Thursday, January 3, 2013

Offbeat Kokan गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg)

"कुंभडक" 

मालवणच्या घरी गेलो की, मी घरी स्वस्थ बसत नाही. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाण्यासारखी इतकी ठिकाण आहेत की, मला कधीच निराश व्हाव लागल नाही. काही दिवसापूर्वी लोकसत्ता मध्ये बातमी आली होती, "मालवणजवळ आदिमानव कालिन कातळशिल्प मिळाली". यापूर्वी मी मध्यप्रदेशातील भिमबेटकाच्या आदिमानवाच्या गुहा व चित्र पाहिली होती, त्यामुळे आमच्या कोकणातल्या आदिमानवांनी काढलेली कातळशिल्प पहाण्यासाठी मी उत्सुक होतो. 

 


मालवण पासून ३० किमीवर असलेले कुडोपी गाव थोड आडबाजूला आहे. डोंगराततून वहात येणार पाणी पाटाने गावात खेळवल आहे. त्यावरच गावाची शेती -बागायती व धुण - भांड्यांच्या पाण्याची गरज भागते. गावात कातळशिल्पांबद्दल चौकशी केली, पण अस काहीही आपल्या गावात नाही आहे अस गावकर्‍यांनी सांगितल. तितक्यात मला आठवल की, आमच्या गावात दगडात कोरलेली प्रचंड विहिर आहे. ही विहिर पांडवांची विहिर म्हणून ओळखली जाते. (आपल्या भारतात गावातल्याच सामान्य लोकांनी पिढ्यान पिढ्या खपून काही अचाट, प्रचंड काम केलेलं असल तर त्याला पांडवांच नाव दिले्ले आढळते.) त्यामुळे या कातळशिल्पांनाही पांडवांचा काही संदर्भ असेल, म्हणून पांडवाच्या शिल्पांबद्दल विचारल्यावर गावकर्‍यांनी होकार दिला, ते म्हणाले "पांडवाची चित्र " सड्यावर आहेत. गावातल्या तरूण पिढीला या पांडवांच्या चित्राबद्दल फारशी माहिती नव्हती. (हि खरतर आपली शोकांतीका आहे. आजवर अनेक ठिकाणी फिरतांना मला असा अनुभव आलेला आहे, आपल्या गावात पहाण्या लायक एखादी ऎतिहासिक गोष्ट आहे, हेच बर्‍याच जणांना माहित नसते.)


गावातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही गावाच्या मागचा डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत एका झाडावर शेणाने बनवलेल मधमाश्यांच ३ फूट उंचीच उलट्या नरसाळ्याच्या (फनेलच्या) आकाराच पोळ बघायला मिळाल. स्थानिक लोक या पोळयाला "कुंभडक" म्हणतात. शेणाने बनवलेल्या या पोळ्याच्या बाहेरच्या बाजूला हाताने जमिन सारवल्यावर जशी नक्षी येते तशीच नक्षी मधमाशांनी पायांनी तयार केलेली दिसली. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला सडा व त्यावरच पिवळ पडलेल गवत नजरेत मावत नव्हत. पंधरा मिनिट सड्यावर चालल्यावर अचानक आदिमानवाने कातळात कोरलेली चित्र दिसायला लागली. त्यांचे आकार व गुढरम्यता पाहून आम्ही थक्क झालो. मी आणि कौस्तुभ त्या शिल्पांवरच गवत उपटून त्यांचे आकार ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो. माणूस, झाडे, पशू, पक्षी, मासे इत्यादी आकार आम्ही ओळखू शकलो. यातील एका  मानवाकृतीची लांबी ३.५ मीटर भरली तर, एका वर्तूळाकृती चित्राचा परिघ ३ मीटर होता. काही चित्रांचे आकार मात्र गुढरम्य होते. त्यांचे आकार पाहून मला शामलन नाईटच्या "साईन्स (Signs)" या हॉलिवूडपटाची आठवण झाली. त्यात परग्रहवासी शेतांमध्ये मोठ मोठी वर्तूळं, चिन्ह काढून ठेवतात. पण ही चित्र मात्र आदिमानवानेच काढलेली होती. त्यात दैनंदिन जीवनात आजूबाजूला दिसणारी माणस, प्राणी, निसर्ग चितारण्याचा प्रयत्न दिसत होता. अशा चित्रप्रकाराला शास्त्रीय भाषेत "रॉक आर्ट" म्हणतात. कुडोपीच्या या कातळचित्रांचाही श्री.सतीश लळित यांनी अभ्यास करून त्यावर पेपरही प्रसिध्द केलेला आहे. एकूण ६० चित्र त्या माळावर विखुरलेली आहेत. ती शोधून त्यांचा अर्थ लावता लावता तीन तास कधी निघून गेले कळलच नाही. परतांना मनात सारखा विचार येत होता , कोकणातला धुवाधार पाऊस, सड्यावरचा ठिसूळ दगड, वारा, गवत यांच्याशी झुंज देत ही चित्र हजारो वर्ष तशीच पडली आहेत आज त्यातील बरीच चित्र नष्ट झाली आहेत, पुसट झाली आहेत. आता जर या चित्रांचे योग्य संरक्षण केल नाही तर उरलेला आपला हा राष्ट्रीय ठेवा सुध्दा नष्ट होईल.

