Sunday, November 19, 2017

Offbeat Maharashtra कंधार - होट्टल आणि नांदेडची भटकंती Kandhar Fort, Siddheshwar Mandir, Hottal, Mukhed, Tadkhel & Nanded)

कंधार किल्ल्यातील शिल्प

भल्या पहाटे हुजूरसाहेब नांदेड स्टेशनला उतरलो. पावसाळी हवेमुळे गारवा जाणवत होता. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई पुण्याजवळचे गर्दीने बजबजलेल्या किल्ल्यांवर जाण्यापेक्षा दुरवरचे वेगळे किल्ले, मंदिर आणि प्रदेश पाहाण्याचा कार्यक्रम आखायला गेल्या काही वर्षापासून सुरुवात केली होती. स्टेशनवरची गर्दी कमी झाल्यावर उपहागृहाकडे मोर्चा वळवला. भल्या पहाटे त्याने लावलेल्या भयानक गाण्यांमुळे उपाहारगृह शोधायला वेळ लागला नाही. हिंदी सिनेमातली टाकाऊ गाणी निवडून त्याची सीडी बनवणारे आणि ती विकत घेणारे दोघेही प्रात:समयी वंदनीय असल्यामुळे तिथेच चहा घेतला. आता झुंजुमुंजू व्हायला लागल्याने फ़लाट सोडला आणि नांदेड शहरात प्रवेश केला. नांदेडचा गुरुव्दारा हे सुवर्णमंदिरा खालोखाल शिखांचे दुसरे महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्याने स्टेशनची इमारतही गुरुव्दारा सारखी बनवलेली होती. नुकत्याच उघडलेल्या हॉटेलात नाश्ता मिळेल का ? अस विचारल्यावर त्याने गरमागरम पोहे बनवून दिले तो पर्यंत आम्ही ठरवलेली गाडी आली. भरल्या पोटाने कंधारकडे कुच केले. नांदेडच्या तीन दिवसाच्या भटकंतीत पहिल्या दिवशी कंधार किल्ला, मुखेड, होट्ट्ल आणि तडखेल येथिल मंदिरे पाहायची होती. दुसर्‍या दिवशी गोळेगावची गढी, गुरुव्दारा आणी नांदेडचा किल्ला. तर तिसर्‍या दिवशी माहूरचा किल्ला पाहून परतीचा प्रवास करायचा होता.   



नांदेड शहरापासून ५८ किलोमीटरवर असलेले कंधार हे गाव बालाघाट रांगेच्या उतारावर मन्याड नदीच्या खोर्‍यात वसलेला आहे. इसवीसनाचा चौथ्या शतकात काकतीय घराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती केली आणि त्याला आपली राजधानी बनवले. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकुटांचीही ही राजधानी होती. त्यांनी कंधारपूर ही नगरी वसवली आणि जगत्तुंग समुद्र या विशाल तलावाची निर्मिती केली . राष्ट्रकुटांच्या काळात कंधार किल्ला कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जात असे. 
कंधार किल्ला


कंधार किल्ला गावाच्या एका बाजूला आहे. खंदक पार करुन किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत गेलो, पण दरवाजाला भला मोठा टाळा होता. किल्ला  पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असून ९ . ३० ते संध्याकाळी ५ .०० पर्यंत किल्ला पाहाता येतो. किल्ल्याचे दरवाजे उघडायला अजून अर्धा ते पाऊण तास होता. आम्हाला पाहून जमा झालेल्या गावकर्‍यां बरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. अशा गप्पांमधून नविन माहिती हाती लागते ती सहसा कुठल्याही पुस्तकात मिळत नाही. गप्पांच्या ओघात कळले की गावातल्या कॉलेज मधल्या प्रोफ़ेसरांनी कंधार किल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. ते कॉलेज जगत्तुंग सागर तलावाकाठी होते. नशिबाने सरांना लेक्चर नव्हते ते इतिहास विभागत होते. सरांशी भरपूर गप्पा झाल्या त्यांच्या इतर पुस्तका बद्दल माहिती मिळाली. पण त्यांच्या कंधारच्या पुस्तकाची प्रत त्यांच्याकडॆ नव्हती, कंधार मार्केट मधिल पुस्तकाच्या दुकानात मिळेल अस ते म्हणाले. गाडी कंधार मार्केटकडे घेतली. त्यादिवशी कंधारचा आठवडी बाजार होता. गावात भरणार्‍या आठवडी बाजारात फ़िरायला मला खूप आवडत. या बाजारातही सुबक विणलेल्या डिझायनर टोपल्या दिसल्या. अतिशय स्वस्त असल्याने लगेच विकत घेतल्या. कंधार वरच पुस्तक बरीच शोधाशोध केल्यावर दुकानदाराला मिळाल ते घेऊन कंधार किल्ला गाठला. किल्ल्याच कुलूप आता उघडलेल होत.    

कंधार आणि मानसपुरी परिसरात सापडलेली शिल्प,कंधार किल्ला  

इसवीसनाच्या चौथ्या शतकात वरंगळचा काकतीय राजा नंदगिरीने कंधार किल्ला बांधला. त्याचा पुत्र सोमदेव याने कंधार ही राजधानी बनवली असा उल्लेख प्रतापरुद्र यशोभूषण या ग्रंथात आहे. इसवीसनाच्या सातव्या  शतकात राष्ट्रकुट घराण्यातील राजा कृष्ण पहिला याने कंधार नगरास राजधानीचा दर्जा दिला . त्याच काळात कंधारला पाणी पुरवठा करण्यासाठी जगत्तुंग समुद्र या तलावाची निर्मिती करण्यात आली आणि कंधारचा किल्ला बांधण्यात आला. वेंगीचा चालुक्य राजा गुणग विजयादित्य तिसरा याने इसवीसनाच्या ९ व्या शतकात कंधार जाळून टाकले . राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने कंधार नगराची उभारणी केली. त्याच बरोबर किल्ला भक्कम केला. पुढील काळात राष्ट्रकुटानी त्यांची राजधानी गुलबर्गा जवळील म्यानखेटला याठिकाणी हलवली आणि कंधारला उपराजधानीचा दर्जा दिला .

इसवीसनाच्या १२ व्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता. १३ व्या शतकात मलिक काफूरने हा किल्ला जिंकून घेतला. महमद तुघलकाने १३४७ मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. त्याने नसरत सुलतान याला कंधारचा किल्लेदार नेमले . १२ वर्ष किल्लेदार म्हणून राहील्यावर त्याने बंड केले ते तुघलकाने मोडून काढले.इसवीसन १३४७ मध्ये हसनगंगूने बहामनी सत्तेची स्थापना केली तेंव्हा कंधार किल्ला त्याच्या ताब्यात गेला. बहामनी साम्राज्याचा अस्त झाल्यावर इसवीसन १५६५ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात किल्ला गेला. इसवीसन १५९६ मध्ये चांदबिबीने कंधार मोगलांच्या ताब्यात दिला. पुढे मलिक अंबरने हा किल्ला इसवीसन १६२० मध्ये मोगलांकडून जिंकून घेतला. त्याने किल्ला मजबूत केला . किल्ल्यात अंबरी बुरूज, दर्गा , मशीद बांधली आणि  किल्ल्यात पाणीपुरवठा योजना राबवली .  मोगल बादशाह शहाजहानने इसवीसन १६३१ मध्ये नसिरखान यास कंधार घेण्यास पाठवले. मोगलानी किल्ल्याला वेढा घातला. कंधारच्या किल्लेदाराने १९ दिवस किल्ला लढवला पण किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवीसनाच्या १८ व्या शतकात हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात कंधार किल्ला गेला . त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो निजामाच्या ताब्यात होता.

इसवीसनाच्या चौथ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत विविध राजवटींच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांनी या किल्ल्यात अनेक बदल, बांधकाम केली. आजही हा बदल आपल्याला पाहाता येतो. पुरातत्त्व खात्याने किल्ला उत्तम रितीने ठेवलेला आहे. किल्ल्यात भरपूर वास्तूंचे अवशेष आहेत. त्यांच्या बांधकाम शैलीतही वैविध्य आहे. 

मकरमुख असलेली बांगडी तोफ़,कंधार किल्ला  

कंधार किल्ला भूईकोट असल्यामुळे संरक्षणासाठी त्याच्या चारी बाजूला खंदक खोदलेला आहे .हा खंदक घडीव दगडानी बांधून काढलेला आहे. खंदकाची रुंदी १०० फ़ूट आणि खोली ५० फ़ूट आहे. अनेक वर्ष खंदकात गाळ साठल्यामुळे त्याची खोली कमी झालेली आहे. खंदकात पावसाचे पाणी साठवले जात असे तसेच कंधार गावात राष्ट्रकुटांनी बांधलेल्या जगत्तुंग तलावातून खंदकात पाणी सोडले जात असे. त्यासाठी बनवलेल्या मोर्या आणि सांडवे खंदकाच्या तलावाकडील भागात पाहाता येतात. खंदक साफ करण्यासाठी तसेच दुरुस्त करण्यासाठी त्यात उतरावे लागते. त्यासाठी ठराविक अंतरावर जीने बांधलेले आहेत. सध्याच्या मार्गाने खंदकात उतरल्यावर डाव्या बाजूला एक विहिर आहे. तसेच किल्ल्याच्या दक्षिण दिशेला खंदकात एक दर्गा आहे.

