Sunday, August 23, 2015

वाघदेव


अशेरीगड, जिल्हा ठाणे 


डोंगर दर्‍या फ़िरताना आदिवासी पाड्याजवळ , किल्ल्यांवर लाकडी फ़ळीवर किंवा दगडावर कोरलेल्या वाघदेवाच्या प्रतिमा पाहायला मिळतात. साधारणपणे या शिल्पाच्या वरच्या बाजूला सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली  वाघाची प्रतिमा कोरलेली पाहायला मिळते. याला आदिवासी लोक "वाघदेव" म्हणतात. लाल, पिवळा, केशरी या नैसर्गिक रंगात वाघदेवाची प्रतिमा रंगवलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी वाघाच्या खाली सापाची प्रतिमाही कोरलेली आढळते. जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून आदिवासींचे त्यांच्या गाईगुरांचे रक्षण वाघदेव करतो अशी आदिवासींची श्रध्दा आहे. जंगलाशी नेहमीच संबंध येणार्‍या आदिवासींना वाघ, बिबटे इत्यादी मार्जारवंशीय प्राण्यांकडुन होणार्‍या प्राणघातक हल्ल्याची भिती मनात ठेउनच जंगलात जावे लागते. या भितीतूनच " वाघदेव " या कल्पनेचा जन्म झाला असावा.

न्हावीगड - बागलाण


लाकडी फ़ळीवर कोरलेली वाघदेवाची प्रतिमा असलेले काष्ठशिल्प आदिवासी आदिम काळापासून बनवत असावेत. जंगलात सहजपणे उपलब्ध होण्यार्‍या लाकडावर कोरीवकाम करुन त्याला नैसर्गिक रंगात रंगवून "वाघदेव" तयार केला जातो. त्यानतंरच्या काळात वाघदेवाचे शिल्प दगडात कोरले जाऊ लागले.  (हरिशचंद्र गडावर जातांना टोलार खिंडीत, तुंगी(कर्जत) किल्ल्यावर तुंग मातेच्या मंदिरात वाघाचे (वाघ देवाचे) शिल्प आहे.)






लाकडावर कोरले जाणारे हे वाघदेव उन पावसाच्या मार्‍याने खराब होतात. त्यावर उपाय म्हणुन आताच्या काळात वाघदेवाची सिमेंटची बेढभ आणि भडक रंगात रंगवलेली मुर्ती पाहायला मिळते. काही ठिकाणी अशी वाघ देवांची मंदिरेही पाहायला मिळतात. काळाबरोबर होणार्‍या सिमेंटच्या या आक्रमणामुळे  लाकडावर वाघदेव कोरण्याची ही कला आणि पध्दत लुप्त होत जाईल.

सिमेंटचे वाघदेव. म्हैसघाट


भारतभर पसरलेल्या वाघदेवांची पूजा दरवर्षी "वाघबारसीला" म्हणजेच अश्विन वद्य व्दादशीला होते.

 


वीरगळ, गधेगळ, धेनुगाळ  (Hero Stone, Sati Stone, Gadhhegal, Dhenu (Cow) Stone) यावरील ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html




Monday, August 3, 2015

टाहाकारीचे मंदिर Tahakari Temple , Offbeat Maharashtra

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक छोट्या गावात  कलाकुसर केलेली प्राचिन मंदिर आहेत. त्याकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिर आज आडबाजूला पडली आहेत. प्राचिन काळी घाटवाटांचे/ व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले तशीच त्याकाळच्या राज्यकर्त्यांनी या मार्गांवर मंदिरांचीही निर्मिती केली. या मार्गांवरुन प्रवास करणार्‍या व्यापारी तांड्यांची, पांथस्थांची विश्रांतीची राहाण्याची सोय या मंदिरात होत असे. व्यापार्‍यांनी केलेल्या दानामुळे या मंदिरांचा दैनंदिन खर्च आणि डागडुजीची कामे होत असत अशी परस्पर पूरक रचना होती. मंदिराच्या बाहेर असलेल्या शिलालेखावर शक ११५० अशी नोंद आढळते. त्यावरुन या मंदिराची निर्मिती इसवी सनाच्या बाराव्या शतकात झालेली असावी. 



सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांग इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला “कळसूबाई रांग” म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पूरातन अवंध व पट्टा किल्ल्य़ांच्या परीसराचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिध्द !!
 या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणार्‍या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. अहमदनगर जिल्हयातील, अकोले तालुक्यात येणार्‍या टाहाकारी गावात शाक्त संप्रदायाचा प्रभाव असलेले  "जगदंबेचे " प्राचिन मंदिर आहे. मंदिर म्हटल की दंतकथा आलीच. नाशिक परीसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडीत आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याचवेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रा॔ना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परिक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रुपातील पार्वती मातेला ओळखले आणि तीला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धन पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.

हेन्री कझिन्स यांनी १८८० मधे काढलेला मंदिराचा फ़ोटो.

टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिरा जवळ पोहोचल्यावर मंदिरा भोवती असलेली सात फ़ूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी भूमीज शैलीत केलेली आहे. मुख्य गर्भगृहावर एकेकाळी विटांनी बांधलेले "कर्नाट द्रविड" शैलीतील शिखर होते. इतर दोन गर्भगृहावर "भूमीज शैलीतील" शिखरे होती कझिन्स या इंग्रज अधिकार्‍याने १८८० मध्ये काढलेल्या छायाचित्रामुळे संशोधकांना हे कळू शकले.  मंदिराचे मुळचे तीनही  कळस काळाच्या ओघात कोसळलेले असुन त्याजागी सिमेंटचे अतिशय बेढभ कळस बांधलेले आहेत. तसेच मंदिराच्या समोर सिमेंटचा सभामंडप बांधुन मंदिराची शोभा घालवायाचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. आपले नशिब म्हणजे दगडी बांधणीचे मंदिर अजुनही जसेच्या तसे ठेवलेले आहे.