मानवाकृती 
त्रिशूळ 


जाण्यासाठी :- मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून २२ किमीवर आचरा गाव आहे. आचर्‍याहून एक रस्ता कणकवलीला जातो. या रस्त्यावर आचर्‍यापासून २.५ किमीवर डावीकडे कुडोपी गावाकडे जाणारा फाटा फूटतो. या फाट्याने ६ किमी गेल्यावर गणपती मंदिर आहे. येथून उजव्या बाजूला एक रस्ता कुडोपी टेंब वाडीत जातो. वाडीत पोहोचल्यावर गावातून वाटाड्या घेऊन कातळशिल्प पहायला जावे.

मासे 
मानवाकृती 

कातळशिल्पाच्या परीघावर ३ जण उभे आहेत.

३.५ मीटर लाबं मानवी शिल्पाचा पाय 








Wednesday, October 31, 2012

डोंगरवाटेवरचे रक्षाबंधन (Rakshabandhan)



     
त्यावर्षी रक्षाबंधन व १५ ऑगस्टची सुट्टी जोडून आली होती. अशी जोडून सुट्टी आली की आमची पावल कधीही घरात राहात नाहीत. अनेक वर्षापूर्वी लागलेल डोंगर भटकंतीच वेड स्वस्थ बसू देत नाही. त्यात पावसाळा असेल तर मग काही विचारायला नकोच! नेहमीचे गर्दीचे किल्ले नकोत म्हणून आम्ही नगर जिल्ह्य़ातील आडवाटेवरचे कुंजरगड, भैरवगड व पेमगिरी हे तीन किल्ले दोन दिवसात सर करायचे ठरवले. सकाळी प्रचंड पावसातच गडाच्या पायथ्याच्या विहिर गावात उतरलो. विहिर गाव म्हणजे २०-३० घरांची छोटी वस्ती आहे. गावाच्या बाजूने डोंगर उतारावर थोडीशी भातशेती दिसत होती. त्यामागे कुंजरगड एखाद्या महाकाय हत्ती सारखा पसरलेला दिसत होता.

रात्री पासूनच पाऊस दणकून कोसळत होता. वातावरण कुंद व ओलसर झाले होते. अशावेळी गडाची माहिती चोख वाचली असली तरी वाटाड्या सोबत घेणे शहाणपणाच असत, हे अनेक वर्ष डोंगरदर्‍यात पायपिट केल्यामुळे माहित होत. थोडी शोधाशोध केल्यावर वाटाड्या मिळाला. आम्ही प्रथम चहाची चौकशी केली. तो आम्हाला त्याच्या घरीच चहाला घेऊन गेला. त्याच घर म्हणजे कुडाच्या भिंती असलेली १० फूट * १२ फूटाची झोपडी होती, सतत पडणार्‍या पावसामुळे छपरावरील नळ्याच्या कौलांवर गवत उगवलेल होत. दरवाजातून वाकून घरात शिरलो. पावसामुळे ७ दिवसापासून गावात लाईट नव्हती, त्यामुळे चुलीच्या अंधूक प्रकाशात शेणाने सारवलेली जमिन, विरूध्द बाजूच्या कोपर्‍यात असलेली खाट व खोलीत असलेल तुरळक सामान दिसत होत. वाटाड्या भाऊंना दुसरीत जाणारी मुलगी व पाचवीत जाणारा मुलगा होता. दोघांनाही बोलत करेपर्यंत बिनदुधाचा (कोरा) चहा आला. चहा बरोबर आम्ही आणलेला सुका खाऊ सगळ्यांना वाटून खाल्ला. जेवायला परत गावातच येऊ असा विचार करून खायच सामानही बरोबर घेतल नाही. पण धुवाधार पावसाने आणि जोरदार वार्‍याने आमचे सर्व अंदाज चुकवले. सकाळी ९ वाजता किल्ला चढायला सुरुवात केलेले आम्ही दुपारी ३ वाजता गावात पोहोचलो.



