Sunday, April 24, 2016

South Indian Food in Mumbai (जीवाचे साऊथ इंडीयन) What & where to eat south Indian food in Mumbai

मुंबईकरांच्या सुपरफास्ट जीवनात इडली, वडा, डोसा या पदार्थानी अढळपद प्राप्त केलेल आहे. मुंबईकरांची ही गरज ओळखुन मुंबईत अनेक साउथ इंडीयन हॉटेल्स उभी राहीली.  मुंबईभर पसरलेली उडपी हॉटेल्स इडली डोसे खिलवता-खिलवता काळानुरुप बदलत गेली. त्यात पंजाबी, चायनीज इत्यादी पदार्थ ही राजरोसपणे दिसू लागले आणि त्यांच्या सांबर चटणीची अस्सल चव हरवली. तरी आजही मुंबईत काही अस्सल साउथ इंडीयन रेस्टॉरंट अजुनही टिकून आहेत.




अस्सल साऊथ इंडीयन हॉटेलच व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याच्या काउंटरवर पांढरी लुंगी (हल्ली पॅंट) आणि शर्ट घालून, कपाळावर भस्माचा आडवा पट्टा किंवा टिळा लावलेला आणि तोंडात पानाचा तोबारा भरून बसलेला मॅनेजर, हॉटेलमधे न मागता सढळ हस्ते मिळणारी सांबार, चटणी आणि तिथे मिळणारे साऊथ इंडीयन पदार्थ. (आजकाल गल्लोगल्ली उभ राहून इडली- वड्याची प्रेत चटणी सांबाराच्या चिखलात बुडवून पेपरावर देणार्‍यांना आपल्या या यादीत स्थान नाहीये.) असे अस्सल साऊथ इंडीयन पदार्थ खाण्यासाठी माटुंगा गाठण्या शिवाय पर्याय नाही. ब्रिटीश काळात मुंबई शहराची वाढ होताना वेगवेगळी पॉकेट्स तयार झाली. त्यातील माटुंगा परीसरावर दाक्षिणात्यांचा प्रभाव राहिला. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक अशा विविध भागातून आलेल्या लोकांनी इथे वस्ती केली. त्यांच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेची छाप या परीसरावर पडण अटळ होत. दक्षिणात्य शैलीतील मंदिरे, मठ, शंकरमठम सारखी वेदपाठशाळा, तेलंग रोडच्या कोपर्‍यावरचा फ़ुलबाजार त्यात मिळणारे दाक्षिणात्य पध्दतीचे हार, गजरे. रामा नायक ते मणीज, मद्रास कॅफ़े इत्यादी हॉटेल्स असा छोटासा दक्षिण भारतच माटुंग्यात वसलाय.   

माटुंगा स्थानकात पूर्वेकडे उतरल्यावर स्टेशनच्या बाजुलाच डाव्या हाताला रामा नायक यांचे "श्रीकृष्ण बोर्डींग" आहे. येथे दक्षिण भारतीय पध्दतीचे उत्तम जेवण मिळते. सांबार, रस्सम, भात, चटणी, भाजी, पापड, लोणच आणि स्वीट डीश अस जेवण अनेक पिढ्याना माफक दरात खाउ घालत रामा नायक अनेक वर्ष आपला आब राखत उभ आहे. हौशी माणसांसाठी केळीच्या आडव्या पानावरही याच जेवणाचा आस्वाद घेता येतो.


रामा नायक पासुन पुढे जाउन रस्ता ओलांडल्यावर "शारदा भुवन" आपल स्वागत करत. इथले काही वेटर्स आजही पांढर्‍या शुभ्र लुंगीत आपल्या सेवेला हजर असतात. इडली, वडा, विविध प्रकारचे डोसे, केळा भजी असे असंख्य प्रकार इथे खायला मिळतात. पण इथली खासियत म्हणजे अडाई, पाणपोळी आणि उलुंदु डोसा. शारदा भुवनवरुन पोदार कॉलेज ओलांडुन पुढे गेल्यावर रुईया कॉलेजच्या बाजुला "मणीज" नावाच छोटस हॉटेल आहे. आपल्या कॉलेज जीवनात अनेकानी पहिल्या वहिल्या अस्सल साउथ इंडीयन चवीचा आस्वाद याच ठिकाणी घेतला आहे. इथे बसायला कमी जागा असल्यामुळे हॉटेलच्या बाहेर कट्ट्यावर बसुन किंवा गाडीत बसुन खावे लागते तरीही इथे कायम गर्दी असते. इथे मिळणारी इडली चटणी, वडा चटणी आणि त्याबरोबर कॉलेज जीवनातल्या आठवणी एकदम लाजवाब कॉम्बिनेशन आहे.


माटुंग्याला उतरुन रुईया कॉलेजकडे न जाता विरुध्द बाजुस गेल्यावर भांडारकर रोडच्या कॉर्नरवर राम आश्रय आहे. इथे मिळणारा म्हैसुर मसाला डोसा आणि त्याबरोबर मिळणार्‍या विविध प्रकारच्या चटण्या मस्तच. या ठिकाणी रस्सम वडाही चांगला मिळतो. राम आश्रय वरुन पुढे गेल्यावर डाव्या हाताला फुलांचे सुंदर हार बनवणारी दुकान दिसतात. त्याचा मंद सुगंध वातावरणात पसरलेला असतो. येथे डावीकडे जाणारा रस्ता शंकर मठम या वेदपाठशाळेकडे जातो. येथे "मणीस" आहे. वडा सांबार चटणी; डोसे, दुपारी आणि रात्री मिळणार साउथ इंडीयन पध्दतीच जेवण आणि स्टीलच्या ग्लास वाटीतून येणारी कॉफ़ी (उच्चार काफ़ी) इथली खासियत आहे. आमच्या रोजच्या ट्रेन मधला खवय्या गृप एखाद्या शनिवारी दादरला उतरुन इथे टॅक्सीने इथे थडकतो. मग शिरा, उपमा, पोंगल, इडली, वडा, चटणी - सांबार , डोसे आणि याबरोबर मिळणार अमर्यादित सांबार चटणी खाउन झाल्यावर इथे मिळणारा तुपाळ मउ म्हैसुरपाक खाउन जडावलेल्या पोटाने आणि डोळ्यानी नाईलाजाने परत आपापल्या ऑफिसकडे निघतो. खरतर उलट्या बाजूची गाडी पकडून घरी जाऊन ताणून द्यावी असा मोह झालेला असतो. या मणीजच्या वर त्यांचच एक लॉज आहे. एकदा मणीस मधे आडवा हात मारुन वर लॉजमधे जाउन मस्त ताणुन द्यायची ऑफीसला जायचच नाही अस आम्ही ठरवलय पण अजुन ही कल्पना प्रत्यक्षात उतरवता आलेली नाहीये, २०१६ साली मणीज चेंबुरला शिफ़्ट झाले. (मणीज मधे पुरी आणि बटाटा भाजी हा प्रकारही मिळतो. कोणी हा पदार्थ खाताना दिसला की आम्ही त्याला फाउल समजतो. पुरी भाजी खायला अनेक हॉटेल्स आहेत. मणीज मधे येउन सांबार चटणी नाही खाल्ली तर आयुष्याला अर्थ नाही.) 



