Wednesday, August 6, 2014

Undiscovered Sindhudurg Fort अपरिचित किल्ले सिंधुदुर्ग

अपरिचित किल्ले सिंधुदुर्ग


Sindhudurg Fort Malvan

मालवण माझ गाव असल्याने सिंधुदुर्ग किल्ला हा माझा मातृकिल्ला (मातृभुमी सारख) आहे. सिंधुदुर्गावर आत्ता पर्यंत ३० फ़ेर्‍या झाल्यामुळे मला सर्व किल्ला माहिती आहे, अस मला उगाचच वाटायला लागल होत. माझ्या बरोबर किल्ल्यावर येणार्‍यां मित्रांना, नातेवाईकांना मी एखाद्या इतिहास तज्ञाच्या आवेशात मोरयाच्या धोंड्यापासून ते राणीच्या वेळा पर्यंत किल्ल्याची माहिती सांगायचो. त्यावेळी शिवराजेश्वर मंदिरातले महाराज आणि सिंधुदर्ग किल्ला माझ्याकडे बघून नक्कीच हसत असणार.

Scuba Diving behind Sindhudurg Fort, Malavan

      त्याच झाल अस की, मालवणला इतक्या वेळाजाऊनही मी स्कुबा डायव्हींग केल नव्हत. २०१३ साली स्कुबा डायव्हींगसाठी बोटीने किल्ल्याच्या मागच्या बाजुला गेलो आणि समोरच दृश्य पाहून हरखुन गेलो. सिंधुदुर्गाच्या तटबंदीत चक्क एक चोर दरवाजा दिसत होता. समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या थोडासा वर असलेला चोर दरवाजा, यातून निसटायच म्हणजे एकतर होडी पाहिजे किंवा समुद्राच्या पाण्यात झोकून द्यायच आणि पोहत मालवणचा किनारा गाठायचा.

एवढ्या वेळा किल्ल्याला भेट देऊनही हा चोर दरवाजा मला किल्ल्याच्या आतून दिसला नव्हता. कारण किल्ल्यात पाणी येऊ नये म्हणुन तो आतून बंद करण्यात आला आहे. तरीही आजही तिथुन समुद्राच पाणी किल्ल्यात येत. (समुद्राच पाणी चोर दरवाजातून किल्ल्यात येऊ नये म्हणुन ३०० वर्षापूर्वी काय योजना केली होती हा अभ्यासाचा विषय आहे).

चोर दरवाजा , सिधुदुर्ग किल्ला
         चोर दरवाजा पाहिल्या पासून मी अस्वस्थ झालो, इतक्या वेळा किल्ला पहिला पण अजून बरच काही बघायच राहीलय अस जाणवायला लागल. मग माझा शोध सुरु झाला किल्लाचा कोपरा न कोपरा माहित असलेल्या माणसाला शोधण्याचा.माझ्या सुदैवाने माझी भेट झाली गेली १२ वर्ष सिंधुदुर्ग किल्ल्याचे  संरक्षक असलेल्या पुरातत्व खात्यातल्या श्री हरीश गुजराथींशी

Shivrajeshwar Mandir, Sindhudurg Fort, Malvan



Shivrajeshwar Mandir, Sindhudurg Fort, Malvan

Sindhudurg Fort
      किल्ला समग्र पाहाण्यासाठी हनुमान जयंतींचा मुहुर्त निवडला होता. दरवर्षी मालवणची सिंधुदुर्ग सेवा समिती किल्ल्यावर जाउन हनुमान जयंती साजरी करते. त्यामुळे सकाळी ७.०० वाजताच किल्ल्यावर मी, कौस्तुभ आणि गुजराथी दाखल झालो. गुजराथींनी रुईच्या फ़ुलांचा स्वत: बनवलेला लांबलचक हार प्रवेशव्दारा जवळच्या हनुमंताला घातला. नारळ फ़ुटले गाराण घातल आणि सर्वजण शिवराजेश्वर मंदिरात पोहोचले. त्या मंदिरातही पूजा आणि गाराण झाल. महाराजांचा जयजयकार झाला. कोल्हापूरहून आलेल्या मुलांनी तलवारबाजीची उत्कृष्ठ प्रात्येक्षिक दाखवली.