सूरसुंदरी


टाहाकारीच मंदिर भूमीज पध्दतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, गुढ मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चारफ़ूट उंच दगडी जोत्यावर  उभ आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मुर्ती दिसतात. त्यातील एक शंकर पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराच छत  खांबांवर तोललेल आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्प, किर्तीमुख, भौमित्तीक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या वितानावर (छतावरचे) वर्तूळाकार नक्षीकाम केलेले आहे.  या वर्तूळाकार कोरीवकामात फ़ुल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. अशा वितानाला नाभीछंद वितान असे म्हटले जाते. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजुस तीन गर्भगृह आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.




    
  









नाभीछंद वितान


मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशव्दारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भूजा असलेली काष्ठमुर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुर मर्दीनीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजुस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मुर्तीं आहेत.



मंदिराचा अंतर्भाग पाहुन मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनात दुमडलेला बाह्यभाग समोर येतो. मंदिराचा तलविन्यास (Ground Plan ) पंचांग प्रासाद प्रकाराचा आहे.  भद्र, उपरथ, कर्ण या रचनेमुळे निर्माण झालेल्या कोनाड्यांमधे सुरसुंदरींच्या मुर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारीका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मुर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरु केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गणेशाची मुर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहा मागिल देवकोष्टात  चामुंडेची अप्रतिम मुर्ती आहे. चामुंडा हे देवीच क्रुर रुप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचु, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मुर्ती आपल लक्ष वेधुन घेते. या देवकोष्टका खाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमी प्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख (मकर प्रणाल) कोरलेल आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे


मकर प्रणाल

मुख्य गर्भगृहा मागिल देवकोष्टात नृत्य करणार्‍या शंकराची मुर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी ताल वाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपर्‍यात बासरी वाजवणार गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रम्हा, विष्णु, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागिल देवकोष्टात डमरु, तलवार आणि त्रिशुळ घेतलेल्या शंकराची मुर्ती कोरण्यात आलेली आहे. मुर्तीचा एक हात तुटलेला आहे.



मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करुन मंदिरा समोर येउन नदीवरील घाटाच्या पायर्‍यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही.  पण या लेखाचे वाचन इंग्रज अधिकारी किलहॉर्न याने केलेले आहे. त्यात शक ११५० असा मंदिर बांधलेल्या काळाचा उल्लेख आलेला आहे, या खांबाच्या बाजुला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिरा बाहेर काही वैशिष्ट्यपूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फुट उंचीचे हे दगड अष्टकोनी असुन त्याच्या वर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.

समाधी


शिलालेख

मंदिर परीसरात भक्तांसाठी बांधलेला नविन हॉल आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिर परीसरातील झाडी, जवळून वाहाणारी नदी यामुळे हा परीसर रम्य झालेला आहे. या रम्य परीसराला आणि उन, वारा, पाउस यांचा मारा सहन करत गेली अनेक शतक उभ असलेल हे मंदिराच दगडी शिल्प पाहाण्यासाठी एकदा वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.




मुंबईकर, नाशिककर स्वत:च वाहान असल्यास एका दिवसात "टाहाकारीच जगदंबा मंदिर", "टाकेदच जटायु मंदिर" पाहु शकतात. जर वेळेच व्यवस्थित नियोजन केल तर शिवरायांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला "पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड" ही पाहाता येइल आणि एका दिवसात त्रिस्थळी यात्रा घडेल.

जाण्यासाठी:- १) मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहुन टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.

२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :- मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणार्‍या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडी पासुन ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.



1) ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) Offbeat Places near Jodhpur,Rajasthan
हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

2) Ancient Temples in Maharashtra (महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य)
महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.



#ancienttemplesinmaharashtra#offbeattemplesinmaharashtra#

Monday, July 13, 2015

Dady long leg on Sudhagad Fort

सुधागड वरचा डॅडी लॉंग लेग


रायगड जिल्ह्यातील अष्टविनायका पैकी पाली जवळ सुधागड नावाचा पूरातन किल्ला आहे. या किल्ल्याला विस्तिर्ण पठार लाभलेल आहे. त्यावर आजही अनेक वास्तु, दरवाजे, बुरुज, तटबंद्या काळाचे घाव सोसत उभ्या आहेत. त्यातच किल्ल्याच्या पश्चिमेला तटबंदीत लपवलेला गुप्त दरवाजा आहे. या गुप्त दरवाजात " डॅडी लॉंग लेगच "(Dady long leg) वास्तव्य आहे.


गुप्त दरवाजात उतरणारा जीना


किल्ल्याचा गुप्त दरवाजा हा अजब प्रकार असतो. गुप्त दरवाजाचा उपयोग लढाईच्या काळात गुप्तपणे निसटून जाण्यासाठी होतो. त्याचबरोबर तो किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही नाजूक भाग असतो. त्यामुळे दरवाजाचे स्थान ठरवणे अतिशय कौशल्याने असते. दरवाजा बनवतांना त्यातून एकावेळी एकच माणूस वाकून जाऊ शकेल एवढाच उंच व रुंद ठेवलेला असतो. गुप्त दरवाजाच्या आतल्या बाजूस असलेल्या पायर्‍या वेगवेगळ्या उंचीच्या असतात. त्यामुळे शत्रू गुप्त दरवाजाने आत शिरला तरी आतल्या काळोखामुळे व पायर्‍यांच्या वेगवेगळ्या उंचीमुळे त्याला सहज चढून जाता येत नाही. गुप्त दरवाजा तटबंदीत चिणून टाकलेला असतो. त्यामुळे तो तटबंदीत वेगळा ओळखता येत नाही. पूर्वीच्याकाळी किल्ल्यावरील फ़ार थोड्याच महत्वाच्या व्यक्तींना गुप्त दरवाजाचा ठावठिकाणा माहित असे. 


