Tuesday, September 24, 2013

" पेव फुटणे " (Flowers in Sahyadri :-- Costus speciosus)

      
  " बॉम्बस्फोटा नंतर अफवांचे पेव फुटले ", "अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले" असे अनेक मथळे वर्तमानपत्रात आपण वाचत असतो. लहानपणी न समजून ही अनेक गोष्टी पाठ केल्या होत्या, त्यापैकी "पेव फुटणे - भराभर बाहेर पडणे",  हा वाकप्रचार ही पाठ करून १ मार्कही मिळवला होता. पण या शब्दाचा अर्थ पुढे कधीतरी मला माझ्याच अंगणात सापडेल असं मात्र वाटल नव्हत. सप्टेंबर महिन्यात गणपतीला गावी गेलो होतो, आमच्या सुपारीच्या बागेत जिथे नेहमी मोकळी जागा असते तिथे एकाच प्रकारच्या झुडूपांच गचपण माजल होत. त्या झुडूपांवर क्रेपच्या कागदासारखी दिसणारी पांढर्‍या रंगाची नरसाळ्या सारखी सुंदर फ़ुले फ़ुललेली होती. गावातल्या मित्राला त्याच नाव विचारल तर म्हणाला हे पेवाच झाड... आणि शाळेत केवळ घोकंपट्टी करून पाठ केलेल्या "पेव फुटणे" या वाकप्रचारचा अर्थ खर्‍या अर्थाने मला कळला. 

पेवच फुल (Costus speciosus)
Costus speciosus (family:- Zingiberaceae)

       

सुपारीच्या बागेत मला झालेल्या या साक्षात्कारामुळे "पेव" बद्दल कुतूहल निर्माण झाले. पेवच शास्त्रीय नाव Costus speciosus असून त्याच कुदुंब (family) Zingiberaceae आहे. ही "आल्याच्या" (आपण चहात, जेवणात वापरतो ते आलं) कुटुंबातील वनस्पती आहे. आल्यासारखे याचे कंद जमिनीत पसरतात. त्यातुन फ़ुटणारी झुडूपं आजुबाजूची जमिन व्यापून टाकतात. त्याठिकाणी इतर वनस्पतींना वाढायला वाव मिळत नाही. त्यामुळे आपल्याला "पेवच बेट" दिसायला लागत. दरवर्षी जुलै महिन्यात जमिनित असलेल्या कंदांमधून पेव उगवत, सप्टेंबर मध्ये त्याला फुलं येतात आणि नोव्हेंबर मध्ये हे झाड सुकून जा्ते. जेमतेम ४ ते ५ महिन्यांच आयुष्य असलेल हे झुडूप आहे.
पेवच बेट


         पेव ही झुडूप (shrub) या प्रकारात मोडणारी वनस्पती आहे. २ ते ३ मीटर उंच वाढणारी ही वनस्पती दाट सावलीत वाढते. त्यामुळे याच्या पानांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते.पान १५ ते ३० सेंटीमीटर लांब असतात. दाट झाडीखाली वाढणार्‍या या झुडूपाच्या पानांना झाडीतून झिरपणारा सूर्यप्रकाशाचा कवडसा पकडता यावा याकरीता पेवाच्या पानांची रचना मुख्य दांड्याभोवती सर्पीलाकार (Spiral) गोल जिन्यासारखी केलेली असते. याचा अजून एक फायदा म्हणजे एका पानाची सावली दुसर्‍या पानावर पडत नाही. 

  पेवच्या पानांची सर्पिलाकार रचना        


     पेवच्या बेटाकडे आपल लक्ष वेधले जाते ते हिरव्या बेटावर डोलणार्‍या त्याच्या नरसाळ्या सारख्या दिसणार्‍या पांढर्‍या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी -लाल रंगाची रुपांतरीत पाने पाहायला मिळतात. पूर्ण फुललेल फुलाचं तोंड खालच्या बाजूला झुकलेल असत. फुल पांढर्‍या रंगाच असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. यामुळे परागीभवनासाठी येणार्‍या किटकांना मकरंद (मध) कुठल्या दिशेला आहे त्याचे मार्गदर्शन होते. या लांब दांड्याच्या फुलातील मकरंद (मध) पिण्यासाठी / परागीभवनासाठी लांब सोंड असलेल ग्रास डेमन (Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae)  हे फुलपाखरू पेवच्या बेटातून उडतांना दिसत. हे कृष्णधवल रंगाचे फुलपाखरू असून पंखांवर पांढरे ठिपके असतात. या फुलपाखराला सावलीत, जमिनीलगत उडायला आवडते. त्याची सोंड त्याच्या आकाराच्या दुप्पट असते. उडतांना फुलपाखराची सोंड (Probosis) कॉईल सारखी गुंडाळलेली असते. पेवसारख्या लांब दांड्याच्या फुलावर बसल्यावर हे फुलपाखरू आपली सोंड उलगडून फुलातील मकरंद (मध) पिते. निसर्गातील हे परस्परावलंबन आश्चर्यचकीत करणारे आहे.

पेवच फुल आणि त्यावरील ग्रास डेमन फुलपाखरू 









Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae

      पेवच्या कंदांचा उपयोग प्राचीन काळापासून आयुर्वेदात ताप, दमा, खोकला आणि जंत यावरील औषधात होतो. ज्ञानेश्वरीतही पेवा़चा उल्लेख आलेला आहे.
  
जे भुलीचे भरिव। जे विकल्पाचे वोतिव। किंबहुना "पेव" विंचवाचे॥८-४५॥ ज्ञानेश्वरी.
  










                     





संदर्भ :-   1) Flowers of Sahyadri :- Shrikant Ingahallikar ,  2) महाराष्ट्रातील फुलपाखरे :- डॉ. राजू कसंबे.


"सह्याद्रीतील रानफ़ुलं"  हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.....