     सकाळी ८.०० वाजता आम्ही गडफ़ेरीला सुरुवात केली. त्यात चुन्याचा घाणा, चुना साठवण्याचे हौद, तटबंदीतली खोली, बुरुजावर कोरलेला गणपती अशा बर्‍याच नविन गोष्टी पाहायला मिळाल्या. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पडझड झालेल्या बुरुजांचे व तटबंदीचे बांधकाम चालू होत. समुद्रात पडलेले दगड क्रेनच्या मदतीने बाहेर काढून रचण्याच काम चालू होत. आज इतक्या सोयी सुविधा असुनही खाली पडलेला दगड उचलून वर आणून बुरुजात योग्य जागी बसवण प्रचंड कठीण काम होत. तर ३४० वर्षापूर्वी हा किल्ला बांधताना समुद्राच्या पाण्याशी झुंज देत पायापासून  दगड कसे बसवले असतील हा विचार मनात आला. 

बुरुजातली खोली

चुना साठवण्याचा हौद

चुन्याचा घाणा

Ganpati on Buruj of Sindhudurg Fort
सकाळी ८.०० ला सुरु झालेली किल्ल्याची भटकंती दुपारी १.०० ला संपली. एप्रिलच उन आणि खारी हवा यांनी हैराण झालो होतो, पण किल्ला पूर्ण पाहिल्याचे समाधान काही औरच होते. एक स्वप्न तर पूर झाल . आता एकदा सिंधुदुर्ग किल्ला छोट्या होडीतून सर्व बाजूंनी फ़िरुन पाहायचाय. न जाणो अजून काही नविन हाती लागायच.


Bastion at Sindhudurg Fort before repairing
Bastion at Sindhudurg Fort after repairing
Shri Gujrathi & Me


Tuesday, September 24, 2013

" पेव फुटणे " (Flowers in Sahyadri :-- Costus speciosus)

      
  " बॉम्बस्फोटा नंतर अफवांचे पेव फुटले ", "अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले" असे अनेक मथळे वर्तमानपत्रात आपण वाचत असतो. लहानपणी न समजून ही अनेक गोष्टी पाठ केल्या होत्या, त्यापैकी "पेव फुटणे - भराभर बाहेर पडणे",  हा वाकप्रचार ही पाठ करून १ मार्कही मिळवला होता. पण या शब्दाचा अर्थ पुढे कधीतरी मला माझ्याच अंगणात सापडेल असं मात्र वाटल नव्हत. सप्टेंबर महिन्यात गणपतीला गावी गेलो होतो, आमच्या सुपारीच्या बागेत जिथे नेहमी मोकळी जागा असते तिथे एकाच प्रकारच्या झुडूपांच गचपण माजल होत. त्या झुडूपांवर क्रेपच्या कागदासारखी दिसणारी पांढर्‍या रंगाची नरसाळ्या सारखी सुंदर फ़ुले फ़ुललेली होती. गावातल्या मित्राला त्याच नाव विचारल तर म्हणाला हे पेवाच झाड... आणि शाळेत केवळ घोकंपट्टी करून पाठ केलेल्या "पेव फुटणे" या वाकप्रचारचा अर्थ खर्‍या अर्थाने मला कळला. 

पेवच फुल (Costus speciosus)
Costus speciosus (family:- Zingiberaceae)

       

सुपारीच्या बागेत मला झालेल्या या साक्षात्कारामुळे "पेव" बद्दल कुतूहल निर्माण झाले. पेवच शास्त्रीय नाव Costus speciosus असून त्याच कुदुंब (family) Zingiberaceae आहे. ही "आल्याच्या" (आपण चहात, जेवणात वापरतो ते आलं) कुटुंबातील वनस्पती आहे. आल्यासारखे याचे कंद जमिनीत पसरतात. त्यातुन फ़ुटणारी झुडूपं आजुबाजूची जमिन व्यापून टाकतात. त्याठिकाणी इतर वनस्पतींना वाढायला वाव मिळत नाही. त्यामुळे आपल्याला "पेवच बेट" दिसायला लागत. दरवर्षी जुलै महिन्यात जमिनित असलेल्या कंदांमधून पेव उगवत, सप्टेंबर मध्ये त्याला फुलं येतात आणि नोव्हेंबर मध्ये हे झाड सुकून जा्ते. जेमतेम ४ ते ५ महिन्यांच आयुष्य असलेल हे झुडूप आहे.
पेवच बेट


         पेव ही झुडूप (shrub) या प्रकारात मोडणारी वनस्पती आहे. २ ते ३ मीटर उंच वाढणारी ही वनस्पती दाट सावलीत वाढते. त्यामुळे याच्या पानांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते.पान १५ ते ३० सेंटीमीटर लांब असतात. दाट झाडीखाली वाढणार्‍या या झुडूपाच्या पानांना झाडीतून झिरपणारा सूर्यप्रकाशाचा कवडसा पकडता यावा याकरीता पेवाच्या पानांची रचना मुख्य दांड्याभोवती सर्पीलाकार (Spiral) गोल जिन्यासारखी केलेली असते. याचा अजून एक फायदा म्हणजे एका पानाची सावली दुसर्‍या पानावर पडत नाही. 