गुप्त दरवाजाच्या आतला काळोखी जीना


            सुधागडच्या गुप्त दरवाजातून आत शिरल्यावर खाली उतरायला पायर्‍या आहेत. या पायर्‍या उतरुन आपण तटबंदीच्या तळाला असलेल्या गुप्त दरवाजाच्या दुसर्‍या तोंडाने बाहेर पडतो. या तटबंदीमधे असलेल्या जीन्यात त्यामुळे थोडा काळोख असतो. जीन्याने उतरायला सुरुवात केल्यावर काळोखामुळे आपण साहाजिकपणे भिंतीचा आधार घेतो. त्यावेळी आपल लक्ष जर  छताकडे गेल तर आपल्याला छातावर लटकलेला काळ्या रंगांच्या कोळ्यांचा मोठा थवा दिसतो. प्रतिक्षिप्त क्रियेने आपण मान खाली घालून, आक्रसून पटापट खाली उतरायला सुरुवात करतो. अशी काळोखी ,दमट जागा हे "डॅडी लॉंग लेगच" आवडत वास्तव्याच ठिकाण आहे.


Daddy long legs/ harvestman at Sudhagad


        "डॅडी लॉंग लेग" किंवा "हार्वेस्टमन" या नावाने ओळखले जाणार्‍या कोळ्यांची गणना Opiliones (Arachnid Family) कुटुंबात होते. हे कोळी इतर कोळ्यांसारखे दिसत असले तरी कोळी (Spider) आणि यांच्यात एक मुलभूत फरक आहे. कोळ्याला डोक, धड आणि ८ पाय असतात. तर Opiliones किटकांना डोक आणि धड असे दोन वेगळे भाग नसतात तर एकाच अंडाकृती भागा भोवती 8 पाय असतात. त्याला पुढच्या बाजूस दोन डोळे असतात, पण त्याची दृष्टी विकसित झाली नसल्याने तो आपल्या पायाच्या दुसर्‍या जोडीचा ऍंटेना म्हणुन उपयोग करतो. 

"डॅडी लॉंग लेग" किंवा "हार्वेस्टमन"

        Opiliones च्या ज्ञात जाती ६५०० असुन अगदी ४१ कोटी वर्षापूर्वीच्या फॉसिलमधेही यांच्या भाउबंधांचे अवशेष सापडलेले आहेत. अंटार्टिका सोडून संपूर्ण पृथ्वीवर हे आढळतात. बुरशी, शेवाळ, वनस्पती, छोटे किटक, मेलेल्या किटकांचे/प्राण्यांचे/वनस्पतींचे अवशेष, पक्ष्यांची विष्ठा अस प्रचंड विविधता असलेल खाण खात असल्यामुळे निसर्गाच्या उलथापालथीतही Opiliones इतकी वर्ष टिकुन राहीले असावेत. आपल्या भक्षकांपासुन रक्षण होण्यासाठी हे सर्वजण एकत्र राहातात. भक्षकाची चाहुल लागतात हे पायावर ताठ उभ राहुन शरीराचा भाग एखाद्या स्प्रिंगप्रमाणे खालीवर हलवायला सुरुवात करतात.त्यामुळे त्यांचा भक्षक गोंधळून जातो.

       "डॅडी लॉंग लेग" बद्दल पाश्चात्य जगात अनेक अंधश्रध्दा/ गैरसमज आहेत. याचा दंश विषारी असुन हा कोळी चावला तर माणूस मरतो असाही समज आहे. त्यावर झालेल्या संशोधनात अस आढळून आल की या सोंड (Jaws) एवढे छोटे असतात की ते माणसाच्या कातडीत शीरु शकत नाहीत.कारण ते मुळात माणसाला दंश करण्यासाठी बनलेलेच नाहीत. त्यामुळे या कोळ्यापासून विषबाधा होत नाही.

या कोळ्यांचा फ़ारच कमी शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी सुधागडला जाल तेंव्हा ""डॅडी लॉंग लेग" च निरीक्षण करायला विसरू नका.


गुप्त दरवाजा बाहेरच्या बाजूने


Wednesday, June 10, 2015

Ancient Temples in Maharashtra (महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य)

महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर, जि. नाशिक

पुण्याजवळचा पुरंदर किल्ला पाहून पायथ्याच्या नारायणपूर गावात उतरलो. नारायणपूर गाव बालाजी मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव म्हणून आज प्रसिध्द आहे. याच गावात चालुक्य कालिन प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे. इतक्या वेळा येऊनही हे मंदिर एकदाच पण घाईघाईत पाहिल होत. आजचा मुक्कम गावातच होता त्यामुळे कॅमेरा घेऊन मंदिरा भोवती तटबंदीतील छोट्या दरवाजातून आवारत शिरलो. मंदिराच्या कळासाकडे पाहून आपण येथे का आलो ? असा मला प्रश्न पडला. मंदिराचा मुळचा कळस काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे त्या जागी मंदिराच्या रचनेला न शोभणारा सिमेंटचा कळस बांधलेला आहे. नुसता सिमेंटचा कळस बांधून हा आधुनिक शिल्पकार गप्प बसला असता तरी ठिक होत. पण त्याने त्या भोवती पाच फण्यांचा मोठा नाग बनवलेला आहे. एवढे कमी होते म्हणून त्या नागाच्या डोळ्यात लाल रंगाचे दिवे लावून वेगखाच "इफेक्ट" दिला होता. खरतर आमचा भ्रमनिरास झाला होता पण, हिम्मत करून मंदिरात गेलो. मंदिराचा पुजारी मंदिरात एकटाच होता. आमची जिज्ञासा पाहून त्याने संपूर्ण मंदिर त्यातील बारकाव्यां सकट दाखवले. जोडीला अनेक दंतकथा सांगितल्या. पाच मिनिटात मंदिर पाहून जाऊ म्हणून आत आलेलो आम्ही तब्बल दिड तासाने तृप्त होऊन बाहेर पडलो.

नारायणेश्वर मंदिर


  सह्याद्रीच्या दर्‍या खोर्‍यात केलेल्या भटकंतीत अशी अनेक प्राचीन मंदिर पाहायला मिळाली होती. दमुन भागुन या मंदिराच्या शांत गार सभामंडपात विश्रांती घेतली होती. खरतर मंदिर ही कल्पनाच किती सुंदर आहे. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. पण त्याही आधी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मुर्तीची स्थापना केली जात होती. सह्याद्री डोंगररांगेत आजही देवरुख जवळचे मार्लेश्वर मंदिर, वासोट्या जवळचे नागेश्वर मंदिर, ढाक किल्ल्या वरील बहिरीची गुहा इत्यादी अनेक गुहा मंदिर आपल्याला पाहायला मिळतात.

लहुगडा वरील गुहेतील मंदिर, जि. औरंगाबाद

वासोट्या जवळचे नागेश्वर मंदिर

गुहा मंदिर हरीश्चंद्रगड

त्यानंतरच्या मंदिरांची रचना ही एखाद्या सर्वसामान्य घरासारखी होती. गुप्तकालिन मंदिरे (४ थे शतक) ही एक खोली व तीच्या पुढिल लहानसा सोपा म्हणजे व्हरांडा अशी होती. पुढील काळात पूजापद्धतीचा विस्तार होऊन पूजन, नैवेद्य यांच्या जोडीला नृत्य, गायन ह्या गोष्टी आल्या. देवाचे स्नान, भोग, सोहळे आले. हे सर्व विधी सहजतेने करता येतील अशाच प्रकारची मंदिरे उभी राहिली पाहीजेत याची स्थापतींना जाणीव झाली आणि हळुहळू मंदिरांच्या रचनेत बदल होत गेला. खोलीवजा घराचे रुपांतर कळस, सभामंडप, मुखमंडप, इत्यादी घटकांनी युक्त स्थापत्यात झाले. गाभार्‍या भोवती प्रदक्षिणापथ व समोर मोठा मंडप आला. मंडपाचे छप्पर सपाट, आणि गाभार्‍यावर शिखर आले.  गाभार्‍याच्या आणि मंडपाच्या मधला भाग म्हणजे अंतराळ व त्यावर गजपृष्ठ पद्धतीचे छप्पर असे. चौकोनी मंडप बाधू लागल्यावर कोनाकार, शंकूसारखी छपरे बसविण्यात येऊ लागली. या छपरांची उंची गाभार्‍यापासून मंडपाच्या दिशेने कमी कमी होत जात असे.

नागर शैलीतील मंदिर
 
या मंदिरांमधून एकूण १८ विभाग कार्यरत असत. तेथे पाठशाळा चालत, त्यांच्या प्रांगणात व आजुबाजूला बाजार भरे, ग्रामसभा, न्यायसभा होत. गाभार्‍यातीला देवदेवतांच्या सन्मुख राहून मंडपाच्या मध्यभागी प्रवचन, किर्तन, भजन, गायन वादन, नर्तन केले जात असे. मंदिरात 1)वास्तुकला 2) चित्रकला 3) शिल्पकला 4) किर्तन 5) नृत्यकला 6) धर्मसभा 7) धर्मविवेचन 8) संगीत 9) आयुर्वेदीक वनस्पती 10) गोशाळा 11) अतिथीगृह 12) धर्मकार्ये 13) प्राणिसंग्रह 14) ध्यानमंदिर 15) खलबत खाना 16) ग्रंथालय 17) अनाथ बालसंगोपन 18) पाठशाळा हे विभाग होते.

भारतीय वास्तुकारांनी भौगालिक परिस्थितीनुसार अनेकविध प्रकारांची सुंदर सुंदर मंदिरे निर्माण केली. या मंदिरांचे अनेक प्रकार आहेत.  
     
नागर शैली मंदिरे :- यांनाच इंडो आर्यन मंदिरे असेही म्हणतात. हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा प्रकार आहे.याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा व काहीसा बहिर्वक्र स्वरुपाचा असतो. शिखराच्या मुख्य आकाराच्या वर बसक्या लोट्या प्रमाणे भाग असतो ज्याला "आमलक' म्हणतात. ही मंदिर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात.

द्रविड शैली मंदिरे :- द्रविड हा शब्दच मुळात भौगोलिक प्रदेशाचे सूचक आहे. कृष्णानदी पासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रदेशात ही शैली प्रसिध्द होती. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मंदिराच्या शिखरात मजले  बांधलेले असतात. यांनाच "भूमी' असे म्हणतात. ही मंदिरे मोठ्या परिसरात पसरलेली असतात. या मंदिराचा आणखी एक विशेष म्हणजे "गोपूर'. मालवण जवळील कुणकेश्वराचे देऊळ हे द्रविड शैलीत बांधलेले प्राचीन मंदिर आहे.