Sunday, September 1, 2013

अंतुर किल्ल्यावरचा गुप्त (भूयारी) मार्ग (Secret Passage on Antur Fort , DIst :- Aurangabad)

       

   अंतुर किल्ल्यावरील भव्य बुरुज
 
      किल्ल्यावरील चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे अबाल वृध्दांची नेहमीच उत्कण्ठा वाढवतात. लहानपणापासून वाचलेल्या अनेक रहस्य कथा, साहस कथांमधून आपल्याला या गोष्टी आधीच भेटलेल्या असतात, त्यांनी आपल्या मनाचा एक कप्पा व्यापलेला असतो. त्यात भर म्हणजे किल्ल्यावरील गुप्त मार्ग, भूयारे यांच्या भोवती तयार झालेल्या दंतकथांमुळे त्यांना एक गुढतेचे वलय प्राप्त झालेले असते. भूयारे आणि गुप्त वाटा यांच्या बद्दल जनमानसात अनेक अतिरंजीत समज पिढ्यान पिढ्या पसरलेले असतात. (उदा :- सिंधुदुर्ग किल्ल्यातील भूयार समुद्राखालून मालवण शहरात जात हो्ते., कुलाबा किल्ल्यातील भुयार समुद्राखालून अलिबाग मधील कान्होजी आंग्रे यांच्या वाड्यापर्यंत जाते. अशा भूयारांबाबत अनेक कथा वेगवेगळ्या किल्ल्यांवर ऎकायला मिळतात) त्या शास्त्रकाट्यावर पारखून न घेता त्यावर अंधविश्वास ठेवला जातो, याला कारण म्हणजे या भूयारांनी नकळत व्यापलेला आपल्या मनातील कप्पा. खरतर चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे ही किल्ल्याची महत्वाची अंग होती. त्याकाळचे राजकारण, युध्द, फंद - फितुरी यांच्याच साक्षीने होत होती.  महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्यावरील चोर (गुप्त) मार्ग अचानक पाहाण्याची संधी मिळाली आणि आम्ही हरखूनच गेलो.

बुरुजा खालील कातळातील गुहा व तटबंदी, अंतुर

त्याच झाल असं की, २०१३ च्या पावसाळ्यात पेडका, लोंझा ,कण्हेरगड, अंतुर या दुर्लक्षित किल्ल्यांचा अभ्यास करून www.trekshitiz.com  या साईटवर माहिती लिहीण्यासाठी आम्ही चाळीसगावात दाखल झालो. सकाळी लोंझा किल्ला पाहून अंतुर किल्ला गाठला. अंतुर जरी दुर्लक्षित किल्ला असला तरी किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायचा असेल तर दोन ते तीन तास लागतात. त्यात आम्ही नोंदी करीत, नकाशा बनवत किल्ला पाहात होतो. त्यामुळे किल्ला पाहायला अंमळ जास्तच वेळ लागला. त्यात भर पडली ती अर्धा - एक तास आम्हाला झोडपून काढणार्‍या पावसाची. संपूर्ण किल्ला पाहून संध्याकाळी ६.०० च्या सुमारास आम्ही अंतुर किल्ल्याच्या भव्य, सुंदर बुरुजासमोर बसून तो नजरेत साठवण्याचा प्रयत्न करत होतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण प्रसन्न होतं, वारा भन्नाट वहात होता. त्यामुळे दिवसभराचा शीण हळूहळू उतरत होता. खंदका पलिकडे बुरुजाच्या अर्ध्या उंचीवर बसून आम्ही त्या भव्य बुरुजाचे निरीक्षण करत होतो.

 अंतुर किल्ला दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगर रांगेच्या टोकावर बांधलेला आहे. मुख्य डोंगररांगेपासून किल्ला वेगळा करुन तो संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत करण्यासाठी त्याकाळच्या स्थापतींनी येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे २५० फूट लांब, १०० फूट रूंद व ३० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे २००० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दक्षिण बाजूला  उंचावर भव्य बुरुज व तटबंदी बांधलेली आहे. तर पूर्व- पश्चिम बाजूला खोल दरी आहे. शत्रु या खिंडीच्या पलिकडच्या बाजूस आल्यास बुरुजा आडून शत्रूवर हल्ला करणे सोपे होते. त्यातूनही जर शत्रू खंदकात पोहोचलाच, तर बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. दोन्ही बाजूला खोल दरी व मागील बाजूस असलेल्या खंदकाच्या भिंतीमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत. ही खाच बनवण्यामागे हा विचार असावा. खिंडीच्या किल्ल्याकडील भागात अंदाजे १०० ते १५० फुट उंचीचा कातळ आहे. त्या कातळावर तेवढ्याच उंचीचा भव्य बुरुज बनवण्यात आला आहे. या बुरुजाच्या बाहेरच्या बाजूस ३० फूट ते ५० फूट उंच तटबंदी बांधून तो संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत करण्यात आला आहे.

या बुरुजाचे खंदकच्या पलिकडे बसून निरीक्षण करतांना असे दिसून आले की, बुरुजाच्या खाली असलेल्या कातळाच्या तळाकडे उजव्या बाजूला एक भगदाड पडलेलं आहे. तशीच नजर फिरत वर आली, तर बुरुजाच्या खालच्या कातळात साधारण मध्यभागी एक गुहा दिसत होती. गुहेपासून थोड्या अंतरावर डावीकडे भिंत बांधून कातळात पडलेलं भगदाड बुजवल्याच दिसत होत. या भिंतीत जंग्याही ठेवलेल्या दिसत होत्या. किल्ला बांधतांना एवढा विचारपूर्वक बांधणारे स्थापती कातळात मध्येच भिंत बांधून त्यात जंग्या कारणाशिवाय बांधतील हे पटत नव्हत. मग नजर थोडीशी "झुम आऊट" करून या तीनही गोष्टी एकत्र पाहील्यावर त्यांना एकत्र सांधणारा काही दुवा असावा असे वाटायला लागले. गेल्याच वर्षी औरंगाबाद जिल्ह्या्तीला सुतोंडा किल्ला पाहीला होता. त्यालाही असाच कातळात कोरलेला खंदक होता आणि त्या खंदकातच किल्ल्याचे प्रवेशव्दार देवड्या व छोटासा भूयारी मार्ग कातळात कोरून काढलेला होता.



खंदकात कसे उतरायचे हा आता मुख्य प्रश्न होता. आमच्याकडे ३० फूटी रोप होता, पण वेळ कमी होता. खाली उतरण्यासाठी रस्ता शोधतांना उजव्या बाजूला चक्क कातळात कोरलेल्या ३ पायर्‍या दिसल्या. त्या उतरून गेल्यावर दरीच्या बाजूने एक चिंचोळी वाट खंदकात उतरत होती. खंदकात उतरल्यावर झुडूपामागे लपलेल्या भगदाडापाशी पोहोचलो.  