  पेवच्या पानांची सर्पिलाकार रचना        


     पेवच्या बेटाकडे आपल लक्ष वेधले जाते ते हिरव्या बेटावर डोलणार्‍या त्याच्या नरसाळ्या सारख्या दिसणार्‍या पांढर्‍या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी -लाल रंगाची रुपांतरीत पाने पाहायला मिळतात. पूर्ण फुललेल फुलाचं तोंड खालच्या बाजूला झुकलेल असत. फुल पांढर्‍या रंगाच असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. यामुळे परागीभवनासाठी येणार्‍या किटकांना मकरंद (मध) कुठल्या दिशेला आहे त्याचे मार्गदर्शन होते. या लांब दांड्याच्या फुलातील मकरंद (मध) पिण्यासाठी / परागीभवनासाठी लांब सोंड असलेल ग्रास डेमन (Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae)  हे फुलपाखरू पेवच्या बेटातून उडतांना दिसत. हे कृष्णधवल रंगाचे फुलपाखरू असून पंखांवर पांढरे ठिपके असतात. या फुलपाखराला सावलीत, जमिनीलगत उडायला आवडते. त्याची सोंड त्याच्या आकाराच्या दुप्पट असते. उडतांना फुलपाखराची सोंड (Probosis) कॉईल सारखी गुंडाळलेली असते. पेवसारख्या लांब दांड्याच्या फुलावर बसल्यावर हे फुलपाखरू आपली सोंड उलगडून फुलातील मकरंद (मध) पिते. निसर्गातील हे परस्परावलंबन आश्चर्यचकीत करणारे आहे.

पेवच फुल आणि त्यावरील ग्रास डेमन फुलपाखरू 









Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae

      पेवच्या कंदांचा उपयोग प्राचीन काळापासून आयुर्वेदात ताप, दमा, खोकला आणि जंत यावरील औषधात होतो. ज्ञानेश्वरीतही पेवा़चा उल्लेख आलेला आहे.
  
जे भुलीचे भरिव। जे विकल्पाचे वोतिव। किंबहुना "पेव" विंचवाचे॥८-४५॥ ज्ञानेश्वरी.
  










                     





संदर्भ :-   1) Flowers of Sahyadri :- Shrikant Ingahallikar ,  2) महाराष्ट्रातील फुलपाखरे :- डॉ. राजू कसंबे.


"सह्याद्रीतील रानफ़ुलं"  हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.....

Sunday, September 1, 2013

अंतुर किल्ल्यावरचा गुप्त (भूयारी) मार्ग (Secret Passage on Antur Fort , DIst :- Aurangabad)

       

   अंतुर किल्ल्यावरील भव्य बुरुज
 
      किल्ल्यावरील चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे अबाल वृध्दांची नेहमीच उत्कण्ठा वाढवतात. लहानपणापासून वाचलेल्या अनेक रहस्य कथा, साहस कथांमधून आपल्याला या गोष्टी आधीच भेटलेल्या असतात, त्यांनी आपल्या मनाचा एक कप्पा व्यापलेला असतो. त्यात भर म्हणजे किल्ल्यावरील गुप्त मार्ग, भूयारे यांच्या भोवती तयार झालेल्या दंतकथांमुळे त्यांना एक गुढतेचे वलय प्राप्त झालेले असते. भूयारे आणि गुप्त वाटा यांच्या बद्दल जनमानसात अनेक अतिरंजीत समज पिढ्यान पिढ्या पसरलेले असतात. (उदा :- सिंधुदुर्ग किल्ल्यातील भूयार समुद्राखालून मालवण शहरात जात हो्ते., कुलाबा किल्ल्यातील भुयार समुद्राखालून अलिबाग मधील कान्होजी आंग्रे यांच्या वाड्यापर्यंत जाते. अशा भूयारांबाबत अनेक कथा वेगवेगळ्या किल्ल्यांवर ऎकायला मिळतात) त्या शास्त्रकाट्यावर पारखून न घेता त्यावर अंधविश्वास ठेवला जातो, याला कारण म्हणजे या भूयारांनी नकळत व्यापलेला आपल्या मनातील कप्पा. खरतर चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे ही किल्ल्याची महत्वाची अंग होती. त्याकाळचे राजकारण, युध्द, फंद - फितुरी यांच्याच साक्षीने होत होती.  महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्यावरील चोर (गुप्त) मार्ग अचानक पाहाण्याची संधी मिळाली आणि आम्ही हरखूनच गेलो.