गावात आल्यावर समाज मंदिराच्या आडोशाला कपडे बदलले, तेव्हा जिवात जीव आला. आता आवश्यकता होती एका कडक चहाची व काहीतरी पोटात ढकलण्याची. ओले कपडे , कॅमेरे गाडीत टाकून आपापले डबे घेऊन आम्ही चहा पिण्यासाठी भाऊंच्या घरी दाखल झालो. मुलांची भीड आता चेपली होती. त्यांच्याशी गप्पा मारत डबे खात असतांनाच चहा आला. चहा पिऊन निघण्याच्या बेतात असतांना ताईंनी आम्हाला विचारल," आज रक्षाबंधन आहे अनायासे तुम्ही चार भाऊ माझ्या घरी आला आहात, मी तुम्हाला ओवाळल तर चालेल का ?" या अनपेक्षित प्रश्नामुळे आम्ही आवाक झालो, गोंधळून गेलो. कसा बसा होकार दिला. ताईंनी ताट सजवल, आम्हाला टिळा लावला , राखी बांधली आणि ओवाळल. निरंजनाच्या अंधुकश्या प्रकाशात ताईचा चेहरा ओझरता पाहिला. ओवाळणी झाल्यावर तिथे भयंकर शांतता पसरली. आम्हा चौघांना सतावणारा प्रश्न म्हणजे ओवाळणी काय द्यायची. पावसामुळे पाकीटं सुध्दा गाडीत ठेवलेले. माझ्या डोळ्या समोर लहानपणी पासूनची रक्षाबंधन सरकून गेली. रक्षाबंधन म्हटले की, बहिणी ओवाळणार, मग आई-बाबांनी दिलेल पैशाच पाकीट किंवा गिफ्ट तिला द्यायच म्हणजे समारंभ पार पडला , मग वर्षभर तिच्याची भांडाभांडी-मारामारी केली तरी काही फरक पडत नाही, रक्षण तर बाजूलाच राहिलं. पुढे बहिणी मोठ्या झाल्या आपापल्या सासरी गेल्या, पहिले काही वर्ष उत्साहाने रक्षाबंधनाला त्यांच्याकडे जायचो, आता दोघांनाही वेळ नसल्यामुळे sms टाकला तरी काम भागत. या आठवणींनी माझ्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. अंधाराचा फायदा घेऊन चेहर्‍यावरचे भाव न दाखवता "निघतो" एवढेच शब्द उच्चारून आम्ही घराच्या बाहेर पडलो. गाडीजवळ आल्यावर आम्ही सर्वांनी दिर्घ निश्वास सोडला, सॅक मधून पाकीट बाहेर काढली व ओवाळणीची रक्कम गोळा करून ताईला देऊन आलो, तेव्हा कुठे आम्हाला सुटल्यासारख वाटल. शहरात वाढलेल्या आमच्या मनाला अशी अकृत्रीम, कुठलीही अपेक्षा नसलेली नाती असतात याचाही विसर पडत चालला आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.

या घटनेला आता दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पुन्हा काही विहिर गावात जाण झाल नाही. परत कधी मी विहिर गावात गेलो तरी मला ते घर सापडेल की नाही या बद्दल मी साशंक आहे. मधल्या काळात मोबाईल हरवल्यामुळे भाऊंचा नंबर पण गेला. गेलेल्या काळा बरोबर निरंजनाच्या अंधुकश्या प्रकाशात ओझरता पाहिलेला ताईचा चेहरा पण धुसर झाला आहे. या सर्वात नशीबाने एकच गोष्ट माझ्याकडे शिल्लक आहे ती म्हणजे ताईने बांधलेली राखी. ती मी आजही जपून ठेवली आहे.