या भगदाडाच्या वरच्या बाजूस चुन्यात लावलेले दगड दिसत होते.एकेकाळी दगड लावून हे भगदाड बंद केलेले असावे. पूर्वीच्या काळी एक - दोन मुख्य प्रवेशव्दार सोडली तर इतर चोर दरवाजे, भिंती बांधून चिणून टाकले जात असत. भगदाडाची उंची २.५ ते ३ फूट होती. आत मध्ये मिट्ट काळोख होता. पावसाळा असल्याने अशा अंधार्‍या भागात साप, विंचू असण्याची दाट शक्यता होती. हातात काठी आणि टॉर्च घेऊन भगदडातून आत प्रवेश केला वाट काटकोनात वळून वर चढत होती. 

भूयाराचा अंर्तभाग, अंतुर


कातळात कोरलेल्या पायर्‍यांवरून १० मिनिटे चढल्यावर प्रकाश आणि गार हवेचा झोत जाणवायला लागला आणि आम्ही चक्क किल्ल्याखालील कातळाच्या मध्यभागी असलेल्या गुहेत पोहोचलो होतो. इथे भन्नाट वारा होता, समोर खंदकाची पलिकडची बाजू (जिथे काही वेळापूर्वी आम्ही बसलो होतो) ती दिसत होती. 



बुरुजा खालील कातळातील गुहा व तटबंदी, अंतुर
                                                     

 गुहेच्या आतल्या बाजूला बुरुजावर जाणारी भूयारी वाट दिसत होती. त्या वाटेवर थोडे अंतर चढल्यावर समोर वरून सुटून खाली पडलेल्या दगडांची रास दिसत होती. त्यामुळे हा भूयारी मार्ग अजून चिंचोळा झाला होता. त्या दगडांच्या राशीवर चढून पुढे सरकल्यावर आतून वटवाघळांचा आवाज व त्याच्या शीटेचा गुदमवणारा वास येत होता. आता बाहेर संध्याकाळचे ६.३० वाजून गेले होते. यापूढील मार्गाबद्दल काहीच अंदाज येत नव्हता, त्यामुळे माघारी परतण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. पुढच्या वेळी पूर्ण तयारीनीशी या गुप्तमार्गात शिरायचे असे ठरवून आम्ही परतीचा प्रवास चालू केला.

दगडांमुळे मार्ग बंद झाला होता.
      अंतुर किल्ल्यावरील या भूयारी मार्गाची नोंद पुरातत्व खात्याकडे नक्कीच असणार. त्यांनी जर हा गुप्त मार्ग मोकळा करून सर्वांसाठी खुला केला तर, या किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांच्या (अंतुर किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत १२ महिने वहानाने जाता येत) संख्येत वाढ होईल. त्यांना नविन काही पाहिल्याच समाधान मिळेल.


Friday, August 16, 2013

किल्ल्यांवरील पाणी स्थिरीकरण योजना. (Water Stabilisation Systems on the Forts)

पेडका किल्ल्यावरील एका खाली एक असलेले तलाव

           किल्ल्यांवरील टाकी, तलाव , विहीरी या व इतर पाणी साठावण्याच्या पध्दती हा माझ्या आवडीचा विषय आहे. किल्ल्यावरील हे पाणी साठे किल्ल्याबद्दल बरीच माहिती सांगून जातात. किल्ल्यावर किती शिबंदी असावी, किल्ला बांधला त्यावेळेचे पडणार्‍या पावसाचे प्रमाण, किल्ल्याचे महत्व वाढल्यावर पाणी साठवण्यासाठी केले गेलेले नवे उपाय यांचा अंदाजही या पाणी साठ्यांवरून करता येतो. किल्ला लढता ठेवण्यासाठी सैनिक अन्नधान्या इतकेच किंवा त्याहून जास्तच पाणी साठ्याला महत्व होते. त्यामुळे हा पाणी साठा वाढवण्याचे,  त्या टाक्यात, तलावात जास्तीत जास्त पाणी साठवण्याच्या अनेक युक्त्या आपल्या पूर्वजांनी (त्याकाळच्या स्थापतींनीं) शोधून काढल्या होत्या.  

यावर्षी भर पावसाळ्यात चाळीसगाव - औरंगाबाद परीसरातील किल्ल्यांवर जाण्याचा योग आला. पावसाळ्यामुळे पेडका किल्ल्यावरील तलाव चांगले भरलेले होते. त्यामुळे किल्ल्यावर राबवण्यात आलेली पाणी स्थिरीकरणाची योजना नीटच पहाता आली. पाणी स्थिरीकरण म्हणजे काय? डोंगरावरून, जमिनी वरून वहात येणारे पाणी आपल्या बरोबर माती, गाळ, कचरा घेऊन येते. हा गाळ टाकी, तलावात साठत जातो. या गाळावर पडणार्‍या साठलेल्या पाण्याच्या दाब पडल्यामुळे मातीचा थर सिमेंटसारखा घट्ट होतो. अशाप्रकारे दरवर्षी साठत जाणार्‍या गाळामुळे अनेक तलाव व धरण भरून जातात किंवा कायमची बाद होतात. पाण्याच्या दाबामुळे घट्ट झालेला हा गाळ काढणे ही मोठी खर्चिक व वेळकाढू बाब होते. त्यामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ खाली बसावा, मुख्य टाक्यात, तलावात येऊ नये यासाठी वहाते पाणी थोडावेळ थांबवून (स्थिरकरून) त्यातील गाळ खाली बसवण्यात येतो. यालाच पाण्याचे स्थिरीकरण म्हणतात. महाराष्ट्रातल्या बर्‍याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी अशा अनेक योजना राबवलेल्या पाहायला मिळतात.

पेडका किल्ल्यावर पाण्याचा मुख्य मोठा तलाव प्रवेशव्दाराच्या वरच्या अंगाला आहे. या तलावाच्या वर डोंगर पसरलेला आहे. या डोंगरावरून वहात येणारे पाणी थेट मोठ्या तलावात जाऊन तॊ गाळाने भरू नये यासाठी या तलावाच्या वर २ छोटे तलाव बनवलेले आहेत. सर्वात वरच्या पठारावर असलेल्या तलावात पठारावरून वाहाणारॆ पाणी व गाळ जमा होतो. तो तलाव भरला की वरचे पाणी बाजूच्या पन्हाळीतून खालच्या बाजूला असलेल्या बांधीव तलावात येते. इथे पाण्याला पुन्हा एकदा स्थिर करून त्यातील गाळ खाली बसवला जातो. या तलावाच्या बांधाच्या एका कडेला वरच्या बाजूस पाणी जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली आहे. त्यातून पाणी खालच्या मोठ्या तलावात जमा होते. यामुळे मोठ्या तलावात फारच कमी प्रमाणात गाळ जमा होतो. याशिवाय २ अतिरीक्त पाणी साठे तयार होतात आणि दरवर्षी वरच्या २ छोट्या तलावातील गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येतो.