बुरुजा खालील कातळातील गुहा व तटबंदी, अंतुर

त्याच झाल असं की, २०१३ च्या पावसाळ्यात पेडका, लोंझा ,कण्हेरगड, अंतुर या दुर्लक्षित किल्ल्यांचा अभ्यास करून www.trekshitiz.com  या साईटवर माहिती लिहीण्यासाठी आम्ही चाळीसगावात दाखल झालो. सकाळी लोंझा किल्ला पाहून अंतुर किल्ला गाठला. अंतुर जरी दुर्लक्षित किल्ला असला तरी किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायचा असेल तर दोन ते तीन तास लागतात. त्यात आम्ही नोंदी करीत, नकाशा बनवत किल्ला पाहात होतो. त्यामुळे किल्ला पाहायला अंमळ जास्तच वेळ लागला. त्यात भर पडली ती अर्धा - एक तास आम्हाला झोडपून काढणार्‍या पावसाची. संपूर्ण किल्ला पाहून संध्याकाळी ६.०० च्या सुमारास आम्ही अंतुर किल्ल्याच्या भव्य, सुंदर बुरुजासमोर बसून तो नजरेत साठवण्याचा प्रयत्न करत होतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण प्रसन्न होतं, वारा भन्नाट वहात होता. त्यामुळे दिवसभराचा शीण हळूहळू उतरत होता. खंदका पलिकडे बुरुजाच्या अर्ध्या उंचीवर बसून आम्ही त्या भव्य बुरुजाचे निरीक्षण करत होतो.

 अंतुर किल्ला दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगर रांगेच्या टोकावर बांधलेला आहे. मुख्य डोंगररांगेपासून किल्ला वेगळा करुन तो संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत करण्यासाठी त्याकाळच्या स्थापतींनी येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे २५० फूट लांब, १०० फूट रूंद व ३० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे २००० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दक्षिण बाजूला  उंचावर भव्य बुरुज व तटबंदी बांधलेली आहे. तर पूर्व- पश्चिम बाजूला खोल दरी आहे. शत्रु या खिंडीच्या पलिकडच्या बाजूस आल्यास बुरुजा आडून शत्रूवर हल्ला करणे सोपे होते. त्यातूनही जर शत्रू खंदकात पोहोचलाच, तर बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. दोन्ही बाजूला खोल दरी व मागील बाजूस असलेल्या खंदकाच्या भिंतीमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत. ही खाच बनवण्यामागे हा विचार असावा. खिंडीच्या किल्ल्याकडील भागात अंदाजे १०० ते १५० फुट उंचीचा कातळ आहे. त्या कातळावर तेवढ्याच उंचीचा भव्य बुरुज बनवण्यात आला आहे. या बुरुजाच्या बाहेरच्या बाजूस ३० फूट ते ५० फूट उंच तटबंदी बांधून तो संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत करण्यात आला आहे.

या बुरुजाचे खंदकच्या पलिकडे बसून निरीक्षण करतांना असे दिसून आले की, बुरुजाच्या खाली असलेल्या कातळाच्या तळाकडे उजव्या बाजूला एक भगदाड पडलेलं आहे. तशीच नजर फिरत वर आली, तर बुरुजाच्या खालच्या कातळात साधारण मध्यभागी एक गुहा दिसत होती. गुहेपासून थोड्या अंतरावर डावीकडे भिंत बांधून कातळात पडलेलं भगदाड बुजवल्याच दिसत होत. या भिंतीत जंग्याही ठेवलेल्या दिसत होत्या. किल्ला बांधतांना एवढा विचारपूर्वक बांधणारे स्थापती कातळात मध्येच भिंत बांधून त्यात जंग्या कारणाशिवाय बांधतील हे पटत नव्हत. मग नजर थोडीशी "झुम आऊट" करून या तीनही गोष्टी एकत्र पाहील्यावर त्यांना एकत्र सांधणारा काही दुवा असावा असे वाटायला लागले. गेल्याच वर्षी औरंगाबाद जिल्ह्या्तीला सुतोंडा किल्ला पाहीला होता. त्यालाही असाच कातळात कोरलेला खंदक होता आणि त्या खंदकातच किल्ल्याचे प्रवेशव्दार देवड्या व छोटासा भूयारी मार्ग कातळात कोरून काढलेला होता.