मणीज वरुन भाउ दाजी रस्त्यावर गेल्यावर मद्रास कॅफे आहे. इथली इडली चटणी अप्रतिमच. पुढे किंग्ज सर्कलला म्हणजे आजच्या महेश्वरी उद्यानला रामा नायक यांच "उडपी विहार" हे एसी रेस्टॉरंट आहे. एसी असल्याने माटुंग्यातील इतर साऊथ इंडीयन रेस्टॉरंटच्या मानाने महाग आहे. गम्मत म्हणजे हे रेस्टॉरंट इथल्या सँडविचसाठी प्रसिध्द आहे. उडपीच्या बाजूला शारदा भुवन आहे. तर समोरच्या फ़ुटपाथला रामा नायक यांच इडली हाउस आहे. इडली हाउस मध्ये फ़क्त इडलीचेच अनेक प्रकार खायला मिळतात सोबत सांबार चटणी अनलिमिटेड मिळते, फ़क्त अट एकच सांबार आणि चटणी टाकायची नाही अन्यथा पैसे घेतले जातात. इथे मिळणारी कांजीवरम इडली, पेपर इडली, मुढ्ढो (फ़णसाच्या पानात शिजवलेली इडली) , फ़ोनसा मुढ्ढो (फ़णसाचे गरे घालून केलेली गोड इडली, हि इडली फ़क्त फ़णसाच्या मौसमातच मिळाते) आणि सोबत लाल तिखट चटणी अशा विविध प्रकारच्या इडल्या मिळतात.

Mudho , Anand Bhuvan 

Phonsa Mudhho (Sweet Idali) Butter Jack fruit idali 

Kanjivaram Idali, Idali house , Matunga

याशिवाय भांडारकर रोडवरच अंबा भुवनही आपली चव राखुन आहे. तिथे मिळणारा कढीवडा लाजवाब. त्याच बरोबर इथे मिळणारा नीर डोसा आणि पायनॅपल शिराही उत्तम असतो. येथे दुपारी आणि रात्री केवळ बिसिबिळ्ळे (आपल्या भाताच्या खिचिडीचा भाऊबंध) खाण्यासाठी लोक येतात.

  माटुंग्याच्या पुढे सायनला एकमेव साउथ इंडीयन हॉटेल आहे. सायन स्टेशनकडून पूर्व महामार्गाकडे चालत जातांना उजव्या बाजूला "मणीज लंच होम" आहे. फ़क्त जेवणाच्या वेळातच उघड्या असणार्‍या या हॉटेलात अस्सल साउथ इंडीयन जेवण मिळत.

माटुंग्यानंतर अस्सल साउथ इंडीयन खाण्याकरता मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नाही. मुंबई सीएसटी स्थानकात उतरुन मिंट रोडने चालायला सुरुवात केल्यावर आनंद भुवन नावाची तीन हॉटेल्स एकापाठोपाठ एक लागतात, जाणकारानाच त्यातील फरक कळतो. पहिल "न्यु आनंद भुवन" हे रोटी, पंजाबी, चायनीज इत्यादीमुळे आपल्या कॅटॅगरीत बसत नाही. त्याच्या बाजूच "न्यू स्पेशल स्पेशल आनंद भुवन" नावाच हॉटेल आहे. आत्ता आत्ता पर्य़ंत केवळ साउथ इंडीयन पदार्थ देणार हे हॉटेलही आता बाटलय. तरी पण आजही इथे दररोज एक अस्सल साउथ इंडीयन पदार्थ मिळतो. निअप्पम, पानपोळी, सुगियम, पायसम इत्यादी पदार्थ खाण्यासाठी इथे जायला हरकत नाही. तिसर म्हणजे बॅलार्ड पिअर जवळच "न्यू स्पेशल आनंद भुवन" हे अजून साउथ इंडीयन चव राखुन आहे. इथे प्रथेप्रमाणे सांबार, चटणी आग्रहाने वाढतात. या हॉटेलच्या बाजूलाच "उडपी बोर्डींग" नावाच साऊथ इंडीयन जेवण देणार केवळ आणि केवळ जेवणाच्या वेळेतच उघड असणार हॉटेल आहे. 
 

सिएसटीला आलोच आहोत तर, दोन टपर्‍यांचा उल्लेख टाळता येणार नाही. सिएसटी स्टेशनसमोर कॅनन पावभाजीच्या लाईनीत "साऊथ कॉर्नर" नावाची टपरी आहे. इथली खासियत म्हणजे इथे डोसे कोळश्याच्या शेगडीवर बनवले जातात. इथली इडली आणि म्हैसुर मसाला डोसा खासच. मुंबईतल्या इतर टपर्‍यांप्रमाणे इथेही सांबार, चटणीची परीस्थिती चिंतनीय आहे. इथे रस्त्यात उभ राहून लोकांचे धक्के चुकवत खाव लागत. दुसरी टपरी म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर समोरच्या फ़ुटपाथवरची. इथे बटर डोसा, मसाला उत्तप्पा आणि डाल वडा उत्तम मिळतो. इथे चक्क चटणीही चांगली असते. 

मुंबईच्या इतर उपनगरात अस्सल साऊथ इंडीयन हॉटेल्स जवळजवळ नाहीतच. दोन वर्षापूर्वी घाटकोपर पूर्वेला आयनॉक्स थेटरच्या खाली "बालाजी" नावाच हॉटेल होत. इथे फ़क्त इडली आणि डोश्याचे सतराशे साठ प्रकार मिळायचे. इथे मिळणारा इडली प्लॅटर प्रकार एकदम हटके होता. यात वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या वेगवेगळ्या चटणी सांबार आणि टॉपिंगज सहित एकामागोमाग एक यायच्या. चार जणांना पोटभर मिळणारा हा प्रकार हॉटेल अचानक बंद झाल्यामुळे मिळेनासा झाला आणि घाटकोपरला उतरण्याच कारणच राहील नाही.