वेसर शैलीची मंदिरे:- या शैलीची मंदिरे प्रामुख्याने पश्चिम भारतात आढळतात. विंध्यपर्वता पासून कृष्णानदी पर्यंत ही शैली प्रचलित आहे. यात नागर आणि वेसर दोन्ही पध्दतीचा समावेश दिसतो. यालाच "मिश्रक' असेही नाव आहे.

भूमिज शैलीची मंदिरे :- ही शैली नागर शैलीच्या मंदिरांची उपशैली आहे. या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या बाजूच्या परिसरात, माळव्यात व महाराष्ट्रात आढळतात. यातही प्रस्तर शिखर असलेली आणि विटांची शिखर असलेली भूमिज मंदिरे असे दोन प्रकार आढळतात. अंबरनाथचे शिवमंदिर, गोंदेश्वरचे मंदिर ही भूमिज प्रकारची मंदिरे आहेत.

चाळीसगाव जवळचे महादेव मंदिर

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर

 सिध्देश्वराचे मंदिर, माचणूर

अमृतेश्वर मंदिर,रतनगड

कर्णेश्वर मंदिर,संगमेश्वर 













    


या सर्व प्रकारच्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे, या वास्तूच्या उभारणीत सांधे जोडण्यासाठी चुना, माती यांचा वापर केला जात नसे. मंदिरे विविध म्हणजेच त्रिकोणी, चौकानी, वर्तुळाकृती, अर्धवर्तुळाकृती इत्यादी आकाराच्या दगडांनी बांधली जात असत. या दगडांना विशिष्ट ठिकाणी खोबणी असत, त्यांच्या सहाय्याने हे दगड एकमेकांवर बसवून संपूर्ण वास्तू उभी केली जात असे.


सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. इअसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकांपासून तेराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात शेकडो मंदिरे बांधण्यात आली. यातील बहुतेक मंदिरांचे बांधकाम एखाद्या राजाने करून घेतले आहे, त्यामुळे ही मंदिरे त्यावेळच्या राजधान्या, व्यापारी मार्ग, बाजारपेठा यांच्या जवळ बांधली गेली. अशाच घाटमार्गांवर असलेले भीमाशंकरचे प्राचीन शिवमंदिर आजही प्रसिध्द आहे. हरीश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेले खिरेश्वर गावातील मंदिर, रतनगडाच्या पायथ्याशी असलेले अमृतेश्वर मंदिर, सोलापूर पंढरपूर मार्गावर असलेले माचणूर येथील सिध्देश्वराचे मंदिर, डोंबिवली जवळचे खिडकाळेश्वर मंदिर, अंबरनाथचे शिव मंदिर, टाकेदचे जटायू मंदिर अशी अनेक मंदिरे व्यापारी मार्गांवर होती. तर संगमेश्वर जवळचे कर्णेश्वर मंदिर, नगर जवळचे सिध्देश्वराचे मंदिर, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर, सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, फलटणचे जरबेश्वर मंदिर ही प्राचीन नगरांजवळ बांधण्यात आली होती.

याशिवाय पूराण कथांमधील उल्लेखांमुळे पवित्र मानल्या गेलेल्या स्थानांवर देखील अनेक मंदिरे बांधण्यात आली. चाळीसगाव जवळचे पाटणादेवी मंदिर व महादेव मंदिर, नाशिक परीसरातील मंदिरे, मुंबईचे वालुकेश्वर मंदिर, सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरचे मंदिर, लोणारचे मंदिर अशी अनेक मंदिरे पूराण कथांमधील पवित्र स्थानांवर बांधण्यात आली.


फलटणचे जरबेश्वर मंदिर

निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर


















 


महाराष्ट्रातील मंदिरे प्रामुख्याने चालुक्य, विजयनगर, यादव यांच्या काळात बांधली गेली. त्यामुळे मंदिरांच्या रचनेत व बांधकामावर त्याचा प्रभाव पडला. त्याशिवाय स्थानिकरित्या उपलब्ध झालेली साधने वापरून ही मंदिरे बांधल्यामुळे, सह्याद्रीच्या कुशीतील व घाटमाथ्यावरील मंदिरे काळया पाषाणात बांधण्यात आली. मंदिरासाठी लागणारा दगड मंदिराच्या परिसरातूनच काढला गेला आणि त्याजागी पाण्याची कुंड किंवा पुष्करणी तयार केल्या गेल्या. कोकणातील मंदिरे चिर्‍यापासून बनवलेली होती, त्यावर कौलारू छप्पर असे.



 दिपमाळ हे महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील खास वैशिष्ट्य आहे. विटांचा किंवा दगडांचा निमुळता होणारा स्तंभ उभारुन त्याच्यात ओळीने हात बसविलेले असतात. उत्सवाच्या प्रसंगी, दिवाळीच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला या दिपमाळा उजवळण्यात येत असत.