खंदकात कसे उतरायचे हा आता मुख्य प्रश्न होता. आमच्याकडे ३० फूटी रोप होता, पण वेळ कमी होता. खाली उतरण्यासाठी रस्ता शोधतांना उजव्या बाजूला चक्क कातळात कोरलेल्या ३ पायर्‍या दिसल्या. त्या उतरून गेल्यावर दरीच्या बाजूने एक चिंचोळी वाट खंदकात उतरत होती. खंदकात उतरल्यावर झुडूपामागे लपलेल्या भगदाडापाशी पोहोचलो.  


या भगदाडाच्या वरच्या बाजूस चुन्यात लावलेले दगड दिसत होते.एकेकाळी दगड लावून हे भगदाड बंद केलेले असावे. पूर्वीच्या काळी एक - दोन मुख्य प्रवेशव्दार सोडली तर इतर चोर दरवाजे, भिंती बांधून चिणून टाकले जात असत. भगदाडाची उंची २.५ ते ३ फूट होती. आत मध्ये मिट्ट काळोख होता. पावसाळा असल्याने अशा अंधार्‍या भागात साप, विंचू असण्याची दाट शक्यता होती. हातात काठी आणि टॉर्च घेऊन भगदडातून आत प्रवेश केला वाट काटकोनात वळून वर चढत होती. 

भूयाराचा अंर्तभाग, अंतुर


कातळात कोरलेल्या पायर्‍यांवरून १० मिनिटे चढल्यावर प्रकाश आणि गार हवेचा झोत जाणवायला लागला आणि आम्ही चक्क किल्ल्याखालील कातळाच्या मध्यभागी असलेल्या गुहेत पोहोचलो होतो. इथे भन्नाट वारा होता, समोर खंदकाची पलिकडची बाजू (जिथे काही वेळापूर्वी आम्ही बसलो होतो) ती दिसत होती. 



बुरुजा खालील कातळातील गुहा व तटबंदी, अंतुर
                                                     

 गुहेच्या आतल्या बाजूला बुरुजावर जाणारी भूयारी वाट दिसत होती. त्या वाटेवर थोडे अंतर चढल्यावर समोर वरून सुटून खाली पडलेल्या दगडांची रास दिसत होती. त्यामुळे हा भूयारी मार्ग अजून चिंचोळा झाला होता. त्या दगडांच्या राशीवर चढून पुढे सरकल्यावर आतून वटवाघळांचा आवाज व त्याच्या शीटेचा गुदमवणारा वास येत होता. आता बाहेर संध्याकाळचे ६.३० वाजून गेले होते. यापूढील मार्गाबद्दल काहीच अंदाज येत नव्हता, त्यामुळे माघारी परतण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. पुढच्या वेळी पूर्ण तयारीनीशी या गुप्तमार्गात शिरायचे असे ठरवून आम्ही परतीचा प्रवास चालू केला.

दगडांमुळे मार्ग बंद झाला होता.
      अंतुर किल्ल्यावरील या भूयारी मार्गाची नोंद पुरातत्व खात्याकडे नक्कीच असणार. त्यांनी जर हा गुप्त मार्ग मोकळा करून सर्वांसाठी खुला केला तर, या किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांच्या (अंतुर किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत १२ महिने वहानाने जाता येत) संख्येत वाढ होईल. त्यांना नविन काही पाहिल्याच समाधान मिळेल.


Friday, August 16, 2013

किल्ल्यांवरील पाणी स्थिरीकरण योजना. (Water Stabilisation Systems on the Forts)

पेडका किल्ल्यावरील एका खाली एक असलेले तलाव

           किल्ल्यांवरील टाकी, तलाव , विहीरी या व इतर पाणी साठावण्याच्या पध्दती हा माझ्या आवडीचा विषय आहे. किल्ल्यावरील हे पाणी साठे किल्ल्याबद्दल बरीच माहिती सांगून जातात. किल्ल्यावर किती शिबंदी असावी, किल्ला बांधला त्यावेळेचे पडणार्‍या पावसाचे प्रमाण, किल्ल्याचे महत्व वाढल्यावर पाणी साठवण्यासाठी केले गेलेले नवे उपाय यांचा अंदाजही या पाणी साठ्यांवरून करता येतो. किल्ला लढता ठेवण्यासाठी सैनिक अन्नधान्या इतकेच किंवा त्याहून जास्तच पाणी साठ्याला महत्व होते. त्यामुळे हा पाणी साठा वाढवण्याचे,  त्या टाक्यात, तलावात जास्तीत जास्त पाणी साठवण्याच्या अनेक युक्त्या आपल्या पूर्वजांनी (त्याकाळच्या स्थापतींनीं) शोधून काढल्या होत्या.  