माटुंग्या नंतर साऊथ इंडीयन लोकांची वस्ती असणार ठिकाण म्हणजे डोंबिवली. राजाजी पथ, डोंबिवली पश्चिम आणि गोग्रासवाडी या भागात यांची वस्ती आणि देवळ आहेत. पण आज दुर्दैवाने खाण्याची ठिकाण मात्र नाहीत. इथे दक्षिणात्य खाद्य संस्कृती रुजली, पण फ़ुलली नाही. काही वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेला बाजीप्रभू चौकात "अन्नपूर्णा" नावाच अस्सल साउथ इंडीयन हॉटेल होत. डोंबिवलीतील एक खाणारी पिढी या हॉटेलने घडवली. रविवारी सकाळी अण्णुकडे (हे डोंबिवलीकरांनी त्याला ठेवलेल प्रेमाच नाव) जाऊन अप्पम, इडली, डोसे खाल्ल्या शिवाय डोंबिवलीकरांचा रविवार सुरु होत नसे. कालांतराने हे हॉटेल बंद पडले. पण आज डोंबिवलीत जागोजागी मिळणारे अप्पम ही याच हॉटेल्सची देणगी आहे.


खरतर खाण्यात अस्सल आणि नक्कल अस काही नसत. कधीकधी आई किंवा बायकोने बनवलेली सांबार चटणी अगदी  साऊथ इंडीयन हॉटेलच्या तोडीची होते. पण या हॉटेलात दरवळणारे सांबार, रस्सम, कॉफ़ीचे संमिश्र वास तिथल वातावरण तिथे वारंवार जाऊन खायला मजबूर करत .

अमित सामंत




Thursday, April 21, 2016

हरिश्चंद्रगडाचे साथिदार ( Bhairavgad(kothale), Bhairavgad (Shirpunje), Kalalgad, Kunjargad treks around Harishchandragad)


Bhairavgad (kothale) from base village kothale 


हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या उभ्या आडव्या पसरलेल्या गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. दुर्ग भटक्यांनी या वाटा कधी ना कधी तरी तुडवलेल्या असतात. त्यामानाने हरीशचंद्रगडाच्या प्रभावळीत असलेल्या कुंजरगड (कोंबडगड) , भैरवगड (कोथळे) , कलाडगड , भैरवगड (शिरपुंजे) या किल्ल्यांवर फ़ारच कमी दुर्ग भटके जातात. हरीशचंद्रगडकडे जाणार्‍या विविध मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीनकाळी हे किल्ले बांधले गेले. हे किल्ले  पाहाण्याचा बर्याच दिवसापासुन मानस होता. दोन दिवसात चार किल्ले पाहायचे, त्यांचे GPS Mapping करायच या उद्देशाने शुक्रवारी रात्री निघालो. नगर जिल्ह्यातल्या या भागात मुंबईहुन जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.  मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे  ओतुर -बामणवाडा - कोतुळ किंवा  मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर या दोनही मार्गाने अंतर जवळ जवळ सारखच होत.

पहिल्या दिवशी कुंजरगड आणि भैरवगड (कोथळे) करुन पाचनईत मुक्काम करायचा असल्यामुळे आम्ही माळशेज घाट मार्गे विहिर हे कुंजर (कोंबड) गडाच्या पायथ्याचे गाव गाठले. कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट चढून आल्यावर अजून एक डोंगररांग आडवी येते तीला बालाघाट रांग म्हणतात. हरीशचंद्र गडाच्या मागच्या बाजूस येणार्‍या या डोंगररांगेवर कलाल, कुंजर, भैरवगड इत्यादी किल्ले येतात. "कुंज" या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन "कुजंरगड" असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.

विहिर गाव म्हणजे २०-३० घरांची छोटी वस्ती आहे. गावाच्या बाजूने डोंगर उतारावर थोडीशी भातशेती दिसत होती. त्यामागे कुंजरगड एखाद्या महाकाय हत्ती सारखा पसरलेला दिसत होता. किल्ला चढण्यासाठी १ तास , किल्ला फिरायला १ तास व उतरायला १ तास असा तीन तासांचा अवधी मनात धरुन किल्ला चढायला सुरुवात केली. विहिर गावातून कुंजर गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून जाणार्‍या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. या वाटेने गडावर चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे वळते. या वाटेने गडाला वळसा घालून जातांना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्‍या मुर्तीला काळोबा म्हणतात. या मुर्ती येथून हलवून गावात नेऊन मंदिर बांधण्याचा गावकर्‍यांचा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आज पर्यंत शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात.





या मुर्ती पाहून मागे न जाता कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता येते किंवा परत मागे फिरुन आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील खिंडीतून गडावर जाता येते. पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावाकडून येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. अर्ध्या पायर्‍या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी विहिर गावच्या दिशेला व फोफसंडी गावाच्या बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे. पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग होत असावा. आज या गुहेतून आरपार जाण कठीण आहे. श्री. बेंडखळें सरांच्या भूयार या पुस्तकात या गुहेतून त्यांनी केलेल्या प्रवासावर एक रोमहर्षक प्रकरण लिहीलेल आहे.  गुहा पाहुन पायर्‍यांच्या मार्गाने उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश केल्यावर उध्वस्त वास्तुचे अवषेश दिसतात. उजव्या बाजूला पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. या बाजूला किल्लाच्या माथ्यावरील पठार अरुंद होत जाते, टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. इथुन पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन विरुध्द (डाव्या बाजूच्या) टोकाकडे जातांना वाटेत पाण्याची ३ सुकलेली टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवषेश दिसतात.या वाड्यामागे (पिण्याच्या पाण्याच्या) दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.  