नाग शिल्प
सतीगळ
किर्तीमुख

गोमुख

गध्देगाळ
वीरगळ , सतीशिळा , गध्देगळ , धेनुगळ (Hero Stone, Sati Stone, Gadhhegal, Dhenu (Cow) Stone) यावर वेगळा ब्लॉग लिहिलेला आहे. तो जरुर वाचावा. ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.
 https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html


सुरसुंदरी

मकर प्रणाल 


पुष्कर्णी

सह्याद्रीतील ही प्राचीन मंदिर हा किल्ले, लेणी यासारखा अभ्यासण्याचा विषय आहे. मंदिराची रचना, त्यावरील कोरीव काम, मुर्ती, शिलालेख, विरगळ, गध्देगाळ, मंदिरां भोवतीच्या अनेक दंतकथा या सर्वांचे मिळुन खरतर मंदिर तयार होत. आज काळाच्या रेट्याने काही प्राचीन मंदिरे नष्ट झाली, काही आडबाजूला पडल्यामुळे लोकांच्या विस्मरणात गेली आहेत.

#ancienttemplesinmaharashtra#templearchitecure#templesinmaharashtra#


1) ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) Offbeat Places near Jodhpur,Rajasthan
हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

2) Tahakari Temple टाहाकारीचे मंदिर 
हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा






Monday, June 8, 2015

Tank Museum at Ahmednagar , Maharashtra

रणगाडा म्युझियम

Tank Museum Ahmednagar, Maharashtra
      
      पहिल्या महायुध्दात रणगाडा या अदभुत वहानाच्या शोधाने अनेक युध्दांचे निकाल बदलले. कुठल्याही पृष्ठभागावरुन आग ओकत जाणार्‍या या वहानाने पायदळात महत्वाचे स्थान पटकावले. भारतीय युध्द इतिहासातही रणगाड्यांनी महत्वाची भूमिका बजावलीय. एकेकाळी विदेषी बनावटीचे रणगाडे वापरणारा आपला देश आज स्वत: निर्माण केलेले रणगाडेही वापरतोय. जागतिक आणि भारतीय सैन्यातल्या रणगाड्यांचा चालता बोलता इतिहास आपल्याला आशियातील एकमेव नगर येथील "रणगाडा म्युझियम" मध्ये पाहाता येतो.

    इसवीसनाच्या १५ व्या शतकात अहमदशाह बादशहाने अहमदनगरचा किल्ला आणि राजधानीचे शहर वसविले. या शहराचे भौगोलिक स्थान आणि महत्व पाहून इंग्रजांनी आपला सैन्यतळ याच गावात उभारला. स्वातंत्र्या नंतरही भारतीय लष्कराचा तळ या भागात ठेवण्यात आला. लष्कराच्या ताब्यात असलेल्या दारुगोळ्याच्या डंपिंग ग्राऊंडच्या जमिनीवर आशियातील एकमेव "रणगाडा म्युझियमची" निर्मिती करण्यात आली. इ.स. १६ फ़ेब्रुवारी १९९४ ला जनरल बी.सी. जोशी यांच्या हस्ते या म्युझियमच उदघाटन करण्यात आले. या संग्रहालयाची उभारणी आणि देखभाल Armored Corps Center and School, अहमदनगर या लष्करी आस्थापने तर्फ़े केली जाते. 

      नगर एसटी स्थानकापासून साधारणपणे ४ किमी अंतरावर, नगर - सोलापूर रस्त्यावर भारतीय बनावटीचा "विजयंता" रणगाडा आपले लक्ष वेधून घेतो. या रणगाड्या जवळून रणगाडा म्युझियमकडे जातांना प्रथम आपल्या गाडीची नोंद व तपासणी होते. कमानीतून आत शिरल्यावर माळरानातून जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला ठेवलेला अमेरीकन बनावटीचा उध्वस्त "पॅटन रणगाडा" पाहायला मिळतो आणि आपली उत्सुकता चाळवली जाते. थोड्याच अंतरावर माळरानाचा कायापालट होऊन आपण गर्द झाडीने वेढलेल्या आणि नीटनेटक गवत राखलेल्या उद्यानापाशी पोहोचतो. येथे म्युझियम मधे प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्का बरोबरच राज्य किंवा भारत सरकारने दिलेले फोटो आयडेंटी कार्ड जवळ असणे आवश्यक आहे. (उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड, इत्यादी.) 

"रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" Rolls Royce, Silver Ghost
" सेंच्युरीयन टर्ट" Centurion Turt Tank  
      
रणगाडा म्युझियम मधे प्राथमिक अवस्थेतील रणगाड्यांपासून पहिल्या आणि दुसर्‍या महायुध्दात वापरलेले ५० च्या वर रणगाडे लष्करी शिस्तीत मांडून ठेवलेले आहेत. पहिल्या चिलखती गाडी पासून आजच्या अद्ययावत रणगाड्या पर्यंतचा प्रगतीचा इतिहास इथे पाहायला मिळतो. म्युझियम मधे शिरल्यावर दोनही बाजूंना " सेंच्युरीयन टर्ट" ठेवलेले आहेत. रणगाड्यावरचा हा तोफ़ असलेला फ़िरता भाग कासवा सारखा दिसतो म्हणुन याला "टर्ट"(ल) म्हणतात. जमिनी वरुन जमिनीवर व जमिनी वरुन आकाशात मारा करण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. रणगाड्यासारखी याला चाक किंवा पट्टे नसतात. त्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी दुसर्‍या वहानाची मदत घ्यावी लागते. टर्टच्या पुढे रोल्स राईस कंपनीची पहिली चिलखती गाडी (Armoured Car) ठेवलेली आहे. रणगाड्याच्या शोधापूर्वी युध्दभुमीवर वापरण्यासाठी ब्रिटनच्या रॉयल नेव्हल एयर सर्व्हीसेसनी १९१४ साली रॉल्स राईस कंपनी बरोबर "रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" या पहिल्या चिलखती गाडीची निर्मिती केली. पहिल्या महायुध्दात या गाडीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला १९४१ मधे गाडीच उत्पादन बंद करे पर्यंत त्यात अनेक बदल केले गेल. भारतात जनरल डायरने जालियनवाला बाग मधे शिरण्यासाठी या चिलखती गाडीचा उपयोग केला होता. "रोल्स राईस सिल्व्हर घोस्टच्या मागे "Schmerer Panzersphah Wagen (8-RAD)" ही १९३४ मधे जर्मनीत वापरात असलेली चिलखती गाडी त्यावरील नाझींच्या उलट्या स्वस्तिकच्या चिन्हामुळे चटकन नजरेत भरते. 


"Schmerer Panzersphah Wagen (8-RAD)"
चिलखती गाडी मजबूत असली तरी तीची चाक हाच तीचा मोठा अडथळा होता. त्यामुळेच युध्दभुमीवर गाडीच्या वापराला मर्यादा पडत.  पहिल्या महायुध्दा दरम्यान सर्वच देश अशा एका वहानाच्या शोधात होते जे रस्ता नसलेल्या पृष्ठभागावरुन म्हणजेच खाच, खळगे, खंदक, तारा, कुंपणे, दलदल, खडक, वाळू, वाळवंट, टेकडी या सर्वांवरून मार्गक्रमण करु शकेल. त्याचवेळी शत्रुवर मारा सुध्दा करु शकेल. त्यातूनच १९१६ साली इंग्लंड आणि फ़्रान्स मधे जवळजवळ एकाच वेळी रणगाड्यांची निर्मिती झाली. सुरवातीच्या काळात हा शोध गुप्त ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी या प्रोजेक्टला "मोबाईल वॉटर टॅंक" अस नाव दिल. पुढील काळात रणगाड्यात अनेक बदल झाले, पण त्याला चिकटलेल "टॅंक" नाव आजही सर्वोतोमुखी आहे. 


"वॉटर बफ़ेलो" Water Buffalo Tank

 जमिनीवर आणि पाण्यात चालणारे रणगाडे Sea Lion Tank
"रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" समोरच अमेरीकन बनावटीची " M3 A1 Reconnassance Vehical" ही चिलखती गाडी ठेवलेली आहे. या गाडीचा उपयोग शत्रुच्या भागात सैन्य पोहोचवण्यासाठी होत असे. या गाडीत काळानुसार बदल होत गेले. आताच्या आखाती युध्दात "M3 A3" या अत्याधुनिक तंत्राने सज्ज असलेल्या गाडीचा वापर केला गेला. त्याच्या पुढे "LVTA(4)" हा पाण्यातून चालणारा अमेरिकन बनावटीचा "वॉटर बफ़ेलो" रणगाडा ठेवलेला आहे. युध्दनौकेवरील सामान किनार्‍यावर आणण्यासाठी या रणगाड्याची निर्मिती करण्यात आली होती. यातही काळानुसार बदल होत गेले आणि प्रत्यक्ष युध्दातही याचा वापार केला गेला. "Topas Ambiphious  आणि  Sherman"  हे जमिनीवर आणि पाण्यात चालणारे रणगाडेही येथे पाहायला मिळतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आराखडा पास झाला म्हणुन "व्हॅलेंटाईन" नाव दिलेला रणगाडा दुसर्‍या महायुध्दात वापरला गेला. शत्रूचा मारा झाल्यावर पातळ पत्र्यामुळे हा रणगाडा लगेच पेट घेत असे त्यामुळे "मॅच बॉक्स" या टोपण नावाने तो सैनिकांमधे ओळखला जात असे.

भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा "विजयंता" Vikyanta Tank

    पहिल्या व दुसर्‍या महायुध्दात वापरलेल्या रणगाड्यांच्या गर्दीत एकमेव तरूण रणगाडा येथे पाहायला मिळतो. तो म्हणजे भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा "विजयंता" . १९६६ मध्ये नगरला झालेल्या समारंभात "विजयंता" लष्करात दाखल झाला. भारत पाकिस्तान युध्दात मोलाची कामगिरी करणार्‍या या रणगाड्याच उत्पादन १९८३ पर्यंत चालु होते. एकुण २२०० विजयंता रणगाडे लष्करात दाखल झाले होते. २००४ साली नगर येथील फ़ायर रेंजवर या रणगाड्याला निरोप देण्यात आला होता. ब्रिटीशांनी दुसर्‍या महायुध्दात बनवलेला  विमान विरोधी तोफ़ा असणारा "मटिल्डा" रणगाडा आणि त्याचीच सुधारीत आवृत्ती असलेले चर्चिल रणगाडे इथे पाहायला मिळतात. 


१९७१ च्या लढाईत पाकीस्तान कडुन हस्तगत केलेला झेंडा.
Bulldog tank captured in India -Pakistan war

पाकीस्तान कडून जिंकलेले "चॅफ़ी" रणगाडे
दुसर्‍या जागतिक महायुध्दा नंतर १९६५ साली झालेल्या भारत पाकीस्तान युध्दात रणगाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. या रणगाडा युध्दात पाकीस्तानी सैन्याच पारड जड होत. त्यांच्या कडे अमेरीकन बनावटीचे पॅटन, चॅफ़ी, शेरमन असे अत्याधुनिक रणगाडे होते. भारतीय रणगाड्यांपेक्षा त्यांची संख्याही जास्त होती. परंतू सियालकोट सेक्टर आणि चिविंडा - खेमखेरा , पंजाब येथे झालेल्या लढाईत भारतीयांनी पाकिस्तानी रणगाड्यांना धुळ चारली. या युध्दात भारताने पाकीस्तानचे ४७१ तणगाडे नष्ट केले आणि ३८ रणगाडे ताब्यात घेतले. त्यातील शेरमन, M-24 चेफ़, वॉटर बुलडॉग आणि M-47 पॅटन रणगाडे या ठिकाणी पाहायला मिळतात. युध्दात जिंकलेल्या रणगाड्यांच्या तोफ़ा खालच्या बाजूला वळवलेल्या असतात , त्याप्रमाणे या रणगाड्यांच्या तोफ़ाही खाली वळवून ठेवलेल्या आहेत. या लढाईत "पॅटन किलर" किंवा "बहादुर" म्हणुन नावारुपाला आलेला ब्रिटीश बनावटीचा "सेंच्युरीयन" रणगाडा इथे पाहायला मिळतो. विमानातून नेता येण्यासाठी आकाराने छोटा आणि वजनाने हलका असा रशियन बनावटीचा PT-76 आणि फ्रेंच बनावटीचा  AMX-13  हे छोटे रणगाडे येथे पाहायला मिळतात. १९६५ च्या लढाईत वापरलेला AMX-13 हा भारतीय सैन्यात "जम्पिंग टॅंक किंवा बख्तावर" या नावाने ओळखला जातो. या १९४८ साली झालेल्या पहिल्या भारत पाकीस्तान युध्दात १२००० फ़ुटावरील झोजिला खिंडीत भारतीय सैन्याने चढवलेला "स्टुअर्ट " रणगाडा प्रदर्शनात ठेवलेला आहे.

"जम्पिंग टॅंक किंवा बख्तावर"
     याशिवाय अनेक रणगाडे काही विशिष्ट कामासाठी बनवण्यात आले होते, ते ही इथे पाहायला मिळतात. "शेरमन बीच आर्मर्ड रेकव्हरी व्हेईकल आणि सी लायन" हे दोन रणगाडे बीचवर वाळूत आणि पाण्यात चालवण्यासाठी बनवण्यात आले होते. नॉर्मेडीच्या लढाईत त्यांचा चांगला उपयोग झाला. "सेंटॉर डोझर" हा रस्ते बनवणारा रणगाडा, "चर्चिल ब्रीज", "व्हॅलेंटाईन ब्रीज" ,"शेरमन ब्रीज" हे पूल तयार करणारे रणगाडे ही इथे पाहायला मिळतात. रणगाड्याचा सर्वात नाजूक भाग म्हणजे त्याच्या चाकावरील पट्टा. त्याला लक्ष करण्यासाठी भूसुरूंग पेरले जातात. या भूसुरूंगाना नष्ट करणारा "शेरमन क्रॅब" हा काहीसा विचित्र दिसणारा रणगाडाही येथे पाहायला मिळतो. "हा-गो", "चि-हा" अशी विचित्र नाव असलेले जपानी बनावटीचे रणगाडे. रशियन बनावटीचा "T4" इत्यादी रणगाडे पाहायला मिळतात.

भू सुरूंगाना नष्ट करणारा "शेरमन क्रॅब" Sherman Crab Tank

Centaur Dozer Tank

 या म्युझियम मधे ३ हॉल बांधलेले आहेत. पहिल्या मेमरी हॉल मधे "इंडीयन आर्मीच्या आर्मर्ड कॉर्पचा " १९७१ पूर्वीचा इतिहास आणि दुसर्‍या मेमरी हॉल मधे १९७१ नंतरचा इतिहास फ़ोटो, दस्त ऎवज, पदक, मॉडेल्स, युध्दाच्या व्युहाचे नकाशे यांच्या व्दारे मांडलेला आहे. याशिवाय प्रत्येक रेजिमेंटची घोषवाक्य, झेंडे, चिन्ह आणि आजपर्यंत त्यांना मिळालेल्या पदकांची यादी येथे लावण्यात आलेली आहे. या मेमरी हॉलच आकर्षण म्हणजे १९७१ च्या लढाईत पाकीस्तान कडुन हस्तगत केलेला झेंडा. तिसरा हॉल म्हणजे "हिरोज गॅलेरी" आर्मर्ड कॉर्पमध्ये शौर्य गाजवलेल्या, शहीद जवानांची माहिती आणि फ़ोटो असलेला हॉल आहे.

रणगाडा म्युझियमचा परीसर गर्द वनराईने नटलेला आहे. जागोजागी फ़ुलझाड, कारंजे, लॉन्स ठेऊन परीसर रमणीय बनवलेला आहे. जगोजागी बसण्यासाठी बाक ठेवलेले आहेत. म्युझियम मधे कॅफ़ेटेरीयाची सोय आहे. म्युझियमचे आकर्षण असणारे रणगाडे सुस्थितीत ठेवलेले आहेत. त्यांच्या बाजूला माहिती फ़लक लावलेले आहेत. लष्कराच्या ताब्यात असूनही छायचित्रणास बंदी नाहीये. वर्षभर ९.०० ते ५.०० यावेळात, नाममात्र शुल्कात हे म्युझियम पाहाता येते. तरीही आशियातील या एकमेव रणगाडा म्युझियमला भेट देणार्‍यांची संख्या तशी कमीच आहे. रणगाड्याच आकर्षण लहान थोरांना सर्वांनाच असत. एखादा दिवस थोडीशी वाट वाकडी करुन नगरच्या रणगाडा म्युझियमला भेट द्यायला काहीच हरकत नाही.

"व्हॅलेंटाईन ब्रीज" Valentine Bridge Tank

"चर्चिल ब्रीज" Charchil Bridge Tank