सदर लेख "लोकसत्ताच्या"  अंकात ’ब्लॉग इट" सदरात प्रसिध्द झाला होता.

Monday, October 22, 2012

मृगाचा (मखमली) किडा ( Red Velvet Mite)


Red Velvet Mite

पावसाळा सुरू झाला की तर्‍हेतर्‍हेचे किडे दिसायला लागतात. ट्रेकर्सचही काहीस असचं आहे. पाऊस सुरु झाला की, धुक्याने वेढलेले हिरवे डोंगर त्यांना साद घालायला लागतात. मग शनिवार-रविवार गडांच्या वार्‍या सुरु होतात. अशाच एका पावसाळ्यात मंगळगडाचा ट्रेक करत होतो. चढाईचा पहीला टप्पा ओलांडून सर्व जण विश्रांतीसाठी पसरले होते. इतक्यात बाजूच्या पाचोळ्यातून फिरणारे लाल भडक रंगाचे मखमली किडे सर्वांच्या नजरेस पडले. असं काही विचित्र/ वेगळं दिसल की, ती गोष्ट पाहण्यापेक्षा कॅमेर्‍यात पकडण्यासाठी सर्वजण धडपडत होते. मग हे फोटो पिकासा/ फेसबुकवर टाकून "लाईक्स" मिळवले की फोटो काढणारा धन्य होतो. आताही सर्वांनी किड्याच्या मागे - पुढे सरपटत चुंबन फोटोग्राफी (मॅक्रो मोड मध्ये फोटो काढण्याला आम्ही दिलेले हे नाव आहे.) सुरु केली. मी पण माझ्या वाट्याला आलेल्या किड्याचे मनसोक्त फोटो काढले. त्यानंतर जवळच्या वाळलेल्या काटकीने त्याच्या पाठीवर हलकेच दाब दिला त्याबरोबर किड्याने आपले पाय पोटाखाली घेतले. निपचित पडून स्वतःचे संरक्षण करण्याचा त्याचा हा प्रकार असावा. त्याच काडीने त्या किड्याला उलटे केल्यावर त्याच्या पोटावर व पायांवरही  तांबडी मखमल पसरलेली दिसली.

घरी आल्यावर संगणकावर फोटो टाकून गुगल भाऊंना साद घातली. त्यांनी नेहमी प्रमाणे ज्ञानाचा खजिना रीता केला. मृग नक्षत्रातच हा किडा दिसतो म्हणून याला "मृगाचा किडा" म्हणतात. यावरूनच त्याला तेलगुत "आरुद्रा (नक्षत्र) पुरुगू" म्हणतात. संस्कृत मधे " बिरबाहूती ", तर उर्दूत "राणी किडा", म्हणतात. मराठीत मखमली किडा, गोसावी किडा (त्याच्या शरीरावरील भगवी झाकं असलेल्या मखमलीमुळे) या नावाने ओळखतात. इंग्रजीत "Red Velvet Mite" आणि शास्त्रिय भाषेत " Holostric" या नावने हा ओळखला जातो. 

जव्हार तलासरी भागातील आदिवासी या किड्याला "देवगाय" म्हणतात.  हा किडा पकडून पापण्यांवरुन फ़िरवतात अशी महिती या भागात फ़िरतांना कळली. 

वाल्मिकी रामायणात सुध्दा मृगाच्या किटकाचा उल्लेख आलेला आहे.

*वर्षावर्णनम्*

बालेन्द्रगोपान्तरचित्रितेन विभाति भूमिर्नवशाद्वलेन।
गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण नारीव लाक्षोक्षितकम्बलेन।।
                             
                                                      - वाल्मीकिरामायणे।

 इन्द्रगोपः- मृगाचे किडे (लाल रंगाचे)

भावार्थ :- पावसामुळे नुकत्याच उगवलेल्या हिरव्यागार कोवळ्या गवतावर "मृगाचे किडे" शोभून दिसत आहेत. जसे हिरव्या (पोपटी) रंगाचे वस्त्र धारण केलेल्या स्त्रीने लाखेच्या रंगाचे (लाल) कांबळे (शाल) पांघरली आहे.