यावर्षी भर पावसाळ्यात चाळीसगाव - औरंगाबाद परीसरातील किल्ल्यांवर जाण्याचा योग आला. पावसाळ्यामुळे पेडका किल्ल्यावरील तलाव चांगले भरलेले होते. त्यामुळे किल्ल्यावर राबवण्यात आलेली पाणी स्थिरीकरणाची योजना नीटच पहाता आली. पाणी स्थिरीकरण म्हणजे काय? डोंगरावरून, जमिनी वरून वहात येणारे पाणी आपल्या बरोबर माती, गाळ, कचरा घेऊन येते. हा गाळ टाकी, तलावात साठत जातो. या गाळावर पडणार्‍या साठलेल्या पाण्याच्या दाब पडल्यामुळे मातीचा थर सिमेंटसारखा घट्ट होतो. अशाप्रकारे दरवर्षी साठत जाणार्‍या गाळामुळे अनेक तलाव व धरण भरून जातात किंवा कायमची बाद होतात. पाण्याच्या दाबामुळे घट्ट झालेला हा गाळ काढणे ही मोठी खर्चिक व वेळकाढू बाब होते. त्यामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ खाली बसावा, मुख्य टाक्यात, तलावात येऊ नये यासाठी वहाते पाणी थोडावेळ थांबवून (स्थिरकरून) त्यातील गाळ खाली बसवण्यात येतो. यालाच पाण्याचे स्थिरीकरण म्हणतात. महाराष्ट्रातल्या बर्‍याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी अशा अनेक योजना राबवलेल्या पाहायला मिळतात.

पेडका किल्ल्यावर पाण्याचा मुख्य मोठा तलाव प्रवेशव्दाराच्या वरच्या अंगाला आहे. या तलावाच्या वर डोंगर पसरलेला आहे. या डोंगरावरून वहात येणारे पाणी थेट मोठ्या तलावात जाऊन तॊ गाळाने भरू नये यासाठी या तलावाच्या वर २ छोटे तलाव बनवलेले आहेत. सर्वात वरच्या पठारावर असलेल्या तलावात पठारावरून वाहाणारॆ पाणी व गाळ जमा होतो. तो तलाव भरला की वरचे पाणी बाजूच्या पन्हाळीतून खालच्या बाजूला असलेल्या बांधीव तलावात येते. इथे पाण्याला पुन्हा एकदा स्थिर करून त्यातील गाळ खाली बसवला जातो. या तलावाच्या बांधाच्या एका कडेला वरच्या बाजूस पाणी जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली आहे. त्यातून पाणी खालच्या मोठ्या तलावात जमा होते. यामुळे मोठ्या तलावात फारच कमी प्रमाणात गाळ जमा होतो. याशिवाय २ अतिरीक्त पाणी साठे तयार होतात आणि दरवर्षी वरच्या २ छोट्या तलावातील गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येतो.


मनोहर गडावरील पाणी जाण्यासाठी तटबंदीतील मोर्‍या
मनोहर गडावरील तलावाचे अवशेष
   
 मनोहर - मनसंतोषगड हे तळकोकणातले किल्ले, या भागात महामूर पाऊस पडतो. पावसाळ्यात मनोहर गडावरच्या वाड्यामागून एक ओढा वाहातो. आता गडाची तटबंदी जिथे कोसळलेली आहे तेथून या ओढ्याचे पाणी खालच्या दरीत पडते. किल्ला बांधतांना त्यावेळेच्या स्थापतींनी या ओढ्यातील पाण्याचा वेग कमी करण्यासाठी व पाणी साठवून त्याचा निचरा करण्यासाठी तटबंदी जवळ एक तलाव बांधला होता. तसेच तटबंदीत जागोजागी पाणी जाण्यासाठी मोर्‍या बांधल्या होत्या. आजही नीट पाहिले तर गाळात गाडल्या गेलेल्या तलावाचे अवशेष व ढासळलेल्या तटबंदीत पाणी जाण्यासाठी बांधलेल मोर्‍या पहायला मिळतात. ओढ्याचे पाणी आपल्या बरोबर भरपूर गाळ घेऊन असे. ते पाणी तलावात आणून त्याचा वेग कमी केले जाई व पाणी स्थिर केल्यामुळे त्यातील गाळ ही खाली बसत असे. तलावाच्या बांधावरून बाहेर पडणारे पाणी तटबंदीतील मोर्‍यांवाटे दरीत जात असे. अशा प्रकारच्या योजनेमुळे ओढ्याच्या पाण्याचा अतिरीक्त दाब पडून तट्बंदीला धोका होत नसे व गडावरील वापरासाठी अतिरीक्त पाणी साठा पण तयार होई.

पाण्याचे टाकं, असावा 


                                                                                                                                                
               ठाणे जिल्ह्यातील बोईसर जवळ असावा किल्ला आहे. या किल्ल्यावर एक प्रचंड मोठ पाण्यचं टाक आहे. या टाक्याच्या तीन बाजू कातळात कोरलेल्या असून एक बाजू दगडांनी बांधलेली आहे. डोंगरावरचे पाणी कातळ उतरावरून टाक्यात पडते. त्या पाण्याबरोबर येणारा गाळ टाक्यात जाऊ नये म्हणून येथे कातळात जागोजागी रूंद व खोल खळगे कोरलेले आहेत. त्यात वहात्या पाण्यातला गाळ साठून रहात असे व शुध्द पाणी तलावात जात असे . तसेच या खळग्यात साठणारा गाळ काढणे पण सोपे होते.

         याशिवाय बर्‍याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी उतारावर एकाखाली एक पाण्याची टाकी कोरलेली पहायला मिळतात. या रचनेमुळे डोंगर उतारावरून येणार गाळमिश्रीत पाणी सर्वात वरच्या टाक्यात पडत असे. ते टाक भरल्यावर पाणी पुढच्या टाक्यात जात असे. अशाप्रकारे सर्वात वरच्या टाक्यातच जास्तीत जास्त गाळ साठत असे. त्यामुळे गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येत असे.

       किल्ला पाहिल्यावर अनेक जणांची तक्रार असते की, किल्ल्यावर पहाण्यासारख काही नव्हत. पण प्रत्येक किल्ल्याच स्वत:च अस एक वैशिष्ट्य असत, तो ते आपल्याला दाखवत असतो, पण गरज आहे ती त्याच्याकडे शोधक नजरेने पहाण्याची.
     

एका खाली एक कोरलेली पाण्याची टाकी


Sunday, June 30, 2013

भामगिरी / भांबगिरी / भामचंद्र डोंगर (Bhamchandra Dongar near Talegaon)




तुकाराम महाराजांनी १५ दिवस भामगिरी डोंगरावर निर्वाणीचा संकल्प करून श्रीहरीवर ध्यान लावले. त्या काळात सर्प, विंचू, वाघ अंगाला झोंबू लागले, पण त्यांनी ध्यान सोडल नाही, आसन मोडल नाही. शेवटी दिव्याच्या ज्योती जवळ धरलेला कापूर ज्याप्रमाणे ज्योतीशी एकरूप होतो तसा तुकारामांचा देह श्रीहरीशी एकरूप झाला, त्यांना साक्षात्कार झाला. त्याच वर्णन तुकोबांनी अभंगातून केलेल आहे.



पंधरा दिसामाजी साक्षात्कार झाला !
विठोबा भेटला निराकार !!
भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली !
वृत्ति स्थिरावली परब्रम्ही !!
निर्वाण जाणोनी आसन घातिले !
ज्ञान आरंभिले देवाजीचे !!
सर्प, विंचू, व्याघ्र अंगासी झोंबिले!
पिडू जे लागले सकळीक !!
दिपकी कर्पूर कैसा तो विराला!
त्तैसा देह झाला तुका म्हणे !!

भामगिरी डोंगररांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात डोंगराने अंदाजे ८०० फूटी कातळ टोपी घातलेली आहे. या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.


भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने दाट झाडीतून अर्ध्या तासात आपण सपाटीवर येतो. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. येथून १० मिनिटात आपण कातळ कड्यापाशी पोहोचतो. येथे थोड्याश्या उंचीवर कातळात खोदलेल टाक आहे. टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे. कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडप चार दगडी खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाला लागूनच पाण्याच टाक खोदलेल आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. गाभार्‍या शिवलींग व पार्वतीची मुर्ती आहे. छतावर नक्षीकाम केलेल आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल अजून एक टाक पहायला मिळत, टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे. या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले रहातात.  गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मुर्त्या ठेवलेल्या आहेत. या झाडाजवळून एक  पायवाट खालच्या बाजूला जाते. येथे एक पाण्याच टाक व गुहा आहे. ती पाहून परत झाडाजवळ येऊन कातळ भिंतीत कोरलेल्या पायर्‍यांनी तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेकडे जावे. 

संसारात राहून, व्यापार सांभाळून विठ्ठल भक्ती करणार्‍या तुकाराम महाराजांना दैनंदिन व्यापातून ईश्वर भक्तीसाठी वेळ देता येत नसे. त्याची खंत त्यांनी अनेक अभंगांमधून व्यक्त केलेली आहे.






संसारतापे तापलो मी देवा !
करीता या सेवा कुटुंबाची!!
कसया गा मज घातिले संसारी!
चित्त पायावरी नाही तुझ्या !!

किंवा

मन माझे चपळ न राहे निश्चळ!!
घडी एक पळ स्थिर नाही !!


अशा मनाच्या अवस्थेत तुकोबारायांना भामगिरीवर जाऊन ध्यानधारणा करण्याची आज्ञा झाली.
 

तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे. गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे. त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मुर्ती आहे. गुहेची अंदाजे उंची ६ फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे. गुहेची लांबी अंदाजे १० फूट व रूंदी ६ फूट आहे. गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर तुकाराम महाराजांची मुर्ती कोरलेली आहे. त्यांच्या हातावर विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत. गुहेच्या टोकाशी विठ्ठल रखुमाईची मुर्ती आहे. या गुहेच्या बाजूला ३ फूट उंच व ६ फूट लांब गुहा आहे. या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे.


ज्ञानेश्वर माऊलींनी तपश्चर्य़ेच स्थान कस असावे याबद्दल अभंग लिहिले आहेत. भामगिरीच्या ध्यान गुंफेला हे वर्णन लागु पडत.

बहुत करोति निशब्द
दाट न रिगे श्वापद !
शुक अन षटपद
तेऊते नाही !!

तपश्चर्य़ेच्या ठिकाणी शांतता असावी , श्वापदांचे येणे जाणे, पक्षी (पोपट) , किटक (भुंगे) यांचा आवाज नसावा.

आणिकही एक पहावे
जे साधकही वसते होआवे !
आणि जनाचेनी पायरवे
मळेचिना !!

हे साधकांनी वसवलेले स्थान असावे येथे सामान्य जनांचा वावर नसावा.

 






गुहेत शिरल्यावर गुहेतल्या शांततेने आमच्यावर गारूड केलं. गुहेच्या दारातून आत झिरपणार्‍या प्रकाशामुळे ती गुहा एकाच वेळी गुढ आणि सुंदर भासू लागली. तुकाराम महाराजांच्या मुर्ती समोर बसून अलगद डोळे मिटून घेतले. नितांत शांतता सभोवती दाटली होती. मनही शांत होत गेले. मनात विचार आला याठिकाणी कित्येक साधक साधना करुन गेले असावेत. अशा पवित्र ठिकाणी ५ मिनिटे का होईना आपल्याला शांतपणे बसता आलं , अंतर्मुख होता आले याचा आनंद झाला.

 भामगिरीवर जाण्याचा मार्ग :-  पुणे - नगर रस्त्यावर तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर पोहोचतो (वसुली हे गावाचे नाव आहे.). येथे डाव्या बाजूला शिंद, भांबुर्ले गावाकडे जाणारा रस्ता पकडावा. नाक्यापासून भांबुर्ले १.५ किमीवर आहे. भांबुर्ले गावातून उजव्या बाजूचा रस्त्याने १ किमीवरील भामचंद्र माध्यमिक विद्यालया पर्यंत जावे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या (विद्यालयाच्या बाजूने) कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. डोंगराच्या पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे.


मुंबई - पुण्यापासून एका दिवसात  भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर व इंदुरीचा किल्ला ही तिनही ठिकाण पहाता येतात.



ज्ञानेश्वरीतील पक्षी ( Birds in Dnyaneshawari ) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.
https://samantfort.blogspot.com/2020/05/blog-post.html