मनोहर गडावरील पाणी जाण्यासाठी तटबंदीतील मोर्‍या
मनोहर गडावरील तलावाचे अवशेष
   
 मनोहर - मनसंतोषगड हे तळकोकणातले किल्ले, या भागात महामूर पाऊस पडतो. पावसाळ्यात मनोहर गडावरच्या वाड्यामागून एक ओढा वाहातो. आता गडाची तटबंदी जिथे कोसळलेली आहे तेथून या ओढ्याचे पाणी खालच्या दरीत पडते. किल्ला बांधतांना त्यावेळेच्या स्थापतींनी या ओढ्यातील पाण्याचा वेग कमी करण्यासाठी व पाणी साठवून त्याचा निचरा करण्यासाठी तटबंदी जवळ एक तलाव बांधला होता. तसेच तटबंदीत जागोजागी पाणी जाण्यासाठी मोर्‍या बांधल्या होत्या. आजही नीट पाहिले तर गाळात गाडल्या गेलेल्या तलावाचे अवशेष व ढासळलेल्या तटबंदीत पाणी जाण्यासाठी बांधलेल मोर्‍या पहायला मिळतात. ओढ्याचे पाणी आपल्या बरोबर भरपूर गाळ घेऊन असे. ते पाणी तलावात आणून त्याचा वेग कमी केले जाई व पाणी स्थिर केल्यामुळे त्यातील गाळ ही खाली बसत असे. तलावाच्या बांधावरून बाहेर पडणारे पाणी तटबंदीतील मोर्‍यांवाटे दरीत जात असे. अशा प्रकारच्या योजनेमुळे ओढ्याच्या पाण्याचा अतिरीक्त दाब पडून तट्बंदीला धोका होत नसे व गडावरील वापरासाठी अतिरीक्त पाणी साठा पण तयार होई.

पाण्याचे टाकं, असावा 


                                                                                                                                                
               ठाणे जिल्ह्यातील बोईसर जवळ असावा किल्ला आहे. या किल्ल्यावर एक प्रचंड मोठ पाण्यचं टाक आहे. या टाक्याच्या तीन बाजू कातळात कोरलेल्या असून एक बाजू दगडांनी बांधलेली आहे. डोंगरावरचे पाणी कातळ उतरावरून टाक्यात पडते. त्या पाण्याबरोबर येणारा गाळ टाक्यात जाऊ नये म्हणून येथे कातळात जागोजागी रूंद व खोल खळगे कोरलेले आहेत. त्यात वहात्या पाण्यातला गाळ साठून रहात असे व शुध्द पाणी तलावात जात असे . तसेच या खळग्यात साठणारा गाळ काढणे पण सोपे होते.

         याशिवाय बर्‍याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी उतारावर एकाखाली एक पाण्याची टाकी कोरलेली पहायला मिळतात. या रचनेमुळे डोंगर उतारावरून येणार गाळमिश्रीत पाणी सर्वात वरच्या टाक्यात पडत असे. ते टाक भरल्यावर पाणी पुढच्या टाक्यात जात असे. अशाप्रकारे सर्वात वरच्या टाक्यातच जास्तीत जास्त गाळ साठत असे. त्यामुळे गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येत असे.

       किल्ला पाहिल्यावर अनेक जणांची तक्रार असते की, किल्ल्यावर पहाण्यासारख काही नव्हत. पण प्रत्येक किल्ल्याच स्वत:च अस एक वैशिष्ट्य असत, तो ते आपल्याला दाखवत असतो, पण गरज आहे ती त्याच्याकडे शोधक नजरेने पहाण्याची.
     

एका खाली एक कोरलेली पाण्याची टाकी


Sunday, June 30, 2013

भामगिरी / भांबगिरी / भामचंद्र डोंगर (Bhamchandra Dongar near Talegaon)




तुकाराम महाराजांनी १५ दिवस भामगिरी डोंगरावर निर्वाणीचा संकल्प करून श्रीहरीवर ध्यान लावले. त्या काळात सर्प, विंचू, वाघ अंगाला झोंबू लागले, पण त्यांनी ध्यान सोडल नाही, आसन मोडल नाही. शेवटी दिव्याच्या ज्योती जवळ धरलेला कापूर ज्याप्रमाणे ज्योतीशी एकरूप होतो तसा तुकारामांचा देह श्रीहरीशी एकरूप झाला, त्यांना साक्षात्कार झाला. त्याच वर्णन तुकोबांनी अभंगातून केलेल आहे.



पंधरा दिसामाजी साक्षात्कार झाला !
विठोबा भेटला निराकार !!
भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली !
वृत्ति स्थिरावली परब्रम्ही !!
निर्वाण जाणोनी आसन घातिले !
ज्ञान आरंभिले देवाजीचे !!
सर्प, विंचू, व्याघ्र अंगासी झोंबिले!
पिडू जे लागले सकळीक !!
दिपकी कर्पूर कैसा तो विराला!
त्तैसा देह झाला तुका म्हणे !!

भामगिरी डोंगररांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात डोंगराने अंदाजे ८०० फूटी कातळ टोपी घातलेली आहे. या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.


भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने दाट झाडीतून अर्ध्या तासात आपण सपाटीवर येतो. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. येथून १० मिनिटात आपण कातळ कड्यापाशी पोहोचतो. येथे थोड्याश्या उंचीवर कातळात खोदलेल टाक आहे. टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे. कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडप चार दगडी खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाला लागूनच पाण्याच टाक खोदलेल आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. गाभार्‍या शिवलींग व पार्वतीची मुर्ती आहे. छतावर नक्षीकाम केलेल आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल अजून एक टाक पहायला मिळत, टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे. या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले रहातात.  गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मुर्त्या ठेवलेल्या आहेत. या झाडाजवळून एक  पायवाट खालच्या बाजूला जाते. येथे एक पाण्याच टाक व गुहा आहे. ती पाहून परत झाडाजवळ येऊन कातळ भिंतीत कोरलेल्या पायर्‍यांनी तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेकडे जावे. 