मृगाचा किडा हा गोचिडीचा भाऊबंध असल्याचे वाचून त्याला हात लावला नाही याचा मला आनंद झाला. मात्र हा किडा गोचिडीसारखा प्राण्यांचे रक्त पित नाही तर, त्याची पिल्ले गोचिडीसारखी माश्या, नागतोडे व इतर किटकांना चिकटतात व आपले पोषण करतात. पूर्ण वाढ झालेले मृगाचे किडे पालापाचोळ्यावर वाढण्यार्‍या बुरुशी भक्षकांची अंडी खातात व अप्रत्यक्ष्यपणे पालापाचोळा कुजविण्याच्या क्रियेला मदत करतात.  मृगाच्या किड्याला निसर्गतः जास्त शत्रू नसले तरी, मानव हा आता त्याचा मुख्य शत्रू झाला आहे.  वंशपरंपरेने आदिवसींना ज्ञात असलेले त्याचे औषधी गुणधर्म आता बहूराष्ट्रीय कंपन्यांनाही माहित झाले आहेत. त्यामुळे किडे गोळा करणे हे आदिवासींच्या अर्थाजनाचे साधन झाले आहे. पूर्वांपार या किड्याचा उपयोग अतिसारा वरील औषधात होतो. या किड्याचे तेल अर्धांगवायूत (paralysis) रामबाण उपाय म्हणून वापरतात. त्याचा उपयोग लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी देखिल होतो. याच कारणासाठी छत्तीसगड मधील आदिवासी नवपरीणीत दांपत्याला मृगाचा किडा भेट म्हणून दे्ण्याची परंपरा आहे. 

Harishchandragad


यावरून एक किस्सा आठवला, मध्यंतरी हरीशचंद्रगड उतरतांना काही गावकरी एका रानफूलाच्या बिया ओरबाडून पोत्यात भरत होते. विशिष्ट उंचीवरच दिसणार्‍या या रानफूलांची मोजकीच झुडपं या परीसरात आहेत. आमचं कुतूहल चाळवल्यामुळे आम्ही गावकर्‍यांकडे चौकशी केली. त्यांनी दिलेली माहिती रंजक होती. या रानफूलाच्या बिया लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच्या औषधात वापरतात. व्यापरी १ किलोला १००/- रुपये भाव देतात. त्यामुळे या दिवसात गावातील सर्व लोक या बिया गोळा करण्याच काम करतात. त्यांनी पोत्यातून काढून थोड्या- थोड्या बिया सर्वांच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले खाऊन बघा, काही होत नाही. अख्खा गड उतरायचा असल्याने आम्ही काही बिया खाल्या नाहीत. थोड्या  तरी बिया झुडपांवर ठेवा म्हणजे पुढच्या वर्षी सुध्दा झाडे येतील असा (फूकटचा) सल्ला देऊन आम्ही निघालो. पण त्यांच्या पाचवीला पुजलेलं अठराविश्व दारीद्र्य व या झुडपांपासून मिळणारे पैसे याचा विचार केला तर काही वर्षांनी ही वनस्पती सह्याद्रीत नक्कीच दुर्मिळ होत जाणार आहे.  


Red Velvet Mite

खरतर पावसाळ्यात एकदाच दर्शन देऊन सुप्तावस्थेत जाणार्‍या या राजबिंड्या मृगाच्या किड्याचं दुर्मिळ होत, नष्ट होत जाण आपल्याला कळणारही नाही.  त्याच्या नसण्याने काय फरक पडणार आहे ? असा विचार कदाचित मनात येऊ शकतो . इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, निसर्गचक्रात प्रत्येकाला कामे वाटून दिले्ली आहेत. यातून परस्परावलंबनाचे एक चक्र निसर्गाने तयार करुन दिले आहे. त्यातील एक जरी सांधा निखळला तर हे  निसर्गचक्र फिरणार कसे ?  आता आपला मृगाचा किडाच बघा त्याच काम पालापाचोळ्यावर वाढण्यार्‍या बुरुशीच्या भक्ष्यांची अंडी खाणं. उद्या हाच जर नष्ट झाला तर, बुरुशी भक्षकांची संख्या वाढेल, बुरशी कमी होईल आणि पानांच कुजण मंदावेल. पान कुजली नाहीत तर माती तयार होणार नाही, झाडांच पडलेल बी रुजणार नाही आणि या सगळ्याचा शेवट एक चांगल्या जंगलाच्या मृत्यूने होईल. कदाचित हे वाचतांना अतिशयोक्ती वाटेल पण निसर्गचक्रातील ढवळाढवळीचे दूरगामी परिणाम भयंकरच असतील.   