GPS Mapping साठी गडावर चढुन आलेल्या वाटेने परत न जाता गडाच्या उजव्या बाजुला लागुन असणार्‍या डोंगरावरुन खाली उतरताना कपारीतल्या ३ नैसर्गिक गुहा पाहायला मिळतात. गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे बांधण्यासाठी करतात. कुंजर गावात उतरून बरोबर आणलेला तहानलाडू भुक लाडू खाऊन १० किमी वरील कोथळे हे भैरवगडाच्या पायथ्याचे गाव गाठले. हरीश्चंद्रगडावर जाण्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी मुख्य मार्ग हा टोलारखिंडीतून जातो. पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर आणि नगर जिल्ह्यातील कोथळे गावातून टोलारखिंडीत जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाची निर्मिती करण्यात आली होती. गडाचा आकार आणि रचना पाहाता या किल्ल्याची निर्मिती हरिश्चंद्रगडाच्या काळातच झाली असावी. कोथळे या पायथ्याच्या गावाजवळ डोंगररांग चालु होते. यात सर्वात प्रथम एक पिंडीच्या आकाराचा डोंगर आहे. या डोंगराला "कोळथा" नावाने ओळखतात. त्यापुढे अजुन एक शिखर आहे. या शिखरापुढे  थोडी सपाटी असलेला "भैरवगड" आणि त्यापुढे उंच "गाढवाचा डोंगर" अशी शिखरांची सुंदर माळ कोळथे गावातून दिसते. भैरवगडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे. स्थानिक लोक गडावर जाणार्‍या दुसर्‍या शिडी खाली आपली पादत्राणे काढुन अनवाणी पायाने गडमाथ्यावर जातात. दरवर्षी चैत्रात भैरोबाची यात्रा भरते.


Water Tank at Bhairavgad (Kothale)

    कोतुळ किंवा विहिर गावातून कोळथे गावाकडे जाताना गावाच्या अर्धा किमी अलिकडे (राजुरच्या बाजुने येताना कोळथे गावाच्या पुढे) एक कच्चा रस्ता टोलार खिंडीकडे जातो. इथे हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य असा मोठा फलक लावलेला आहे. तसच टोलारखिंडीकडे असा बाण दाखवलेला फलकही बसवलेला आहे. या रस्त्याने २ मिनिटे  चालल्यावर डाव्या बाजुला एक पायवाट जाते. यावाटेवर एका झुडुपाखाली "गवळ देवाची" मुर्ती आहे. ती पाहुन मळलेल्या वाटेने शेतांमधुन जात पुढे  गेल्यावर वाट जंगलात शिरते. जंगलात  शिरल्यावर खडा चढ चालु होतो. साधारण २० मिनिटात आपण गडाच्या कातळकोरीव पायर्‍यांपाशी पोहोचतो. या पायर्‍यांच्या पुढे डाव्या बाजूला कातळकड्या खाली एक पाण्याच टाक आहे. ते पाहुन परत पायवाटेवर येऊन एक वळसा मारल्यावर वनखात्याने बसवलेली पहीली शिडी आहे. शिडी चढुन वर गेल्यावर एक वळसा मारल्यावर पायवाटेच्या डाव्या बाजुला कातळाखाली खोदलेल पाण्याच टाक आहे. ते पाहुन पायवाटेने ५ मिनिट चढुन गेल्यावर कातळात खोदलेल खांब टाक दिसत. त्याच्या बाजुला एक बुजलेल टाक आहे. वनखात्याने त्यावर बसण्यासाठी दोन लोखंडी बाकडी ठेवलेली आहेत. टाक्या जवळच दुसरी मोठी शिडी आहे. ४० पायर्‍यांची शिडी चढुन गेल्यावर एक छोटी आडवी शिडी आहे. ती शिडी चढुन गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. वनखात्याने बसवलेल्या या शिड्यांमुळे आज आपण सहजपणे गडावर पोहोचु शकतो.


Ladder at Bhairavgad (kothale)-

गडमाथ्याचा विस्तार छोटा आहे. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला (उत्तरेला) भैरवाच ठाण आहे. त्याच्या बाजुला काही मुर्ती आणि वीरगळी ठेवलेल्या आहेत. समोरच्या बाजुला कातळात कोरलेली पाण्याची २ टाक आहेत. टाक्यांच्या मागे दोन दिपमाळा आहेत. भैरवाच्या मागच्या बाजुला कड्यावर रेलिंग लावलेले आहे. तिथुन समोर पसरलेला हरिश्चंद्रगड, त्यावरील तारमाती शिखर आणि हरीश्चंद्रगडाची "वेताळधार" स्पष्टपणे दिसते. भैरवाच दर्शन घेउन विरुध्द दिशेला ( दक्षिणेला) चालायला सुरुवात केल्यावर समोर भैरवगडापेक्षा उंच डोंगर दिसतो. त्याला "गाढवाचा डोंगर" म्हणतात. भैरवगड म्हणजे देवाचा रथ आणि त्याच्या पुढचा डोंगर म्हणजे रथ ओढणार गाढव अशी कल्पना करुन स्थानिक लोकानी या डोंगराला गाढव नाव दिलेल आहे. या डोंगराच्या दिशेने जाताना ५ टाक्यांचा एक समुह पाहायला मिळतो. पुढे गाढवाचा डोंगर आणि भैरवगड यांच्या मधिल गडाच्या टोकावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. भैरवगडावरुन पश्चिमेला हरिश्चंद्रगड, उत्तरेला शिरपुंज्याचा भैरवगड, पूर्वेला कुंजरगड दिसतात.



भैरवगड पाहुन खाली उतरल्यावर टोलारखिंडी मार्गे हरिश्चंद्रगडावर ४ ते ५ तासात पोहोचता येते. आम्हाला दुसर्‍या दिवशी कलालगड आणि शिरपुंज्याचा भैरवगड पाहायचा असल्याने आम्ही मुक्कामाला पाचनईत गेलो. जोडून सुट्टी असल्याने पाचनई गाव दुचाकी, चारचाकी गाड्यांनी भरुन गेल होत. त्यावरुन हरीश्चंद्रगडावर किती हौशा नवशांची गर्दी असेल याचा अंदाज येत होता. गावात नेहमीच्या वाट्याड्याकडे जेवणाची आणि झोपण्याची सोय केलेली होती. पण आमचा वाटाड्या घरी नव्हता, त्याने आम्ही येणार याचीही कल्पना घरी दिली नव्हती. फ़ोनही लागत नव्हते. पण पर्यटकांच्या सततच्या वावरामुळे हल्ली "प्रोफ़ेशनल" झालेल्या या गावातल्या गृहीणीनी आमची जेवणाची आणि राहाण्याची सोय करुन दिली.  भाकरी-पिठल, डाळ-भात खाऊन आदल्या रात्रीच जागरण आणि आजच्या दोन किल्ल्यांच्या भेटीने थकलेल शरीर लगेच झोपेच्या अधीन झाले.