संसारात राहून, व्यापार सांभाळून विठ्ठल भक्ती करणार्‍या तुकाराम महाराजांना दैनंदिन व्यापातून ईश्वर भक्तीसाठी वेळ देता येत नसे. त्याची खंत त्यांनी अनेक अभंगांमधून व्यक्त केलेली आहे.






संसारतापे तापलो मी देवा !
करीता या सेवा कुटुंबाची!!
कसया गा मज घातिले संसारी!
चित्त पायावरी नाही तुझ्या !!

किंवा

मन माझे चपळ न राहे निश्चळ!!
घडी एक पळ स्थिर नाही !!


अशा मनाच्या अवस्थेत तुकोबारायांना भामगिरीवर जाऊन ध्यानधारणा करण्याची आज्ञा झाली.
 

तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे. गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे. त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मुर्ती आहे. गुहेची अंदाजे उंची ६ फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे. गुहेची लांबी अंदाजे १० फूट व रूंदी ६ फूट आहे. गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर तुकाराम महाराजांची मुर्ती कोरलेली आहे. त्यांच्या हातावर विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत. गुहेच्या टोकाशी विठ्ठल रखुमाईची मुर्ती आहे. या गुहेच्या बाजूला ३ फूट उंच व ६ फूट लांब गुहा आहे. या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे.


ज्ञानेश्वर माऊलींनी तपश्चर्य़ेच स्थान कस असावे याबद्दल अभंग लिहिले आहेत. भामगिरीच्या ध्यान गुंफेला हे वर्णन लागु पडत.

बहुत करोति निशब्द
दाट न रिगे श्वापद !
शुक अन षटपद
तेऊते नाही !!

तपश्चर्य़ेच्या ठिकाणी शांतता असावी , श्वापदांचे येणे जाणे, पक्षी (पोपट) , किटक (भुंगे) यांचा आवाज नसावा.

आणिकही एक पहावे
जे साधकही वसते होआवे !
आणि जनाचेनी पायरवे
मळेचिना !!

हे साधकांनी वसवलेले स्थान असावे येथे सामान्य जनांचा वावर नसावा.

 






गुहेत शिरल्यावर गुहेतल्या शांततेने आमच्यावर गारूड केलं. गुहेच्या दारातून आत झिरपणार्‍या प्रकाशामुळे ती गुहा एकाच वेळी गुढ आणि सुंदर भासू लागली. तुकाराम महाराजांच्या मुर्ती समोर बसून अलगद डोळे मिटून घेतले. नितांत शांतता सभोवती दाटली होती. मनही शांत होत गेले. मनात विचार आला याठिकाणी कित्येक साधक साधना करुन गेले असावेत. अशा पवित्र ठिकाणी ५ मिनिटे का होईना आपल्याला शांतपणे बसता आलं , अंतर्मुख होता आले याचा आनंद झाला.

 भामगिरीवर जाण्याचा मार्ग :-  पुणे - नगर रस्त्यावर तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर पोहोचतो (वसुली हे गावाचे नाव आहे.). येथे डाव्या बाजूला शिंद, भांबुर्ले गावाकडे जाणारा रस्ता पकडावा. नाक्यापासून भांबुर्ले १.५ किमीवर आहे. भांबुर्ले गावातून उजव्या बाजूचा रस्त्याने १ किमीवरील भामचंद्र माध्यमिक विद्यालया पर्यंत जावे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या (विद्यालयाच्या बाजूने) कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. डोंगराच्या पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे.


मुंबई - पुण्यापासून एका दिवसात  भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर व इंदुरीचा किल्ला ही तिनही ठिकाण पहाता येतात.



ज्ञानेश्वरीतील पक्षी ( Birds in Dnyaneshawari ) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.
https://samantfort.blogspot.com/2020/05/blog-post.html

Thursday, January 3, 2013

Offbeat Kokan गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg)

"कुंभडक" 

मालवणच्या घरी गेलो की, मी घरी स्वस्थ बसत नाही. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाण्यासारखी इतकी ठिकाण आहेत की, मला कधीच निराश व्हाव लागल नाही. काही दिवसापूर्वी लोकसत्ता मध्ये बातमी आली होती, "मालवणजवळ आदिमानव कालिन कातळशिल्प मिळाली". यापूर्वी मी मध्यप्रदेशातील भिमबेटकाच्या आदिमानवाच्या गुहा व चित्र पाहिली होती, त्यामुळे आमच्या कोकणातल्या आदिमानवांनी काढलेली कातळशिल्प पहाण्यासाठी मी उत्सुक होतो. 

 


मालवण पासून ३० किमीवर असलेले कुडोपी गाव थोड आडबाजूला आहे. डोंगराततून वहात येणार पाणी पाटाने गावात खेळवल आहे. त्यावरच गावाची शेती -बागायती व धुण - भांड्यांच्या पाण्याची गरज भागते. गावात कातळशिल्पांबद्दल चौकशी केली, पण अस काहीही आपल्या गावात नाही आहे अस गावकर्‍यांनी सांगितल. तितक्यात मला आठवल की, आमच्या गावात दगडात कोरलेली प्रचंड विहिर आहे. ही विहिर पांडवांची विहिर म्हणून ओळखली जाते. (आपल्या भारतात गावातल्याच सामान्य लोकांनी पिढ्यान पिढ्या खपून काही अचाट, प्रचंड काम केलेलं असल तर त्याला पांडवांच नाव दिले्ले आढळते.) त्यामुळे या कातळशिल्पांनाही पांडवांचा काही संदर्भ असेल, म्हणून पांडवाच्या शिल्पांबद्दल विचारल्यावर गावकर्‍यांनी होकार दिला, ते म्हणाले "पांडवाची चित्र " सड्यावर आहेत. गावातल्या तरूण पिढीला या पांडवांच्या चित्राबद्दल फारशी माहिती नव्हती. (हि खरतर आपली शोकांतीका आहे. आजवर अनेक ठिकाणी फिरतांना मला असा अनुभव आलेला आहे, आपल्या गावात पहाण्या लायक एखादी ऎतिहासिक गोष्ट आहे, हेच बर्‍याच जणांना माहित नसते.)


गावातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही गावाच्या मागचा डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत एका झाडावर शेणाने बनवलेल मधमाश्यांच ३ फूट उंचीच उलट्या नरसाळ्याच्या (फनेलच्या) आकाराच पोळ बघायला मिळाल. स्थानिक लोक या पोळयाला "कुंभडक" म्हणतात. शेणाने बनवलेल्या या पोळ्याच्या बाहेरच्या बाजूला हाताने जमिन सारवल्यावर जशी नक्षी येते तशीच नक्षी मधमाशांनी पायांनी तयार केलेली दिसली. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला सडा व त्यावरच पिवळ पडलेल गवत नजरेत मावत नव्हत. पंधरा मिनिट सड्यावर चालल्यावर अचानक आदिमानवाने कातळात कोरलेली चित्र दिसायला लागली. त्यांचे आकार व गुढरम्यता पाहून आम्ही थक्क झालो. मी आणि कौस्तुभ त्या शिल्पांवरच गवत उपटून त्यांचे आकार ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो. माणूस, झाडे, पशू, पक्षी, मासे इत्यादी आकार आम्ही ओळखू शकलो. यातील एका  मानवाकृतीची लांबी ३.५ मीटर भरली तर, एका वर्तूळाकृती चित्राचा परिघ ३ मीटर होता. काही चित्रांचे आकार मात्र गुढरम्य होते. त्यांचे आकार पाहून मला शामलन नाईटच्या "साईन्स (Signs)" या हॉलिवूडपटाची आठवण झाली. त्यात परग्रहवासी शेतांमध्ये मोठ मोठी वर्तूळं, चिन्ह काढून ठेवतात. पण ही चित्र मात्र आदिमानवानेच काढलेली होती. त्यात दैनंदिन जीवनात आजूबाजूला दिसणारी माणस, प्राणी, निसर्ग चितारण्याचा प्रयत्न दिसत होता. अशा चित्रप्रकाराला शास्त्रीय भाषेत "रॉक आर्ट" म्हणतात. कुडोपीच्या या कातळचित्रांचाही श्री.सतीश लळित यांनी अभ्यास करून त्यावर पेपरही प्रसिध्द केलेला आहे. एकूण ६० चित्र त्या माळावर विखुरलेली आहेत. ती शोधून त्यांचा अर्थ लावता लावता तीन तास कधी निघून गेले कळलच नाही. परतांना मनात सारखा विचार येत होता , कोकणातला धुवाधार पाऊस, सड्यावरचा ठिसूळ दगड, वारा, गवत यांच्याशी झुंज देत ही चित्र हजारो वर्ष तशीच पडली आहेत आज त्यातील बरीच चित्र नष्ट झाली आहेत, पुसट झाली आहेत. आता जर या चित्रांचे योग्य संरक्षण केल नाही तर उरलेला आपला हा राष्ट्रीय ठेवा सुध्दा नष्ट होईल.

मानवाकृती 
त्रिशूळ 


जाण्यासाठी :- मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून २२ किमीवर आचरा गाव आहे. आचर्‍याहून एक रस्ता कणकवलीला जातो. या रस्त्यावर आचर्‍यापासून २.५ किमीवर डावीकडे कुडोपी गावाकडे जाणारा फाटा फूटतो. या फाट्याने ६ किमी गेल्यावर गणपती मंदिर आहे. येथून उजव्या बाजूला एक रस्ता कुडोपी टेंब वाडीत जातो. वाडीत पोहोचल्यावर गावातून वाटाड्या घेऊन कातळशिल्प पहायला जावे.

मासे 
मानवाकृती 

कातळशिल्पाच्या परीघावर ३ जण उभे आहेत.

३.५ मीटर लाबं मानवी शिल्पाचा पाय 








Wednesday, October 31, 2012

डोंगरवाटेवरचे रक्षाबंधन (Rakshabandhan)



     
त्यावर्षी रक्षाबंधन व १५ ऑगस्टची सुट्टी जोडून आली होती. अशी जोडून सुट्टी आली की आमची पावल कधीही घरात राहात नाहीत. अनेक वर्षापूर्वी लागलेल डोंगर भटकंतीच वेड स्वस्थ बसू देत नाही. त्यात पावसाळा असेल तर मग काही विचारायला नकोच! नेहमीचे गर्दीचे किल्ले नकोत म्हणून आम्ही नगर जिल्ह्य़ातील आडवाटेवरचे कुंजरगड, भैरवगड व पेमगिरी हे तीन किल्ले दोन दिवसात सर करायचे ठरवले. सकाळी प्रचंड पावसातच गडाच्या पायथ्याच्या विहिर गावात उतरलो. विहिर गाव म्हणजे २०-३० घरांची छोटी वस्ती आहे. गावाच्या बाजूने डोंगर उतारावर थोडीशी भातशेती दिसत होती. त्यामागे कुंजरगड एखाद्या महाकाय हत्ती सारखा पसरलेला दिसत होता.

रात्री पासूनच पाऊस दणकून कोसळत होता. वातावरण कुंद व ओलसर झाले होते. अशावेळी गडाची माहिती चोख वाचली असली तरी वाटाड्या सोबत घेणे शहाणपणाच असत, हे अनेक वर्ष डोंगरदर्‍यात पायपिट केल्यामुळे माहित होत. थोडी शोधाशोध केल्यावर वाटाड्या मिळाला. आम्ही प्रथम चहाची चौकशी केली. तो आम्हाला त्याच्या घरीच चहाला घेऊन गेला. त्याच घर म्हणजे कुडाच्या भिंती असलेली १० फूट * १२ फूटाची झोपडी होती, सतत पडणार्‍या पावसामुळे छपरावरील नळ्याच्या कौलांवर गवत उगवलेल होत. दरवाजातून वाकून घरात शिरलो. पावसामुळे ७ दिवसापासून गावात लाईट नव्हती, त्यामुळे चुलीच्या अंधूक प्रकाशात शेणाने सारवलेली जमिन, विरूध्द बाजूच्या कोपर्‍यात असलेली खाट व खोलीत असलेल तुरळक सामान दिसत होत. वाटाड्या भाऊंना दुसरीत जाणारी मुलगी व पाचवीत जाणारा मुलगा होता. दोघांनाही बोलत करेपर्यंत बिनदुधाचा (कोरा) चहा आला. चहा बरोबर आम्ही आणलेला सुका खाऊ सगळ्यांना वाटून खाल्ला. जेवायला परत गावातच येऊ असा विचार करून खायच सामानही बरोबर घेतल नाही. पण धुवाधार पावसाने आणि जोरदार वार्‍याने आमचे सर्व अंदाज चुकवले. सकाळी ९ वाजता किल्ला चढायला सुरुवात केलेले आम्ही दुपारी ३ वाजता गावात पोहोचलो.