 आज आपल्याला किल्ल्यात जाण्यासाठी खंदकात उतरुन जावे लागते. पुरातत्व विभागाने त्यासाठी व्यवस्थित मार्ग बांधलेला आहे. खंदकाच्या भिंतीत कंधार गावाच्या बाजूला एक उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार आहे.  पूर्वीच्या काळी या खंदकावर काढता घालता येणारा पूल होता. खंदक पार करुन किल्ल्यासमोर पोहोचल्यावर भक्कम उत्तराभिमुख लोहबंदी दरवाजा आपल्याला दिसतो. या दरवाजावर लोखंडी खिळे मारलेले असल्यामुळे त्याला लोहबंदी दरवाजा हे नाव पडले आहे. या दरवाजावर थेट मारा करता येउ नये यासाठी त्यासमोर जीभीची भिंत बांधलेली आहे. 
छतावरील वीटांचे बांधकाम, कंधार किल्ला  

किल्ल्याला दोन तटबंद्या आहेत. लोहबंदी दरवाजा बाहेरच्या तटबंदीत आहे. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर वाट काटकोनात वळते. समोरच एक पूर्वाभिमुख मछली दरवाजा/मत्स्य दरवाजा आहे. मछली दरवाजावर दोन शिलालेख आहेत. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला एक फ़ारसी लिपीतील शिलालेख आहे. या दरवाजाच्या छतावर दोन मासे कोरलेले आहेत त्यावरुन या दरवाजाचे नाव मत्स्य दरवाजा उर्फ़  मछली दरवाजा असे पडले आहे. मछ्ली दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला भिंतीवर एक फ़ारसी लिपीतील शिलालेख आहे आणि समोर प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात दरवाजाच्या डाव्या बाजूला ६ देवड्या आहेत. या देवड्यांच्या शेवटी एक जीना आहे. त्याठिकाणी एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. दरवाजाच्या समोरच्या बाजूला  एक मजली इमारत आहे. त्या इमारतीला अंबरखाना म्हणतात. या इमारतीच्या भिंतीत एक व्यालाचे शिल्प पाहायला मिळते. राष्ट्रकुट काळातील किल्ल्यातील मंदिर आणि इतर वास्तू पाडून त्याचेच दगड किल्ल्याच्या पूर्नबांधणीसाठी त्यानंतरच्या इस्लामी शासकांनी वापरल्यामुळे असे अवशेष जागोजागी पाहायला मिळतात. किल्ल्याच्या बाहेरच्या भागात दरवाजा जवळ अंबरखाना (धान्यकोठार) असण्याची शक्यता कमी आहे. कारण किल्ल्याच्या आतही एक अंबरखाना आहे. या इमारतीचा उपयोग कचेरी सारखा होत असावा. कंधार प्रशासकीय किल्ला असल्याने, प्रशासकीय कामासाठी आलेल्या लोकांना किल्ल्यात प्रवेश करण्याची आवश्यकता पडू नये त्यांची काम बाहेरच्या बाहेर व्हावीत याकरीता याठिकाणी कचेरी असण्याची शक्यता जास्त आहे. आता या इमारतीत पुरातत्त्व खात्याच कार्यालय आहे. या अंबरखान्याच्या मागच्या बाजूस जो भव्य बुरुज आहे त्याला टेहळणी बुरुज म्हणतात. या बुरुजावर एक कमानदार छत असलेली एक खोली आहे. या खोलीत बसून किल्ल्याच्या दरवाजावर तसेच बाहेर नजर ठेवता येते.  

कंधार आणि मानसपुरी परिसरात सापडलेली शिल्प,कंधार किल्ला  

लोहबंदी दरवाजा, मछली दरवाजा आणि प्रांगणातल्या इमारती हा भाग बाह्य आणि आतल्या तटबंदीच्या मध्ये आहे. प्रांगणाच्या टोकाला आतील तटबंदीत एक भव्य दरवाजा आहे. या दरवाजाला रंगीन दरवाजा किंवा महाकाली दरवाजा म्हणतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला महाकाली बुरुज उर्फ़ धन बुरुज आहे. या बुरुजावर फ़ारसी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. रंगीन दरवाजाच्या डाव्या बाजूला भव्य बुरुज आहे. तो बुरुज शहा बुरुज किंवा इब्राहिमी बुरुज या नावाने ओळखला जातो. औरंगजेबाच्या काळात बहादूरशहा या किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने किल्ल्याच मजबूतीकरण केले. त्यावेळी हा भक्कम बुरुज बांधला. या बुरुजावर बाहेरच्या बाजूला एक आणि आतील बाजूला २ फ़ारसी लिपीतील शिलालेख आहेत.  रंगीन दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला भक्कम खांबांवर तोललेल्या कमानदार ओवर्‍या आहेत. या कमानदार छ्तावर पूर्वी चुन्यात कोरीवकाम केलेले होते व त्यात रंग भरलेले होते म्हणून या दरवाजाला रंगीन दरवाजा असे नाव पडले होते. पण पूरातत्व खात्याने दुरुस्ती करतांना येथे सिमेंटचा गिलावा केल्यामुळे केवळ उजव्या बाजूच्या कोपर्‍यात आपल्याला नक्षीचा एक रंगीत तुकडा पाहायला मिळतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला आपल्याला भव्य दगडी शिल्पाचे अवशेष दिसतात. यात नाकापासून डोक्या पर्यंतचा भाग, पावल, बीजपूरक फ़ळ धरलेले हात दिसतात. इ.स. १९६० मध्ये कंधार जवळ असलेल्या मानसपुरी गावातील श्री मानसपुरे यांच्या शेतात हे अवशेष मिळाले होते. राष्ट्रकुट नृपती कृष्ण तिसरा याने कंधार लेखात उल्लेख केलेल्या क्षेत्रपालीची ही मुर्ती असावी असा अंदाज आहे. कंधार गावात केलेल्या उत्खननात गणेशाच्या मुर्ती, पार्श्वनाथाचे मुर्ती व इतर अनेक मुर्ती मिळालेल्या त्याही या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे अवशेष पाहिल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूला महावीर जैनांची बसलेली मुर्ती आहे. ती मुर्ती पाहून त्याच्या बाजूला असलेल्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाकाली / धन बुरुजात एक वास्तू दिसते. या वास्तूत एक भूयार आहे. ही वास्तू तिजोरी किंवा जवाहिरखाना म्हणून वापरण्यात येत होती. त्यावरूनच महालकाली बुरुजाला धन बुरुज असे नाव नंतरच्या काळात पडले असावे. या वास्तूच्या समोरच्या बाजूस मशिदेचे उत्तराभिमुख प्रवेशव्दार आहे ते ओलांडून आपण मशिदीपाशी पोहोचतो. काकतीय राजा सोमदेव व महादेव यांनी याठिकाणी शिवमंदिर बांधले होते. ते पाडून निजामाच्या काळात मशिद बांधण्यात आली. शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुजवून त्याठिकाणी उत्तराभिमुख प्रवेशव्दार बांधण्यात आले. पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुजवले असले तरी त्याच्या दोन्ही बाजूना असलेली नागशिल्प आणि आजही पाहायला मिळतात. मशिदीच्या इमारतीची लांबी ५० फ़ूट व रूंदी २५ फ़ूट आहे. मशिदीवर तीन घुमट आहेत. मशिदीवर चार फ़ारसी लिपीतील शिलालेख आहेत. मशिदी समोर १५ फ़ूट लांब आणि १५ फ़ूट रूंद आणि ४ फ़ूट खोल तलाव आहे. या तलावाच्या मागच्या बाजूला शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार होते ते बंद करून त्याठिकाणी दोन मजली महाल बांधलेला आहे. मशिदीच्या बाजूला चुन्याचा घाणा, जात आणि शिवलिंग ठेवलेल आहे. 

मशिद, कंधार

मशिदीच्या बाजूने जाणार्‍या जीन्याने अंबरी बुरुजावर जाता येते. निजामाचा सेनापती मलिक अंबरने या बुरुजाची फ़ेरबांधणी केली. त्यामुळे हा किल्ल्यावरील सर्वात भव्य आणि मोठा बुरुज मलिक अंबरच्या नावाने ओळखला जातो. या बुरुजावर मकरमुख असलेली मोठी १५ फ़ूट लांब बांगडी तोफ़ आहे. तोफ़ेला दोन्ही बाजूला गोलाकार कडी आहेत. अंबरी बुरुजावरून फ़ांजीवर उतरून दक्षिण दिशेकडे चालत जाताना आपल्याला उजव्या बाजूला बुरुज तर डाव्या बाजूला किल्ल्याच्या आतल्या वास्तू दिसतात. अंबरी बुरुजा पासून दुसर्‍या बुरुजावर एक खोली आहे. पुढे गेल्यावर फ़ांजीला लागून डाव्या बाजूला एक उध्वस्त वास्तू आहे. तो शाही हमामखाना म्हणजेच शाही स्नानगृह आहे. किल्ल्यातील राणी महालात आणि राजवाड्यातही स्नानगृह आहेत त्या व्यतिरीक्त हे स्नानगृह बांधलेल आहे. यात पाणी आणण्यासाठी तांब्याचे नळ वापरलेले आहेत ते आजही पाहायला मिळतात. स्नानगृह पाहून परत फ़ांजीवर येऊन पुढे चालायला सुरुवात केल्यावर पुढच्या बुरुजावर खोली आहे. त्याच्या पुढील बुरुज (अंबरी बुरुजा पासून चौथा बुरुज ) दर्गा बुरुज या नावाने ओळखला जातो. कारण या बुरुजाच्या खाली खंदकात एका उंचवट्यावर दर्गा बांधलेला आहे. बुरुजावर चढल्यावर आपल्याला खंदकातील दर्गा आणि खंदकाच्या भिंतीत बाहेरुन पाणी आणण्यासाठी केलेला कमानदार बोगदा पाहायला मिळतो.  दर्गा बुरुजावरुन फांजीवर उतरल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून एका वास्तूचे छत दिसते . या छताला ९ गोल आकाराची,  ३ फुट व्यासाची तोंड दिसतात . हे किल्ल्यावरचे कैदखाने (तुरुंग) आहेत . त्याची उंची २० फूट आहे. यात कैद्यांना वरुनच सोडले जात असे तसेच कैद्यांना अन्न पाणी याच ठिकाणीहून सोडण्यात येत असे.



कैदखाने पाहून परत फांजीवर येउन दक्षिण तटबंदीतील शेवटच्या बुरुजापाशी पोहोचतो. हा बुरुज बहाद्दरपूर गावाच्या दिशेला असल्यामुळे त्याच नाव बहाद्दरपूर बुरुज आहे. बुरुजावर एक खोली व तोफ आहे. बुरुजावरुन खाली उतरुन आता फांजीवरुन पूर्वेला चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून (किल्ल्याचा आतल्या बाजूला) कैदखाना आणि त्याला लागूनच एक इमारत आहे. या इमारतीला लागून खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. पायर्‍यांनी खाली उतरल्यावर या ठिकाणी किल्ल्यावरील धान्यकोठार आहे. प्रवेशव्दाराच्या आतमध्ये कमानी असलेली ८ दालने आहे. अंबरखान्यात हवा खेळती राहावी यासाठी ३ फ़ूट उंचीचे व २ फ़ुट रुंदीचे झरोके ठेवलेले आहेत. वास्तूच्या बाहेर पाहारेकर्‍यांसाठी ३ खोल्या आहेत.  अंबरखान्याची वास्तू इंग्रजी "L" आकाराचे असून पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण तटबंदीला समांतर बांधलेली आहे. अंबरखाना पाहून परत फांजीवर येउन पुढे चालायला सुरुवात केल्यावर पूर्व तटबंदीतल्या शेवटच्या बुरुजापाषी पोहोचतो या बुरुजाचे नाव मानसपूरी बुरुज आहे. मानसपूर गावाच्या दिशेने असल्यामुळे त्याला हे नाव पडलेले आहे. मानसपूर बुरुजावर एक तोफ आणि एक खोली आहे.
शीश महाल (काच महाल), कंधार

मानसपूर बुरुजावरुन उतरून उत्तरेकडे चालत गेल्यावर दुसर्‍या बुरुजाखाली एक खोली आहे. त्यावर एक फ़ारसी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ आहे. बुरुजावरुन फांजीवर उतरुन चालत गेल्यावर उत्तर टोकावरचा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजावर एक तोफ आहे. बुरुजा समोर तटबंदीला लागून तीन मजली राणी महालाचे अवशेष आहेत . राणी महालात जाण्यासाठी फांजीवरुन जीना आहे . पुढे एक प्रवेशव्दार आहे. त्यातून आत गेल्यावर एक कमानदार बोळ आहे त्याच्या शेवटी पायर्‍या आहेत त्या चढून गेल्यावर आपला राणी महालाच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश होतो. या ठिकाणी अनेक दालन, त्यातील कोनाडे,  हौद,  स्नानगृह,  शौचालय आणि त्यात तांब्याच्या नळांद्वारे खेळवलेले पाणी पाहायला मिळते. राणी महालाच्या पुढे राजमहाल शहा बुरुजा पर्यंत पसरलेला आहे. राज महालातून शहा बुरुजावर चढून जाताना दोन कमानी असलेली छोटी प्रवेशद्वार आहेत.  एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. बुरुजावर चढून गेल्यावर दुसरा शिलालेख आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ तोंड खाली करुन उभी करुन ठेवलेली आहे. शहा बुरुज पाहून परत राणी महालात येउन खाली उतरणार्‍या पायर्‍याच्या वाटेवर पुन्हा दोन प्रवेशद्वार आहेत. राजमहाल, राणी महाल ही महत्वाची ठिकाणे दोन्ही बुरुज आणि इतर किल्ल्यापासून वेगळी करण्यासाठी सर्व दिशांना प्रवेशद्वार ठेवलेली आहेत. खाली उतरल्यावर आपण मानसपुरीहून मिळालेल्या मुर्ती ठेवल्या आहेत तेथे पोहोचतो. याठिकाणी आपली किल्ल्याची तटबंदीवरुन संपूर्ण प्रदक्षिणा होते. शहा बुरुजाच्या पायथ्याशी आणि जीन्याजवळ काही वास्तूंचे अवशेष आहेत. राजमहालात आणि राणी महालात काम करणार्या अधिकारी आणि नोकर वर्गासाठी या वास्तू बाधलेल्या असाव्यात.
दारु कोठार, कंधार

तटबंदी वरून किल्ला पाहिल्यावर किल्ल्याच्या आतील वास्तू पाहाण्यासाठी रंगिन दरवाजाच्या समोरच्या भागात जावे. या ठिकाणी एक चौकोनी विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. या परिसरात झालेल्या उत्खननात येथे सार्वजनिक हमामखाना (स्नानगृह ) असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या बाजूला जी दोन मजली उध्वस्त वास्तू दिसते ती नक्षी महाल या नावाने ओळखली जाते. या महालात ५ हौद व स्नानगृह व शौचालय यांच्या वेगळ्या वास्तू आहेत. हा महाल मुघल सरदार बहादूरखानने बांधला होता. नक्षी महालाच्या बाजूला एक प्रवेशव्दार आहे त्यातून आत गेल्यावर आपण एका उद्यानात पोहोचतो. या जागी शाही उद्यान होते. येथे असलेल्या हौदांमध्ये तांब्याच्या नळांव्दारे पाणी खेळवून कारंजी उडवली जात. हौदातील तांब्याचे नळ आजही पाहायला मिळतात. या उद्यानाच्या दुसर्‍या बाजूला एक प्रवेशव्दार आहे ते राजाबाघ प्रवेशव्दार या नावाने ओळखले जाते. हे सुंदर बांधणीचे प्रवेशव्दार राष्ट्रकुट काळातले असून त्याकाळी त्यावर दोन्ही बाजूला शरभाचे शिल्प होते. दरवाजा दुरुस्त करतांना पुरातत्व खात्याने ती शिल्प काढून टाकाली. त्यावरून याला पूढच्या काळात व्याघ्र दरवाजा आणि नंतर मुस्लिम शासकांच्या काळात बाघ दरवाजा असे नाव प्रचलित झाले. या व्याघ्र दरवाजाच्या बाजूला शीश महाल (काच महाल) आहे. हा महाल उत्तराभिमुख असून दोन मजली आहे.हा महाल १५ फ़ूट लांब व १० फ़ूट रुंद आहे. या महालात अनेक कोनाडे,  देवळ्या चुन्यात कोरलेल्या आहेत. यात विविध रंगाच्या काचा आरसे बसवून हा महाल सजवण्यात आला होता. या महालाच्या पूर्व भिंतीवर एक पाण्याचा छोटा कृत्रिम धबधबा ही तयार केला होता. त्यासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी येथे तांब्याचा नळही दिसणार नाही अशाप्रकारे आतल्या बाजूला बसवलेला आहे. या ठिकाणी लावलेल्या काचा आणि आरश्यांमुळे या महालाला शीशमहाल हे नाव पडल आहे. शीश महाल पाहून वाघ दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या कमानीतून बाहेर पडल्यावर समोर एक पाण्याचा हौद दिसतो, तर डाव्या बाजूला अनेक कमानी असलेले इंग्रजी "L" आकाराचे दारु कोठार आहे. त्यात अनेक आकारचे तोफ़गोळे पडलेले पाहायला मिळतात. दारू कोठार पाहून आल्या मार्गाने वाघ दरवाजा पाशी यावे. वाघ दरवाजातून बाहेर गेल्यावर उजव्या बाजूला दर्गा आहे. ही वास्तू १० फ़ुट लांब, १० फ़ूट रुंद आणि १० फ़ूट उंच आहे. त्यावर घुमटाकार छत आहे. ही एका सुफ़ी संताची कबर आहे . दर्ग्याच्या बाजूला कमानी असलेल्या वास्तू आहेत. त्याच्या बाजूला अनेक कोनाडे असलेला दोन मजली महाल आहे. महालाच्या समोर एक छत्री आहे.ती मुघल काळात राजपूत सरदाने बांधली असावी. या संकुलातून बाहेर पडतांना दोन कमानी आहेत. त्याच्या डाव्या बाजूला ज्या वास्तू आहेत त्यांना घोड्याच्या पागा म्हणतात. शाही घोडे येथे बांधले जात. कमानीतून बाहेर पडून उजव्या बाजूला वळल्यावर आपण लालमहालाच्या परिसरात जातो. निजामाच्या काळात हा महाल आणि त्यासमोरचा सुंदर तलाव बांधण्यात आला. तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी बांधलेली नक्षीदार नाली पाहाण्यासारखी आहे. या महालाच्या दक्षिण बाजूच्या कुंपणाच्या भिंतीत अनेक कोनाडे आहेत. याठिकाणी कबूतर खाना होता. लाल महाल पाहून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर समोर एक प्रवेशव्दार दिसते त्यातून पुढे गेल्यावर परिस विहिर आहे. त्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. बाजूला हत्तीची शिल्प कोरलेली आहेत. पायर्यांनी खाली न उतरता डाव्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आपण एका प्रांगणात येतो. याठिकाणी विहीरीच्या भिंतीला लागून जलमहाल बांधलेला आहे.उन्हाळ्याच्या दिवसात थंदावा मिळावा याकरिता या जलमहालाची निर्मिती राष्ट्रकुटांच्या काळात करण्यात आली होती. या महालाचे प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. जलमहाल १८ फ़ूट लांब आणि ११ फ़ूट रुंद आहे. त्याच्या छताची उंची १२ फ़ूट आहे. जलमहालाला विहिरीच्या बाजूला ३ खिडक्या आहेत. त्यातून विहिरीच्या पाण्यावरुन येणारी गार हवा महालात येते. महाल दोन मजली होता. पूर्णपणे दगडाने बांधलेला असल्याने बाहेरच्या उष्णतेने तो तापत नाही. आज महालाचा वरचा मजला नष्ट झालेला आहे. महालाच्या आतल्या बाजूस एका दगडी व्दार पट्टीवर गणपती आणि फ़ुल कोरलेली आहेत. या जलमहालात प्रवेश केल्यावर डाव्या १० फ़ूट लांब २ फ़ूट रुंद आणि ८ फ़ूट उंच खोली आहे. मुख्य जलमहालाला लागून एक वास्तू आहे . हा सुध्दा एक छोटा जलमहालच आहे. याचे प्रवेशव्दार उत्तराभिमुख असून ४ फ़ूट उंच आणि२ फ़ूट रुंद आहे. या जलमहालाला एकच झरोका आहे.   
पारस विहिर आणि जलमहाल

पारस विहिर आणि जलमहाल पाहून बाहेर आल्यावर तटबंदीच्या दिशेने गेल्यावर एक मशीदची इमारत दिसते, तीला एक खांबी मशिद म्हणतात. मशिदीच्या मागच्या बाजूला तटबंदी लगत घोड्याच्या पागा आहेत. मशिद पाहून परत विहिरीच्या प्रवेशद्वारापाशी येउन बाहेर पडल्यावर एक स्टेज आणि त्याच्या दोन्ही बाजूला इमारत दिसते . हा रंगमहाल आहे. या ठिकाणी नाचगाण्याचे कार्यक्रम होत असत. समोर बसण्यासाठी पटांगण आहे. मागच्या भिंतीत दिवे लावण्यासाठी कोनाडे केलेले आहेत. रंगमहाल पाहून समोर असलेल्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आपण राणी महाला समोरील बारादरी या इमारतीपाशी पोहोचतो. या इमारतीला चारही बाजूला मिळून कमानदार १२ खिडक्या आहेत. बारादरी महालाच्या दक्षिणेस १० वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. ही किल्ल्यावरील अधिकार्‍यांची निवासस्थाने असावीत.
लालमहाल


बारदरी पाहून रंगीन दरवाजापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ल्यावर या व्यतिरिक्त अनेक वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला तटा बुरुजांवर काही शिल्प आहेत. मानसपूरी बुरुजावर शरभ आणि हत्तीचे शिल्प आहेत. बहाद्दुरपुरा बुरुजावर दोन शरभ शिल्प आहेत. दर्ग्या जवळील बुरुजावत माकडाची शिल्प आहेत. किल्ल्याच्या बाहेरुन खंदका पलिकडून फ़ेरी मारतांना ही शिल्प पहाता येतात.

बारदरी


कंधार किल्ल्या सोबत आजूबाजूला असलेली ऐतिहासिक ठिकाणही किल्ल्या बरोबर पाहाता येतात.
१) कंधार गावात राष्ट्रकुटांनी बांधलेला जगत्तुंग सागर हा तलाव आहे.
२) कंधार किल्ल्यापासून १ किलोमीटरवर मानसपुरी हे गाव आहे. या गावात किल्ल्यात सापडलेल्या मुर्ती शांतीघाटावर ठेवलेल्या आहेत.
३) कंधार किल्ल्यापासून अर्धा किलोमीटरवर बहाद्दरपुरा हे गाव आहे. या गावात रस्त्यालगत आणि म्युझियम मध्ये काही मुर्ती ठेवलेल्या आहेत.

ही तीनही ठिकाणे पाहून मुखेड गावाकडे मोर्चा वळवला.

एखाद्या ठिकाणी भटकायला जातांना त्या परिसरावर मिळतील तितकी पुस्तक ,इंटरनेट वर उपलब्ध असलेली माहिती वाचायची सवय लागली आहे . इंटरनेटवर उपलब्ध असलेली गॅझेटियर हा भटकणाऱ्यासाठी खजिना आहे. इंग्रजानी स्वत:च्या सोयीसाठी बनवलेल्या या गॅझेटियर मध्ये भरपूर माहीती असते . त्यातच मुखेड, तडखेल , होट्टलच्या मंदिराची माहिती मिळाली ही तीनही ठिकाण आता बघायची होती.

शिव मंदिर, मुखेड

कंधारहुन मुखेड ३२ किलोमीटरवर आहे . मुखेड छोट गाव आहे . गावातल्या दाट वस्तीत शंकराचे पुरातन मंदिर आहे . मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि सिमेंटीकरणाने त्यामुळच्या सुंदर मंदिराचे केलेले विद्रूपीकरण डोळ्यात सलायला लागल होते. मंदिराच्या सभागृहाच्या पुढे कॉंक्रीटचा स्लॅब आणि पिलर टाकून एक्सटेंशन दिल होते. मुळचा कळस कोसळलेला आहे त्या जागी अतिशय बेढब कळस बांधला होता. मंदिरातील खांबावर सुंदर नक्षीकाम आणि मुर्ती कोरल्ता आहेत . त्या खांबावर आणि सर्वच दगडी बांधकामांवर गुलाबी ऑईलपेंट लावला होता. गर्भगृहाचे तर निळ्या टाईल्स लावून बाथरुम करुन टाकल होते . मंदिराच्या बाह्यभिंती कशा काय माहिती नाही पण या अत्याचारापासून वाचल्या होत्या . त्यावर सुरसुंदऱ्यान्च्या मुर्ती आहेत . एकंदरीत मुखेडच्या मंदिराने निराशाच केली.  

सिध्देश्वर मंदिर, होट्टल

मुखेड - होट्टल अंतर ५० किलोमीटर आहे. (नांदेड - होट्टल ९० किमी) आता होट्टल गाठण आवश्यक होते. पावसाळी वातावरण आणि वेळेशी चाललेली मारामारी यामुळे आम्ही जेवणाचा विचार सर्वानुमते रद्द केला आणि देगलूर गाठले . महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेल हे मोठ गाव. इथल्या लोकांच्या पेहरावात आणि भाषेच्या लहेजातही थोडा फरक होता. होट्टलचा रस्ता विचारुन आणि अमृततुल्य चहा पिउन होट्टल गाठल. गावा बाहेर दोन मंदिरांच संकुल आहे . जसजस मंदिरांच्या जवळ जायला लागलो तसतशी त्याची भव्यता आणि सुंदरता डोळ्यात भरायला लागली  संध्याकाळची वेळ असल्याने गावातली सगळी मुल मंदिर परिसरात खेळायला जमली होती. आम्ही म्हणजे त्यांना आयतीच करमणूक होती. जेथे जाऊ तेथे तू माझा सांगाती या उक्तीप्रमाणे ते आमच्या मागेमागे फिरत होते. फोटो काढणे कठीण झाले होते . त्यावर उपाय म्हणून त्यासर्वाना गोळा करुन एक ग्रूप फोटो काढला . त्यांना प्रत्येकाला तो दाखवला , मग मुल पांगली आणि आम्ही शांत पणे मंदिर पाहायला सुरुवात केली . 