सकाळी नाश्ता करुन कलाडगडाच्या दिशेने कुच केल. पाचनई गावाच्या मागच्या बाजूला हरीश्चंद्रगड आहे, तर समोरच्या बाजूला मुख्य डोंगररांगेपसुन सुटललेला डोंगर दिसतो. तोच कलाडगड. हा किल्ला एका बाजुला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याच्या मार्ग कठीण असल्यामुळे फारसे ट्रेकर्स या किल्ल्याला भेट देत नाहीत. परंतू एकदा वाट वाकडी करुन पाहावा असा हा किल्ला आहे. कलाडगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी, हे गाव पाचनई पासुन ७ किमीवर आहे. पण किल्ल्यावर जाणारी वाट पाचनई पासुन ५ किमीवर आहे. वनखात्याने इथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे सोपे झालेले आहे.पाचनईहुन खाजगी वाहानाने किंवा चालत या निवार्‍यापर्यंत येउन उत्तर - दक्षिण पसरलेल्या कलाडगडाच्या धारेवरुन चढायला सुरुवात करुन १० मिनिटे दाट झाडीतून चालल्यावर आपण उघड्या जागी येतो. येथे काही दगडाना शेंदुर फासुन ठेवलेला आहे. त्यामधुनच कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. येथुन साधारण अर्ध्या तासाचा खडा चढ चढल्यावर आपण कातळात खोदलेल्या खोबण्यांच्या टप्प्यापाशी येतो. या जेमतेम पाय मावतील अशा खोबण्या कातळात तिरक्या कोरलेल्या आहेत. या खोबण्यात पाय रोवुन आणि हाताची मजबुत पकड घेउन सावधगिरीने हा टप्पा पार केल्यावर आपण भैरोबाच्या गुहेपाशी येतो. जमिनीच्या पातळीच्या खाली कातळात खोदलेल्या गुहेत भैरोबाचा शेंदुर फासलेला दगड आहे. बाहेरच्या मोकळ्या भागात झिजलेली २ सर्प शिल्प ठेवलेली आहेत. भैरोबाचे दर्शन घेउन किल्ल्याच्या मधला डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजुला ठेवत अरुंद पायवाटेवरुन दक्षिणेकडे चालत गेल्यावर कातळात खोदलेल्या दोन टाक्यांपाशी पोहोचतो. टाक्यांमधे दगड कोसळुन टाकी बुजलेली आहेत. टाकी पाहुन दक्षिण टोकाकडे चालत गेल्यावर उजव्या बाजुला दोन मोठे गोल दगड आणि एक देवळी आहे. याला वेताळाचा चाळा म्हणतात. हे ठिकाण पाहुन आल्या वाटेने टाक्यापर्यंत जाउन गडाच्या सर्वोच्च माथ्यावर  जाणार्‍या वाटेने ५ मिनिटात आपण माथ्यावर पोहोचतो. दक्षिणेकडे अरुंद असलेला गड माथा उत्तरेकडे रुंद आहे. याच भागात काही घरांची जोती आहेत. किल्ला पाहून परत येण्यासाठी ३ तास लागतात. किल्ल्याच्या ज्या धारेवरुन आपण चढाई करतो ती पूर्वेला असल्याने सकाळी लवकर चढाई करावी. त्यावेळी दगड तापलेला नसेल आणि चढता उतरताना त्याचा त्रास होत नाही.


Kalalgad

   कलालगड पाहून पाचनई मार्गे भैरवगड शिरपुंजेला जाताना सर्वत्र डोंगर कारवी मोठ्या प्रमाणत फुललेली दिसत होती. सह्याद्रीच्या डोंगर उतारावर येणार्‍या या झाडाला ७ वर्षातून एकदाच फुल येतात. तेंव्हा जंगल या फुलाच्या निळाईने न्हाउन जात. झाडतर फुलानी गच्च बहरलेली असतात. पण गळुन गेलेल्या फुलांची निळी चादरही ही पायवाटांवर पसरलेली दिसते. .....निळ आकाश , निळ जंगल....निळ्या पायवाटा....अवघी निळाई सर्वत्र भरुन राहील्याचा भास होतो. सह्याद्रीत कारवीचे दोन प्रकार आढळतात डोंगर कारवी (Hill Cone head) आणि टोपली कारवी. डोंगर कारवी ट्रेकर्स लोकांच्या खास परीचयाची अवघड वाटा, उतार, या कारवीच्या आधारानेच पार कराव्या लागतात.


Steps ,Bhairavgad (Shirpunje)

  
 कोतुळ - राजुरला रस्त्यावर माणिकओझर गाव आहे. गावातून आंबितला जाणार्‍या रस्त्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते. त्यामुळे भैरवगडावर जायची वाट व्यवस्थित मळलेली आहे. या वाटेवर अनेक ठिकाणी कातळकोरीव पायर्‍या आणि काही ठिकाणी रेलिंग्ज लावलेले आहेत. या वाटेने १ तासात आपण भैरवगड आणि त्याच्या बाजुचा डोंगर यामधील खिंडीत येउन पोहोचतो. येथे वरच्या अंगाला एक टाक आहे. पुढे कातळात कोरलेल्या सुंदर पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढुन वर आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार दिसते. प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला  कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या पुढे एक कोरड टाक आहे. ते पाहुन गुहेकडे (दक्षिणेकडे) जाण्यार्‍या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला मोठ खांब टाक आहे. टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरुन बनवलेला आहे. या टाक्याच्या बाजुला एक रांजण खळगा कोरलेला आहे. तर टाक्याच्या वरच्या बाजूला तीन रांजण खळगे खोदलेले आहेत.टाक आणि त्यावरील रांजण खळगे पाहुन परत पायवाटेवर येउन  गुहेच्या दिशेने जाताना उजव्या बाजुला कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या वरच्या बाजुला अजुन ४ पाण्याची टाकी आहेत.  टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेली १०x१० ची गुहा आहे. या गुहेला कमान असलेल प्रवेशव्दारही आहे.

Cave at Bhairavgad (Shirpunje)

गुहा पाहुन परत पायवाटेवर येउन एक साडेचार फुट उंच वीरगळ आहे.  पुढे डाव्या बाजुला, गुहेच्या वरच्या बाजूला एक वीरगळ. या वीरगळीच्या चारही बाजू कोरलेल्या आहेत. विरगळी जवळ गणपतीच्या झिजलेल्या मुर्ती शेंदुर फासुन ठेवलेल्या आहेत. त्या पाहुन कातळात खोदलेल्या पायर्‍या उतरुन कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या गुहेत जाताना बाहेरच्या बाजुला एक वीरगळ ठेवलेली आहे. गुहेत भैरोबाची अश्वारुढ मुर्ती आहे. भैरोबाच्या गुहेच्या बाजुला इंग्रजी " L "  आकाराची गुहा आहे. या गुहेत १० जण राहु शकतात. गुहेच्या कड्याकडील बाजुला रेलिंग लावलेले आहे. येथुन शिरपुंजे गाव आणि आजुबाजूचा परीसर दिसतो. या रेलिंगच्या एका बाजुला फाटक बसवलेले आहे. तेथुन खाली उतरण्याचा मार्ग आहे. खालच्या बाजुस एक गुहा आहे. तिचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.या गुहा पाहुन गुहेच्या वरच्या बाजुला येउन डाव्या बाजुला वर चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल एक टाक पाहायला मिळत. हे टाक पाहुन गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. मोठी गुहा १०x १२ फूट आहे. दोन खांबावर तोललेल्या या गुहेत आता मात्र पाणी साठल्यामुळे ती एखाद्या टाक्यासारखी दिसते. मोठ्या गुहेच्या उजव्या बाजुला छोटी गुहा आहे. ती सुध्दा पाण्याने भरलेली आहे. गुहा पाहुन किल्ल्याच्या माथ्यावर जाणार्‍या पायवाटेने ५ मिनिटात आपण गड माथ्यावर पोहोचतो. इथे कातळात कोरलेली पाण्याची ३ टाकी आहेत. गडमाथ्यावरुन दक्षिणेला हरीश्चंद्रगड, पाबरगड हे किल्ले दिसतात.गडमाथ्यावरुन गुहेच्या दिशेने न उतरता प्रवेशव्दाराच्या दिशेने उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला दोन लांबलचक पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ती पाहुन प्रवेशव्दारा जवळ आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडफेरीस एक तास लागतो. ठरल्याप्रमाणे दोन दिवसात ४ किल्ले बघुन झाले होते. आता परतीच्या प्रवासाची ओढ लागली होती. राजुर इगतपुरीमार्गे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

Veergal at Bhairavgad (Shirpunje)


सहसा भेट न दिले जाणारे आडबाजूचे किल्ले पाहायला जातांना फ़ार काही पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. GPS Mapping करायच, नकाशे बनवायचे किल्ल्यावरील अवशेषांची  नोंद करायची , माहिती जमा करायची या उद्देशाने गेलेल्या आम्हाला या गडांनी समृध्द करुन टाकल.





जाण्यासाठी:- मुंबईहुन दोन मार्गाने कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलाडगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात..
 मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे  ओतुर गाठावे (अंतर १५९ किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (अंतर २५ किमी)  (भैरवगडाच्या पायथ्याचे गाव) - ७ किमीवर पाचनई त्यापुढे ५ किमीवर कलालगड आणि पुन्हा पाचनईत येऊन खडकी गाव गाठावे.(खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे शिरपुंज्याला जातो. हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे.) खडकी पासुन १० किमी अंतरावर माणिकओझर गाव आहे. (इथुन ४ किमीवर राजुर आहे.) माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. पोहोचतो. ( एकुण अंतर २६४ किमी ) . याशिवाय  मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) यामार्गेही जाता येते.


१) मुंबई - पुण्याहून शुक्रवारी रात्री निघुन स्वत:चे वाहान (या भागात एसटी आणि जीप्स (वडाप)ची फ़्रीक्वेन्सी चांगली नसल्यामुळे) असल्यास कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलाडगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात. शनिवारी सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. दुपारी कोथळे गावातील मंदिरात जेवण, आराम करुन भैरवगड पाहावा. कुंजरगड - भैरवगड (कोळथे) हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनईला मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी उन तापण्या अगोदर कलाडगड पाहावा. (कलालगड हा कठीण श्रेणीचा किल्ला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने रोप बरोबर ध्यावा.) दुपारी शिरपुंज्याचा भैरवगड पाहून परतीचा प्रवास करावा.

२) मुंबई - पुण्याहून शुक्रवारी रात्री निघुन कोळथेचा भैरवगड पाहावा. भैरवगडाला वळसा घालून टोलारखिंड मार्गे ५ ते ६ तासात हरिश्चंद्रगडावर जाता येते. रविवारी हरिश्चंद्रगड पाहून परतीचा प्रवास करावा

#harishchandragad#bhairavgadkolthe#bhairavgadshirpunge#kalalgad#kombadgad#kunhargad#

Sunday, September 27, 2015

सह्याद्रीतील रानफ़ुले (Sahyadri the valley of flowers)


Fkowers on slopes of sahyadri

कौंडल


Harishchandra gad 

पावसाळा सुरु झाला की सह्याद्रीच्या पठारावर डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातीची ,रंगांची, आकाराची ही फुल आपल लक्ष वेधुन घेतात. सप्टेंबर अखेर पर्यंत त्या फुलांची चादर सर्वदुर पसरलेली दिसायला लागते. काही तासांच ते दिवसांच आयुष्य असलेली ही फुल डोंगर भटके आणि अभ्यासकांपुढे आपल भांडार उघड करतात. सह्याद्रीतील फुल म्हटली की सर्वांच्या नजरेसमोर पहिल्यांदा येत ते कासच पठार. कास पुष्प पठारावर पाउस पडायला लागला की दर महिन्यात वेगवेगळी फ़ुल फ़ुलायला लागतात. पण कासच्या पठारावर मोठ्या प्रमाणात असलेली टोपली कारवी सात ते बारा वर्षात एकाच वेळेस फ़ुलते तेंव्हाचे कास पठाराच दृष्य अवर्णनीय असत. विविध साईटवर, वृत्तपत्रां मधुन येणारे सात ते बारा वर्षात एकदाच फ़ुलणार्‍या कारवीने खच्चुन बरलेल्या कासच्या पठाराचे फोटो पाहून त्याठिकाणी जाणार्‍या पर्यटकांचा लोंढा इतका वाढायला लागला की शनिवार, रविवार सातार्‍यात ट्रॅफिक जाम व्हायला लागला. त्याच्या प्रदुषणाने, लोकांच्या बॉलिवुड टाईप बागडण्याने त्या पठारावरच्या फ़ुलांनाही धोका उत्पन्न झाला. त्यामुळे वनखात्याने कास पठारालाच कुंपण घालुन टाकले. हिंदी सिनेमात दिसते तशी ऑर्कीडची एकाच प्रकारची फ़ुल पाहाण्याच्या अपेक्षेने आलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास व्हायला लागला. या सर्व गोष्टींमुळे पुण्या - मुंबईहुन प्रवास करुन पोहोचणार्‍या लोकांनी कासला पाहायला काही नाही म्हणुन मग ठोसेघर, बारामोटेची विहिर या जवळपासाच्या ठिकाणांची महती वाढायला लागली.

Kas Platu

कास पठार इतकी पुष्प वैविध्यता सह्याद्रीत इतर ठिकाणी नाही हे मान्य केल तरी, कास हे रानफुले पाहाण्यासाठी एकमेव ठिकाण नाही. सहज पाहाता येण्यासारखी अनेक ठिकाण सह्याद्रीत आहेत. अर्थात तिथे जाउन काय पाहायच ? हे मात्र माहित पाहिजे.

पाऊस पडायला सुरुवात झाली की जमिनीवर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फ़ुटायला लागतात. जमिन हिरवीगार दिसायला लागते. पाउस पडल्या - पडल्या सर्वप्रथम हजेरी लावतात ती पाण कुसुमची फ़ुल. त्यानंतर काळी मुसळीची चांदणी सारखी दिसणारी पिवळी फ़ुल हजेरी लावतात. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ती मुळासकट उपटली जातेय. मग येते आषाढ आमरी, आमरी म्हणजे इंग्रजीत ऑर्किड. ती येते तेंव्हा गवत जास्त वाढलेल नसते त्यामुळे त्याची पांढरी सुंदर फ़ुल त्या हिरव्या गालिच्यावर उठुन दिसतात. एकदा एका पावसाळी संध्याकाळी एका पठारावर विसावलेलो. पावसामुळे वातावरण कुंद होत. संध्याकाळच्या कमी होत जाणार्‍या प्रकाशात गवताच्या वर डोलवणार्‍या दांड्यांमधुन आषाढ आमरीची फ़ुल फ़ुलायला लागली आणि काही वेळातच ते पठार त्या पांढर्‍या फ़ुलांनी चमकायला लागल. या फ़ुलांमधे पण गमती जमती असतात. पाउस पडल्यावर "हबे आमरीच्या" कंदातुन एक दांडा बाहेर येतो त्यावर पांढरी फ़ुल येतात. त्यानंतर त्याला जमिनी लगत एकच मोठ पान येत. परागीभवन झाल की फ़ुल गळुन पडतात. पानात तयार झालेल अन्न कंदात साठवल जाते ते पुढच्या पावसाळ्यासाठी. ऑगस्ट, सप्टेंबर मधे तेरड्याची फ़ुल आणि सोनकीने सह्याद्रीची पठार झाकली जातात, रस्त्यांच्या कडेला, दाट झाडीत जागा मिळेल तिथे पेवची बेट फ़ुलायला लागतात. हा पुष्प सोहळा सह्याद्रीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत चालु असतो.  




  काही तासांचे आयुष्य ते काही दिवसांचे आयुष्य असलेली, काही मिलीमीटर ते काही सेंटीमीटर आकाराची फ़ुल आपल्या रंगाने, सुवासाने किटकांना आकर्षित करायला लागतात. स्वत: अचल असल्याने पराग वाहुन नेण्यासाठी त्यांना किटकांची आवश्यकता असते. त्यामुळे किटकांच्या पटकन नजरेत भरतील असे रंग, त्यांना परागांपर्यंत जाण्याच्या वाटा दाखावण्यासाठी बनवलेले वेगळ्या रंगाचे बाण हे प्रत्येक फ़ुलात असतात आणि त्याची रचना पाहाण्यासारखी असते. पराग वहनाच्या मोबदल्यात दिला जाणारा मकरंद ही अशा ठिकाणी साठवलेला असतो की तिथे पोहोचेपर्यंत त्या किटकाला जास्तीत जास्त परागकण चिकटले पाहिजेत. अर्थात यातही काही उस्ताद फ़ुल असतात. काही न देता किटकांकडुन परागीभवन करुन घेतात. तर काही ठिकाणी फ़ुलांचा आणि किटकांचा सुंदर सहजीवन दिसुन येत.

पावसाळ्यात फ़ुटणार्‍या पेवच्या बेटाकडे आपल लक्ष वेधले जाते ते हिरव्या बेटावर डोलणार्‍या त्याच्या नरसाळ्या सारख्या दिसणार्‍या पांढर्‍या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी -लाल रंगाची रुपांतरीत पाने पाहायला मिळतात. पूर्ण फुललेल फुलाचं तोंड खालच्या बाजूला झुकलेल असत. फुल पांढर्‍या रंगाच असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. यामुळे परागीभवनासाठी येणार्‍या किटकांना मध कुठल्या दिशेला आहे त्याचे मार्गदर्शन होते. या लांब दांड्याच्या फुलातील मध खाण्यासाठी/ परागीभवनासाठी लांब सोंड असलेल ग्रास डेमन (Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae) हे फुलपाखरू पेवच्या बेटातून उडतांना दिसत. हे कृष्णधवल रंगाचे फुलपाखरू असून पंखांवर पांढरे ठिपके असतात. या फुलपाखराला सावलीत, जमिनीलगत उडायला आवडते. त्याची सोंड त्याच्या आकाराच्या दुप्पट असते. उडतांना फुलपाखराची सोंड (Probosis) कॉईल सारखी गुंडाळलेली असते. पेवसारख्या लांब दांड्याच्या फुलावर बसल्यावर हे फुलपाखरू आपली सोंड उलगडून फुलातील मध पिते. निसर्गातील हे परस्परावलंबन आश्चर्यचकीत करणारे आहे.पावसाळ्यात भटकंती करतानांना रानफ़ुलां बरोबर किटक, फ़ुलपाखरे अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. 

काळी मुसळी

विंचवी

निळी चिराईत
साप कांदा


रानफ़ुले ओळखायची कशी ? हा प्रश्न बर्‍याच जणांना पडतो. रानफ़ुले बघायला फ़ारसा प्रयास पडत नाही, ती भटकंती करतांना सहज दिसतात. साध्या मायक्रो मोड असलेल्या कॅमेराने  फ़ुलांचे मस्त फ़ोटो काढावेत. फ़ोटो काढताना फ़ुलांचा क्लोजप आणि एक फ़ोटो पानासकट काढावा. कारण बर्‍याचदा फ़ुल एक सारखी दिसल्याने ओळखण्यात चुक होते. त्यावेळी पानांवरुन अचुक ओळखता येते. फ़ोटो काढुन झाले की ती फ़ुल ओळखण्यासाठी अनेक पुस्तक आणि साईटस उपलब्ध आहेत. या रानफ़ुलांची तीन नाव असतात, एक शास्त्रिय, दुसरे त्याच्या फ़ॅमिलीच नाव आणि तिसरे मराठी नाव. तेरड्याच शास्त्रिय नाव आहे Impatiens balsamina तेरड्याच्याच जातीतच एक मोठ फ़ुल आहे त्याला मराठीत "ढाल तेरडा" (Impatiens phulcherima)  म्हणतात. Balsaminaceae हे त्यांच्या फ़ॅमिलीच नाव आहे या नावातल Impatiens म्हणजे उतावीळ, अजिबात धीर नसलेला, हा शब्द तेरड्यांच्या फ़ळापासून आलाय. तेरड्याच फ़ळ सुकायला लागले की त्यांना अजिबात धीर नसतो. वार्‍याच्या झोताने, भुंग्याच्या धक्क्यानेही ते फ़ळ फ़ुटते आणि बिया विखुरतात.

 रानफ़ुलांची मराठी नावही फ़ार सुंदर आहेत. गिरीपुष्प, कुमुद, विष्णुकांत, आभाळी इत्यादी नाव लक्षात ठेवायला पण सोपी आहेत. एकदा हा छंद लागला, तुम्ही त्याबद्दल वाचत गेलात की फ़ुलांच्या अनेक गमती जमती कळत जातात. जमल्यास एखादा ट्रेक फ़क्त रानफ़ुल पाहाण्यासाठी काढावा. त्या ट्रेकला आपल्या बरोबर  बॉटनीतला माहितगार घेऊन जावा. आमच्या ट्रेक क्षितिज संस्थे तर्फ़े आम्ही फ़क्त रानफ़ुल पाहाण्यासाठी ट्रेक घेऊन जातो. २०१३ साली पुरंदरवर आमच्या सोबत प्र.के.घाणेकर सर आले होते. त्या दिवसात आम्ही ८४ जातीची फ़ुल नोंदवली. गेल्यावर्षी त्रिंगलवाडी किल्ल्यावर ४६ जातींच्या फ़ुलांची नोंद केली. जर तज्ञ व्यक्तीं बरोबर जर तुम्ही रानफ़ुले एकदा तरी पाहीलीत तरी तुम्हाला बर्‍याच नव्या आणि रंजक गोष्टी कळतील.

बुरुंडी


आभाळी



घाणेरी
ढाल तेरडा

कास प्रमाणेच पुष्प वैविध्य असलेला किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला. १५०० मीटर उंची असलेल्या या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील केदारेश्वर मंदिराकडे जाणारी पायवाट सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस फ़ुलांनी भरुन जाते. सोनकीच्या पिवळ्या फ़ुलांनी डोंगर जरी झाकलेला असला तरी पुरंदरवर अनेक प्रकारची फ़ुल पाहायला मिळतात. त्यात निळ्या जांभळ्या रंगाची निलांबरी, आकाश तुळस, इत्यादी दुर्मिळ फ़ुलही पाहायला मिळतात. त्रिंगलवाडी किल्ल्याला नाशिकच कासच पठार म्हणतात. या किल्ल्याच्या पठारावर रानफ़ुलांचे अनेक प्रकार विखुरलेले पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगडावरचा गुहेसमोरचा आणि मंदिराच्या आजुबाजूचा प्रदेश सोनकीच्या चादरीने झाकलेला असतो. यावरून एक किस्सा आठवला, मध्यंतरी हरीशचंद्रगड उतरतांना काही गावकरी एका रानफूलाच्या बिया ओरबाडून पोत्यात भरत होते. विशिष्ट उंचीवरच दिसणार्‍या या रानफूलांची मोजकीच झुडपं या परीसरात आहेत. आमचं कुतूहल चाळवल्यामुळे आम्ही गावकर्‍यांकडे चौकशी केली. त्यांनी दिलेली माहिती रंजक होती. या रानफूलाच्या बिया लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच्या औषधात वापरतात. व्यापरी १ किलोला १००/- रुपये भाव देतात. त्यामुळे या दिवसात गावातील सर्व लोक या बिया गोळा करण्याच काम करतात. त्यांनी पोत्यातून काढून थोड्या- थोड्या बिया सर्वांच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले खाऊन बघा, काही होत नाही. अख्खा गड उतरायचा असल्याने आम्ही काही बिया खाल्या नाहीत. थोड्या  तरी बिया झुडपांवर ठेवा म्हणजे पुढच्या वर्षी सुध्दा झाडे येतील असा (फूकटचा) सल्ला देऊन आम्ही निघालो. पण त्यांच्या पाचवीला पुजलेलं अठराविश्व दारीद्र्य व या झुडपांपासून मिळणारे पैसे याचा विचार केला तर काही वर्षांनी ही वनस्पती सह्याद्रीत नक्कीच दुर्मिळ होत जाणार आहे.  

निलांबरी , पुरंदर 


रानभेंडी


कानपेट




 कळलावी


सीतेची आसव

ताग

रतनगडाचा परीसरही उतरत्या पावसात रानफ़ुलांनी बहरुन जातो. प्रतापगड, शिवनेरी, राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा या किल्ल्यांवरही या दिवसात पुष्पोत्सव चालु असतो. कोकण आणि सह्याद्रीला जोडणारे घाट वरंधा, कुंभार्ली, आंबा ,राधानगरी आंबोली हे रानफ़ुलांनी बहरलेले असतात. मुंबईकर आरे कॉलनी, संजय गांधी उद्यानात जाऊन रानफ़ुलांचा आनंद घेऊ शकतात. एकदा का तुम्ही रानफ़ुल ओळखायला लागलात की आपल्या गावा - शहरांबाहेरच्या टेकड्यांवरची रानफ़ुल तुम्हाला साद घालायला लागतात.

कुर्डु, कोंबडा

दुधाळी

गोलगुंडा

पिवळा धोत्रा

चवर

वनराणी

सोनकी

Purandar 

Photos by :- Amit Samant  © Copy right


  अमित सामंत