गावात आल्यावर समाज मंदिराच्या आडोशाला कपडे बदलले, तेव्हा जिवात जीव आला. आता आवश्यकता होती एका कडक चहाची व काहीतरी पोटात ढकलण्याची. ओले कपडे , कॅमेरे गाडीत टाकून आपापले डबे घेऊन आम्ही चहा पिण्यासाठी भाऊंच्या घरी दाखल झालो. मुलांची भीड आता चेपली होती. त्यांच्याशी गप्पा मारत डबे खात असतांनाच चहा आला. चहा पिऊन निघण्याच्या बेतात असतांना ताईंनी आम्हाला विचारल," आज रक्षाबंधन आहे अनायासे तुम्ही चार भाऊ माझ्या घरी आला आहात, मी तुम्हाला ओवाळल तर चालेल का ?" या अनपेक्षित प्रश्नामुळे आम्ही आवाक झालो, गोंधळून गेलो. कसा बसा होकार दिला. ताईंनी ताट सजवल, आम्हाला टिळा लावला , राखी बांधली आणि ओवाळल. निरंजनाच्या अंधुकश्या प्रकाशात ताईचा चेहरा ओझरता पाहिला. ओवाळणी झाल्यावर तिथे भयंकर शांतता पसरली. आम्हा चौघांना सतावणारा प्रश्न म्हणजे ओवाळणी काय द्यायची. पावसामुळे पाकीटं सुध्दा गाडीत ठेवलेले. माझ्या डोळ्या समोर लहानपणी पासूनची रक्षाबंधन सरकून गेली. रक्षाबंधन म्हटले की, बहिणी ओवाळणार, मग आई-बाबांनी दिलेल पैशाच पाकीट किंवा गिफ्ट तिला द्यायच म्हणजे समारंभ पार पडला , मग वर्षभर तिच्याची भांडाभांडी-मारामारी केली तरी काही फरक पडत नाही, रक्षण तर बाजूलाच राहिलं. पुढे बहिणी मोठ्या झाल्या आपापल्या सासरी गेल्या, पहिले काही वर्ष उत्साहाने रक्षाबंधनाला त्यांच्याकडे जायचो, आता दोघांनाही वेळ नसल्यामुळे sms टाकला तरी काम भागत. या आठवणींनी माझ्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. अंधाराचा फायदा घेऊन चेहर्‍यावरचे भाव न दाखवता "निघतो" एवढेच शब्द उच्चारून आम्ही घराच्या बाहेर पडलो. गाडीजवळ आल्यावर आम्ही सर्वांनी दिर्घ निश्वास सोडला, सॅक मधून पाकीट बाहेर काढली व ओवाळणीची रक्कम गोळा करून ताईला देऊन आलो, तेव्हा कुठे आम्हाला सुटल्यासारख वाटल. शहरात वाढलेल्या आमच्या मनाला अशी अकृत्रीम, कुठलीही अपेक्षा नसलेली नाती असतात याचाही विसर पडत चालला आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.

या घटनेला आता दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पुन्हा काही विहिर गावात जाण झाल नाही. परत कधी मी विहिर गावात गेलो तरी मला ते घर सापडेल की नाही या बद्दल मी साशंक आहे. मधल्या काळात मोबाईल हरवल्यामुळे भाऊंचा नंबर पण गेला. गेलेल्या काळा बरोबर निरंजनाच्या अंधुकश्या प्रकाशात ओझरता पाहिलेला ताईचा चेहरा पण धुसर झाला आहे. या सर्वात नशीबाने एकच गोष्ट माझ्याकडे शिल्लक आहे ती म्हणजे ताईने बांधलेली राखी. ती मी आजही जपून ठेवली आहे.










सदर लेख "लोकसत्ताच्या"  अंकात ’ब्लॉग इट" सदरात प्रसिध्द झाला होता.

Monday, October 22, 2012

मृगाचा (मखमली) किडा ( Red Velvet Mite)


Red Velvet Mite

पावसाळा सुरू झाला की तर्‍हेतर्‍हेचे किडे दिसायला लागतात. ट्रेकर्सचही काहीस असचं आहे. पाऊस सुरु झाला की, धुक्याने वेढलेले हिरवे डोंगर त्यांना साद घालायला लागतात. मग शनिवार-रविवार गडांच्या वार्‍या सुरु होतात. अशाच एका पावसाळ्यात मंगळगडाचा ट्रेक करत होतो. चढाईचा पहीला टप्पा ओलांडून सर्व जण विश्रांतीसाठी पसरले होते. इतक्यात बाजूच्या पाचोळ्यातून फिरणारे लाल भडक रंगाचे मखमली किडे सर्वांच्या नजरेस पडले. असं काही विचित्र/ वेगळं दिसल की, ती गोष्ट पाहण्यापेक्षा कॅमेर्‍यात पकडण्यासाठी सर्वजण धडपडत होते. मग हे फोटो पिकासा/ फेसबुकवर टाकून "लाईक्स" मिळवले की फोटो काढणारा धन्य होतो. आताही सर्वांनी किड्याच्या मागे - पुढे सरपटत चुंबन फोटोग्राफी (मॅक्रो मोड मध्ये फोटो काढण्याला आम्ही दिलेले हे नाव आहे.) सुरु केली. मी पण माझ्या वाट्याला आलेल्या किड्याचे मनसोक्त फोटो काढले. त्यानंतर जवळच्या वाळलेल्या काटकीने त्याच्या पाठीवर हलकेच दाब दिला त्याबरोबर किड्याने आपले पाय पोटाखाली घेतले. निपचित पडून स्वतःचे संरक्षण करण्याचा त्याचा हा प्रकार असावा. त्याच काडीने त्या किड्याला उलटे केल्यावर त्याच्या पोटावर व पायांवरही  तांबडी मखमल पसरलेली दिसली.

घरी आल्यावर संगणकावर फोटो टाकून गुगल भाऊंना साद घातली. त्यांनी नेहमी प्रमाणे ज्ञानाचा खजिना रीता केला. मृग नक्षत्रातच हा किडा दिसतो म्हणून याला "मृगाचा किडा" म्हणतात. यावरूनच त्याला तेलगुत "आरुद्रा (नक्षत्र) पुरुगू" म्हणतात. संस्कृत मधे " बिरबाहूती ", तर उर्दूत "राणी किडा", म्हणतात. मराठीत मखमली किडा, गोसावी किडा (त्याच्या शरीरावरील भगवी झाकं असलेल्या मखमलीमुळे) या नावाने ओळखतात. इंग्रजीत "Red Velvet Mite" आणि शास्त्रिय भाषेत " Holostric" या नावने हा ओळखला जातो. 