सिध्देश्वर मंदिर, होट्टल


या ठिकाणी दोन मंदिर बाजूबाजूला असून एका मंदिराला सिध्देश्वर मंदिर आणि दुसर्‍या मंदिराला महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते.  पुरातत्व खात्याने मंदिराची नुकतीच पुनर्बांधणी करुन त्याला गतवैभव प्राप्त करुन दिलेले आहे. होट्टल गावात चालुक्यांनी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. त्यातील सोमेश्वर मंदिराला चालुक्य राजा विक्रमादित्य याने इसवीसन ११०१ मध्ये त्याच्या २६ व्या राज्यारोहण दिनानिमित्त दान दान दिल्याचा शिलालेख मंदिरात आहे. त्या अर्थी हे मंदिर ११ व्या शतकापूर्वी अस्तित्वात होते. या सिध्देश्वर मंदिराच्या बाह्यभिंतींवर अनेक सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. नृत्य गणेशाची एक सुंदर मुर्ती बाह्यभिंतीवर पाहायला मिळते. या गणेशाच्या बाजूला एक दगडी घट बसवलेला आहे. त्यात पाणी ओतले असता ते थेट गर्भगृहातील पिंडीवर पडेल अशी व्यवस्था केलेली आहे. देवकोष्ठात शंकराच्या विविध मुर्ती आहेत. गर्भगृहाच्या व्दारपट्टीवर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. छतावर सुंदर नक्षीकाम आहे. बाजूला असलेल्या महादेव मंदिरात सिध्देश्वर मंदिरापेक्षा शिल्प कमी प्रमाणात आहेत.   शिवाय गावात सोमेश्वर मंदिर आहे. सोमेश्वर मंदिर त्रिदल रचनेचे असून याला तीन गर्भगृहे आहेत.  ती अनुक्रमे ब्रम्हा, विष्णू, महेश यांची आहेत. 

दगडी घट,सिध्देश्वर मंदिर, होट्टल

नृत्य गणेश

सुरसुंदरी

सुरसुंदरी

सुरसुंदरी

















देगलूर ते तडखेड अंतर १२ किलोमीटर आहे. गावात शिरलो तेंव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. शंकर मंदिर कुठेय ? अस विचारल्यावर गावातल्या लोकांनी आम्हाला भरवस्तीत नेल आणि सिमेंटने बांधलेले एक मंदिर दाखवल . ते ओबडधोबड सिमेंटमध्ये बांधलेले मंदिर पाहून आल्या पावली मागे फिरावे अस वाटायला लागले. पण एवढे आलोच आहोत तर पाहून जाउया म्हणून मंदिराच्या जवळ गेलो तर दोन गाय वासरु खांब खांब पडलेले होते . त्यावर सुबक गाय वासरु कोरलेले होते आणि खाली तेलगू लिपीतला शिलालेख होता . गाय वासरू दगड महाराष्ट्रात अनेक गावात गायवासरु दगड उर्फ़ धेनुगळ पाहायला मिळतात धेनूगळ हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.
धेनुगळ, तडखेड 

शिलालेख , तडखेड 


मंदिरात शिरलो गर्भगृहाच्या बाजूला ४.' ५ " उंच आणि २ ' रुंद शिलालेख आहे . त्याची वरील बाजूस कलश कोरलेला आहे . त्याख्हालच्या पट्टीवर मध्यभागी पिंड कोरलेली आहे. त्या बाजूला चंद्र सुर्य कोरलेले आहेत आणि सर्वात बाहेरील बाजूस दोन्ही बाजूला बैल आणि तलवार कोरलेली आहे. . खाली तब्बल ४० ओळींचा तेलुगू लिपीतील शिलालेख आहे . कल्याणी चालुक्यांची सत्ता या भागावर होती त्यावेळी त्यांनी कोरुन घेतलेले अनेक तेलगु लिपीतील शिलालेख महाराष्ट्र पाहायला मिळतात. मंदिराच्या आजूबाजूच्या घरांचा बांधणीमध्ये जुन्या मंदिराचे अनेक अवशेष वापरलेले दिसत होते . एक चांगला ठेवा काळाच्या उदरात गडप झाला . आता पाऊसही सुरु झाला होता . रात्री उशिरा नांदेडला पोहोचलो. 

सकाळी नाश्ता करुन थेट गोळे गावातली गढी गाठली . मध्ययुगापासून  मराठवाड्यात अनेक वर्ष अस्थिर राजकीय परिस्थिती होती.  त्यामुळे परकीय सैन्य , दरोडेखोर यांच्या पासून संरक्षण होण्यासाठी गावच्या पाटलांनी , इनामदारानी गढ्या बांधलेल्या पाहायला मिळतात. ही गढी बामणाची म्हणजेच ब्राम्हण कुटुंबाची होती . ते सध्या इथे राहात नाहीत . गढी ज्याच्याकडे सांभाळायला होती तो कुलूप लावून बाजाराच्या गावी गेला होता. कोणीतरी आपल्या गावातली गढी बघायला आलय म्हटल्यावर गावातल्या मुलाना चेव आला . त्यांनी मोबाईलवर त्याला फोन लावला पण तो बधेना. मग आमची गाडी घेउन ती मुल १० किमीवरील त्या बाजाराच्या गावात गेली आणि त्याला घेउन आली . तो पर्यंत आम्ही गढीच्या बाजूला असलेला चौसोपी वाडा पाहीला. वाड्याच्या मालकाने चांगल्या प्रकारे ठेवला होता .
गोळे गावातली गढी 

जीप मध्ये चावीवाल्याला घेउन गावातली मुल विजयी वीराप्रमाणे आली आणि अख्खा गाव आमच्या बरोबर गढी बघायला आला . मग त्या चावीवाल्याने सगळ्यांना हाकलवल. तरी काही बायका आमचे कपडे उडून वाड्यात पडलेत ते घ्यायचेत म्हणून आले . २० फुटी भिंतीवरुन वाळत घातलेले कपडे कसे काय वाड्यात गेले हा प्रश्न आम्हाला पडला . 

चौसोपी वाडा

अशा प्रकारे गावातल्या लोकांची पांगापांग केल्यावर चावीवाल्याने दार उघडल . गढी म्हणजे मिनी किल्लाच असतो. छोट्या दरवाजाच्या आत पाहारेकर्यांसाठी देवडी होती . पुढे तटबंदी काटकोनात वळून दुसरा मोठा दरवाजा होता . त्याला दिंडी होती दिंडीतून आत गेल्यावर चौसोपी वाडा होता . सागात आणि शिसवी लाकडात बनवलेल्या या एक मजली वाड्याची पडझड झाली होती . वाड्याला लागून विहीर होती. तटबंदीवर चढण्यासाठी जीना होता . तटबंदीत बंदुकीतून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्यांची रचना केलेली होती . वाडा पाहून नांदेड गाठल . नांदेडचा सचखंड श्री हुजुर साहेब गुरुव्दारा आणि परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवलेला आहे. ते पाहूनच मन प्रसन्न झाले. गुरुव्दाराचे दर्शन घेउन लंगर गाठला . लंगर मधील स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेउन नांदेड किल्ला पाहाण्यासाठी निघालो.

गोदावरी नदीच्या काठी वसलेले नांदेड हे प्राचीन शहर आहे. या शहरात गोदावरी नदीच्या उत्तर तटावर नंदगिरी नावाचा किल्ला होता. आज किल्ल्याचे काही अवशेषच उरले आहेत. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही त्यावर नांदेड महानगरपालिकेने पाण्याच्या दोन टाक्या आणि बंगले बांधून किल्ल्याचा उरलेला भागही गिळंकृत केला आहे. किल्ल्यावरील पुष्कर्णीचे चुकीच्या पध्दतीने नुतनीकरण केलेले आहे.
पुष्कर्णी, नांदेड किल्ला

नांदेड शहराच्या जुन्या भागातील अरब गल्लीत गोदावरीच्या पात्रा लगत किल्ल्याचे अवशेष उरलेले आहेत. नंदीतट, नंदीनगर, नंदीग्राम, इत्यादी नावाने इतिहासात प्रसिध्द असलेल हे नगर नंद वंशातील राजाने वसवलेले होते. पैठण ही नंदवंशाची दक्षिण भारतातली राजधानी होती.तर नंदआहार आणि नवनंदडेरा ही उपराजधानी होती. याच नवनंदडेरा या नावाचा अपभ्रंश होऊन नांदेड हे आजचे नाव प्रचलित झाले. नांदेड हे शहर उपराजधानी आनि व्यापारी केंद्र असल्याने त्याकाळी त्या शहराला संरक्षणासाठी तटबंदी असणार. नांदेड हा नगर किल्ला होता.सातवहानांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपिठ होते.सांचीच्या स्तुपावरील दानलेखात त्याचा उल्लेख आहे. वाकाटक त्यानंतर चालुक्य ,राष्ट्रकुट व गंग यांच्या काळात नांदेड हे प्रसिध्द शैक्षणिक केंद्र आणि वैभवशाली नगर म्हणुन प्रसिध्द होते.त्यानंतरच्या काळात बहामनी, मुघल आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाकडे हा किल्ला होता.  

नांदेड जिल्ह्यात रेणूका देवीचा माहूरगड हा किल्लाही आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.   



Saturday, October 14, 2017

ऑफ़बीट मराठवाडा (धाराशिव (उस्मानाबाद), लातुर) Offbeat Maratwada (Ausa, Udgir, Nilangeshwar Mandir, Ter, Dharashiv Caves & Kharosa Caves )

पर्यटनासाठी घराबाहेर पडायचे म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर पुण्या मुंबई जवळची नेहमीचीच ठिकाणे येतात. पर्यटनासाठी धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, धारुर, नांदेड असा फ़ारसे ग्लॅमर नसलेल्या जिल्ह्यात जायचे म्हटल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. डोक्याला फारच ताण दिला तर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर आणि नळदुर्ग ही ठिकाण आठवतात, पण धाराशिव (उस्मानाबाद), तुळजापूर जवळ असलेले तेर गाव मात्र आठवत नाही. जगभराच्या पुरातत्वीय अभ्यासक, इतिहासकार, कला अभ्यासक यांना तेर पूर्वीपासूनच सुपरिचित आहे ते तेर येथील रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयामुळे. याशिवाय तेरणा नदीकाठी असलेले संत गोरा कुंभार (गोरोबाकाका) यांचे मंदिर त्याच्या बाजूलाच असलेले चालुक्यकालिन शिवमंदिर, पूर्णपणे वीटांनी बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव उत्तरेश्वर मंदिर व एखाद्या चैत्याप्रमाणे प्रमाणे रचना असलेले महाराष्ट्रातील एकमेव त्रिविक्रम मंदिर, नृसिंह मंदिर ही ठिकाणे अर्ध्या दिवसात पाहून होतात. त्याच बरोबर धाराशिव लेणी उस्मानाबाद जवळ आहेत तीही पाहाता येतात. अशा प्रकारे पहिला दिवस सत्कारणी लावल्यावर दुसर्‍या दिवशी औसा किल्ला, खरोसा लेणी, निलंगेश्वर मंदिर आणि उदगिर किल्ला ही ठिकाणे पाहाता येतात. 
नळदुर्ग किल्ला पाहाण्यासाठी पूर्ण एक दिवस लागतो. त्यामुळे नळदुर्ग किल्ला तिसर्‍या दिवशी पाहून सोलापूर मार्गे परतीचा प्रवास करता येतो.
 तेर (TER)



तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या तेर उर्फ़ तगर येथे इसवीसन पूर्व चौथ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. इसवीसनाच्या दुसर्‍या शतकात सातवाहन काळात तेर हे महाराष्ट्रातील व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणुन उदयाला आले. येथुन भडोच या बंदरा मार्गे रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे. याप्रदेशात पिकणार्‍या कापसा पासून बनवलेले सुती तलम कापड, लाकूड, शंखाच्या बांगड्या, इत्यादी वस्तूंना रोमन साम्राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी होती. या व्यापारामुळे तगर नगराची भरभराट झाली. परदेशी प्रवासी टॉलेमी आणि ग्रीक खलाश्याने लिहिलेल्या "पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन सी" या प्रवास वर्णनात तगर नगराचा उल्लेख सापडतो. त्याच कलावधीत बौध्द धर्मियांनी तगर येथे धार्मिक केंद्र उभारले. सातवाहनांनंतर आलेल्या गुप्त चाकुक्यांपासून ते यादवांपर्यंत सर्व राजवटींनी या नगरात अनेक मंदिरे बांधली. मध्ययुगीन कालखंडात इतर व्यापारी केंद्रे उदयास आल्याने तगर विस्मृतीत गेले. इसवीसन १९०१ मध्ये हेन्री कझिन यांनी तेर येथे सविस्तर पाहाणी करून वृत्त्तांत प्रसिध्द केला. त्यानंतर तेर येथे वेगवेगळ्या कालखंडात पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले.   

रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय (Ramlinga Khandappa Lamture Museum)


तेर गावात शिरल्यावर प्रथम लागते ते रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय. आपल्या गावात परदेशी प्रवासी येतात आणि इथल्या पांढरीच्या टेकाडावरून जून्या पुराण्या वस्तू घेऊन जातात हे पाहून लहान रामलिंगप्पाच कुतुहल चाळवल. त्याने हेडमास्तरांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी तेर गावच्या इतिहासाबद्दल आणि इथे मिळणार्‍या वस्तूंच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल रामलिंगप्पला माहिती सांगितली. त्यानंतर रामलिंगप्पांनी अशा वस्तू जमवायला सुरुवात केली. हळूहळू गावकर्‍यांनीही आपल्याला सापडलेल्या वस्तू त्यांना आणुन द्यायला सुरुवात केली. अशाप्रकारे रामलिंगप्पांचा संग्रह वाढत गेला. आयुष्यभर जमवलेला संग्रह त्यांनी १९७२ मध्ये शासनाच्या हवाली केला. तोच २२८९२ वस्तूंचा संग्रह आपल्याला रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयात पाहायला मिळतो. यामध्ये सातवाहन, चालुक्य कालिन नाणी, मातीची भांडी, दगडात, मातीत बनलेल्या मुर्ती, प्राणी प्रतिमा, पदक, दगडात कोरलेले शिलालेख, गध्देगाळ, नक्षीकाम, शंखाच्या बांगड्या, वस्तू, हस्तीदंती वस्तू, पाण्यावर तरंगणारी वीट इत्यादी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या संग्रहालयातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सहाव्या सातव्या शतकातील उत्तरेश्वर मंदिराची लाकडी चौकट. मंदिराच्या गर्भगृहाची ही चौकट चिखलात पडून राहील्याने इतक्या वर्षानंतरही तशीच्या तशी होती. पुरातत्व खात्याने त्यावर काम करुन ती संग्रहालयात ठेवलेली आहे. त्यावरील मुर्ती, नक्षीकाम, कोरीवकाम पाहाण्य़ासारखे आहे.  (वस्तुसंग्रहालयात छायाचित्रण करण्यास मनाई आहे.) 

काळेश्वर मंदिर 

संत गोरोबा मंदिर आणि काळेश्वर मंदिर  (Goroba Mandir & Kaleshwar Mandir)


    वस्तू संग्रहालय पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण गोरोबाकाकांच्या मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणी वारकरी आणि भक्तांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. गोरोबा काकांच्या मंदिराच्या बाजूला चालुक्य काळातले काळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दोन सुंदर वीरगळ पाहायला मिळतात. मंदिराचा कळस आणि गर्भगॄह ढासळलेला आहे त्याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. पण त्याभोवती सिमेंटचा विचित्र कट्टा बांधून सध्या कळसाला आधार दिलेला आहे. पण त्यामुळे कळसाची शोभा गेलेली आहे. मंदिर परीसरात अनेक पिंडी, सतीशिळा आणि समाधी पाहायला मिळतात.

उत्तरेश्वर मंदिर  (Uttareshwar Mandir,Ter)

उत्तरेश्वर मंदिर


गोरोबाकाका मंदिर पाहून तेरणा नदी ओलांडून गेल्यावर दाट वस्तीत असलेल्या उत्तरेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. ६-७ व्या शतकात कलचुरी राजवटीत संपूर्णपणे वींटांमध्ये बांधलेले हे एकमेव मंदिर आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. मंदिराच्या बांधकामात शोभा आणण्यासाठी विविध प्रकारच्या नक्षीकाम, मकरशिल्प असलेल्या वीटा खास बनवून वापरलेल्या आहेत. मंदिराच्या पाया व भिंतींसाठी भरीव आणि जड वीटा वापरलेल्या असून कळसासाठी मात्र हलक्या वीटा वापरलेल्या आहेत. जेणेकरून कळसाचे वजन कमी होईल. कळसासाठी ज्या वीटा बनवल्या आहेत त्या इतक्या हलक्या (त्याचवेळी शिखराचे वजन पेलण्या इतक्या मजबूत) आहेत की त्या पाण्यावर तरंगतात. वस्तूसंग्रहालयात आपल्याला अशाप्रकारची वीट पाण्यावर तरंगणारी वीट पाहायला मिळते.  वजनाने हल्की आणि तरीही मजबूत अशी वीट बनवण्यासाठी मातीत मोठ्या प्रमाणावर तुस मिसळले जाते. ही वीट उच्च तापमानाला भाजल्यावर त्यातील तूस जळून जाते आणि सच्छिद्र पोकळ्या तयार होतात. अशाप्रकारे हलकी आणी मजबूत वीट बनवली जात असे. उत्तरेश्वर मंदिराच्या बाहेर काही वीरगळ पाहायला मिळतात. 


उत्तरेश्वर मंदिर










त्रिविक्रम मंदिर
त्रिविक्रम मंदिर (Trivikram Mandir,Ter)

उत्तरेश्वर मंदिरापासून ५ मिनिटाच्या अंतरावर चैत्य गृहासारखी गजपृष्ठाकार रचना असलेले त्रिविक्रमाचे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिरही पूर्ण वीटांध्ये बांधलेले असून मंदिरात श्री विष्णूची त्रिविक्रम मुर्ती आहे. मुर्तीच्या पायाशी बळी, शुक्राचार्य आणि बळीच्या पत्नीची मुर्ती असून बाजूला भैरवाची मुर्ती आहे. मंदिरातील कानडी शिलालेखानुसार शके १००० मध्ये कळचुर्य घराण्यातील महामंडळेश्वर जोगम्रस याचा उल्लेख आहे. मंदिरा समोर असलेल्या मंडपात गरुडाची मुर्ती आहे. 

त्रिविक्रम मंदिर


जाण्यासाठी :- धाराशिव (उस्मानाबाद) रस्त्याने आणि रेल्वेने इतर शहरां जोडलेले आहे. धाराशिव (उस्मानाबाद) हून २५ किमी आणि तुळजापूरहून ५० किमी अंतरावर तेर गाव आहे. गावात खाण्या पिण्याची सोय आहे.

तेर गावाची सफ़र करुन धाराशिव (उस्मानाबाद) कडे मोर्चा वळवावा. उस्मानाबाद म्हणजेच पूर्वीचे धाराशिव. या नगराकडे येणार्‍या मार्गावर धाराशिव लेणी आहेत.

धाराशिव लेणी  Dharashiv Caves, Osmanabad)

धाराशिव लेणी


      लेणी आणि संपन्न व्यापारीमार्ग यांच एकदम घट्ट नात आहे. प्राचीनकाळी पैठण, तेर या शहरांमधून विविध प्रकारचा माल पश्चिम किनार्‍या वरील भडोच, शुर्पारक(सोपारा), कल्याण, चौल इत्यादी बंदरात  व्यापारी मार्गाने जात असे. पश्चिम किनार्‍यावरील बंदरा मार्फत परदेशाशी होणार्‍या या व्यापारामुळे व्यापार्‍यांची भरभराट होत होती. त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून व राजाश्रयामुळे महाराष्ट्रात अनेक लेणी खोदली गेली. त्यामुळे संपन्न बंदरे, व्यापारी मार्ग, बाजारपेठा, राजधान्या यांच्या आसमंतात ही लेणी मुख्यत्वे करुन आढळतात. या लेण्यांचा धार्मिक कार्यासाठी आणि व्यापारी मार्गावरील विश्रांती स्थाने म्हणुन उपयोग होऊ लागला. व्यापार्‍यांनी दिलेल्या दानातून या लेण्यंचा दैनिक खर्च चालत असे, अशी परस्पर पूरक व्यवस्था समाजातल्या या दोन्ही घटकांच्या सोयीची होती. 


 पैठण , तेर (तगर) नगरांपासून जाणार व्यापारी मार्ग धाराशिव (म्हणजे आजचे उस्मानाबाद) या प्राचीन शहरातून जात असे. या व्यापारी मार्गावर धाराशिव शहरा नजिक सहाव्या शतकात बालाघाट डोंगररांगेत लेणी खोदण्यात आली. ती लेणी धाराशिव लेणी म्हणुन आजही प्रसिध्द आहेत. बौध्द, हिंदू, जैन अशी एकूण ११ लेणी या परिसरात आहेत. याशिवाय येथे एक समाधी मंदिर आहे. त्याच्या बांधकाम शैली वरुन ते सतराव्या शतकात बांधले असावे.



 उस्मानाबाद शहरापासून ७ किमी वर धाराशिव लेणी आहेत. जेथे रस्ता संपतो तेथून लेण्यांपर्यंत खाली उतरण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍या उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बजूला एक ठळक पायवाट दिसते. या पायवाटेने पुढे गेल्यावर ठराविक अंतरावर ३ हिंदू लेणी पाहायला मिळतात. त्यातील दुसर्‍या लेण्यात रामायण महाभारत आणि हिंदू पुराणातल्या कथांवर आधारीत शिल्पपट कोरलेले पाहायला मिळतात. हिंदू लेणी पाहून परत पायर्‍यांपाशी येऊन खाली उतरल्यावर आपण बौध्द लेण्यांपाषी पोहोचतो. यातील दुसरे लेणे भव्य असून त्याला दगडात कोरलेले कमानदार प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस व्दारपाल कोरलेले आहेत. आत गेल्यावर उजव्या बाजूला दगडात कोरलेल्या स्तूपाचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी सुरुवातीची काळात बौध्द लेणे होते. त्या लेण्यात मुचलिंड बुध्दाची मुर्ती होती. या मुर्तीत आणि पार्श्वनाथांच्या मुर्तीत असलेल्या साम्यामुळे नंतरच्या काळात ही लेणी जैन लेणी म्हणुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्यातल्या मुळ मुर्तींना आज वेगळ्याच देवतेचे नावाने पुजलेल्या पाहायला मिळतात.

स्तुपाचे अवशेष पाहून पायऱ्या चढून लेण्यात प्रवेश करतांना ओवरीच्या खालच्या बाजूस भार्गव कोरलेले पाहायला मिळतात. लेण्याची रचना ओवरी , सभामंडप त्याच्या दोन्ही बाजूला असलेले विहार आणि गर्भगृह अशी आहे. आजच्या तारखेला ओवरी नष्ट झालेली आहे. सभामंडप २० खांबांवर तोललेला आहे. या खांबावर खूप सुंदर नक्षीकाम होते . लेण्याची दुरुस्ती करतांना ते नष्ट झाले . आता फक्त उजव्या बाहेरच्या कोपऱ्यातल्या खांबावर नक्षीकाम पाहायला मिळते . सभामंडपाच्या दोन्ही बाजूला ७ खोल्या आहेत. गर्भगृहात पार्श्वनाथाची मुर्ती आहे .

समाधी मंदिर 


या लेण्या समोरच मराठा सरदाराची समाधी मंदिर आहे . त्याची रचना मराठेशाहीतील वाड्याप्रमाणे आहे . गाभाऱ्यात शिवपिंडीची स्थापना केलेली आहे . गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस कमानदार ओवऱ्या आहेत. गाभाऱ्या समोर असलेल्या दारातून आणि कळसातून फक्त पिंडीवर प्रकाश पडेल अशी योजना केलेली आहे . मंदिरासमोर वीरगळ आणि ३ समाध्या आहेत.

समाधी मंदिर 


या नेहमीच्या गडबडीपासून लांब असलेल्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात लेणी आणि मंदिर पाहाता पाहातांना आपला काही शतकांचा कालप्रवास होतो.



तुळजापूर , धाराशिव लेणी आणि तेर ही तीनही ठिकाण खाजगी वहानाने एका दिवसात पाहून होतात.

जाण्यासाठी :- धाराशिव (उस्मानाबाद) रेल्वेने आणि रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. उस्मानाबाद पासून ७ किमीवर धाराशिव लेणी आहेत. ती आडबाजूला असल्याने खाजगी वाहानाने लेण्यांपर्यंत जाता येते.

औसा किल्ला  (Ausa Fort)


लातूर जिल्ह्यातील उदगीर व औसा हे दोन सुंदर भूईकोट किल्ले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे किल्ले निजामाच्या संस्थानात असल्यामुळे नांदते होते. संस्थानाची सरकारी कार्यालये या किल्ल्यात असल्याने या किल्ल्यांवरील बहुतेक इमारतींचा वापर बदलला तरी त्या शाबूत आहेत. तसेच हे किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्यांनी डगडूजी केल्याने किल्ल्यांची शान अजूनही टिकून आहे. भूईकोट किल्ल्यांची सर्व वैशिष्ट्ये या किल्ल्यांमध्ये पहायला मिळतात. औसा किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आढळणारे मोर. किल्ल्यावरील झाडी, आजूबाजूची शेती व कमी माणसांचा वावर यामुळे या किल्ल्यात अनेक मोर पहायला मिळतात. स्वत:चे वहान असल्यास औसा किल्ल्याबरोबर खरोसा येथील लेणी, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर व उदगीरचा किल्ला ही ठिकाणे एका दिवसात पहाता येतात.



औसा गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या लोहबंदी दरवाजा पर्यंत जाऊ शकतो. औसा गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामूळे  किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४० फूट खोल व २० फूट रूंद खंदक खोदलेला आहे. हा खंदक दोनही बाजूनी बांधून काढलेला आहे. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशव्दारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. हा पूल सूर्यास्तानंतर व युध्द प्रसंगी उचलून (काढून) घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर खंदकात काही घर (वस्ती) आहेत व इतर बाजूच्या खंदकात सध्या शेती केली जाते.


औसा किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात १२ बुरुज आहेत. बाहेरील तटबंदीवर २ फूट रुंद व ३ फूट उंच चर्या आहेत. आतील तटबंदी १०० फूट उंच असून त्यात १२ बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. खंदक ओलांडून जातांना खंदकात पायर्‍या असलेल्या दोन विहिरी आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे ४ दरवाजे आहेत. किल्ल्यात चांद विहिर, तवा विहीर, कटोरी विहिर अशा तीन विहिरी आहेत. किल्ल्यात अनेक वैशिष्य़्पूर्ण तोफ़ा आहेत. त्यात एक  ७ फूट ४ इंच लांब व २ फूट ४ इंच व्यासाची पंचधातूची तोफ आहे.या तोफेवर फारसीतील शिलालेख आहे व मागच्या बाजूला सूर्यमुख कोरलेल आहे.


औसा किल्ल्यावरील अजून एक वेगळी वास्तू म्हणजे "जलमहाल". एका बांधीव तलावाच्या खाली हा महाल आहे . महालात उतरण्यासाठी तलावाच्या एका बाजूला जीना आहे. विजेरी घेऊन यात उतरावे लागते. खाली उतरल्यावर आतमध्ये अनेक कमानी असलेला महाल पहायला मिळतो. या महालात हवा आणि प्रकाश आत येण्यासाठी छ्तामध्ये झरोके अशाप्रकारे बांधलेले आहेत की त्यांचे तोंड तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर उघडेल. यामुळे तलावात पाणी भरले तरी महालाच्या  छ्तामध्ये असलेल्या झरोक्यातून पाणी खाली येत नसे. या महालाचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात रहाण्यासाठी केला जात असे. जमिनी खाली बांधलेला महाल व वर असलेले तलावातील पाणी यामुळे महालात गारवा असे. या महालाचा उपयोग खलबतखाना म्हणूनही होत असावा.

औसा किल्ल्यापासून २३ किमी अंतरावर खरोसा लेणी आहेत.

 खरोसा लेणी  (Karosa Caves)




लेणी म्हटल की आपल्या डोळ्यासमोर अजिंठा, वेरुळ आणि सह्याद्रीच्या कानाकोपर्‍यात काळ्या बेसॉल्ट मध्ये खोदलेली सुबक लेणी येतात. बेसॉल्ट व्यतिरीक्त महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात आढळणारा दुसरा दगड म्हणजे जांभा दगड. हा दगड सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने लेणी खोदण्यासाठी हा दगड निकृष्ठ प्रतीचा  समजला जातो. त्यामुळे जांभा दगडात सहसा लेणी खोदलेली पाहायला मिळत नाहीत. कोकणापासून काहीशे मैल दुर असलेल्या लातूर जिल्ह्यातील खरोसा गावाजवळ एक चक्क जांभा दगडाचा डोंगर आहे. लाखो वर्षापूर्वी पृथ्वीच्या पोटात झालेल्या उलथापालथीमुळे याठिकाणी या जांभ्या दगडाच्या डोंगराची निर्मिती झाली. ती का आणि कशी झाली ह्यावर भूगर्भशास्त्रज्ञांची अनेक मत आहेत. ती आपण बाजूल ठेऊया. पण याभागात असलेल्या या वेगळ्याच प्रकारच्या लालसर रंगाच्या दगडाचे त्यावेळच्या लेणी खोदणार्‍या कलाकारांना आकर्षण वाटल असेल आणि त्यातूनच या ठिसूळ दगडात त्यांनी लेणी कोरायचे आव्हान स्विकारल असेल. इसवीसनाच्या सातव्या आठव्या शतकात चालुक्य राजवटीत या लेण्यांची निर्मिती झाली असे मानले जाते.



लातूर निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोट्या डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. पहिले लेणे बौध्द लेणे असून लेण्याच्या बाहेर स्तुपाचा उरलेला भाग पाहायला मिळतो. लेण्यात बुध्दाची मुर्ती आहे. दुसरे लेणे हे ब्राम्हणी (हिंदु) लेणे असून ते दोन मजली आहे. लेण्याच्या खालच्या आणि वरच्या मजल्यावर सभामंडप आणि गर्भगृह, प्रदक्षिणापथ अशी रचना पाहायला मिळते. लेण्याच्या भिंतीवर शिव, विष्णू, ब्रम्हा, व्दारपाल, शिवलिंग कोरलेली आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जीना आहे. जीन्याने वर गेल्यावर खांबांवर तोललेला भव्य सभामंडप आणि गाभार्‍यात शिवलिंग पाहायला मिळते. तिसरे लेणे महादेव लेणे हे महत्वाचे लेणे आहे. येथे शैव आणि वैष्णव पंथांचा मिलाप झालेला पाहायला मिळतो. लेण्याच्या बाहेरच्या भिंतीवर डाव्या बाजूला शंकर आणि उजव्या बाजूला कोदंडधारी राम आणि लेणी बांधण्यासाठी दान देणार्‍या दांपत्याच शिल्प कोरलेल आहे. आतल्या बाजूला सभामंडपाच्या डाव्या भिंतेवर शिवाची गजासूरवध, उमामहेश्वर, रावणानुग्रह इत्यादी शिल्प कोरलेली आहेत. तर उजव्या बाजूच्या भिंतीवर विष्णु अवतारातील गोवर्धन पर्वत उच्लणारा कृष्ण, वराह, नृसिंह, वामन यांची शिल्प कोरलेली आहेत. गाभार्‍यात शिवलिंग आहे. गाभार्‍याच्या दारावर व्दारपाल व नाग कोरलेले आहेत. गाभार्‍याच्या भिंतीवर राम रावण युध्द आणि अमृतमंथनाचे शिल्प कोरलेले आहे. पुढचे महत्वाचे लेणे म्हणजे लाकोले लेणे यात महिषासूरमर्दिनी, गणेश यांची शिल्पे आहेत आणि गाभार्‍यात विष्णुची मुर्ती आहे. याशिवाय सहाव्या - सातव्या लेण्यासमोर ठळकपणे दिसणारे हत्ती आपले लक्ष वेधून घेतात. लेण्यांच्या वरच्या बाजूला डोंगर माथ्यावर रेणुकादेवीच मंदिर आणि सीता न्हाणी नावचा पाण्याचा साठा आहे. खाजगी वहानाने औसा किल्ला, खरोसा लेणी आणि निलंगा गावातील प्राचीन नीलकंठेश्वराचे मंदिर एका दिवसात पाहुन होते. 


जाण्यासाठी :-
लातूर - निलंगा - बिदर रस्त्यावर लातूर पासून ४३ किमीवर व औसा पासून २३ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावापुढे असलेल्या डोण्गरावर लेणी आहेत. एक पक्का रस्ता थेट डोंगरावरील लेण्यांपर्यंत जातो. 

खरोसापासून १० किमीवर निलंगा गाव आहे.

निलंगेश्वर मंदिर  (Nilangeshwar Mandir, Nilanga)




लातूर - उदगिर रस्त्यावर लातूर पासून ६३ किमीवर निलंगा गाव आहे. तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या या गावात भर वस्तीत निलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे सभामंडप अंतराळ आणि तीन गर्भगृह अशी रचना आहे. मंदिराचे छत २८ स्तंभ आणि २२ अर्ध स्तंभांवर तोललेले आहे. मंदिराचे शिखर अस्तित्वात नाही. मंदिरातील स्तंभांवर आणि छतावर कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर सुरसुंदरींच्या विविध प्रकारच्या मुर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात. बाह्य भिंतींवरील देव कोष्टकात महिषासूर मर्दीनी,शिव,वराह, विष्णू नरसिंह यांच्या मुर्ती आहेत. मंदिराला राखाडी रंगाच्या ऑईलपेंटने रंगवून दगडाचा नैसर्गिक काळा रंग झाकून टाकलेला आहे. 

                                                                                   
























उदगिर (Udgir Fort)



लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे. बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव "उदयगिरी" होते. काही ठिकाणी याचा उल्लेख "उदकगिरी" या नावानेही येतो. या डोंगररांगेत लेंडी नदीचा उगम होत असल्यामुळे या परीसराला हे नाव मिळाले असावे. अगदी पुराण काळापासून या नगरीचे उल्लेख सापडतात त्यामुळे या शहराला  ऎतिहासिक व आध्यात्मिक मह्त्व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे.


उदगिर किल्ल्याचा उल्लेख ११ शतकातील शिलालेखांमध्ये येत असला तरीही या नगरीचा उल्लेख पूराण कथांमध्येही आढळतो. करबसवेश्वर ग्रंथ या पोथीतील कथे नुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींनी आशिर्वाद दिला,"मी या ठिकाणी लिंग रुपाने येथे प्रगट होईन." त्यानुसार काही काळाने जमिनीतून एक लिंग हळूहळू वर आले. पुढील काळात याठिकाणी वस्ती वाढून नगर वसले त्याला उदलिंग ॠषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले. आजही किल्ल्यात उदगिर महाराजांचा मठ व शिवलिंग आहे.

उदगीर हा भूईकोट किल्ला आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्यामूळे त्यातील अवशेष आजही अस्तित्वात आहेत. किल्ल्याला चार भक्कम दरवाजे आहेत. दिवाने आम, दिवाने खास, नर्तकी महाल, हवा महाल इत्यादी महाल आहेत. किल्ल्यात अनेक फ़ारसी शिलालेख आहेत.


धाराशिव (उस्मानाबाद) परिसरातील अपरिचित काटीच्या मशिदीची माहीती वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.
https://samantfort.blogspot.com/2019/12/blog-post_18.html