या बहुगुणी मृगाच्या किड्याला वाचवायच असेल तर रेशीम किड्या सारखी याची जोपासना/ शेती करण्याच तंत्र विकसित कराव लागेल . हे तंत्र आदिवासींना शिकवून त्यातून त्यांच्या उत्पन्नाची सोय झाली तरच हा किडा वाचू शकेल. 
    


"अदृश्य किटकांच्या जगात"  ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा ....


Friday, November 26, 2010

स्लाइड शो

२० नोव्हेंबर २०१० ला आमच्या "ट्रेक क्षितिज" संस्थेचा कोठिम्ब्याच्या वनवासी कल्याण आश्रमात स्लाइड शो होता . मी आणि श्रीकृष्णने पाठ पिशवीत प्रोजेक्टर , camera, पाण्याची बाटली  भरून कर्जत लोकल पकडली . नेरळला उतरून टमटमचा १२ कि.मी .चा खडतर प्रवास करुन कशेले गावात पोहोचलो . तिथें दूसरी टमटम पकडून कोठीम्बा गावाच्या पुढील फाट्यावर उतरालो . त्यानंतर  अर्धा  कि.मी. चालल्यावर आम्ही एकदाचे   वनवासी कल्याण आश्रमात पोहोचलो .
      

 
    नोव्हेंबर महिना असून सुध्धा  उन "मी म्हणत "होते. आम्ही दोघे घामाने चिंम्ब झालो होतो. पण आश्रमात पोहोचल्यावर तेथील  दाट झाडी व नीटनेटकपणा पाहून   डोळ्याना  थंडावा मिळाला. आश्रमात आमचे छान स्वागत झाले. आम्ही गेलो तेंव्हा मुलांचे  जेवण चालु होते. सार काही शिस्तीत , कुठेही गोंधळ गड़बड़ दिसत नव्हती . आश्रमातील कार्यकर्त्यां बरोबर गप्पा मारल्यावर वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती मिळाली. देशभर आदिवासी वस्तीत असे  अनेक वनवासी कल्याण आश्रम आहेत. तेथे आदिवासी मुलांची राहाण्या - खाण्याची सोय केली जाते. आदिवासी मुलांवर संस्कार केले जातात. कोठिम्ब्याच्या आश्रमात ३५ मुले आहेत . आता शिबिर चालू असल्यामुळे ठाणे व रायगड जिल्ह्यामधून निवडक मुले व मुली येथे आल्या आहेत अशी माहिती मिळाली.

आश्रमाच्या रुचकर व सात्विक जेवणाचा आस्वाद घेउन आम्ही आश्रमा मागील जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेलो . तेथे अनेक प्रकारची फुलपाखरे व फुले होती त्यांची छायाचित्रे घेतली . थोड्या अंतरावर एका  ओढ्यावर आश्रमाने बांध घालून छोटेसे धरण केले  होते , त्यावरुन पडणारया पाण्याचा  नाद ऐकत आम्ही बराच वेळ बसलो. जर स्लाइड शो करायचा नसता तर आम्ही फुलपाखरा सोबत तिथेच बसलो असतो .






































बरोबर २.३० वाजता सह्याद्रितील किल्ले या स्लाइड शो ला आम्ही सुरुवात केली. मुले  व कार्यकर्त्यां बरोबर संवाद साधत केलेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला . कार्यक्रम संपल्यावर उपस्थितांबरोबर पावसानेही आम्हाला दाद दिली . नंतर  धो - धो पाउस तासभर पडला .पाउस कमी झाल्यावर आश्रमाताल्या कार्यकर्त्यांनी कशेले गावापर्यंत आम्हाला सोडले. पडणारया  पावसाने वातवरणात सुखद बदल घडवून आणला होता .त्यामुले सकाळी रखरखीत आणि कंटाळवाणा  वाटणारा प्रवास आता सुंदर वाटत होता . कदाचित  "ट्रेक क्षितिज" संस्थेने अजुन एक छान स्लाइड शो केल्याचा हा परिणाम असावा .