जव्हार तलासरी भागातील आदिवासी या किड्याला "देवगाय" म्हणतात.  हा किडा पकडून पापण्यांवरुन फ़िरवतात अशी महिती या भागात फ़िरतांना कळली. 

वाल्मिकी रामायणात सुध्दा मृगाच्या किटकाचा उल्लेख आलेला आहे.

*वर्षावर्णनम्*

बालेन्द्रगोपान्तरचित्रितेन विभाति भूमिर्नवशाद्वलेन।
गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण नारीव लाक्षोक्षितकम्बलेन।।
                             
                                                      - वाल्मीकिरामायणे।

 इन्द्रगोपः- मृगाचे किडे (लाल रंगाचे)

भावार्थ :- पावसामुळे नुकत्याच उगवलेल्या हिरव्यागार कोवळ्या गवतावर "मृगाचे किडे" शोभून दिसत आहेत. जसे हिरव्या (पोपटी) रंगाचे वस्त्र धारण केलेल्या स्त्रीने लाखेच्या रंगाचे (लाल) कांबळे (शाल) पांघरली आहे.

मृगाचा किडा हा गोचिडीचा भाऊबंध असल्याचे वाचून त्याला हात लावला नाही याचा मला आनंद झाला. मात्र हा किडा गोचिडीसारखा प्राण्यांचे रक्त पित नाही तर, त्याची पिल्ले गोचिडीसारखी माश्या, नागतोडे व इतर किटकांना चिकटतात व आपले पोषण करतात. पूर्ण वाढ झालेले मृगाचे किडे पालापाचोळ्यावर वाढण्यार्‍या बुरुशी भक्षकांची अंडी खातात व अप्रत्यक्ष्यपणे पालापाचोळा कुजविण्याच्या क्रियेला मदत करतात.  मृगाच्या किड्याला निसर्गतः जास्त शत्रू नसले तरी, मानव हा आता त्याचा मुख्य शत्रू झाला आहे.  वंशपरंपरेने आदिवसींना ज्ञात असलेले त्याचे औषधी गुणधर्म आता बहूराष्ट्रीय कंपन्यांनाही माहित झाले आहेत. त्यामुळे किडे गोळा करणे हे आदिवासींच्या अर्थाजनाचे साधन झाले आहे. पूर्वांपार या किड्याचा उपयोग अतिसारा वरील औषधात होतो. या किड्याचे तेल अर्धांगवायूत (paralysis) रामबाण उपाय म्हणून वापरतात. त्याचा उपयोग लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी देखिल होतो. याच कारणासाठी छत्तीसगड मधील आदिवासी नवपरीणीत दांपत्याला मृगाचा किडा भेट म्हणून दे्ण्याची परंपरा आहे. 

Harishchandragad


यावरून एक किस्सा आठवला, मध्यंतरी हरीशचंद्रगड उतरतांना काही गावकरी एका रानफूलाच्या बिया ओरबाडून पोत्यात भरत होते. विशिष्ट उंचीवरच दिसणार्‍या या रानफूलांची मोजकीच झुडपं या परीसरात आहेत. आमचं कुतूहल चाळवल्यामुळे आम्ही गावकर्‍यांकडे चौकशी केली. त्यांनी दिलेली माहिती रंजक होती. या रानफूलाच्या बिया लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच्या औषधात वापरतात. व्यापरी १ किलोला १००/- रुपये भाव देतात. त्यामुळे या दिवसात गावातील सर्व लोक या बिया गोळा करण्याच काम करतात. त्यांनी पोत्यातून काढून थोड्या- थोड्या बिया सर्वांच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले खाऊन बघा, काही होत नाही. अख्खा गड उतरायचा असल्याने आम्ही काही बिया खाल्या नाहीत. थोड्या  तरी बिया झुडपांवर ठेवा म्हणजे पुढच्या वर्षी सुध्दा झाडे येतील असा (फूकटचा) सल्ला देऊन आम्ही निघालो. पण त्यांच्या पाचवीला पुजलेलं अठराविश्व दारीद्र्य व या झुडपांपासून मिळणारे पैसे याचा विचार केला तर काही वर्षांनी ही वनस्पती सह्याद्रीत नक्कीच दुर्मिळ होत जाणार आहे.  


Red Velvet Mite

खरतर पावसाळ्यात एकदाच दर्शन देऊन सुप्तावस्थेत जाणार्‍या या राजबिंड्या मृगाच्या किड्याचं दुर्मिळ होत, नष्ट होत जाण आपल्याला कळणारही नाही.  त्याच्या नसण्याने काय फरक पडणार आहे ? असा विचार कदाचित मनात येऊ शकतो . इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, निसर्गचक्रात प्रत्येकाला कामे वाटून दिले्ली आहेत. यातून परस्परावलंबनाचे एक चक्र निसर्गाने तयार करुन दिले आहे. त्यातील एक जरी सांधा निखळला तर हे  निसर्गचक्र फिरणार कसे ?  आता आपला मृगाचा किडाच बघा त्याच काम पालापाचोळ्यावर वाढण्यार्‍या बुरुशीच्या भक्ष्यांची अंडी खाणं. उद्या हाच जर नष्ट झाला तर, बुरुशी भक्षकांची संख्या वाढेल, बुरशी कमी होईल आणि पानांच कुजण मंदावेल. पान कुजली नाहीत तर माती तयार होणार नाही, झाडांच पडलेल बी रुजणार नाही आणि या सगळ्याचा शेवट एक चांगल्या जंगलाच्या मृत्यूने होईल. कदाचित हे वाचतांना अतिशयोक्ती वाटेल पण निसर्गचक्रातील ढवळाढवळीचे दूरगामी परिणाम भयंकरच असतील.   

या बहुगुणी मृगाच्या किड्याला वाचवायच असेल तर रेशीम किड्या सारखी याची जोपासना/ शेती करण्याच तंत्र विकसित कराव लागेल . हे तंत्र आदिवासींना शिकवून त्यातून त्यांच्या उत्पन्नाची सोय झाली तरच हा किडा वाचू शकेल. 
    


"अदृश्य किटकांच्या जगात"  ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा ....