेलला लागूनच असलेल्या अन्नपूर्णा रेस्टॉरंट मध्ये गेलो . तिथे सकाळी बिर्याणीचा बोर्ड पाहीला होता . पण टेबलावर बसल्यावर कळल बिर्याणी सकाळीच मिळते. मग चिकन चेट्टीनाड विथ डोसा मागवला. वेटरने टेबलावर डायरेक्ट केळीच आडव पान पसरल. त्यावर चिकन चेट्टीनाड बरोबर राक्षसी तव्यावर बनवलेला भला मोठा डोसा. एका डोशातच गार झालो. अप्रतिम चवीच चिकन आणि सोबत डोसा आनि अनलिमिटेड चटणी आणि सांबार, मग काय विचारता आडवा हात मारला ..... दिवसाचा शेवट रसपूर्ण झाला .



कृष्णगिरी किल्ला


कृष्णगिरी किल्ला

कृष्णगिरी किल्ला पायथ्याचा तलाव




किल्ल्यावरील सर्व दरवाजे आयताकृती आहेत




सकाळी उठल्यावर कृष्णगिरीचा पायथा गाठला. किल्ल्याचे तिकिट काउंटर अजून उघडले नव्हते. तिथे असलेल्या रखवालदाराशी गप्पा मारल्या . तो मिल्ट्रीतून निवृत्त झाल्याने त्याला बऱ्यापैकी हिंदी येत होते. कृष्णगिरीचा डोंगरही मोठ मोठे शिलाखंड एकमेंकांवर रचून तयार केल्यासारखा आहे. त्यातूनच पायऱ्या काढलेल्या आहेत. किल्ल्यावर दगडांची रासच असल्याने झाड जवळजवळ नाहीतच. किल्ल्याच्या पायथ्याशी एक तळ आहे . ते पाहून किल्ला चढायला सुरुवात केली मिनिटात पहिल्या प्रवेशद्वारापाशी आलो. या प्रवेशव्दारा अगोदर एका उंच खडकावर सुटा गोल बुरुज आहे . या बुरुजावर तोफ फिरवण्यासाठी असलेल्या रॉडसाठी केलेली केलेली खाच पाहायला मिळते. या बुरुजाच्या पुढे किल्ल्याच्या उजव्या बाजूने तटबंदी बालेकिल्ल्यापर्यंत नेलेली आहे. ही तटबंदी थेट राजागिरी किल्ल्यापासून सुरु होते आणि पूर्ण फिरुन तिन्ही किल्ल्याना कवेत घेते. या तटबंदीच्या बाजूने किल्ल्याच्या पायथ्या पासून वर पर्यंत पायऱ्या आहेत. तटबंदीची डागडूजी करण्यासाठी, टेहळ्यांसाठी  आणि पर्यायी मार्ग म्हणून या पायऱ्या बांधल्या असाव्यात. या पायऱ्या जागोजागी तुटल्यामुळे सध्या तेथून जाता येत नाही. पहील्या प्रवेशव्दारापाशी विश्रांती घेउन पुढे चढाई चालू केल्यावर दहा मिनिटात दुसरे प्रवेशद्वार येते. या किल्ल्याची प्रवेशव्दार आयताकृती आहेत. त्याना कमानी नाहीत आणि बाजूला बुरूजही नाहीत. पण दरवाजांच्या आतल्या बाजूस देवड्या आहेत. दुसरा दरवाजा पार केला की खडा चढ चालू होतो. १० मिनिटात आपण तिसऱ्या दरवाजापाशी पोहोचतो. या प्रवेशव्दारावरच एक कॅप्सुल बुरूज आहे. तिसरे प्रवेशद्वार पार केले की पुन्हा खडा चढ चढून आपण किल्ल्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दरवाजात दाखल होतो. याठिकाणी देवड्यांच्या खांबावर कोरीवकाम केलेले आहे. त्यात एक हनुमंताची मुर्ती कोरलेली आहे

श्रीकृष्ण मंदिर

श्रीकृष्ण मंदिर

कृष्णगिरी चौथे प्रवेशव्दार आणि बालेकिल्ल्यावरील इमारती





चौथा दरवाजा पार केल्यावर आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. याठिकाणी बऱ्याच वास्तू आहेत.  समोरच धान्यकोठार आहे. त्याच्या वरच्या बाजूस रंगनाथ मंदिर आहे . मंदिराच्या खांबावर सुंदर मूर्ती आणि नक्षी  कोरलेली  आहे. पण नेहमी असतात तशा उठावदार मुर्ती येथे पाहायला मिळत नाहीत. मंदिराच्या गाभाऱ्यात कोणतीही मुर्ती नाही . मंदिरात असलेल्या जिन्याने वर चढून जातांना काही भित्ती चित्रे काढलेली पाहायला मिळतात. वरच्या बाजूला कृष्ण मंदिर आहे. मध्यभागी मंदिर आणि चारही बाजूने अनेक खांब असलेल्या ओवऱ्या अशी रचना येथे केलेली आहे . श्रीकृष्ण मंदिरातही मुर्ती नाही . मंदिरातून बाहेर पडल्यावर समोरच एक सुंदर महाल दिसतो त्याला मंगल महाल या नावाने ओळखातात. किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर हा हवा महाल उभारलेला आहे . यातील सर्वात वरच्या मजल्याला सर्व बाजूनी छोट्या मोठ्या कमानदार खिडक्या आहेत. खिडक्यांना पडदे लावण्यासाठी दोन्ही बाजूला लोखंडी कड्या बसवलेल्या आहेत . हवा महालाच्या मध्यभागी गोल दगडी मंचक आहे . हवा महालातून एका बाजूला जिंजी शहर आणि दुसऱ्या बाजूला राजागिरी किल्ला आहे. हवामहालाच्या खालच्या मजल्यावर छताला झोपाळे लावण्यासाठी बसवलेल्या लोखंडी  कड्या आहेत. हवा महालाच्या बाजूला एक बांधिव हौद आहे. पुढे गेल्यावर दरबार हॉलची वास्तू आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पाहाण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत .

हवा महाल





कृष्णगिरी किल्ला पूर्ण पाहाण्यासाठी तास पुरतात. तिसरा किल्ला चंद्रायन दुर्ग हा किल्ला अभयारण्य क्षेत्रात असल्याने किल्ल्यावर जाण्याची परवानगी मिळत नाही. आपल्याकडे दुसरा दिवसाचा बराच वेळ शिल्लक राहीलेला असतो. त्याचा सदुपयोग करायचा असल्यास चेनैला परत जाता ९० किमी वरील वेल्लुर गाठावे. जिंजी बस स्थानकातून २१६ क्रमांकाची बस तसेच प्रायव्हेट बस वेल्लोरला जातात. वेल्लूरला भुईकोट किल्ला आहे. इसवीसन १६७७ मध्येच . शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता. किल्ल्याचा बराचसा भाग पोलिस खात्याच्या ताब्यात आहे. परंतु तटबंदीवरुन किल्ला व्यवस्थित फ़िरुन पाहाता येतो. किल्ल्यातील पुराण वस्तू संग्रहालय, जलकंदेश्वर मंदिर पाहाण्यासारखे आहे. पण त्याआधी पोटपूजा करुन घेणे आवश्यक होते. किल्ला पाहून पुन्हा हॉटेलवर परतलो. घामाने डबडबलेल्या आणि उन्हाने तापलेल्या शरीराला थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे आराम मिळाला आणि सपाटून भूक लागली. अन्नपूर्णा हॉटेल गाठले. काल बिर्याणी खायची राहीली होती. चिकन बिर्याणीची ऑर्डर दिल्यावर. वेटरने टेबलावर केळीचे आडवे पान अंथरले. चिकन बिर्याणी , दहीकांदा , टॅमोटो चटणी आणि पायसम आणून दिल्यावर जीव केळीच्या पानात पडला ...अजून काय हव आडवा हात मारला. तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने जिंजीचा निरोप घेतला.

चिकन बिर्याणी , दहीकांदा , टॅमोटो चटणी आणि पायसम


इतिहास :- इसवीसनाच्या नवव्या शतकात चोला राजघराण्याने याठिकाणी छोटासा किल्ला बांधला. तेराव्या शतकात हा किल्ला विजयनगर साम्राज्याच्या ताब्यात गेला. त्यांनी या किल्ल्याचा विस्तार केला. विजयनगर साम्राज्याची शकले झाल्यावर जिंजीच्या नायकाच्या ताब्यात हा किल्ला होता. पंधराव्या शतकात हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहाकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत इसवीसन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला. छ. संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडीक यांच्याकडे कर्नाटक प्रांताची सुभेदारी होती. जिंजीच्या किल्ल्याच्या आश्रयाने त्यांनी म्हैसूर आणि मदुराईचा नायक यांच्याशी दोन हात केले. यांनी स्वराजाच्या सीमा थोड्याफ़ार वाढवल्या . त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मुघल महाराष्ट्रात धुमांकुळ घालत होते तेंव्हा त्यांनी हा प्रदेश मराठ्यांकडेच राहील याची काळजे घेतली. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर मोघलांनी रायगडाला वेढा घातला. ५ एप्रिल १६८९ ला रायगडावरुन निघालेले छ. राजाराम महाराज मोगल सैन्याला हुलकावणी देत, तर कधी दोन हात करत २ नोव्हेंबर १६८९ ला जिंजीला पोहोचले. जिंजी या भक्कम बेलाग किल्ल्याला आपली राजधानी बनवून त्यांनी २६ डिसेंबर १६९८ पर्यंत ९ वर्षे राज्यकारभार पाहीला.

सप्टेंबर १६९० मध्ये झुल्फ़िकार खानाने जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातला. त्यानंतर मराठ्यांचे मुघल सैन्यावर छापे घालणे, रसद तोडणे हे प्रकार सुरु झाले. धान्य टंचाईने हैराण झालेल्या झुल्फ़िकारखानाने डिसेंबर १६९४ मध्ये जिंजीचा वेढा उठवला आणि तो वांदिवॉश येथे गेले. मराठ्यांचा ससेमिरा त्याच्या मागे चालूच होता त्यामुळे १६९६ मध्ये झुल्फ़िकारखान अर्काट येथे आला.  ९ जून १६९६ रोजी छ. राजारम महाराज आणि तारराणी यांना जिंजी किल्ल्यावर मुलगा झाला त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. ८ नोव्हेंबर १६९७ रोजी  झुल्फ़िकारखानाने जिंजीला वेढा घातला. २६ डिसेंबर १६९७ रोजी छ.राजाराम महाराजांनी गुप्तपणे जिंजीचा किल्ला सोडला आणि वेल्लोरकडे गेले. जानेवारी - फ़ेब्रुवारी १६९८ मध्ये झुल्फ़िकारखानाने जिंजीचा किल्ला जिंकुन घेतला. औरंगजेबाने जिंजीचे नाव बदलून नुसरतगड ठेवले.  मुघलांकडून हा किल्ला कर्नाटकाच्या नवाबांकडे (अर्काटच्या नवाबांकडे) गेला. इसवीसन १७५० मध्ये जिंजीचा किल्ला फ़्रेंचांनी जिंकून घेतला. इसवीसम १७६१ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला फ़्रेंचाकडून जिंकून घेतला. त्यानंतर हा किल्ला हैदर अलीच्या ताब्यातही काही काळ होता. इसवीसनाच्या अठराव्या शतकात जिंजीचा किल्ला राजा स्वरुपसिंग बुंदेला याच्य ताब्यात होता. त्यानंतर त्याचा मुलगा तेजसिंग बुंदेला ( तो देसिंगु या नावाने प्रसिध्द होता) याच्या ताब्यात जिंजीचा किल्ला होता.



जिंजीचा किल्ला पाहाताना …..

ऱाजगिरी किल्ल्याची दारे सकाळी  वाजता उघडतात आणि संध्याकाळी  वाजता बंद होतात.किल्ल्यावर  वाजल्यानंतर प्रवेश दिला जात नाहीत्यामुळे सकाळीच किल्ला पाहायला सुरुवात  करावी. कृष्णगिरीचे प्रवेशव्दार सकाळी ९ वाजता उघडते आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होते.  

या भागातील उन आणि आर्द्रता (ह्युमिडीटीयामुळे प्रचंड घाम येतोकिल्ल्याची प्रवेशद्वारे  लाउघडत असल्याने उन्हातच किल्ला चढावा लागतोत्यामुळे किल्ल्यात प्रवेश केल्यावर पायथ्याची ठिकाणे  पाहाता थेट किल्ला चढायला सुरुवात करावीत्यामुळे वेळ आणि स्टॅमिना दोन्ही वाचतोयेताना ही सर्व ठिकाणे आरामात पाहाता येतात.

किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाहीकिल्ल्याच्या खाली असलेल्या धान्यकोठारा जवळ पाण्याचा  एकमेव नळ आहेतेथे पिण्याचे पाणी भरुन घेता येइलकिमान  लीटर पाणी सोबत बाळगावे.

ऱाजगिरी आणि कृष्णगिरी दोन्ही किल्ल्यावर माकडांचा त्रास आहेत्यामुळे खाण्याचे पदार्थ सॅक  मध्येच ठेवावेत . उघड्यावर खायला बसले की माकडे त्रास देतातमाथ्यावरील कोठारात किंवा  वाड्यात बसून निवांत खाता येते.

जुलै ते सप्टेंबर आणि नोव्हेंबर ते जानेवारी किल्ला पाहाण्यासाठी योग्य काळ आहेअर्थात   पावसाळ्यात फोटोग्राफी वर मर्यादा येते

राजगिरी किल्ला आणि परिसर व्यवस्थित पाहाण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो.

कृष्णगिरी किल्ला छोटा आहे तो पाहाण्यासाठी  तास पुरतात .

ऱाजगिरी आणि कृष्णगिरी हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहाण्यासाठी एकच १५/- रुपयाचे तिकिट काढावे लागतेपण दोन वेगवेगळ्या दिवशी किल्ले पाहील्यास दोनदा तिकीट काढावे लागते.

दोन्ही किल्ले एका दिवसात पाहाणे शक्य आहेपण त्यात दोन्ही किल्ल्यांवर अन्याय होतोधावत धावत किल्ले बघावे लागतात.

१०जिंजी गावात राहाण्याची, नाश्त्याची आणि जेवणाची चांगली सोय आहे . हॉटेल शिवन हे एकमेव हॉटेल ऑनलाईन बुकींगसाठी उपलब्ध आहेहे हॉटेल मध्यवर्ती ठिकाणी असल्याने खाण्याची आणि  जेवणाची सोय उत्तम होतेशिवमला लागूनच असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा मध्ये नॉनव्हेज आणि  बिर्याणी उत्तम मिळतेबस स्थानका समोर असलेले हॉटेल वसंत नाश्त्यासाठी उत्तम आहेयाशिवाय गावात  लॉज आहेत.


चेनै ते चेनै असा चार दिवसाचा कार्यक्रम आखल्यास बरीच ठिकाणे पाहून होतातपहिल्या दिवशी  चेनै फ़िरुन घ्यावेदुसर्या दिवशी थेट जिंजी गाठावेजिंजीला मुक्काम करुन दिड दिवसात राजागिरी आणि कृष्णगिरी हे दोन किल्ले पाहावेततेथून थेट वेल्लोर गाठावे. (जिंजीहून वेल्लोरला जाण्यासाठी २१६ क्रमांकाची बस आहे.)
वेल्लोरचा किल्ला पाहून कांचीपूरम गाठावेतिसर्या दिवशी कांचीपुरमला मुक्काम करावाचौथ्या  दिवशी सकाळी कांचीपुरमची मंदिरे पाहून महाबलीपुरम गाठावेमहाबलीपुरम पाहून चेनैला येऊन  परतीचा प्रवास करावाहा सर्व प्रवास बसने करणे शक्य आहे कारण या भागात पब्लिक आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणावर आहे. पण भाषेचा आणि लिपीचा प्रॉब्लेम आहे. बस वरील पाट्या वाचता येत नाहीत. चेनै ते चेनै प्रवासाठी गाडी केल्यास कमी त्रासात ही सर्व ठिकाणे पाहून होतात. 


NH-77 जिंजी-तिरुवन्नमलाई महामार्गा वरुन राजगिरी किल्ल्याची मागिल बाजू


      

Friday, December 8, 2017

अदृश्य किटकांच्या जगात Leaf Mining Worm, Bag Worm, Spittle bugs or Froghopper

किल्ल्यावर, निसर्गात भटकंती करतांना आजूबाजूला निरखायची सवय कधी लागली ते कळलच नाही. या सवयीमुळे अनेक नविन गोष्टी सापडल्या , अर्थात हजारो वर्ष निसर्गातच असलेल्या पण माझ्यासाठी मात्र नविन. त्याचा धांडोळा घेतांना अनेक पुस्तक वाचली, काही संग्रहात जमा झाली. या विषयातील तज्ञ मित्रांशी चर्चा केली त्यांना शंका समाधान होई पर्यंत छळल. हि सर्व प्रोसेस प्रत्येकवेळी नविन काही दिसल की चालू होते. 

किटकांची दुनिया तर एकदम वेगळी आहे. सगळ्यात जास्त संख्येने असलेले हे आपले सोबती आपल्याकडून तसे दुर्लक्षित आहेत. दिसला किटक की मार किंवा ठेच हा आपला बाणा राहीलेला आहे. पण मला मात्र माझ्या भटकंतीत किटकांच वेगळच जग दिसल. त्यातील ३ किटकां बद्दल........
 
लीफ़ मायनिंग वर्मने पानावर काढलेली रांगोळी . फ़ोटो सौजन्य गुगल

लीफ़ मायनिंग वर्म (Leaf Mining Worm):- हेळवाकची रामघळ ओलांडून भैरवगडच्या वाटेला लागलो होतो. वाट कोयनेच्या जंगलातून होती. कधी दाट जंगल तर कधी उघड्या बोडक्या पठारावरुन पायवाट पुढे पुढे जात होती. अंतर जास्त असल तरी हाताशी वेळ भरपूर असल्याने नेहमी प्रमाणे नवीन काही दिसतय का पाहात होते. पायवाटेला लागून असलेल्या मोठ्यामोठ्या वृक्षांच्या खाली झुडप वाढलेली होती. त्या झुडूपांच्या काही पानांवर पांढऱ्या वाकड्या तिकड्या जाड रेषा दिसत होत्या. पहिल्यांदा अस वाटल की कुठल्यातरी पक्षाची शीट पडून पानावर पांढरी नक्षी तयार झाली असेल. पण जवळ जाऊन पान नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आल की, पान कोणीतरी खाल्ल्यामुळे अशी पांढरी नक्षी तयार झाली आहे. सुदैवाने ट्रेकला आमचे एन्व्हॉर्मेंटलिस्ट प्राची चिन्मय होते. त्यांना ती पान दाखवल्यावर त्यांनी सांगितले की हे मायनिंग वर्मचे प्रताप आहेत. तो पानात शिरुन पान खात जातो. त्या ठिकाणचे हरीतद्रव्य त्याने खाल्ल्याने पानावर पांढरी नक्षी तयार होते. ही माहिती कुठेतरी डोक्यात होती. गेल्या महिन्यात वैतरणा काठच्या जंगलात फ़िरतांना एका झुडपाच्या सुकलेल्या पानावार परत ती चिरपरिचित नक्षी दिसली. मग मायनिंग वर्मने परत डोक वर काढल. 

Leaf Mining Worm

मायनिंग वर्म हा सहजासहजी न दिसणारा किडा आहे. Lepidoptera जातीचे पतंग (moths), sawflies (Symphyta, a type of wasp) आणि माशा flies (Diptera) यांची मादी योग्य झाड निवडून त्याच्या पानांवर जवळपास पारदर्शक, चमकणारी, अंडी घालतात. मादी ५ दिवसांत ३६ ते ५५ अंडी देते. त्यातुन ३ ते ५ दिवसांत अळ्या बाहेर येतात. अंड्यातून बाहेर येणारी अळी पानाला भोक पाडून पानात शिरते आणि पानाच्या आवरणात शिरुन पान खायला सुरुवात करते. पानातील सेल्युलोज टाळून इतर ऐवज खाते. पानाच्या आवरणाखाली लपल्यामुळे भक्षकांपासून अळीचे संरक्षण होते. पण पानात स्त्रवणार्या टॅनीन सारख्या विषारी रसायनांपासून अळीला धोका असतो. अळी पान खात जसजशी पुढे सरकत जाते तसतसा तिच्या विष्ठेमुळे पांढरा पडलेला पानाचा भाग दिसायला लागतो. या पांढऱ्या रेषेच्या पॅटर्नवरुन तज्ञांना पानात कोणती अळी आहे हे समजते. त्या ठिकाणचे क्लोरोफ़ील (chlorophyll) नष्ट झाल्याने पान सुर्यप्रकाशापासून अन्न तयार करु शकत नाही (photosynthesise). त्यामुळे अळी शिरलेले पान झाडाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरते. अशा रोगट पानांमुळे झाडाची वाढ खुंटते. पिकांचे उत्पादन कमी होते. महाराष्ट्रातील शेतकरी या अळीला नाग अळी या नावाने ओळखतात. पानावर नागमोडी नक्षी काढते म्हणून तीला नाग अळी म्हणातात.

डावीकडच्या फ़ोटोत अळीने पोखरलेले पान तर उजवीकडच्या फ़ोटोत पानाने केलेली नक्कल, फ़ोटो सौजन्य गुगल  

पानात लपून अळीने तर स्वत:चे तीच्या भक्षकांपासून संरक्षण केलेले पण झाडांचे काय ? त्यांची पान अळीच्या भक्षस्थानी पडून त्याच नुकसान होतच असत. आपली पान या अळीच्या भक्ष्यस्थानी पडू नयेत यासाठी झाडानेही स्वत:मध्ये बदल केल्याचे जर्मनीच्या बैरुट युनिव्हर्सिटीच्या बॉटोनिक्सना आढळून आले. इक्वेडोर देशातील जंगलात संशोधन करतांना Caladium steudneriifolium (आपल्या परस बागेत उगवणार्‍या अळूच्या जातीचे झाड ) जातीच्या झाडाच्या पानावर त्यांना लीफ़ मायनींग वर्मच्या अळीने बनवल्यासारखी पांढरी नक्षी आढळून आली. त्या झाडावर अंडी घालू नयेत यासाठी पानांनीच (झाडाने) केलेला तो देखावा होता. अंडी घालण्यासाठी योग्य पानाच्या शोधात असलेल्या पतंगाच्या किंवा माशीच्या मादीला त्या पानावरुन उडतांना पानावरील नक्षीमुळे पानात आधीच कोणत्यातरी अळीने घरोबा केल्यासारख दिसत असणार. अशा आधीच खाल्लेल्या पानावर पतंगाची किंवा माशीची मादी अंडी घालणार नाही. त्यासाठी ही नक्षीची आयडीया झाडाने केली होती. हे खर आहे की नाही हे पाहाण्यासाठी बॉटोनिक्सनी महिनाभर खपून त्या परीसरातील अळूच्या पानांची मोजणी केली. तेंव्हा एकूण हिरव्या पानांपैकी ८% पानात अळीने शिरकाव केला होता. तर पांढरी नक्षी असलेल्या पानांपैकी फ़क्त ०.४% पानातच अळीने शिरकाव केलेला होता, म्हणजे झाडाने केलेल्या नक्षीची आयडीया परफ़ेक्ट होती. अर्थात झाडाला स्वत: मध्ये असा बदल करण्यासाठी कित्येक वर्ष लागली असतील. या अळीमुळे होणारे पिकांचे आणि बागांचे नुकसान रोखण्यासाठी किटकनाशक शोधण्या आधीच निसर्गाने या अळीचा प्रादुर्भाव रोखण्याचा उपाय शोधला होता.

या पानावरची नक्षी सुध्दा मादीला फ़सवण्यासाठी असेल काय?
 आपल्या आजूबाजूला निसर्गात अशा अनेक घडामोडी चालू असतात. मालवण जवळचे माझे गाव घुमडे दाट जंगलात आहे. गावी गेलो की रात्री अंगणात उशिरापर्यंत पुस्तक वाचत बसायला मला आवडते. रात्रीच्या नीरव शांततेही जंगलात अनेक घडामोडी घडत असतात. त्या दिवशी मी असाच १२ -१ पर्यंत वचत बसलो आणि मग जाऊन झोपलो. सकाळी उठून चहा घेऊन अंगणात आलो तर अंगणाच्या एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत मुंग्यानी माती लिंपून बोगदा बनवला होता आणि त्या आतून त्यांची ये-जा चालू होती. जंगलातून अंगणातल्या स्वच्छ जागी आल्यावर ते अंतर शत्रूच्या दृष्टीस न पडता पार पाडण्यासाठी मुंग्यानी हा बोगदा बनवला असावा. मी टेपच्या सहाय्याने त्या बोगद्याची लांबी मोजली ती अंदाजे १० फ़ूट भरली. एवढ्या लहान किटकांनी कुठलीही अवाजार न वापरता, कुठलाही आवाज न करता हा लांबलचक बोगदा एका रात्रीत व्यवस्थित बांधला होता. बोगद्याचे फ़ोटो काढतांना एके ठिकाणी ढासळलेल्या बोगद्यात राणी मुंगी सारखी मोठी मुंगी दिसली. बहूतेक एखाद्या शत्रूमुळे, अन्न कमी झाल्यामुळे किंवा इतर कुठल्या तरी कारणामुळे जुने वारुळ सोडावे लागले असावे. टेहळ्या मुंग्यांनी वारूळासाठी नविन जागा शोधली असावी त्याठिकाणी वारुळाचे स्थलांतर चालले असावे.  


मुंग्यांनी एका रात्रीत बनवलेला लांबलचक बोगदा 

याच अंगणात साधारण १६ वर्षापूर्वी एका रात्री डोंगराच्या दिशेकडून अनेक काळे डोंगळे येतांना दिसले. एकामागोमाग एका रांगेत येणारे ते डोंगळे काळ्या प्रवाहासारखे दिसत होते. त्यातले काही डोंगळे रांग सोडून एकेकटे इकडे तिकडे हिंडत होते. त्यातलाच एक डोंगळा त्यावेळी माझ्या दिड वर्षाच्या मुलाच्या पायाला चावला आणि त्यातून रक्त आल होते. त्यामुळे हा प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला होता. त्यानंतर काही वर्षाने एका रात्री अंगणात वाचत बसलो असतांना पुन्हा हा डोंगळ्यांचा प्रवाह डोंगराच्या दिशेने आला आणि वहाळाच्या दिशेकडे चालला होता. मी टॉर्च घेऊन पायर्या चढून डोंगराच्या दिशेने गेलो . पालापाचोळ्यातून डोंगळ्यांची फ़ौज पुढे सरकत होती. त्यांचा उगम शोधण्याची इच्छा होती पण ऱात्रीच्या वेळी पुढे जायचे माझ धाडस झाल नाही. मधल्या काळात माझ्या वाचनात विजय देवधरांचे " अफ्रीकन जू जू" हे पुस्तक आले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजानी अफ्रीकेच्या जंगलात भटकंती केली आणि आपले अनुभव लिहून ठेवले त्यावर हे पुस्तक आहे. या पुस्तकात दोन सैनिकांचा एक अनुभव दिला आहे. "जंगलातून जाताना रात्र झाली म्हणून त्यांनी मोकळ्या जागी तंबू ठोकला. रात्री निजानीज झाल्यावर अचानक एका सैनिकाला काहीतरी चावले आणि तो किंचाळत उठला. मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांना मोठ्या आकाराच्या दोन मुंग्या दिसल्या. त्याच प्रकाशात त्यांनी तंबूचे छत पाहील्यावर त्यांना त्यावरुन मुंग्याचा प्रवाह जात असल्याचे आढळले. त्यातल्याच दोन मुंग्या तंबूत शिरल्या होत्या. रात्रभर मुंग्यांचा तो प्रवाह तंबूवरुन जात होता. दुसऱ्या दिवशी पुढे जाताना आदल्या दिवशी मरुन पडलेल्या हत्तीच्या जागी त्यांना फक्त सापळा दिसला. मुंग्यांनी त्या हत्तीचा चट्टामट्टा केला होता. त्यांनी अस नमूद केल की, या मुंग्या जंगल सफाईच काम करतात. जंगलात मरुन पडलेले किडे-मकोडे ते हत्ती पर्यंतचे प्राणी खाऊन मुंग्या जंगल साफ करतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या छोट्या जिवंत प्राण्यानाही त्या सोडत नाहीत. त्या ठरलेल्या मार्गावरुन जंगलात फिरत असतात. पुन्हा काही दिवसांनी त्या परत त्याच जागी येतात" . हे सर्व वाचल्यावर माझ्या गावच्या डोंगळ्यांच्या फौजेच कोड सुटल्या सारख मला वाटल. आमच गाव वसून काही शतक झाली असतील. पण त्याआधी आणि आजही त्याठिकाणी जंगलच आहे. आज जंगल रोडावल्यामुळे, माणसाच्या हस्तक्षेपामुळे डोंगळ्यांची संख्या कमी झाली असेल पण ते डोंगळे हजारो वर्षे निसर्गाने त्यांना नेमून दिलेल साफसफाईच काम करत हिंडत आहेत. त्या जंगलातल्या माझ घर असलेल्या जागेवरुन ते शतकानुशतक जाताहेत, तसे आजही जातात. माझ घर त्यांच्या खिजगणतीतही नाही. या माझ्या निष्कर्षा बाबत किटकांचा अभ्यास असणाऱ्या काही मित्रांशी बोललो. त्यातला एकजण म्हणाला ते एका विशिष्ट तिथीला त्याचवेळी, त्याच ठिकाणाहून ते जात असतील. पुढच्यावेळी दिसल्यावर त्यांची वेळ आणि तिथीची नोंद करुन ठेव. आता मी ती डोंगळ्यांची वाहाती नदी परत दिसण्याची वाट बघतोय. 

मोळी किडा (Bag Worm)

मोळी किडा (Bag Worm) :- पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पूर गावात पोहोचलो. शेताच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडावर बाभळीचेच काटे वापरुन शंकुच्या आकारचे २ इंचाचे घरटे लटकलेले दिसले. ते घरटे फ़ांदीला घट्ट बांधलेले होते. लाकडाच्या मोळी सारखे दिसणारे हे घरटे Bag Worm चे होते. Psychidae फ़ॅमिलीतल्या हा पतंगाची अळी ज्या झाडावर असते त्या झाडाची पाने, साल, काटे वापरुन स्वत:साठी संरक्षक कवच बनवते आणि त्यात राहाते.  त्यामुळे ती झाडाशी एकरुप होते आणि अळीचे शत्रूंपासून संरक्षण होते.

मोळी किडा (Bag Worm)

या पतंगाची मादी आयुष्यभर तीने झाडापासून बनवलेल्या संरक्षक कवचातच राहाते. तिथेच ती अंडी देते आणि मरते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या संरक्षक कवचाच्या मागील बाजूस असलेल्या छिद्रातून बाहेर येतात आणि आपल्या तोंडातून निघणार्या दोर्याने फ़ांदीला, पानाला लटकतात. वाहात्या वार्याने या अळ्या दूरवर फ़ेकल्या जातात. एकाच ठिकाणी अळ्यांची गर्दी होऊ नये आणि सर्वांना पुरेसे अन्न मिळावे यासाठी केलेली ही योजना आहे. एकदा योग्य ठिकाणी पोहोचल्यावर अळी झाडाचीच साधनसामुग्री वापरुन स्वत: भोवती सुरक्षा कवच बनवते. आणि त्यात राहूनच झाडाची पान खायला सुरुवात करते. योग्य वेळी अळी स्वत:भोवती कोष विणते आणि आपल घरट एखाद्या फ़ांदीच्या टोकाला घट्ट बांधते. या कोषातून नर पतंग बाहेर आला तर तो आपल्या पंखांच्या सहाय्याने उडून जातो. मादी मात्र आयुष्यभर आपल्या सुरक्षा कवचात राहाते, तिला पंख फ़ुटत नाहीत. नर आणि मादीचे मिलन झाल्यावर नर मरतो आणि त्या कवचातच अंडी घातल्यावर मादी प्राण सोडते. 

थुंकी किडा (Spittlebugs or Froghopper)

थुंकी किडा (Spittlebugs or Froghopper) :- पावसाळ्यात माझ्या गावात अनेक रान फ़ुल फ़ुलतात. काही वर्षापूर्वी त्यांच डॉक्युमेंटेशन करत होतो. या छोट्या रानफ़ुलांचे फ़ोटो काढायचे म्हणजे त्यांच्या एकदम जवळ जाऊन माय्क्रो मोडवर काढावे लागतात. असाच एका फ़ुलाचा फ़ोटो काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूच्या गचपणात घुसलो होतो. जमिनीवर बसून फ़ुलाचा फ़ोटो काढतांना बाजूच्याच झुडपाच्या बेचक्यात थुंकी दिसली. एवढ्या जवळ ती थुंकी पहिल्यावर पटकन बाजूला झालो. नंतर आजूबाजूला पाहिल तर अनेक झुडपांवर थुंकी दिसायला लागली. या सुनसान रस्त्यावर अशा अडगळीच्या ठिकाणी येउन कोण थुंकणार ? असा विचार माझ्या मनात आला. त्या थुंकी सारख्या दिसणार्‍या पदार्थाच नीट निरिक्षण केल्यावर लक्षाअत आल हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. बाजूला पडलेली काडी काडी घेऊन हालवल्यावर आतला किडा बाहेर आला.

थुंकी किडा (Spittlebugs or Froghopper)

आपल्या देशात थुंक संप्रादयातल्या लोकांची कमी नाही. कुठेही पचापच थुंकण यांना भुषणावह वाटत. स्वच्छता अभियानावर करोडो रुपये खर्च करुनही लोकांच्या काही घाणेरड्या सवयी सुटत नाहीत , कुठेही थुंकणे ही त्यापैकी एक सवय. याच सवयीचा या किड्याने आपल्या संरक्षणासाठी उपयोग करुन घेतला आहे. सिकाड्याच्या जातीचा (Prosapia bicincta) हा कीटक ऊंच आणि लांब उड्या मारतो म्हणून त्याला फ़्रॉग हॉपर (Froghopper) या नावानेही ओळखतात. हा किडा स्वत:च्या लांबीच्या शंभरपट लांब उडी मारु शकतो. थुंकी किडा झाडातील रस पिऊन हा आपली उपजिविका करतो. त्याच रसापासून तो आपल्या भोवती पांढर्‍या रंगाचे थुंकी सारखे दिसणारे कवच तयार करतो. थुंकी सारख्या दिसणार्‍या कवचामुळे या किड्याला थुंकी किडा (Spittlebug) या नावाने ओळखले जाते. थुंकी किडा स्वत: भोवती जो फ़ेस तयार करतो त्याला उग्र वास आणि कडवट चव (acrid taste) असते. त्यामुळे त्याचा उपयोग किड्याला शत्रू पासून संरक्षणासाठी होतो. त्याच बरोबर या फ़ेसामुळे त्याचे थंडी आणि उष्णतेपासून संरक्षण होते.

थुंकी किडा (Spittlebugs or Froghopper)


भटकंतीत हे किटक मला प्रत्यक्ष दिसले नाहीत पण त्यांचा पाठपुरावा केल्यावर माहितीचे भांडार माझ्यापुढे उघडल. त्यातून मला मिळालेला आनंद सर्वांबरोबर वाटायचा हा मी प्रयत्न केलाय. मी काही किटक विषयातला तज्ञ नाही त्यामुळे या माहितीत काही त्रुटीही असू शकतात. याबबत कोणी नविन माहिती शेअर केली तर मला नक्कीच आवडेल.

अमित सामंत



Parasa Lepida या किटका वरील ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा ....



""मृगाचा मखमली किडा"  हा  ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा ....